14/05/2023
१४ मे २०२३ दैनिक पुढारी - रायगड आवृत्ती
शरीरम् अनुपालयेत् |
आज मे महिन्याचा दुसरा रविवार, हा दिवस जगभर मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. अवघ्या सृष्टीचे सृजन ज्या मातृशक्तीपासून होते, त्या मातृशक्तीचे वंदन सर्वच संस्कृतीमध्ये केले जाते. आपल्या येथे सुद्धा, पिठोरी अमावस्या हा मातृदिन म्हणूनच साजरा होणारा सण आहे. एक आई गर्भावस्थेपासून ते प्रसुतिवेदना आणि त्यानंतरही बाळाचे भरणपोषण नीट व्हावे यासाठी जे काही करते त्याची बरोबरी कशासोबतही करता येऊ शकत नाही. तर अशा सर्व दिव्य पार करून आईने दिलेला हा जन्म आणि दिलेले आरोग्य याबद्दल आपण सर्व मातांप्रती कायम ऋणी असायला हवं.
आजचा विषय हा या आरोग्यारक्षणासंदर्भातच आहे. माणसाचे शरीर हे फार अजब आणि परस्पर अवलंबी गुंतागुंतीच्या शरीरक्रियांनी बनले आहे. माणूस जन्मल्यापासून किंबहुना गर्भावस्थेत असल्यापासूनच या शरीरक्रिया सुरू होतात. आणि या शरीरक्रियांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शरीरच आपल्याला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा, ही अन्नातून मिळते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर आपल्याला पुन्हा भूक लागते. जलांश कमी झाला की शरीरच पाणी पिण्यासाठी तहानेची संवेदना निर्माण करते. पचन होऊन मल - मूत्र निर्माण झाल्यावर त्यांचा त्याग करण्याची इच्छा सुद्धा शरीरच निर्माण करते. अशाप्रकारे शरीर स्वतःच स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडून करवून घेत असते. या शरीरप्रवृत्तींनाच (natural urges) आयुर्वेदात *शारीरिक वेग* असे म्हटले आहे. आणि हे वेग उत्पन्न झाल्यावर कधीही रोखून धरू नयेत, असे सांगितले आहे.
अडवू नयेत अशा एकूण तेरा शारीरिक वेगांचे वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. हे १३ वेग पुढीलप्रमाणे:
१) मूत्रप्रवृत्ती २) मलप्रवृत्ती ३) अधोवायु ४) उलटी ५) शिंका ६) उद्गार (ढेकर) ७) जांभई ८) भूक ९) तहान १०) अश्रू ११) निद्रा १२) श्रमश्वास १३) शुक्र
या १३ गोष्टी कधीही मुद्दामहून अडवून ठेवू नये. या शारीरिक वेगांना अडवून ठेवले आणि असे वारंवार करत राहिले तर विभिन्न प्रकारचे रोग उत्पन्न होण्याचा संभव असतो. कारण असे वेग अडवून ठेवल्यामुळे शरीरातील वात दोषाचा समतोल बिघडतो आणि वाताचा समतोल बिघडला की कफ - पित्त दोष सुद्धा त्यामुळे बाधित होतात. आणि मग जो वेग अडवला असेल त्यानुसार ते ते रोग उत्पन्न होतात. त्या त्या वेगानुसार उत्पन्न होणाऱ्या रोगांबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
१) मल प्रवृत्ती
मल प्रवृत्तीचा वेग अडवल्याने पोटात दुखणे, डोकेदुखी, वायुनिस्सरण न होणे (गुदमार्गातून वायू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होणे), पोट साफ न होणे, पोटऱ्या दुखणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे या तक्रारी उत्पन्न होतात. अशावेळी गरम पाणी प्यायल्याने बरे वाटते.
२) मूत्र प्रवृत्ती
मूत्र प्रवृत्तीचा वेग रोखून धरला असता मूत्राशय, मूत्रमार्ग येथे वेदना, ओटीपोटात दुखणे मूत्रप्रवृत्ती होताना वेदना, कंबर दुखणे अशा प्रकारचे त्रास होतात. अशावेळी अवागाह स्वेद (गरम पाण्याच्या टबात बसणे), साजूक तूप खाणे फायद्याचे ठरते.
३) अधोवायु
गुदमार्गातून वायुनिस्सरण (गॅसेस पास होताना) अडवून ठेवल्यामुळे मूत्रप्रवृत्ती योग्यरीत्या न होणे, पोट साफ न होणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, थकल्यासारखे वाटणे या तक्रारी निर्माण होतात. अशावेळी वातामुलोमन होईल असे, तूपासारखे स्निग्ध पदार्थांनी युक्त गरमागरम जेवण जेवावे, गरम पाणी प्यावे.
४) उलटी
उलटी अडवली असता, मळमळ वाटणे, तोंडाची चव जाणे, अंगास खाज येणे, थकवा जाणवणे असा त्रास होऊ शकतो. अशावेळी रुग्णाला लाह्या खायला द्याव्यात. कोरडे अन्न खाण्यास द्यावे. आणि मग लंघन म्हणजे उपवास करण्यास सांगावे.
५) क्षवथु (शिंका)
शिंक अडवल्यास मान आखडणे, डोकेदुखी, चेहरा वाकडा होणे, थकवा या तक्रारी उद्भवतात. तेव्हा चेहऱ्याला, मानेला, डोक्याला तेल लावून मालिश करून, वाफारा घेतल्यास फायदा होतो.
६) उद्गार (ढेकर)
ढेकर अडवल्यास उचकी लागणे, खोकला, तोंडाची चव जाणे, छातीत जडपणा, भरल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. तेव्हा गरम पाणी प्यायल्याने बरे वाटते.
७) जृंभा (जांभई)
जांभई अडवल्यास शरीर जखडल्यासारखे वाटणे, झटके येणे, शरीर सुन्न पडल्यासारखे वाटणे, कंप जाणवणे, या तक्रारी उद्भवतात. अशावेळी गरम पाण्याने गुळण्या करणे, गरम पाणी पिणे याने फायदा होतो.
८) क्षुधा (भूक)
भूक लागल्यावर अन्न न खाल्ल्याने, शरीर कृश, दुर्बल होणे, चेहरा निस्तेज होणे, चक्कर येणे, तोंडाची चव जाणे असा त्रास होतो. अशावेळी स्निग्ध, गरम, पचायला हलका असा आहार खायला हवा.
९)तृष्णा (तहान)
तहान लागल्यावर पाणी न प्यायल्याने, घसा - तोंड कोरडे पडते, थकल्यासारखे, गळून गेल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. अशा वेळी थंड, प्यायला बरे वाटतील असे पेय पदार्थ पिण्यास द्यावेत.
१०) निद्रा
झोप आल्यावर न झोपल्याने, जांभया येणे, अंग दुखणे, सुस्ती जाणवणे, डोळ्यावर झापड येणे, डोके दुखणे या तक्रारी उद्भवतात. अशावेळी त्या रुग्णाने झोपल्याने, त्याचे हातपाय चेपल्याने बरे वाटते.
११) अश्रु
अश्रु येतात तेव्हा ते अडवल्याने सर्दी होणे, नाक वाहणे, डोळे जड होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे हा त्रास होतो. अशावेळी त्या व्यक्तीने पाहिले झोप पूर्ण करावी.
१२) श्रम श्वास
श्रम श्वास अर्थात् दमल्यावर वाढलेली श्वास गती, रोखून धरण्याचा प्रयत्न केल्यास पोटात दुखणे, छातीत दुखणे, चक्कर येणे हा त्रास होऊ शकतो. अशावेळी रुग्णाला शांत बसून, एका संथ लयीत श्वास घेण्यास सांगावे. नंतर छातीस तेल लावून वाफारा घेण्यास सांगावे.
१३) शुक्र वेग
हा पुरुषांमध्ये उत्पन्न होणारा वेग अडवला असता, इंद्रिय, अंडाशय येथे दुखणे, अंगदुखी, मूत्र प्रवृत्ती मध्ये अडथळा उत्पन्न होणे हा त्रास जाणवतो. अशावेळी अंगाला मालिश शेक करणे, दूध पिणे फायद्याचे ठरते.
या सर्व विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्या शारीरिक वेगांना कधीही अडवू नये. आजच्या काळात यामध्ये एक आणखी भर पडली आहे. स्त्रियांमध्ये गर्भ शुभकार्य, प्रवास किंवा अन्य कारणांनी तसेच गर्भ निरोधासाठी, मासिक धर्म पुढे ढकलण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय सुद्धा सर्रास औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मासिक पाळी अडवली जाते. हे सुद्धा एकप्रकारे शरीर वेग विधारणच आहे. ज्याचे दुष्परिणाम Hormonal changes च्या माध्यमातून नक्कीच दिसून येतात.
तेव्हा कामाची व्यस्तता, लज्जा, शिष्टाचार अशा सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वात आधी शरीरधर्माचे पालन करावे. म्हणूनच आयुर्वेदात म्हटले आहे :-
*सर्वमन्यत् परित्यज्य शरीरमनुपालयेत्!*
वर सांगितलेले शारीरिक वेग कधीही अडवू नयेत. मात्र लोभ, मोह, शोक, क्रोध असे मानसिक वेग आणि खोटे बोलणे, दुसरा दुखावला जाईल असे बोलणे; असे वाचिक वेग मात्र कायम रोखून धरावेत.
- डॉ. अमेय केळकर
M.D. आयुर्वेद
मोबाईल 9168911444