01/03/2026
कोकण- संघर्षातलं सौंदर्य
© वृषाली आठले
चार घरांचे गाव
चिमुकले पैलटेकडीकडे..
शेतमळ्यांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे!
बालकवींच्या कवितेत दिसतं आमचं गाव. गाडी गावाजवळ जायला लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी प्रत्येक खूण खुणावते असं वाटतं. ह्या वेळी वाटेतल्या प्रत्येक आंब्याला मोहर होता, प्रत्येक काजू वर मोहर होता. करवंदावर छान फुलं होती. मनात आलं की इतकं छान मोहरुन यावं ते ह्या झाडांनीच..माणसांना असं जुनं विसरून नव्याने नाही मोहोरता येत. गाडीच्या खिडकीच्या काचा खाली करून त्या मोहोराचा गंध श्वासात भरून घेत होते मी. प्रत्येक वळण ओळखीचं.. प्रत्येक झाड ओळखीचं..लाल मातीने माखलेले रस्ते पायवाटा जणू दर वेळी विचारतात की 'अगं किती दिवसांनी आलीस बये!' माझी आजी मला बाया म्हणायची. हा खास कोकणातला शब्द, बाया..तिच्या त्या बाया हाक मारण्यात गोडवा होता. प्रत्येक वेळी गावाला जाताना मनात येतं की आत्ता आजी असती तर तिला किती कौतुक वाटलं असतं की नात आई बाबांना घेऊन गावाला येतेय, राहतेय. असं वाटलं आत्ता आई बाबांबरोबर ती असती तर तिला ही घेऊन आले असते. तिचीही सेवा केली असती. पण वय थांबत नाही ना. ना तिचं वय थांबलं, ना आई बाबांचं थांबलं, ना माझं थांबलं. वय, वेळ, काळ, सगळं पुढे सरकत राहतं. आपण मात्र लगबगीने त्याबरोबर धावतो.
ह्यावेळी ठरवून आई बाबांबरोबर गावाला राहिले. कोकणात राहणं सोपं नाही. प्रत्येक बाबतीत संघर्ष असतो. आपण कधी नव्हे ते जाणार मग घराची साफसफाई हा मोठ्ठा उद्योग असतो. मी तर जाताना गाडीतून सगळा संसार घेऊन जाते. संसार म्हणजे अर्थातच स्वैपाकघरात लागणारं सगळं काही हे बायकांच्या लक्षात येईलच. आमचे दिवाकर दादा आणि वासंती मदतीला येतात म्हणून शक्य होतं सगळं. अख्खं घर धुवून पुसून काढून, सामान भरून मग सुरवात होते. घर लाऊन अंघोळ करून देवापाशी आणि तुळशी पाशी दिवा लावला की खरी तिथल्या संसाराला सुरुवात होते. प्रसन्न वाटतं!
हल्ली खूप लोकं कोकणात पर्यटनाला येतात. आणि खूप कौतुक करतात इथल्या निसर्गाचं. आपण कोकणचे आहोत ह्याचा कमालीचा अभिमान आहे मला. पण ह्या फिरायला चार दिवस येणाऱ्या लोकांना सांगावसं वाटतं की कोकणात राहणं आणि कोकणात फिरायला जाणं ह्यात खूप फरक आहे. इथे राहणं आव्हानात्मक आहे असं मला लहानपणापासून वाटत आलं आहे. डोंगराळ भाग, नद्यांचे प्रवाह, कुठे समुद्र ,खाडी किनारपट्टी हे सगळं खूप सुंदर आहे..पण अजूनही गावागावात चांगले रस्ते नाहीत. एक बस चुकली की पुढे कितीतरी वेळ दुसरं वाहन मिळत नाही. किराणामाल लांबून आणावा लागतो. जवळपास दुकानं नाहीत. शाळा कॉलेज वैद्यकीय सुविधा सगळ्यासाठी अजून ही खूप दूर जावं लागतं. पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. प्रत्येक गावात अजून फोन लागत नाहीत. ह्या आणि अशा अनेक अडचणी आपल्याला जाणवतात. मात्र इथली स्थानिक माणसं ह्या अडचणींना आपलसं करून सहज जगतात. भयंकर कौतुक वाटतं मला ह्याचं!
ह्या वेळची माझी ट्रिप वेगळी ठरली ह्याची काही खास कारणं आहेत. ह्यावेळी ह्यातल्या एक एक अडचणीने माझा आणि मी अडचणींचा पिच्छा पुरवला! गावांत २ घरांमध्ये wifi बसवल्याचं समजलं होतं. माझ्या काकानी पण बसवलं..मग लगेच काकाशी बोलून त्या माणसाला बोलवून आधी घरी wifi घेतलं. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा की काय असं वाटलं. ज्या गावात फोन करण्यासाठी अख्खा डोंगर चढून जावं लागायचं त्या गावात आमच्या प्रत्येक घरात चक्क फोन, whatsapp कॉल , वगैरे शक्य झालं होतं. ह्या आनंदात चार दिवस गेले आणि चार दिवसांनी wifi बंद झालं म्हणून त्या माणसाला बोलावून बघायला सांगितलं तर बघितल्यावर थंडपणे त्यानी सांगितलं " वानराने उडी मारून ती cable तोडून टाकली आहे"..मग काय फ्रिज बिघडला, टीव्ही बिघडला मग दुसऱ्या गावातून माणसांना बोलाऊन त्याची दुरुस्ती. सगळं झाल्यावर लक्षात आलं की ह्या सोयी सुविधांशिवाय आपण जगू शकत नाही हेच खरं. एरवी आम्ही जरी फोन नेटवर्क नसलेली ठिकाणं जगात शोधून शांतपणासाठी जात असलो तरी इथे आई वडिलांच्या काळजी पोटी , त्यांच्याशी सहज संपर्क व्हावा म्हणून हे सगळं अत्यावश्यक आहे हे जाणवतं. थोडक्यात आता ज्या गावांत इलेक्ट्रिसिटी नाही, फोन नाही, डॉक्टर नाही अशा गावांत आपली आजी कशी राहिली असेल ही कल्पना सुद्धा करवत नाही. मग जाणवतं की ज्या गोष्टींना आपण सोयी सुविधा म्हणतो त्या अत्यावश्यक आहेतच. तिथल्या कष्टकरी लोकांची जिद्द आणि त्यांचे कष्ट ह्याची आपण कल्पनाच करावी आणि तोंडभरून त्यांचं कौतुक करावं असं मला नेहेमी वाटतं. आपण शहरात राहणाऱ्या लोकांनी ह्यांच्याकडून चिकाटी आणि मेहेनत शिकावी..निदान त्यांचे कष्ट समजून घ्यावे. आणि अगदीच ह्यातलं काही जमलं नाही तर निदान त्यांना अक्कल शिकवायला मुळीच जाऊ नये!
ह्यावेळी गावाच्या वरती डोंगरावर, म्हणजे मुख्य रस्त्याला लागून जे आरोग्यकेंद्र आहे तिथे मी जाऊन आले. तिथे on duty असलेले डॉक्टर सिस्टर आणि आशा स्वयंसेविका ह्या तिघांनाही भेटून त्यांच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ते डॉक्टर प्रत्यक्षात डॉक्टर नसून Bsc nursing केलेले आहेत हे त्यांचीच मला सांगितलं. सरकार नी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी मला सांगितल्या. जवळपास ची चार गावं ते आठवड्यातून बघतात. एक जालन्याचा तरुण इथे कोकणात येऊन नोकरी करतो. ती सिस्टर/ नर्स तिथे स्वतःच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेऊन २४ तास त्या आरोग्यकेंद्रात वस्तीला असते. सूर्य मावळल्या नंतर जिथे कभिन्न काळोख असतो, हाक मारण्याच्या अंतरावर घर नाही, कुणाची सोबत नाही, स्वतःला काही मदत लागली तर मदतीला माणूस नाही अशा ठिकाणी वेगळ्याच गावातून नोकरीसाठी येऊन राहणं सोपं नाही. मला फार कौतुक वाटलं तिचं. गावातली लोकं छोट्यामोठ्या आजारपणात तिथे जातात, त्यांना तपासणं, औषधं देणं , Bp, sugar तपासून काही bloodtest वगैर करणं आणि काही प्राथमिक उपचार ही टीम छान करते हे बघून बरं वाटलं. वैद्यकीय सोयी सुविधा असल्या म्हणजे आपल्याला सुरक्षित वाटतं ही आपली शहरी लोकांची मानसिकता आहे. आपल्याला कधीतरी काहीतरी आजारपण आलं, emergency असली तर उत्तम हॉस्पिटल, तज्ञ डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सगळी व्यवस्था हवी असं वाटतं आपल्याला. पण त्यामुळे रोजच्या जगण्यात आपण नैसर्गिक गोष्टींपासून किती दूर गेलो आहोत ह्याचा साक्षात्कार गावाला जाऊन राहिलं की मगच होतो. तिथल्या खडतर जगण्यातच तिथल्या लोकांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे नक्की. सकाळी उजाडल्या पासून अंगमोडून च काम करतात ही लोकं.. एकदा मागचं पुढचं अंगण झाडलं तरी पाठीचा कणा मोडणं म्हणजे नेमकं काय हे कळतं आपल्याला. आणि अशावेळी तीव्रपणे जाणवतं की इथल्या कष्टप्रद जगण्यातच त्यांचं आरोग्य आहे बहुदा. सगळी साफसफाई करताना वरच्या मजल्यावर बेडरूम मधे मला एकदा मण्यार दिसली, घाई ने दरवाजा बाहेरून बंद करून मी दिवाकर दादांना बोलावलं त्यांनी पटकन ती मण्यार मारली बाहेर लांब नेऊन टाकली आणि पुन्हा कामाला लागले, इतक्या सहज तर मला डास सुद्धा मारता येत नाही. पाचसहा दिवसांनी पुन्हा वरच्या मजल्यावरच्या बेसिन वर छान वेटोळं घालून बसलेली दुसरी मण्यार माझ्या भावजयीला दिसली..पुन्हा दादा आले आमच्या संरक्षणासाठी. त्यांना म्हटलं " दादा तुम्हाला काय मंत्र येतात ते म्हणा हो, दोनदा दिसलं जनावर"...(आमच्या कोकणात सरपटणाऱ्या प्राण्यांना किंवा विषारी सापांना जनावर म्हणतात.) दादांनी शांतपणे सांगितलं " नाय ता मण्यार काय ऐकित नाय ह्या मंत्राला...तिच्यात विष नाय". कोकणात जन्मलेल्या आणि एवढी वर्ष फक्त तिथेच राहिलेल्या दादांना ह्या सरपटणाऱ्या जीवांचा दांडगा अनुभव होता. पण माझ्यासाठी मात्र तिथे झोपणं हा संघर्ष होता.
रोजचं जगणं अत्यंत कठीण असूनही कोकणी माणसं तशी साधी आणि सरळ आहेत. बोलताना खोचक बोलतील पण ती त्यांची भाषा झाली..शहरातून येऊन कुणी अक्कल शिकवली तर असं होणारच ना! मग त्यांचा खोचकपणा, चमत्कारिकपणा अनुभवायची तयारीच ठेवायची आपण. हा पण आपण जर त्यांना समजून घेऊन, त्यांच्यातलं होऊन, त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर मात्र ही माणसं जीव लावतात. इथला पाहुणचार म्हणजे कुठलाही बडेजाव नाही, जे त्या दिवशी स्वतः जेवतील तेच तुम्हाला वाढतील अशी इथली माणसं. पण आपुलकीत मात्र कधीही कमतरता नाही. अशी निसर्गाची आव्हानं पेलत रोजच्या संघर्षाने काटक झालेली इथली माणसं. कोकणातला निसर्ग, हिरवळ, लाल माती , विहीरीचं गार पाणी, गार वारा ह्या माणसांना मायेने बांधून ठेवतो! पण ह्या निसर्ग सौंदर्या इतकंच ह्या काटक माणसांचं ही कौतुक व्हायला हवं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist.