Vrushali Athale

Vrushali Athale *Counseling Psychologist*Psychotherapist
*Marriage Counselor*Relationship counselor
*Career Counselor*Writer

*कभिन्न काळोख्या रात्री* ©वृषाली आठले श्रावण महिन्यात दर वर्षी न चुकता आमची कोकणात एक फेरी असतेच.. हिरवं गार झालेलं आमचं...
29/07/2025

*कभिन्न काळोख्या रात्री*
©वृषाली आठले

श्रावण महिन्यात दर वर्षी न चुकता आमची कोकणात एक फेरी असतेच.. हिरवं गार झालेलं आमचं कोकण म्हणजे निसर्गाचा आशिर्वाद आहे! डोंगर दऱ्या धबधबे ओढे नद्या सगळं अनुभवताना भान हरपणं म्हणजे काय ते कळतं. पंचमहाभौतिक असं हे बाह्य विश्व पंचज्ञानेंद्रियांनी समजून घेणं हा श्रावण महिन्यातला कोकणातला एक खास अनुभव असतो! गंध रस रूप स्पर्श आणि नाद ह्या पाच ही गोष्टी अनुभवायला नक्की श्रावण महिन्यात कोकणात यावं. पानफुलांचा गंध, विहिरीच्या पाण्याची चव, दिवसा चहूबाजूंनी दिसणारा हिरवा कंच रंग, भात शेतातून झाडाझुडपांतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि पशु पक्षांच्या किलबिलाटाचा, कोसळणाऱ्या पावसाचा, वाहणाऱ्या ओढ्याचा नाद..आयुष्य सार्थकी लागल्या सारखं वाटतं!

महालक्ष्मी चं दर्शन घेऊन तिथे पूजा करून कोल्हापूर वरून आंबा घाटातून कोकणात जाणं हा ठरलेला कार्यक्रम. आंबा घाट उतरताना जे काही धुकं होतं त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. धुक्याचा धूसर रंग खरा की धुकं दूर झाल्या नंतर दिसणारा हिरवा कंच रंग खरा..हिरवा कंच रंग म्हणजे ही मायावी दुनिया आणि धूसर रंग म्हणजे सत्य का? असा विचार मनात येऊन गेला.. गेला ते बरं झालं..ही मायावी दुनिया इतकी सुंदर असताना कशाला असे विचार! नेहेमीच्या ठिकाणी उतरून मस्त गवती चहाचा आनंद घेतला, आणि धुक्यात गाडी काढत घाट उतरलो..पुढे रस्त्याचे काम चालू असल्याने साखरपा मार्गे न जाता देवरुख संगमेश्वर मार्गे व पुढे भातगाव मार्गे लांबलचक न संपणाऱ्या रस्त्याने गावाला पोहोचलो. पोहोचे पर्यंत संध्याकाळ झाली. पावसाळ्यात गाडी वरती डोंगरात ठेऊन पायी च खाली जावं लागतं. गाडी वरती रस्त्याजवळ ठेऊन समान घेऊन खाली उतरणं म्हणजे दिव्य होतं. मुसळधार पाऊस, निसरडी वाट..पाय जपून टाकत कसेबसे खाली घरी पोहोचलो. काळोख झालेला, घर उघडून आत येत नाही तर light गेले, ते जे गेले ते पुढे ३ दिवस आलेच नाहीत. कुठेतरी मेणबत्ती शोधून आम्ही दोघं आणि आमचे दिवाकर दादा, तिघांनी घर झाडून काढलं. ते जर आले नसते तर अख्खी रात्र आम्हाला कार मधेच बसावं लागलं असतं किंवा तशीच गाडी फिरवून कुठे दुसरी कडे हॉटेल वर रहावं लागलं असतं..म्हणजे कित्येक किलोमीटर दूर. सगळी साफसफाई करून
चहा केला आणि जे बसलो तेव्हा सगळं लहानपण आठवलं. आई बाबा किती वर्ष हे असं करत आले आहेत. दर वेळी मुंबई मधून आलं की हातात केरसुणी खराटा घेऊन सगळं घर स्वच्छ करा, मग पुढच्या अंगणापासून मागच्या पडवी पर्यंत सगळं घर पुसून काढा. मग चहा साखर हळद तिखट हिंग मोहोरी पासून संसार थाटा...तेव्हा कुठे आमटी भात जेवता येणार. पण दोघं भयंकर उत्साहाने सगळं करत आले. आम्ही मुलं काय जेमतेम २ ते ३ दिवस राहणार पण त्यांना तयारी करणं किती कठीण होतं हे आठवतं.

रात्री अक्षरशः पोहे करून खाल्ले आणि झोपायचं ठरवलं. Light येतील म्हणून वाट पाहून अख्खी रात्र गेली. मिट्ट अंधार, डोळे कितीही विस्फारून पाहिलं तरी जवळ असलेलं आपलं माणूस सुद्धा दिसत नव्हतं. नवऱ्याच्या भाषेत म्हणजे डोळे उघडले तरी स्वतःचेच डोळे उघडे आहेत की बंद ते ही कळत नव्हतं असा अंधार! पावसाने जोर धरला होता. वेड्या सारखा कोसळत होता. रात्री चित्रविचित्र आवाज येत होते. भीती वाटण्याच्याही पलीकडे गेलो होतो आम्ही दोघं. अख्ख्या गावात बाजूच्या एका घरात २ माणसं आहेत एवढी जाणीव सोडली तर सगळं भयानक च होतं. डोळ्यांना काहीच दिसत नसल्यामुळे मन अजूनच अंतर्मुख झालं. एकदम जाणवलं की आपण निसर्गापासून किती लांब गेलोय. हा गडद अंधार हे ही निसर्गाच च रूप ना..मग आपल्याला त्या अंधाराबरोबर समरस का नाही होता येत..आपण शहरात सतत उजेडात असतो, अगदी रात्री सुद्धा उजेड असतो आपल्या सोबतीला. सतत चकचकाट, सतत झगझगाट असतो आपल्या भोवती. गावाला आलं की सूर्यास्तानंतर चा संधिप्रकाश मग हळू हळू होणारा अंधार तीव्रपणे जाणवतो. इथे पहाटे पासून तिन्हीसांजे पर्यंत चुलीपाशी, गुरढोरांपाशी, शेतात राबणारे जीव ह्या अंधारात सहज मिसळतात, शांत होतात. घरातल्या देवघरात दिवे लागतात, तुळशीपाशी अंगणात दिवा लागतो, तसंच बाजूला गणपती च्या देवळात ठरलेल्या वेळी घंटा वाजते, आणि पूजा करणारा आमचा कांत्या दादा किंवा त्याची पत्नी गाभाऱ्यात दिवा लावतात. आत्ता श्रावणात घरी फुलणारं ब्रह्मकमळ दादा श्रद्धेनी देवाला वाहतो..त्या दोघांचा तो नेम पाहून छान वाटलं! कितीही पाऊस कोसळो, कुठलाही ऋतू असो ठरलेल्या वेळी देवळाच्या गाभाऱ्यात दिवा लागतो..आणि अंधारात गाभारा उजळून निघतो!

दिव्याने उजळून निघालेला गाभारा पाहिला आणि गणपती पुढे हात जोडताना सहज विचार मनांत आला की आता मी कधी अंधाराला नाही घाबरणार. अंधार म्हटलं की भय असं आपल्या मनात ठसलं आहे..त्यानंतर रात्री झोपताना आम्ही कंदील लावण्या ऐवजी घरातला मोठा तेल वातीचा दिवा घरांत एका कोपऱ्यात लाऊन च झोपलो. दोन्ही मधला फरक अनुभवला. फार शांत वाटलं! अंधारात प्रत्याहार सहज शक्य असतो असं जाणवलं! बहिरंग योगा कडून अंतरंग योगा कडे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रत्याहार.. बाह्य विश्वाकडून हळू हळू स्वतःच्या आत डोकावणं.. दिवसभराची स्वतःची कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर बाहेर धावणाऱ्या चित्त वृत्ती शांत करणं, अंतर्मुख होणं हा अंधार आपल्याला शिकवतो असं वाटलं. एखादी गोष्ट मनाने समजून घेणं आणि मनाला समजून सांगणं अंतर्मुख झाल्यावर जमू लागतं.
"तत:परमा वश्यतेन्द्रियाणाम् "
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist
२९/७/२०२५




We at 'Manaswasthya' recently had a chance to closely interact with Finance and Mental Health professionals. The result ...
13/07/2025

We at 'Manaswasthya' recently had a chance to closely interact with Finance and Mental Health professionals. The result was amazing - an extensive learning experience for Mental health professionals on managing personal Finance and for the Finance professionals of KRM securities to understand importance of Mental health and its applications on personal and professional lives.

Being completely different events, it’s interesting to see the overlap of how some skills and abilities are transferable across fields. Never too late to learn something new :)

(खिडकी)©वृषाली चारुदत्त 6/7/2025खिडकीत उभं राहून एक टक बाहेर पाहणं.. दूरवर जाणारा रस्ता, बाहेरची हिरवळ पाहणं, उन पाऊस अं...
06/07/2025

(खिडकी)
©वृषाली चारुदत्त
6/7/2025
खिडकीत उभं राहून एक टक बाहेर पाहणं.. दूरवर जाणारा रस्ता, बाहेरची हिरवळ पाहणं, उन पाऊस अंगावर घेणं... खिडकीत उभं राहून येणाऱ्याची वाट पाहणं, घराबाहेर जाणाऱ्याला खिडकीत उभं राहून अच्छा करणं...त्याने जाताना पुन्हा मान वळवून मागे आपल्याकडे पाहताना त्याला पाहणं आणि सुखावणं...
कधीतरी निवांतपणे चहाचा कप हातात घेऊन बाहेर बघत बसून राहणं, तसंच बसून गत काळातल्या आठवणींमध्ये रमून जाणं..खिडकीतून येणारा पश्चिमेचा थंडगार वारा अंगावर घेताना अंगातून जाणारी शिरशिरी अनुभवणं..अशी किती घरं आणि किती खिडक्या असतील ज्या अनेक भावभावनांच्या साक्षीदार असतील!
©वृषाली चारुदत्त
Counseling Psychologist, Psychotherapist

*रानजाई* © वृषाली आठले आज खूप महिन्यांनी घरातली रानजाई खूप फुलली! मधल्या काळात अनेक महिने गुलाब फुलले..मोगरा फुलला..पण ह...
29/05/2025

*रानजाई*
© वृषाली आठले
आज खूप महिन्यांनी घरातली रानजाई खूप फुलली! मधल्या काळात अनेक महिने गुलाब फुलले..मोगरा फुलला..पण ही काही फुलेंना. तेव्हा वाटायचं रानजाई ला घरी आणलं म्हणून ती रुजत नाहीये का..की गुलाबाचे इतके भडक रंग पाहून ती स्वतःच्या रंगावर नाराज तर नसेल..तिला सांगावं का की बाई ग तुझा मोतिया पांढरा रंग खूप सुंदर आहे, तुझा गंध वेड लावणारा आहे! हे नाहीये ह्या गुलाबांकडे.. मग वाटलं आपल्याच मनाचे खेळ सारे. ती तिची तिची फुलेल, बहरेल, तिची वेळ झाली की.. तिचं मन मोहरुन आलं की.
आणि आज अचानक दुसरं कुठलंही फुल झाडावर नसताना ही फुलली, बहरली! ओळखीच्या गंधाने खिडकी जवळ गेले आणि दिवसभर मरगळलेल्या माझ्याच मनाला ताजंतवानं केलं तिने.
ह्या रानजाई ला ही खरच मन असेल का! आणि माझं मन तिला कळलं असेल का!!
©वृषाली चारुदत्त
29/5/2025






04/05/2025

*घर कौलारू*
©वृषाली आठले
4/5/25
"आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू..."
माहेरी मूळ घरी जाताना पावलं झपझप पडत होती, तरीवरून घराकडे जाणारा रस्ता उगाचच लांबलचक आहे असं वाटत होतं. रस्ता कुठला ,पाऊलवाट च ती... खाडी च्या किनाऱ्या वरून नागमोडी जाणारी पाऊलवाट आपल्याला घराकडे नेताना असंख्य खुणा दाखवते आहे असं वाटलं, बालपणी आई वडिलांचं बोट धरून तुडवलेली ही वाट आता त्यांच्या सारखीच थकल्या सारखी वाटली. मन आधीच घरापर्यंत पोचलं होतं, पावलांचा वेग कमी होता पण मनाचा कमाल..पायऱ्या उतरून अंगणात पोचलं आणि गतकाळात गेलं सरळ. सगळं लहानपण डोळ्यासमोर आलं. आजोबांनी बांधलेलं हे घर, जिथे माझ्या बाबांचा , काका चा जन्म झाला..जिथे आत्या मोठ्या झाल्या..जिथे आम्ही भावंडं प्रत्येक सुट्टीत बागडलो ते घर. खाडी किनारी असलेल्या ह्या कौलारू घराने प्रत्येक पाहुण्याला वेड लावलं आहे ते हे घर. उर भरून आला. आमची वाट पाहत ओटीवर बसलेली आजी आठवली..
"माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कंकणे करीती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूर देशीचे प्रोढ लेकरू..
खेड्या मधले घर कौलारू.."
देवघरातले तिचे देव, तिची अन्नपूर्णा, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, आणि हातात बासरी धरलेला तरुण कृष्ण.. आजी कृष्ण भक्त होती.. आचार विचारांनी सुधारक होती..तरी सुद्धा आम्हा सगळ्या नातवंडांना नजर लागायला नको म्हणून काळा गोफ मंत्रवून द्यायची. "कुठला मंत्र म्हणतेस तो सांग ना" असं मी लहानपणी खूप वेळा विचारलं होतं तिला, पण म्हणायची की सांगितलं की ती विद्या कमी होईल. मंत्रा चं शास्त्र जपत होती मायेपोटी. देवापुढे हात जोडले तेव्हा तिच्या आठवणी ने रडू आलं. सगळं जपण्याची बाबांची धडपड तीव्रपणे जाणवली.
मागच्या पडवीतून बाहेर गेलं की आमची विहीर, ह्या विहिरीवर लहानपणी रहाट ओढणारा एक रेडा होता, ’फाट्या ’ म्हणायचो त्याला. बाजूला एक हौद, तो अजून तसाच आहे. मी आणि माझा भाऊ तो हौद भरून गळ्या पर्यंत पाण्यात त्यात उभे राहून खेळायचो. वाटलं उगाच मोठे झालो.. विहिरीच्या मागे अनेक वर्ष खंबीर उभा असणारा फणस जेव्हा काही वर्षांपूर्वी वीज कोसळून जळून गेला तेव्हा ते सांगताना बाबा रडले होते.."एक काळ अचानक वडील गेल्या नंतर ह्या फणसाच्या झाडावर आमचा उदरनिर्वाह होता" असं म्हणाले होते. आज आम्ही भावंडं मुलं, मुलांचा मित्रपरिवार सगळे ज्या ओढीने घरी आलो हे पहायला आजी असती तर खुश झाली असती..माझी प्रजा आहे म्हणायची..मी चिडवायचे तिला की "आजी तू काय स्वतःला राणी समजते का ग!"
माझे दोन्ही काका, काकू, आम्ही चुलत भावंडं, वाहिन्या , आई बाबा , आमचं सगळं कुटुंब ह्या घरात जेव्हा जेव्हा एकत्र जमलो ते दिवस ह्या घराचे सगळ्यात आनंदाचे दिवस असतील.. असं वाटलं की ह्या घराने कायम सगळ्यांची वाट पाहिली असेल.
"माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरती माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
खेड्या मधले घर कौलारू..."
घरात शिरताच पडवीत च आजोबांनी बांधलेली एक मोठी घंटा, ओटी च्या मधल्या खांबाला असलेला अभ्रा, माजघरातला देव्हारा, बाजूच्या भिंती वरचा लामणदिवा, स्वैपाकघरातली चूल सगळं काही तसंच, माणसांची वाट पहाणारं.. मुलांची वाट बघत बसलेली समंजस आई असते अगदी तसंच.
मोजून चार दिवस मुलं, सून , मुलगी, जावई, नातवंडं आल्यावर आई बाबा दोघांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. आंबे, फणस, फणसाची भाजी, काजू, सुने ला आवडतात म्हणून रातांबे.. सगळं देण्याची त्यांची माया पाहून वाटलं आपण भाग्यवान आहोत. घरच्या अळू ची पानं बांधून देणारे काका काकू..अजून काय हवं.
आमच्या मूळ घरातून निघताना दाराबाहेर पायरी वर बसल्यावर जाणवलं इथे आपलंच मन अडकलं आहे तर आई बाबांचं हळवं होणं किती स्वाभाविक आहे! आई बाबांच्या किंचित कापणाऱ्या हातात आणि खंबीर मनांत काय काय असेल ते त्यांनी न सांगताही त्यांच्या डोळ्यांत स्वच्छ दिसलं..ते दोघं आणि घर ह्याचं त्या वेळचं मनोगत एकच असावं..."येत रहा या घरी".
"आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडवल्या येता जाता
परी आई ची आठवण येता
मनी वादळे होती सुरु
खेड्या मधले घर कौलारू
घर कौलारू!"
ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेलं
"खेड्या मधले घर कौलारू " हे माझ्यासाठी नुसतं गीत नसून अनुभूती आहे.
©वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist.









रंग निसर्गाचे © वृषाली आठले उत्तराखंड ला देवभूमी असं का म्हणतात हे इथे प्रवास करताना सतत जाणवतं. प्रत्येक ऋतू मधलं सौंदर...
22/04/2025

रंग निसर्गाचे
© वृषाली आठले
उत्तराखंड ला देवभूमी असं का म्हणतात हे इथे प्रवास करताना सतत जाणवतं. प्रत्येक ऋतू मधलं सौंदर्य वेगळं.
गंगेच्या काठावर राहणं हा खास अनुभव होता ह्यावेळी. बाल्कनी मधून सकाळी उजाडल्या पासून रात्री पूर्ण अंधार होई पर्यंत गंगा पहावी तेव्हा वेगळी भासत होती.
सूर्योदय, उन्हाने तापलेली दुपार, तिन्हीसांज, आणि रात्र ह्या सगळ्या वेळा गंगे च्या तीरावर अनुभवणं सहज शक्य झालं होतं. थंडगार वारा, इतक्या उन्हात सुद्धा अनेक बहरलेली फुलझाडं, गंगे मध्ये rafting करणारी तरुणाई आणि आपल्याला असणारा निवांत मोकळा वेळ असं सगळं जमून आलं होतं.
डोळे बंद करून शांत जागेत ध्यान करण्यासाठी बसावं की उघड्या डोळ्यांनी गंगे कडे एकटक पहात बसावं कळत नव्हतं. देवाने दिलेल्या पंच ज्ञानेंद्रियांनी इथल्या निसर्गाचा आनंद उपभोगावा की ह्या पंच ज्ञानेंद्रियांना ताब्यात ठेऊन त्यांची बाह्य धाव नियंत्रित करून प्रत्याहार करावा...हे द्वंद्व होतं. कानावर गंगेच्या वाहत्या पाण्याचा आवाज पडत होता, अंगाला थंडगार वारा स्पर्श करत होता, डोळ्याला मधुमालती, कांचन, जास्वंद, रातराणी अशी अनेक रंगांची फुलं दिसत होती, त्याचा गंध हवेत भरून राहिला होता...ह्या सगळ्याचा अनुभव हीच ध्यान धारणा झाली होती माझ्यासाठी. निसर्गाचा मोह नाही टाळायचा, विधात्याने आपल्या सकट जे काही निर्माण केलं आहे ते सगळंच सुंदर आहे.
पुरुष आणि प्रकृती / जीव आणि सृष्टी चा जितका अभ्यास केला तितकच प्रत्यक्ष अनुभव आणि रसग्रहण सुद्धा महत्त्वाचं आहेच की!
© वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist

*देवप्रयाग*© वृषाली आठले      22/4/25ऋषिकेश ला गंगे च्या किनारी ध्यानधारणा करण्यासाठी गेलो असताना अचानक मनांत आले देवप्र...
22/04/2025

*देवप्रयाग*
© वृषाली आठले
22/4/25
ऋषिकेश ला गंगे च्या किनारी ध्यानधारणा करण्यासाठी गेलो असताना अचानक मनांत आले देवप्रयाग ला जावं. उत्तराखंड मधील तेहरी गढवाल जिल्ह्यामध्ये अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्यांचा संगम होतो आणि मग गंगा बनून ती पुढे वहाते. हा संगम म्हणजे देवप्रयाग. देवप्रयाग चा अर्थ "ईश्वरीय संगम". पंच प्रयाग पैकी हा एक प्रयाग आहे. अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्या शिवाय विश्वास बसत नाही हेच खरं. एका बाजूनी उसळत येणारी, अवखळ,अल्लड वाटणारी अलकनंदा नदी, जिचं पाणी फेसाळतं आणि निळसर रंगाचं दिसतं..आणि दुसऱ्या बाजूनी अतिशय शांत, जराही आवाज न करता वाहणारी भागीरथी नदी, जिचं पाणी हिरवं गार दिसतं, ह्या दोघींचा संगम होऊन त्या गंगा होतात! इतक्या वेगळ्या दिसणाऱ्या वेगळ्या प्रवृत्ती च्या वाटणाऱ्या दोन नद्या एकरूप होताना पाहणं हा अविस्मरणीय अनुभव होता. तीर्थस्थळ म्हणून काही लोक आवर्जून डुबकी मारत होते, कुणी श्रद्धेनी नदीची पूजा करत होते. आम्ही शांतपणे संगमावर त्या नदीत पायावर थंडगार पाणी घेत बराच वेळ उभे होतो..आणि नद्यांच्या संगमचं ते दृश्य डोळ्यांत साठवून घेत होतो!
भगवान राम आणि दशरथ राजा इथे ध्यान आणि तपस्या करण्या करिता यायचे असे मानले जाते. अर्थात त्याचे दाखले ही मिळतात च. ऋषिकेश वरून बद्रीनाथला जाण्याच्या रस्त्यावर जसे हे देवप्रयाग आहे. तसेच त्या आधी ’वशिष्ठ गुहा’ पण आहे. ऋषी वशिष्ठ हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र ( मानव पुत्र) मानले जातात,तसेच सप्तर्षी पैकी सगळ्यात प्रतिष्ठित ऋषी समजले जातात. ज्या इक्ष्वाकु वंशात रामाचा जन्म झाला त्या कुळाचे गुरु म्हणजे वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींनी ह्या एका गुहेत बराच काळ ( कालावधी) ध्यान केले हा इतिहास आहे. तिथे बाजूला छोटा आश्रम विकसित झाला ज्याची देखभाल करण्याचा निर्णय स्वामी पुरुषोत्तमानंद यांनी घेतला. गेले ४० वर्ष कनौज चे एक ब्राह्मण मिश्रा जी तिथे सेवा व देखभाल करत आहेत. त्यांची ही भेट झाली. त्यांच्या कडून प्रत्यक्ष माहिती मिळाली.
योगशास्त्राचा अभ्यास करताना "योगवासिष्ठ" ग्रंथा चा थोडासा अभ्यास करण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे लक्षात आलं की हा ग्रंथ म्हणजे राम राजा आणि त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांच्यातील संवाद आहे. असे वशिष्ठ ऋषि जे प्रत्यक्ष राम राजाचे गुरु जिथे बसून ध्यान करत असत ती गुहा बघायला मिळाली हा एक छान योग आला. ध्यान धारणा करणारे काही पर्यटक तिथे आत बसून ध्यान धारणा करत होते.
संपूर्ण अंधार असलेल्या त्या गुहेत शिवलिंग आहे त्यापुढे २/३ तेल वाती चे दिवे तेवत होते तेवढा च काय तो प्रकाश. स्वतःचं बोलणं आपोआप बंद झालं, मन शांत होणं अनुभवलं.
जे शिकले त्याचा प्रत्यय आला. एकाग्रता आणि ऐकतानता काय असते ह्याची अनुभूती आली.
देवप्रयाग आणि वशिष्ठ गुहा ह्या दोन्ही ठिकाणी जाऊन परत येताना मनात आलं की ज्यांना ऐतिहासिक पौराणिक संदर्भ माहिती आहेत त्यांनी ते पाहण्या साठी यावं , हिंदू धर्मात अत्यंत पवित्र तीर्थस्थळ मानतात म्हणून यावं, किंवा दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य पाहायला यावं... कोणत्याही कारणानी यावं पण आपल्या देशाची, हिंदू धर्माच्या शिकवणीची, आणि इथल्या निसर्गाची ओळख करून घ्यावी.
© वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist





*ओळखीचे अनोळखी*©वृषाली आठले 20/4/25 आपण ह्याला ओळखतो त्याला ओळखतो असं म्हणतो खरं पण खरंच असे कितीसे एकमेकांना ओळखत असतो ...
21/04/2025

*ओळखीचे अनोळखी*
©वृषाली आठले
20/4/25
आपण ह्याला ओळखतो त्याला ओळखतो असं म्हणतो खरं पण खरंच असे कितीसे एकमेकांना ओळखत असतो हा प्रश्र्न अनेकदा पडतोच. मला खूप वेळा असं वाटतं की आपली एखाद्याशी आधी जुजबी ओळख असते, मग परिचय वाढतो आणि आपण परिचीत आहोत असं म्हणायला लागतो, मग परिचय वाढला की मैत्री होते, मग हळू हळू क्वचित काहीच लोकांशी आपली घट्ट मैत्री. एक चक्र पूर्ण होतं.. मग त्यात आपल्याही नकळत दोघांच्याही मर्यादा विचारात घेता एक तोचतोच पणा यायला लागतो.. ह्याचं कारण आपण एकमेकांना खूप च ओळखायला लागतो, इतकं की आता कुठल्या गोष्टीवर हा आपला ओळखीचा/ मित्र कसा react होणार आहे, काय बोलणार आहे, ते तो कसं बोलणार आहे हे सगळं आपल्याला अगदी नेमकेपणाने माहिती असतं. मग त्यातली गंमत हळू हळू कमी व्हायला लागते.. तरीही नवीन माणसांच्या अनपेक्षित वागण्या बोलण्याशी जमऊन घेण्यापेक्षा आपल्या जीवाभावाच्या मैत्रितला तोचतोचपणा आपल्याला जास्त आवडतो. पण ते त्या मैत्रीतलं प्रेम असतं म्हणून च. अन्यथा त्यात म्हणावा तितका freshness, ताजगी, टवटवीतपणा दर वेळी असतोच असं नाही. जी आपली गरज असते.
माणसांना भेटून आपल्याला किंवा आपल्याला भेटून समोरच्याला फ्रेश वाटायला हवं. ती एक वेगळीच एनर्जी असते, ऊर्जा असते! भटकंती करताना नवीन माणसांना भेटून मला ती ऊर्जा भरभरून मिळते.
कोकणात गावाला जाताना कशेडी घाटात परशुराम जवळ एक छान मिसळ बनवणारे काका आहेत,तिथे त्यांच्या हातची मिसळ तिथे बाहेर झाडाखाली मांडलेल्या खुर्चीवर बसून खाणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं हा ठरलेला कार्यक्रम. गार वारा अंगावर घेत, खालून वाहणारी वसिष्ठी नदी बघत थोडा वेळ बसायचं. ते असं आपुलकीने चौकशी करतात की वाटावं आपले कुणी जुने शेजारी असावेत. हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी काही ड्रायवर दादा भेटले आहेत आजवर. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत, ते पुढच्या वेळची सोय म्हणून नाही, तर त्यांच्या बरोबर च्या गप्पांमधून त्यांच्याशी जो सूर जुळला त्यामुळे. त्याचं आयुष्य, त्यांचे अनुभव, त्याचं लहानपण ह्या सगळ्या गोष्टी अपरिचित असतानाही त्यांनी मला सांगितल्या तेव्हा जाणवलं ते त्यांना माझ्या विषयी वाटणारं आपलेपण. आणि आपल्याला ही बाई नक्की judge करणार नाही हा विश्वास. अजून काहीच विशेष नको असावं माणसाला हे नक्की. वास्तविक स्वतःच्या आयुष्याविषयी काहीतरी दुसऱ्याला सांगणं किंवा दुसऱ्याच्या आयुष्याविषयी ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे म्हटलं तर सगळ्यात मोठी देवाणघेवाण असते माणूस म्हणून. आत्मकेंद्री न राहता त्या वेळी तुम्ही त्या अनोळखी माणसाचे तेवढ्या वेळे पुरते कुणीतरी होता, तो माणूस तुमचा होतो. कारण विचारांची भावनांची देवाण घेवाण होते..अतिशय सहज, निरपेक्षपणे.
कधी भटकंती करताना आवडलेल्या ढाब्यावर, हॉटेल मधे मी अगदी पुन्हा पुन्हा जाते तेव्हा आपल्याला छान गरम गरम आलू पराठे, मुली पराठे करून खाऊ घालणारा तो किंवा ती ही अन्नपूर्णेची रूपं असतात असं वाटतं मला. तिथे नाश्ता करताना त्यांच्याशी मारलेल्या गप्पा म्हणजे काही गहन विषय नसतानाही हलक्या फुलक्या गप्पांमधून त्याचं आयुष्या विषयीचं तत्वज्ञान जाणून घेता येतं इतकं अर्थपूर्ण असतं ते. Housekeeping करायला येणारी एखादी स्थानिक बाई जेव्हा कचरा काढताना आपल्याशी बोलते तेव्हा ते तिच्या आयुष्याचं रडगाणं नसून तिच्या छोट्याशा जगातलं काहीतरी ती आपल्याला सांगते तेव्हा तिच्या आणि आपल्या अनुभवात फक्त एक स्त्री म्हणून कुठे साधर्म्य आहे का हा विचार हळूच मनामध्ये डोकावतो माझ्या. पहाड चढताना, ट्रेकिंग करताना एखादा तरुण निसर्गाची आपल्या ओळख करून देतो तेव्हा तो आपल्यापेक्षा निसर्ग जाणून घेण्यात किती अनुभवी आहे हे लक्षात येतं. स्वतःच कुटुंब आणि घर लांब ठेऊन आलेली एखादी तरुण मुलगी ज्या पद्धतीने परक्या प्रांतात येऊन हॉस्पिटॅलिटी ह्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करते तेव्हा मस्त वाटतं मला. असं वाटतं हिच्या आई वडिलांना कल्पना तरी असेल का की आपली मुलगी किती धीट आहे, आपल्यापेक्षा किती वेगळा अनुभव घेते आहे जगण्याचा.. असे असंख्य ओळखीचे अनोळखी माझ्या आयुष्यात आहेत. ज्यांनी माझं अनुभवविश्व भरलेलं आहे..त्यात दर वेळी नव्याने वाढ होत असते. ते माझे आणि मी त्यांची कुणी नाहीये असं कधी वाटत च नाही मला. उलट ही माणसं जेव्हा जेव्हा सहवासात येतात, संवाद होतो, तेव्हा तेव्हा माझं आयुष्य टवटवीत करतात. माझं जगणं समृध्द करतात. आज आत्ता संध्याकाळी चहा घेऊन शांत बसले असताना एक एक करत कित्येकांची आठवण आली! आणि अगदी तिन्हीसांजेच्या कातर वेळी मन अस्वस्थ न होता अगदी प्रसन्न झालं! अशा माझ्या सगळ्या " ओळखीच्या अनोळखी" लोकांची मी ऋणी आहे!
©*वृषाली आठले*
Counseling Psychologist, Psychotherapist.

हिमालयाच्या कुशीतल्या एका छोट्या गावातली एक संध्याकाळ...ह्या वेळी हॉटेल मध्ये न राहता कुल्लू मनाली मधल्या करजन गावात एक ...
08/01/2025

हिमालयाच्या कुशीतल्या एका छोट्या गावातली एक संध्याकाळ...ह्या वेळी हॉटेल मध्ये न राहता कुल्लू मनाली मधल्या करजन गावात एक छान घर/ बंगला ( Airbnb) बुक केला राहायला. मागे सफरचंदाची मोठी बाग, अवतीभवती देवदार चे वृक्ष आणि बर्फा मुळे कधी पांढरा स्वच्छ तर कधी सोनेरी दिसणारा हिमालय. मन शांत होतं इथे आलं की.
हिमाचल मला बोलवतो असं वाटतं मला. शिमला आणि मनाली ला मी किती वेळा आले आहे हे मोजणं मी आता सोडून दिलं आहे. कारण जगातली ही अशी जागा आहे की मी इथे कितीही वेळा येऊ शकते. इथे येण्याच्या नुसत्या कल्पनेनी माझ्या शरीर मनात एक वेगळीच लेहेर उठते.. असं वाटतं माझं काहीतरी जुनं नातं आहे हिमालयाशी!
नेहेमीच्या ठरलेल्या जागी न जाता ह्यावेळी अनेक गावं आणि वेगळ्या जागा पहिल्या, खूप भटकलो आम्ही.सजला, करजन, शुरू ,नग्गर अशी अनेक गावं जवळून पाहिली.
इथली गावं इतकी सुंदर आहेत की हिमाचल पूर्ण अनुभवण्यासाठी अजून खूप वेळा यावं लागेल मला.
मनाली मधली बियास नदी, पार्वती नदी आणि चंद्रा नदी अशा तिन्ही नद्या आणि त्या बाजूला वसलेली गावं फार देखणी आहेत. पार्वती valley मध्ये कसोल, मणीकरण आणि तोश ही गावं पाहिली. कसोल पासून तोश ला इतक्या उंचावर जायी पर्यंत ही पार्वती नदी सतत आपल्याबरोबर आहे ह्याची जाणीव होते. तोश गावात पायी चढून जावं लागतं तेव्हा जी काही दमछाक होते तेव्हा जाणवतं ते तिथल्या लोकांचं कठीण आयुष्य.. भाजीपाला धान्य च नाही तर भरलेला सिलेंडर पाठीवरून घेऊन जाणाऱ्या आपल्या वयाच्या बायका बघून तर लाज वाटते. तेव्हा जाणीव तीव्र होते आपल्या सुखवस्तू जगण्याची..
कसोल मध्ये मणीकरण म्हणून गाव आहे तिथे गुरुद्वारा मध्ये जाताना बाजूला थंड पाण्याची पार्वती नदी वाहते आहे आणि तिथे च गुरुद्वराजवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. थंडगार पाण्याच्या नदी लगत अक्षरशः कडकडीत गरम पाण्याचे कुंड आणि त्यातून निघणाऱ्या वाफा बघितल्या तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं की का माणसं उगीच इश्र्वरवादी आणि अनिश्र्वरवादी असं म्हणून घेतात स्वतःला, का नाही ह्या निसर्गाच्या, प्रकृतीच्या चमत्काराच्या पुढे नतमस्तक व्हावंसं वाटत ह्यांना, का नाही ह्या सगळ्या शक्तीच्या पुढे तरी शरणागत व्हावंसं वाटत!?
कसोल मध्ये पार्वती नदी च्या बाजूला तरुणाईने गजबजलेले Cafes पाहिले की छान वाटतं. ह्या तरुणांना जास्त गरज आहे निसर्गाच्या सानिध्याची.लाहौल स्पिती ला जातानाचा सुद्धा असाच सुंदर अनुभव..Atal tunnel पार केल्या नंतर एका वेगळ्याच जगात जातो असं वाटलं. लाहौल स्पिति जिल्ह्या मध्ये सिस्सू नावाचं गाव आहे. तिथे सिसू लेक बघण्या सारखं आहे. तिथे जाताना Atal tunnel मधून जावं लागतं, ९ km Tunnel मधून जाताना ह्याला बांधायला १० वर्ष का लागली हे कळतं. एक आश्चर्य म्हणजे tunnel च्या वरती जवळ जवळ २ km एक नैसर्गिक तलाव आहे. कमाल आहे काम करणाऱ्यांची!
सिसु लेक सुंदर होतं. चहू बाजूंनी बर्फानी आच्छादलेले पर्वत आणि मध्ये गोठलेला तलाव. निसर्गाची किमया अगाध आहे. Atal tunnel च्या आधी हिरवेगार दिसणारे पर्वत अचानक गायब होतात आणि स्पिती सुरू होताना अचानक उघडे पडलेले पर्वत आणि त्यावर जागोजागी गोठलेले झरे धबधबे.. वेगळच सौंदर्य आहे ह्या जागेचं. इथे जाताना चंद्रताल तलावातून सुरू झालेली चंद्रा नदी रस्त्याच्या बाजूने वहाते..ती अनेक ठिकाणी गोठलेली च दिसते .
हिमाचल मध्ये खाण्या पिण्याची तर एक वेगळीच मजा असते. आलू पराठा, मुली - पराठा, आलू पापडी चाट, दही भल्ला, मक्के की रोटी सरसू का साग, siddu, असे स्थानिक पदार्थ खाल्ले की वेगळच तेज येतं चेहेऱ्यावर. जाना नावाच्या एका पहाडावर असलेल्या गावा मध्ये आम्ही फक्त कुल्लू च गवरांन जेवण म्हणजे नेमकं कसं त्याचा आस्वाद घ्यायला गेलो होतो.
सगळ्या प्रवासा मध्ये एक गोष्ट मनाला चटका लावून गेली. आम्ही गेली ३२ वर्ष अगदी १९९२ मध्ये आलो होतो तेव्हा ही इथे मनाली mall road वर एक Delhi Chat Bhandar होतं तिथे आलू चाट, छोले समोसे खायचो. मोहन मेहरा त्या काकांचं नाव. त्यांच्या लहानपणी अगदी १४ वर्षाचे असताना घरातल्या प्रश्नांमुळे घरातून पळून जाऊन ते न ठरवता मनाली ह्या गावात आले होते. कुठेतरी मिळेल ते काम करून नंतर त्यांनी एक छोटासा स्टॉल सुरू केला. १९७२ साली त्यांनी हे दुकान सुरू केलं. आम्ही मनाली मध्ये पोहोचलो की सगळ्यात आधी इथे येऊन त्यांच्या हातचा आलू चाट खायचा हे ठरलेलं. तिथे गेलो आणि ते दुकान काही दिसेना.. मी खूप अस्वस्थ झाले, न रहाऊन मी तिथे चौकशी केल्यावर समजलं की मोहन काका आणि त्यांच्या पत्नी दोघं ही कोविड मुळे गेले. लहान मुला सारखी ढसढसा रडले मी काल! प्रत्येकवेळी नियमित त्यांना भेटणं आणि जुन्या आठवणी काढणं हेच नातं होतं त्यांचं आणि माझं. आम्ही दोघं सुन्न झालो. कुठेतरी जाणवलं की मनाली गेल्या ३२ वर्षात किती बदललं म्हणताना हा सगळ्यात दुःखदायक बदल..आता मनाली मध्ये आम्ही येऊच पण ते मोहन काका आणि ते Delhi Chat Bhandar नसेल. त्यांची आठवण म्हणून त्यांचा हा उल्लेख!
आपण जोडलेली माणसं आणि आपल्याशी जोडलेला निसर्ग ही एक वेगळीच सुंदर गुंतागुंत असते. काही जागा काहींची आठवण करून देतात, तर काही माणसं त्या जागांच्या आठवणी सुंदर होण्याचं कारण असतात.असं माझं आणि हिमाचल च नातं आहे!
*वृषाली आठले*
Counseling Psychologist
Psychotherapist
(१४/१२/२४)

मसूरी ची एक पहाट... सुर्य वर येत च होता आणि तेवढ्यात गर्द झाडी मधून वाऱ्याची सळसळ झाली, वाऱ्याचा वेग वाढला, हवेत गारवा आ...
30/05/2024

मसूरी ची एक पहाट... सुर्य वर येत च होता आणि तेवढ्यात गर्द झाडी मधून वाऱ्याची सळसळ झाली, वाऱ्याचा वेग वाढला, हवेत गारवा आला... क्षणात सगळं धुंद झालं. मन हलकं हलकं होत गेलं आणि खूप रडू आलं.
हे असं अनेकदा होतं. निसर्गाची ताकद आहे ती...आपल्याला कशातून तरी मोकळं करण्याची. माझं मलाच कळलं नाही की वाहणारे अश्रु मला मोकळं करत होते की पुन्हा कशात तरी मला अडकवत होते. किती हे गुंतून जाणं! ह्या निसर्गात जीव अडकलाय माझा..ही झाडं पानं फुलं,हे आकाश, वारा, पाऊस ही सारखं मला धुंद करणारी माती.. हे सगळं सोडून जाताना मनात कालवाकालव होईल ना माझ्या! हा विचार मनात आला आणि क्षणभर कासावीस झाले.
मग वाटलं हे सगळं सोडून जायचं आहे की ह्यातच मिसळून जायचं आहे! कुणास ठाऊक..
शेवटी एकरूप होणं म्हणजे नक्की काय.. आधी एकतानता..आणि मग एकरूपता! एकतर हे असं तन्मयतेने भरभरून जागून घेणं, उपभोगण...किंवा त्यातच मिसळून जाणं..दोन्ही सुंदर च आहे की. ह्या विचाराने मन मोकळं झालं....ह्या निसर्गा सारखं च.
वृषाली आठले
Counseling Psychologist
Psychotherapist

30/5/24

**झन्नाट बाईपण** बाईपण भारी देवा पाहिला. आधी मित्रांच्या बायकांबरोबर पाहिला आणि नंतर पुन्हा ए आई आणि अहो आईंबरोबर पाहिला...
09/07/2023

**झन्नाट बाईपण**
बाईपण भारी देवा पाहिला. आधी मित्रांच्या बायकांबरोबर पाहिला आणि नंतर पुन्हा ए आई आणि अहो आईंबरोबर पाहिला. मैत्रिणी न म्हणता मुद्दाम मित्रांच्या बायका असं म्हणतेय. सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या नात्यातल्या बायका एकत्र येऊन हा चित्रपट नक्की बघू शकतात हेच ह्या चित्रपटाचं यश आहे. मित्राची बायको असो किंवा आपल्या नवऱ्याची मैत्रीण असो, आपली आई असो की आपली सासू असो...ती बाई च..ती हे बाई पणाचे सगळे रंग अनुभवत जगते. आणि म्हणून तिला हा चित्रपट आवडतोय असं जाणवलं. चित्रपट पहाताना माझ्या मनात आलेले विचार असच ह्या लेखा कडे बघा. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय छान च. अर्थातच चित्रपटाची समीक्षा करणं असा उद्देश नाहीये. अगदी सामान्य स्त्री म्हणून आणि एक मानसोपचार तज्ञ म्हणून मनात काय काय आलं ते लिहावं असं वाटलं. एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की साधारण तिशी उलटलेली प्रत्येक स्त्री काही ना काही relate करू शकत होती . अगदी कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखे बद्दल किंवा कुठल्या ना कुठल्या प्रसंगा बद्दल प्रत्येक स्त्री ला जवळीक जाणवत होती. अर्थात अगदी तरुण मुली मात्र फार relate करु शकतील असं नाही वाटलं. कारण बाईपण फार झपाट्याने बदलत गेलं आहे. ते बदलताना प्रत्येक स्त्री चे आपले आपले वेगळे अनुभव असतातच. पण स्त्रीमुक्ती सारख्या विषयाचं गांभीर्य दाखवण्यावर चित्रपटाचा focus नसून बाईपण नेमकं कसं आहे ते दाखावण्यावर आहे हे मला फार आवडलं .छान वाटलं. सहा बहिणींचं आयुष्य दाखवत अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील घटना प्रसंग खाचखळगे आणि गमतीजमती सगळंच छान दाखवलं आहे. अगदी सख्ख्या बहिणींमधली धुसफूस, हेवेदावे, मत्सर आणि माया प्रेम ह्या बाईपणाचं यथार्थ दर्शन घडवतात. जन्माला येताच मूल दगावत हे दुःख आयुष्यभर उराशी बाळगून जगणारी माई/जया, त्या दुःखानी जेवढी विझत जाते तेवढीच बरोबरीच्या बहिणीला त्याच वेळी मुलगी होते आणि त्या आनंदात त्या बहिणीला आपल्या दुःखाची जाणीव सुद्धा नाहीये ह्या वेदनेने ती जास्त दुखावते. तिचं मूल गेल्यामुळे तिचीच नजर लागते असा गैरसमज करून घेणारी शशी....आणि तरीही भाची वरच्या माये पोटी तिला सपोर्ट करणारी, तिची काळजी घेणारी माई.. आपली मुलगी आणि तिच्या सासूच्या छान घडत असलेल्या नात्यातला गोडवा किंवा जवळीक ह्याचं कौतुक वाटायच्या ऐवजी आसुया वाटणारी आणि मुलगी माझ्याच पासून दुरावते की काय ह्या भीती ने अस्वस्थ होणारी शशी.. सासऱ्यानी कलागुणांना जोपासण्याची कधीही परवानगी न देता सुद्धा स्वतःच्या सुनेला सपोर्ट करणारी आणि तरीही सासऱ्यांचा योग्य तो मान ठेवणारी साधना.. सुनेच्या हातचं यापुढे जेवणार नाही असं म्हणणारे अण्णा जेव्हा रात्री भुकेने अस्वस्थ होऊन फ्रिज मध्ये खायला काही आहे का शोधतात तेव्हा सगळं ताट व्यवस्थित वाढून "अण्णा तुम्ही काही जेवला नाहीत आणि मी काही पाहिलं नाही" असं म्हणून राग विसरून प्रेमाने अण्णांना जेवायला वाढणारी आणि त्यात ही त्यांचा त्या घरातला मान सांभाळणारी साधना ( काही मुली ह्याला फालतू इगो असं ही म्हणतीलच ..ते ही चूक नाही). ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये स्त्री चं स्त्रीत्व दिसतं. स्वतःचा नवरा जेव्हा दुसऱ्या तरुण स्त्री च्या प्रेमात पडतो तेव्हा कोलमडलेली पल्लवी जेव्हा स्वत्वाची जाणिव होते तेव्हा मात्र नवऱ्याकडे प्रेमाची भिक न मागता divorce paper वर सही करून त्याला मोकळं करण्याचा निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेते. स्वतःच्या हळवेपणा ला दुबळ होऊ न देता कणखर बनवते. "माझ्या घरात सगळ्यात कमी किंमत मला आहे कारण मी पैसे कमवत नाही" असं म्हणणारी केतकी च पल्लवी ला तिच्या क्षमतेची, आत्मनिर्भर असण्याची जाणीव करून देते.. नवरा कर्जबाजारी झाल्या नंतर दोन मुलं नोकरी सांभाळून नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी चारू अचानक आपला menopause आला हे समजतं तेव्हा अक्षरशः कोलमडून जाते. तिच्या ढसाढसा रडण्यात आजपर्यंत दुहेरी भूमिका निभावताना वाढत गेलेला सगळा ताण बाहेर पडतो. menopause आला तरीही फक्त स्वतःसाठी स्वताहाला हवं तसं कधी जगलोच नाही ही त्रासदायक जाणीव त्यात दिसते. असे अनेक प्रसंग बाई चं बाईपण उलगडून दाखवतात. चित्रपटातील सगळ्याच स्त्री कलाकार उत्तम अभिनयाने हे प्रसंग बोलके करतात. एकमेकांमध्ये वर्षानुवर्ष चालणारं शीतयुद्ध असो की सतत मनातल्या मनात चालू असलेली तुलना असो हा बाईपणाचाच एक भाग आहे. पण म्हणून बाई ही अशीच असते का... तर नाही हो.. बाई ही अतिशय हळवी, संवेदनशील, मायाळू, दयाळू, प्रेमळ, सोशिक, चिवट, लवचिक, कणखर, मनस्वी, अतिशय हुशार चलाख ...अरे बाप रे...किती विशेषणं वापरू.. अशी ही असते. हे "बाईपण" असतंच भारी! केतकी च्याच भाषेत सांगायचं तर एकंदर बाईपण झन्नाट!
तळ टीप : ( आपण किंवा आपलं कुटुंब किती सुधारित आहोत, किती पुरोगामी आहोत वगैरे असले विचार न करता निव्वळ बाई चं बाईपण किती अनाकलनीय आहे अशा दृष्टीने चित्रपट बघा. नक्की आवडेल.)
© *वृषाली आठले*
( Counseling Psychologist & Psychotherapist)
डोंबिवली.

**झन्नाट बाईपण**   #बाईपणभारीदेवा      बाईपण भारी देवा पाहिला. आधी मित्रांच्या बायकांबरोबर पाहिला आणि नंतर पुन्हा ए आई आ...
09/07/2023

**झन्नाट बाईपण**

#बाईपणभारीदेवा




बाईपण भारी देवा पाहिला. आधी मित्रांच्या बायकांबरोबर पाहिला आणि नंतर पुन्हा ए आई आणि अहो आईंबरोबर पाहिला. मैत्रिणी न म्हणता मुद्दाम मित्रांच्या बायका असं म्हणतेय. सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या नात्यातल्या बायका एकत्र येऊन हा चित्रपट नक्की बघू शकतात हेच ह्या चित्रपटाचं यश आहे. मित्राची बायको असो किंवा आपल्या नवऱ्याची मैत्रीण असो, आपली आई असो की आपली सासू असो...ती बाई च..ती हे बाई पणाचे सगळे रंग अनुभवत जगते. आणि म्हणून तिला हा चित्रपट आवडतोय असं जाणवलं. चित्रपट पहाताना माझ्या मनात आलेले विचार असच ह्या लेखा कडे बघा. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय छान च. अर्थातच चित्रपटाची समीक्षा करणं असा उद्देश नाहीये. अगदी सामान्य स्त्री म्हणून आणि एक मानसोपचार तज्ञ म्हणून मनात काय काय आलं ते लिहावं असं वाटलं. एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की साधारण तिशी उलटलेली प्रत्येक स्त्री काही ना काही relate करू शकत होती . अगदी कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखे बद्दल किंवा कुठल्या ना कुठल्या प्रसंगा बद्दल प्रत्येक स्त्री ला जवळीक जाणवत होती. अर्थात अगदी तरुण मुली मात्र फार relate करु शकतील असं नाही वाटलं. कारण बाईपण फार झपाट्याने बदलत गेलं आहे. ते बदलताना प्रत्येक स्त्री चे आपले आपले वेगळे अनुभव असतातच. पण स्त्रीमुक्ती सारख्या विषयाचं गांभीर्य दाखवण्यावर चित्रपटाचा focus नसून बाईपण नेमकं कसं आहे ते दाखावण्यावर आहे हे मला फार आवडलं .छान वाटलं. सहा बहिणींचं आयुष्य दाखवत अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील घटना प्रसंग खाचखळगे आणि गमतीजमती सगळंच छान दाखवलं आहे. अगदी सख्ख्या बहिणींमधली धुसफूस, हेवेदावे, मत्सर आणि माया प्रेम ह्या बाईपणाचं यथार्थ दर्शन घडवतात. जन्माला येताच मूल दगावत हे दुःख आयुष्यभर उराशी बाळगून जगणारी माई/जया, त्या दुःखानी जेवढी विझत जाते तेवढीच बरोबरीच्या बहिणीला त्याच वेळी मुलगी होते आणि त्या आनंदात त्या बहिणीला आपल्या दुःखाची जाणीव सुद्धा नाहीये ह्या वेदनेने ती जास्त दुखावते. तिचं मूल गेल्यामुळे तिचीच नजर लागते असा गैरसमज करून घेणारी शशी....आणि तरीही भाची वरच्या माये पोटी तिला सपोर्ट करणारी, तिची काळजी घेणारी माई.. आपली मुलगी आणि तिच्या सासूच्या छान घडत असलेल्या नात्यातला गोडवा किंवा जवळीक ह्याचं कौतुक वाटायच्या ऐवजी आसुया वाटणारी आणि मुलगी माझ्याच पासून दुरावते की काय ह्या भीती ने अस्वस्थ होणारी शशी.. सासऱ्यानी कलागुणांना जोपासण्याची कधीही परवानगी न देता सुद्धा स्वतःच्या सुनेला सपोर्ट करणारी आणि तरीही सासऱ्यांचा योग्य तो मान ठेवणारी साधना.. सुनेच्या हातचं यापुढे जेवणार नाही असं म्हणणारे अण्णा जेव्हा रात्री भुकेने अस्वस्थ होऊन फ्रिज मध्ये खायला काही आहे का शोधतात तेव्हा सगळं ताट व्यवस्थित वाढून "अण्णा तुम्ही काही जेवला नाहीत आणि मी काही पाहिलं नाही" असं म्हणून राग विसरून प्रेमाने अण्णांना जेवायला वाढणारी आणि त्यात ही त्यांचा त्या घरातला मान सांभाळणारी साधना ( काही मुली ह्याला फालतू इगो असं ही म्हणतीलच ..ते ही चूक नाही). ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये स्त्री चं स्त्रीत्व दिसतं. स्वतःचा नवरा जेव्हा दुसऱ्या तरुण स्त्री च्या प्रेमात पडतो तेव्हा कोलमडलेली पल्लवी जेव्हा स्वत्वाची जाणिव होते तेव्हा मात्र नवऱ्याकडे प्रेमाची भिक न मागता divorce paper वर सही करून त्याला मोकळं करण्याचा निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेते. स्वतःच्या हळवेपणा ला दुबळ होऊ न देता कणखर बनवते. "माझ्या घरात सगळ्यात कमी किंमत मला आहे कारण मी पैसे कमवत नाही" असं म्हणणारी केतकी च पल्लवी ला तिच्या क्षमतेची, आत्मनिर्भर असण्याची जाणीव करून देते.. नवरा कर्जबाजारी झाल्या नंतर दोन मुलं नोकरी सांभाळून नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी चारू अचानक आपला menopause आला हे समजतं तेव्हा अक्षरशः कोलमडून जाते. तिच्या ढसाढसा रडण्यात आजपर्यंत दुहेरी भूमिका निभावताना वाढत गेलेला सगळा ताण बाहेर पडतो. menopause आला तरीही फक्त स्वतःसाठी स्वताहाला हवं तसं कधी जगलोच नाही ही त्रासदायक जाणीव त्यात दिसते. असे अनेक प्रसंग बाई चं बाईपण उलगडून दाखवतात. चित्रपटातील सगळ्याच स्त्री कलाकार उत्तम अभिनयाने हे प्रसंग बोलके करतात. एकमेकांमध्ये वर्षानुवर्ष चालणारं शीतयुद्ध असो की सतत मनातल्या मनात चालू असलेली तुलना असो हा बाईपणाचाच एक भाग आहे. पण म्हणून बाई ही अशीच असते का... तर नाही हो.. बाई ही अतिशय हळवी, संवेदनशील, मायाळू, दयाळू, प्रेमळ, सोशिक, चिवट, लवचिक, कणखर, मनस्वी, अतिशय हुशार चलाख ...अरे बाप रे...किती विशेषणं वापरू.. अशी ही असते. हे "बाईपण" असतंच भारी! केतकी च्याच भाषेत सांगायचं तर एकंदर बाईपण झन्नाट!
तळ टीप : ( आपण किंवा आपलं कुटुंब किती सुधारित आहोत, किती पुरोगामी आहोत वगैरे असले विचार न करता निव्वळ बाई चं बाईपण किती अनाकलनीय आहे अशा दृष्टीने चित्रपट बघा. नक्की आवडेल.)
© *वृषाली आठले*
( Counseling Psychologist & Psychotherapist)
डोंबिवली.

Address

Dombivli East

Opening Hours

Tuesday 5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 5pm - 9pm
Friday 10am - 1pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919769083479

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushali Athale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vrushali Athale:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram