24/05/2026
आमरस खाल्ल्याने सात जणांना विषबाधा
शेवगाव शहरातील घटना : बाधितांवर नगरमधील रुग्णालयात उपचार
अहिल्यानगर : शेवगाव शहरातील मिरी रोड येथील आरे वस्तीवर राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस करुन खाल्ल्याने विषबाधा झाली असून, संपूर्ण कुटुंब नगर शहरातील साई एशियन हॉस्पिटल या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रात्री घडली.
सध्या आंब्याचा हंगाम सुरु असल्याने बाजारात विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय यांनी बुधवारी बाजारातून एका फळविक्रेत्याकडून आंबे खरेदी केले. शनिवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी त्या आंब्याचा रस करुन खाल्ला. यानंतर भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय (वय ५०), रेणुका भाऊसाहेब जायभाय (वय ४५), सागर भाऊसाहेब जायभाय (वय २८), अभिजित भाऊसाहेब जायभाय (वय २४), पूनम सागर जायभाय (वय २१), शीतल भाऊसाहेब जायभाय (वय २१) व अवनी सागर जायभाय (वय ४) यांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरु झाला.
पीडित कुटुंबाने कोणत्या ठिकाणावरुन आंबे खरेदी केले होते, याबाबतची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.
गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर
यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शेवगावमधील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु सर्वांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील साई एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केले त्यावेळी जायभाय कुटुंबातील सहा जण बेशुद्ध अवस्थेत तर एक जण शुद्धीवर होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
या रुग्णांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसून येते. परंतु चक्कर येणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे अन्नविषबाधेशिवाय वेगळे असू शकते. काही केमिकल्स पोटात गेल्याने असा त्रास होऊ शकतो. रुग्णांनी खाल्लेला आमरस आणि आंब्यांची फॉरेन्सिक विभागाने तपासणी केली तर नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे समोर येईल.
डॉ. सचिन पांडुळे पाटील,
(एम डी मेडिसिन ) साई एशियन हॉस्पिटल, अहिल्यानगर
उपचार करणारे डॉक्टर
---------------------------
शक्यतो थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावे
आंबे झटपट पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडसारख्या मानवी शरीराला घातक असलेल्या पुड्या आंब्यामध्ये ठेवतात किंवा पावडर टाकतात. यामुळे फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग येऊन पिकल्यासारखे दिसतात. मात्र, अशा प्रकारची फळे खाल्ल्याने माणसांसाठी जीवघेणी ठरू शकतात. यामुळे नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे खरेदी करुन खाल्ले तर कोणताही धोका होणार नाही.फळे २ तास पाण्यात भिजवून नंतर धुवून खावीत जेणेकरून त्यावरील कीटकनाशके आणि रसायने निघून जातील.