23/04/2026
मा.
भाजप वरिष्ठ नेतृत्व,
भारतीय जनता पार्टी
विषय : मा. संजय केणेकर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी देण्याबाबत मनापासून विनंती
महोदय,
काही प्रवास हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नसतात… ते प्रेरणेचे, जिद्दीचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण असतात. छत्रपती संभाजीनगरच्या मातीतून उभा राहिलेला मा. संजय केणेकर यांचा प्रवास हाच त्याचा खरा पुरावा आहे.
गुलमंडीतील साधा नारळ विक्रेता म्हणून सुरुवात… हातात मोठी साधनसंपत्ती नव्हती, पण मनात प्रचंड जिद्द आणि पक्षनिष्ठा होती. त्या जिद्दीच्या बळावर त्यांनी एक एक पायरी चढत आजवरचा राजकीय प्रवास घडवला. 1988 पासून विद्यार्थी संघटना (ABVP) मधून सुरू झालेला त्यांचा प्रवास, भारतीय जनता पक्षात तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ सातत्याने काम करत वॉर्ड अध्यक्ष, शहराध्यक्ष, तसेच प्रदेश सरचिटणीस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
अवघ्या 23 व्या वर्षी उपमहापौर पद भूषवणारे हे नेतृत्व, तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम करत त्यांनी जनतेच्या प्रश्नांशी घट्ट नाळ जोडून ठेवली. ही पदे त्यांनी केवळ भूषवली नाहीत, तर प्रत्येक पदावर कामगिरीची वेगळी छाप उमटवली.
आजच्या राजकारणात “नेतृत्व” सहज मिळतं, पण “कार्यकर्तेपण” जपणं कठीण असतं आणि संजय केणेकर हे नाव म्हणजे त्या कार्यकर्तेपणाची खरी ओळख आहे. गोरगरीब, कामगार, सर्वसामान्य नागरिक यांच्या अडचणी त्यांनी कधीही दूरून पाहिल्या नाहीत; त्या आपल्या जबाबदारीप्रमाणे स्वीकारल्या. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चे काढणे, आंदोलने उभी करणे, आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
जिथे कार्यकर्त्याला अडचण… जिथे नागरिक त्रस्त… किंवा जिथे हिंदुत्वाला धक्का; तिथे सर्वात आधी पोहोचणारे नाव म्हणजे मा. संजय केणेकर. हिंदुत्व हा त्यांच्यासाठी केवळ विचार नाही, तर ती त्यांची ठाम भूमिका आणि जीवनशैली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कडवट, निडर आणि ठाम हिंदुत्व टिकवून ठेवणारे भाजपचे भक्कम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांना 13 महिन्यांसाठी आमदार होण्याची संधी मिळाली तेव्हा तो फक्त त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता; तो प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान होता. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून अनुभवलं, “आपल्यातलाच एक जण आमदार झाला.” ही भावना निर्माण करणे हेच त्यांच्या कार्यकर्तेपणाचे आणि जनाधाराचे खरे यश आहे.
आज पक्षाला अशा नेतृत्वाची गरज आहे, जे पदासाठी नाही तर विचारासाठी जगतं, जे सत्तेसाठी नाही तर समाजासाठी लढतं, आणि जे नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या सोबत उभं राहतं.
म्हणूनच, मा. संजय केणेकर यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, ही केवळ विनंती नाही; तर छत्रपती संभाजीनगरमधील असंख्य कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक यांच्या मनातील भावना आणि अपेक्षांचा प्रामाणिक आवाज आहे.
आपण या भावनेचा आदर करून योग्य निर्णय घ्याल, ही मनापासून अपेक्षा.
आपले विश्वासू,
सर्व सामान्य नागरिक, छत्रपती संभाजीनगर.
Sanjay Kenekar Vijay Moharkar