27/03/2026
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
मानवाला संसार सागरातून पार करणारी, रुद्रापासून उत्पन्न झालेली नर्मदा नदी सर्व पापांना नष्ट करते, तिच्या केवळ दर्शनाने तीन जन्मांचे पाप नष्ट होते आणि नर्मदा स्नानाने हजारो वर्षांचे पाप हरण होते.अशा ह्या नर्मदा नदीची परिक्रमा अत्यंत पुण्यदायीअसून जवळ जवळ ३२०० किमी आहे. तिचे महत्त्व अन्यसाधारण आहे पण ज्यांना सांसारिक कारणामुळे शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा उत्तम पर्याय आहे.
शास्त्राप्रमाणे जेव्हा एखादी नदी आपला प्रवाह उत्तर मुखी करते तेव्हा ती अत्यंत पवित्र पुण्यदायी मानली जाते.त्याचप्रमाणे नर्मदा नदी केवळ चैत्र महिन्यामध्ये तिलकवाडा ते रामपुरा अशी उत्तर वाहिनी होते,आणि म्हणूनच फक्त चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी परिक्रमा तिलकवाडा ते रामपुरा किंवा रामपुरा ते तिलकवाडा अशी केली जाते. नर्मदा पुराणात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेच महत्त्व विस्तृत प्रमाणात सांगितले आहे, जो भक्त चैत्र महिन्यामध्ये उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतो त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्यफळ मिळते.
उत्तर वाहिनी परिक्रमा गुजरात राज्यातील तिलकवाडा येथे विधिवत संकल्प करुन सुरू होते आणि १०किमी चालून झाल्यावर उत्तर तटाची यात्रा पूर्ण होते. इथे नावेने नर्मदा मैय्या पार करुन दक्षिण तटावर पोचता येते,या स्थानाला रामपुरा असे नाव आहे. इथे स्नान करून पाणी घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करून दक्षिण तटाची यात्रा सुरू होते. हे अंतर ११किमी आहे. ईथे पुन्हा नावेने नर्मदा मैय्या पार करुन उत्तर तटावर पोहोचता येते आणि उत्तर तटावर स्नान करून उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण होते. पूर्ण परिक्रमा साधारण एकवीस किलोमीटर आहे. परिक्रमा मार्गात अनेक छोटी गावे लागतात, मंदिरे लागतात, आश्रम आहेत. ठिकठीकाणी गावकरी परिक्रमावासींची सेवा निःस्वार्थपणे करतात. त्यामूळे खाण्या पिण्याचे हाल होत नाहीत. आग्रह करुन करुन खायला लावतात. त्यामूळे कोणताही त्रास होत नाही.
आम्ही २०२२ मध्ये कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना केवळ मैय्यावर भरवसा ठेवून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मी आणि माझे पती आदल्या दिवशी एकता नगर येथे पोहोचलो होतो, आम्ही राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती.तेथून आम्ही तिलक वाड्याला जाऊन मैयाचे दर्शन घेतले, त्यावेळेस आम्ही तेथे चौकशी केली असता तेथील गावकऱ्यांनी आम्हाला तुम्ही उद्या पहाटे रामपुरा येथून परिक्रमा सुरू करा असे सांगितले. आम्ही जी रिक्षा घेऊन गेलो होतो त्याने देखील मी तुम्हाला उद्या पहाटे रामपुराला सोडतो, तेथूनच परिक्रमा सुरू करा असेच सांगितले होते. पण मला खरे तर तिलकवाडा येथूनच परिक्रमा सुरू करायची होती. पण कदाचित हीच मैयाची इच्छा असेल असे म्हणून आम्ही परत एकता नगरला आलो. संध्याकाळी सगळी तयारी केली आणि रात्री नऊ वाजता रिक्षावाल्याचा फोन आला की मी तुम्हाला आत्ताच तिलक वाड्याला नेऊन सोडतो. अनपेक्षितपणे मनासारखा झालेला बदल बघून मन सुखावल होतं. आम्ही तिलकवाड्याला रात्री ११ वाजता पोहोचलो आणि तेथील व्यवस्थापकांनी आम्हाला एक खोली झोपण्यासाठी दिली. तिथे बरेचं जणं बाहेर, किंवा हॉल मध्ये एकत्र झोपले होते, पण आम्हाला मात्र मैय्याच्याच कृपेने सेपरेट खोली मिळाली होती.मैय्याची कृपा इथूनच सुरू झाली होती.
परिक्रमेच्या उत्सुक्तेमुळे झोप फारशी लागलीच नाही. साधारण २ वाजता उठून आंघोळ करून ३ वाजेपर्यंत परिक्रमेला निघालो. त्याचवेळी अजून एक ४-५ जणांचा समूह निघाला होता .साधारण थोडंसं अंतर पुढे गेल्यावर एकमेकांना नर्मदे हर केलं आणि सगळे जण एकत्र चालायला लागले. तेव्हा कळले की त्यातील दोन मैय्यानी यापूर्वी परिक्रमा केलेली आहे, त्यामूळे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची परिक्रमा सुरू झाली. त्यांनी अगदी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी दर्शन, दक्षिण तटावर नर्मदा स्नान, तीर्थंकर महादेवाला अभिषेक असं करुन व्यवस्थित दक्षिण तट पार करून उत्तर तटावर नर्मदा स्नान करून परिक्रमेची सांगता करून दिली. कोणताही त्रास झाला नाही.त्यावेळी असे वाटले,जणू काही नर्मदा मैयानेच त्यांना आमच्यासाठी पाठवले आहे आणि तिनेच आमच्याकडून हि परिक्रमा पूर्ण करुन घेतली आहे.मैय्याची कृपा बघून डोळ्यात पाणी आलं.कारण काहीही माहिती नसताना केवळ मैय्यावर विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलो होतो.खूप समाधान मिळाले. एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. ती पुढे अनेक दिवस पुरली होती. नर्मदा परिक्रमा आपल्याला अध्यात्मिक प्रगती करायला मदत करते. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा करायला नक्कीच प्रेरित करते.
स्मरणाज्जन्मजं पापं दर्शनेन त्रिजन्मजं !
स्नानाज्जन्मसहस्राणि हन्ति रेवा कलौ युगे!!
संपूर्ण नर्मदा परिक्रमा असो किंवा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असो, परिक्रमा ही एक दैवी उपासना आहे असे समजून करावी. ती आपल्याला दैनंदिन व्यवहारात कंटाळा आला म्हणून करण्याची सहल नाही. तिच्याकडे मौजमजा करण्याचे ठिकाण किंवा संधी म्हणून पाहू नये. नर्मदा परिक्रमा ही आपल्या अध्यात्मिक उन्नतिसाठी अतिशय पोषक आहे. नर्मदा मैय्या ही प्रत्यक्ष देवता आहे या भावनेने आपले आचरण असावे. चालताना बरोबरच्या लोकांशी आवश्यक तेवढेच बोलावे आणि इतर वेळी नामस्मरण करावे. कोठे काही असुविधा असेल तर त्याची तक्रार न करता सहनशीलतेने तडजोड करावी.
त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे!!
नर्मदे हर…
डॉ. नमिता प्रसाद गाडगीळ