Dr. Kelkar's Ayurcare And Panchakarma Centre, Alibag

Dr. Kelkar's Ayurcare And Panchakarma Centre, Alibag Dr. Kelkar's Ayurcare And Panchakarma Centre, Alibag offers Ayurveda medicament to various ailments

15/11/2025

Night Shift आणि आयुर्वेद          सध्याचे धकाधकीचे जीवन, कामाचे बदलते स्वरूप, परदेशी कंपन्यांसोबत ऑनलाईन काम करण्याची उप...
08/03/2024

Night Shift आणि आयुर्वेद

सध्याचे धकाधकीचे जीवन, कामाचे बदलते स्वरूप, परदेशी कंपन्यांसोबत ऑनलाईन काम करण्याची उपलब्ध सुविधा या सगळ्या कारणांमुळे दिवसेंदिवस रात्र पाळीत काम करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आधी फक्त कारखान्यात काम करणारे मजूर आणि अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, जसे की वैद्यकीय सेवा, संरक्षण दल, पोलिस दल, सार्वजनिक वाहतूक अशा क्षेत्रात रात्री पाळी अनिवार्य होती. पण आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासामुळे यात रात्रपाळीत काम करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रात्री जागरण झाल्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होणार हे निश्चित कारण आपल्या शरीराच्या घड्याळाला दिनचर्या - सकाळी उठणे, मलमूत्र विसर्जन, दैनंदिन कामकाज, खाणे पिणे, रात्री झोप अशी सवय झालेली असते. जेव्हा कामाच्या ठिकाणी रात्री जागरण करणे चालू होते, तेव्हा हा सगळा नित्याचा झालेला दिनक्रम बिघडतो. याची तीव्रता, त्या त्या व्यक्तीच्या कामाचे स्वरूप, रात्री सलग किती वेळ सजगपणे काम करावे लागते, शिफ्ट एक एक आठवडा पूर्ण की दर दोन दिवसांनी बदलते या सर्व बाबींवर अवलंबून असते.
आयुर्वेदानुसार रात्री जागरण केल्याने आणि दिवसा झोपल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा समतोल बिघडतो. कारण जागरणाने वात दोष वाढतो, तर दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त दोष वाढतात. तसेच आयुर्वेदात १३ अधारणीय शारीरिक वेग सांगितले आहेत. जसे की मल वेग, मूत्र वेग, क्षुधा, इत्यादि. अर्थात विविध शरीर धर्म ज्याला natural urges म्हणता येईल असे. यात निद्रा अर्थात झोपेचा सुद्धा समावेश केला आहे. आणि झोप आल्यावर न झोपल्याने होण्याच्या त्रासाचे वर्णन करताना चरकाचार्यांनी जांभया येणे, अंग दुखणे, सुस्ती जाणवणे, डोळ्यावर झापड येणे, डोके दुखणे अशा तक्रारी उद्भवतात, असे सांगितलेले आहे. या तात्कालिक त्रासांव्यतिरिक्त वजन वाढणे, कोलेस्टेरॉल, रक्तशर्करा वाढणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकार अशा जीवनशैलीजन्य आजारांचा धोकाही वाढीस लागतो. झोपेचे चक्र बिघडते, पचनाच्या समस्या सुरू होतात, दिवसभर सुस्त आणि थकलेले वाटू लागते. हेच सर्व त्रास विनाकारण, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर गेम खेळणे, सोशल मीडिया वर वेळ घालवत राहणे किंवा OTT platform वर उशिरा पर्यंत वेब सिरीज बघत राहणाऱ्या Gen Z ला सुद्धा चालू होतात. हे लोक जागरण टाळू शकतात. पण ज्यांचे कामच रात्रपाळीत आहे, अशांनी मग काय करावे?! सध्याच्या स्पर्धात्मक युगात, पटकन नोकरी बदलणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी काही सोपे आरोग्यरक्षण नियम पाळले आणि जीवनशैलीत थोडे बदल केले तरी त्यांचे स्वास्थ्य अबाधित राहते.

आहार :
सामान्यतः सकाळी पोटभर न्याहारी घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. पण रत्रपळीमध्ये मात्र रात्रीच्या जेवणाला महत्त्व आहे. रात्रीचे जेवण हे उशिरा जेवू नये. जास्तीत जास्त ७.३० - ८ वाजेपर्यंत जेवावे. आणि जेवणात शक्यतो पचायला हलके असे पदार्थ खावेत. आयुर्वेदानुसार एरवी रात्री दूध पिणे कफकारक सांगितले आहे. पण रात्री जागरण होणार असेल तर लवकर जेवावे. आणि रात्री एक कप दूध त्यात अर्धा चमचा घरी कढवलेले साजूक तूप घालून खावे. त्यामुळे रात्रीच्या जागरणाने वाढणारा वात नियंत्रणात राहण्यास मदत होते. रात्रीच्या आहारात तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. तसेच थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम सुद्धा टाळावे. पिण्यासाठी शक्यतो पाणी गरम राहील अशी बाटली सोबत घेऊन जावी. मध्ये मध्ये थोडे गरम पाणी प्यावे. रात्री सुकामेवा खाल्ला चालेल पण जागे राहण्यासाठी म्हणून चहा, कॉफी अशा पेयांचे सेवन करणे टाळायला हवे. नाईट शिफ्ट संपवून घरी आल्यानंतर जर कडकडून भूक लागली नसेल तर आधी झोपावे. झोप पूर्ण झाल्यानंतर स्नान करून मग जेवावे. खाऊन मग लगेच झोपणे टाळावे. त्यापेक्षा आधी सांगितल्याप्रमाणे झोप झाल्यानंतर खावे, जेणेकरून अपचनाचा त्रास होत नाही.

दिनक्रम :
कोणतीही शिफ्ट चालू असली तरी, व्यायामात सातत्य असायला हवे. आठवड्यातून किमान चार दिवस योगासने / सूर्यनमस्कार - जोर बैठका / चालणे / धावणे / सायकल चालवणे असा एखादा; आपल्या वय, बल, उपलब्ध वेळ आणि आवडीनुसार कोणतातरी एक व्यायाम प्रकार अवश्य करावा. त्यामुळे पचनशक्ती, रक्ताभिसरण, हाडे, स्नायू, मणके यांचे स्वास्थ्य चांगले टिकून राहण्यास मदत होते. नाईट शिफ्ट मुळे शरीरावर जसे परिणाम होतात, तसे मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतात. नातेवाईक, मित्र यांना कमी भेटता येते. इतरांपेक्षा आपले घड्याळ पूर्णतः भिन्न चालू असते. अशावेळी मानसिक ताणतणावांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. त्यामळे ध्यानधारणा, मेडिटेशन, योगनिद्रा शिकून घेऊन त्याचा सुद्धा आपल्या दिनक्रमात समावेश करावा. फावल्या वेळात चित्रकला, बागकाम, मनाला शांत वाटेल असे संगीत/गाणी ऐकणे असे काही आपल्या आवडीचे काही छंद जोपासावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे काम सोडून बाकी दिवसभर टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा सर्व प्रकारच्या स्क्रीन पासून लांब राहावे. त्याने आपला बहुमूल्य वेळ वाया जातोच आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत असणाऱ्या संवादावर सुद्धा होतो. व्हिडिओ रिल्स मध्ये कसा आणि किती निरर्थक वेळ वाया जातो, हे तो निघून जाईपर्यंत कळत सुद्धा नाही. दिवसाच्या दोन जेवणापैकी किमान एक वेळ तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण जेवण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व पाळले तर "वर्क - लाईफ बॅलन्स" अर्थात् काम आणि वैयक्तिक जीवन याचा समतोल राखला जाईल आणि परिणामी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहिल.

- डॉ. अमेय केळकर
डॉ. केळकर आयुरकेयर अँड पंचकर्म सेंटर, अलिबाग
९१६८९११४४४

15/08/2023
१४ मे २०२३ दैनिक पुढारी - रायगड आवृत्तीशरीरम् अनुपालयेत् |आज मे महिन्याचा दुसरा रविवार, हा दिवस जगभर मदर्स डे म्हणून साज...
14/05/2023

१४ मे २०२३ दैनिक पुढारी - रायगड आवृत्ती

शरीरम् अनुपालयेत् |

आज मे महिन्याचा दुसरा रविवार, हा दिवस जगभर मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. अवघ्या सृष्टीचे सृजन ज्या मातृशक्तीपासून होते, त्या मातृशक्तीचे वंदन सर्वच संस्कृतीमध्ये केले जाते. आपल्या येथे सुद्धा, पिठोरी अमावस्या हा मातृदिन म्हणूनच साजरा होणारा सण आहे. एक आई गर्भावस्थेपासून ते प्रसुतिवेदना आणि त्यानंतरही बाळाचे भरणपोषण नीट व्हावे यासाठी जे काही करते त्याची बरोबरी कशासोबतही करता येऊ शकत नाही. तर अशा सर्व दिव्य पार करून आईने दिलेला हा जन्म आणि दिलेले आरोग्य याबद्दल आपण सर्व मातांप्रती कायम ऋणी असायला हवं.
आजचा विषय हा या आरोग्यारक्षणासंदर्भातच आहे. माणसाचे शरीर हे फार अजब आणि परस्पर अवलंबी गुंतागुंतीच्या शरीरक्रियांनी बनले आहे. माणूस जन्मल्यापासून किंबहुना गर्भावस्थेत असल्यापासूनच या शरीरक्रिया सुरू होतात. आणि या शरीरक्रियांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शरीरच आपल्याला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा, ही अन्नातून मिळते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर आपल्याला पुन्हा भूक लागते. जलांश कमी झाला की शरीरच पाणी पिण्यासाठी तहानेची संवेदना निर्माण करते. पचन होऊन मल - मूत्र निर्माण झाल्यावर त्यांचा त्याग करण्याची इच्छा सुद्धा शरीरच निर्माण करते. अशाप्रकारे शरीर स्वतःच स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडून करवून घेत असते. या शरीरप्रवृत्तींनाच (natural urges) आयुर्वेदात *शारीरिक वेग* असे म्हटले आहे. आणि हे वेग उत्पन्न झाल्यावर कधीही रोखून धरू नयेत, असे सांगितले आहे.

अडवू नयेत अशा एकूण तेरा शारीरिक वेगांचे वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. हे १३ वेग पुढीलप्रमाणे:
१) मूत्रप्रवृत्ती २) मलप्रवृत्ती ३) अधोवायु ४) उलटी ५) शिंका ६) उद्गार (ढेकर) ७) जांभई ८) भूक ९) तहान १०) अश्रू ११) निद्रा १२) श्रमश्वास १३) शुक्र

या १३ गोष्टी कधीही मुद्दामहून अडवून ठेवू नये. या शारीरिक वेगांना अडवून ठेवले आणि असे वारंवार करत राहिले तर विभिन्न प्रकारचे रोग उत्पन्न होण्याचा संभव असतो. कारण असे वेग अडवून ठेवल्यामुळे शरीरातील वात दोषाचा समतोल बिघडतो आणि वाताचा समतोल बिघडला की कफ - पित्त दोष सुद्धा त्यामुळे बाधित होतात. आणि मग जो वेग अडवला असेल त्यानुसार ते ते रोग उत्पन्न होतात. त्या त्या वेगानुसार उत्पन्न होणाऱ्या रोगांबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
१) मल प्रवृत्ती
मल प्रवृत्तीचा वेग अडवल्याने पोटात दुखणे, डोकेदुखी, वायुनिस्सरण न होणे (गुदमार्गातून वायू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होणे), पोट साफ न होणे, पोटऱ्या दुखणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे या तक्रारी उत्पन्न होतात. अशावेळी गरम पाणी प्यायल्याने बरे वाटते.

२) मूत्र प्रवृत्ती
मूत्र प्रवृत्तीचा वेग रोखून धरला असता मूत्राशय, मूत्रमार्ग येथे वेदना, ओटीपोटात दुखणे मूत्रप्रवृत्ती होताना वेदना, कंबर दुखणे अशा प्रकारचे त्रास होतात. अशावेळी अवागाह स्वेद (गरम पाण्याच्या टबात बसणे), साजूक तूप खाणे फायद्याचे ठरते.

३) अधोवायु
गुदमार्गातून वायुनिस्सरण (गॅसेस पास होताना) अडवून ठेवल्यामुळे मूत्रप्रवृत्ती योग्यरीत्या न होणे, पोट साफ न होणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, थकल्यासारखे वाटणे या तक्रारी निर्माण होतात. अशावेळी वातामुलोमन होईल असे, तूपासारखे स्निग्ध पदार्थांनी युक्त गरमागरम जेवण जेवावे, गरम पाणी प्यावे.

४) उलटी
उलटी अडवली असता, मळमळ वाटणे, तोंडाची चव जाणे, अंगास खाज येणे, थकवा जाणवणे असा त्रास होऊ शकतो. अशावेळी रुग्णाला लाह्या खायला द्याव्यात. कोरडे अन्न खाण्यास द्यावे. आणि मग लंघन म्हणजे उपवास करण्यास सांगावे.

५) क्षवथु (शिंका)
शिंक अडवल्यास मान आखडणे, डोकेदुखी, चेहरा वाकडा होणे, थकवा या तक्रारी उद्भवतात. तेव्हा चेहऱ्याला, मानेला, डोक्याला तेल लावून मालिश करून, वाफारा घेतल्यास फायदा होतो.

६) उद्गार (ढेकर)
ढेकर अडवल्यास उचकी लागणे, खोकला, तोंडाची चव जाणे, छातीत जडपणा, भरल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. तेव्हा गरम पाणी प्यायल्याने बरे वाटते.

७) जृंभा (जांभई)
जांभई अडवल्यास शरीर जखडल्यासारखे वाटणे, झटके येणे, शरीर सुन्न पडल्यासारखे वाटणे, कंप जाणवणे, या तक्रारी उद्भवतात. अशावेळी गरम पाण्याने गुळण्या करणे, गरम पाणी पिणे याने फायदा होतो.

८) क्षुधा (भूक)
भूक लागल्यावर अन्न न खाल्ल्याने, शरीर कृश, दुर्बल होणे, चेहरा निस्तेज होणे, चक्कर येणे, तोंडाची चव जाणे असा त्रास होतो. अशावेळी स्निग्ध, गरम, पचायला हलका असा आहार खायला हवा.

९)तृष्णा (तहान)
तहान लागल्यावर पाणी न प्यायल्याने, घसा - तोंड कोरडे पडते, थकल्यासारखे, गळून गेल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. अशा वेळी थंड, प्यायला बरे वाटतील असे पेय पदार्थ पिण्यास द्यावेत.

१०) निद्रा
झोप आल्यावर न झोपल्याने, जांभया येणे, अंग दुखणे, सुस्ती जाणवणे, डोळ्यावर झापड येणे, डोके दुखणे या तक्रारी उद्भवतात. अशावेळी त्या रुग्णाने झोपल्याने, त्याचे हातपाय चेपल्याने बरे वाटते.

११) अश्रु
अश्रु येतात तेव्हा ते अडवल्याने सर्दी होणे, नाक वाहणे, डोळे जड होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे हा त्रास होतो. अशावेळी त्या व्यक्तीने पाहिले झोप पूर्ण करावी.

१२) श्रम श्वास
श्रम श्वास अर्थात् दमल्यावर वाढलेली श्वास गती, रोखून धरण्याचा प्रयत्न केल्यास पोटात दुखणे, छातीत दुखणे, चक्कर येणे हा त्रास होऊ शकतो. अशावेळी रुग्णाला शांत बसून, एका संथ लयीत श्वास घेण्यास सांगावे. नंतर छातीस तेल लावून वाफारा घेण्यास सांगावे.

१३) शुक्र वेग
हा पुरुषांमध्ये उत्पन्न होणारा वेग अडवला असता, इंद्रिय, अंडाशय येथे दुखणे, अंगदुखी, मूत्र प्रवृत्ती मध्ये अडथळा उत्पन्न होणे हा त्रास जाणवतो. अशावेळी अंगाला मालिश शेक करणे, दूध पिणे फायद्याचे ठरते.

या सर्व विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्या शारीरिक वेगांना कधीही अडवू नये. आजच्या काळात यामध्ये एक आणखी भर पडली आहे. स्त्रियांमध्ये गर्भ शुभकार्य, प्रवास किंवा अन्य कारणांनी तसेच गर्भ निरोधासाठी, मासिक धर्म पुढे ढकलण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय सुद्धा सर्रास औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मासिक पाळी अडवली जाते. हे सुद्धा एकप्रकारे शरीर वेग विधारणच आहे. ज्याचे दुष्परिणाम Hormonal changes च्या माध्यमातून नक्कीच दिसून येतात.

तेव्हा कामाची व्यस्तता, लज्जा, शिष्टाचार अशा सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वात आधी शरीरधर्माचे पालन करावे. म्हणूनच आयुर्वेदात म्हटले आहे :-
*सर्वमन्यत् परित्यज्य शरीरमनुपालयेत्!*

वर सांगितलेले शारीरिक वेग कधीही अडवू नयेत. मात्र लोभ, मोह, शोक, क्रोध असे मानसिक वेग आणि खोटे बोलणे, दुसरा दुखावला जाईल असे बोलणे; असे वाचिक वेग मात्र कायम रोखून धरावेत.

- डॉ. अमेय केळकर
M.D. आयुर्वेद
मोबाईल 9168911444

Today's Dainik PUDHARI - Raigad Edition
07/05/2023

Today's Dainik PUDHARI - Raigad Edition

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन, त्यानिमित्ताने सर्वांना आनंददायी शुभेच्छा!संत रामदास स्वामींनी, मनाचे श्लोक सांगताना, मानसि...
10/10/2019

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन, त्यानिमित्ताने सर्वांना आनंददायी शुभेच्छा!

संत रामदास स्वामींनी, मनाचे श्लोक सांगताना, मानसिक आरोग्य कसे जपावे याचा जणू वस्तुपाठच सांगितला आहे, ज्याचे सार या खलील श्लोकात येते : -

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

शारीरिक लक्षणे ही लगेच व्यक्त होतात, लक्षात येतात आणि त्यांना आवश्यक ती चिकित्सा सुद्धा लवकर मिळते; पण मानसिक विकारांची सुरुवात मात्र लवकर लक्षात येणे कठीण. आणि या विकारांना कारणीभूत होणारे हेतू, हे बऱ्याचदा आपल्या स्वतःच्याच हातून कळत नकळत घडत असतात.
चरकाचार्यांनी सर्व मानसिक आजारांचे कारण केवळ दोन शब्दात सांगितले आहे -
ते म्हणजे
इष्टस्य अलाभात् ; लाभात् अनिष्टस्य!
अर्थात् आपल्याला वांछित गोष्ट न घडणे आणि आपल्याला नको असलेली गोष्ट घडणे. अशा वेळी धी-धृति-स्मृति (ज्ञानग्रहण शक्ती, बुध्दि आणि स्मरणशक्ती) यांचा विभ्रम झालेल्या त्या रुग्णाला परत वस्तुनिष्ठ विचार करायला प्रवृत्त करायला लावणे हेच मानस रोगांच्या चिकित्सेचे उद्दिष्ट!
चरक संहितेत कोणती वस्तु/कृती, कोणती गोष्ट घडवून आणण्यात श्रेष्ठ आहे, अशी एक यादीच अग्र्य संग्रह या नावाने दिलेली आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, या अग्र्य संग्रहातील मानसिक हेतूंशी संबंधित गोष्टी बघूयात :-

#विषादो_रोगवर्धनानां
विषाद म्हणजे, एखादी कृती सुरू करण्याआधीच ती आपल्याला जमणार नाही, या भावनेतून येणारे नैराश्य. हा विषाद रोग वाढवणाऱ्या गोष्टींत अग्रेसर आहे. आजच्या काळात दिसून येणाऱ्या बहुतांश psychosomatic diseases (मनोदैहिक विकार) यांना हेच कारण आहे.

#हर्षः_प्रीणनानां_श्रेष्ठ:
हर्ष अर्थात आनंदित मन, हे सर्व शरीराचे योग्य सुदृढ आरोग्य टिकून राहायला सहाय्यभूत होते.

#शोकः_शोषणानां_श्रेष्ठ:
शोक म्हणजे जवळची व्यक्ती दुरावल्याने येणारे दुःख. अतिशोकामुळे शरीरातील वात वाढतो, कृशता येत. वजन कमी होते.

#निवृत्तिः_पुष्टिकराणां
निवृत्ती, अर्थात सर्व आशा अपेक्षा यांपासून अलिप्तता बाळगणे, हे मनाच्या पुष्टी साठी, समाधानासाठी सर्वोत्तम आहे.

#निर्देशकारित्वमातुरगुणानां
वैद्याने सांगितलेले सर्व जसेच्या तसे पाळणे हा रुग्णाचा श्रेष्ठ गुण आहे.

#लौल्यं_क्लेशकराणाम्
हाव/लालसा ही क्लेशदायक गोष्टींमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. यातूनच पुढे विविध मानसिक रोग निर्माण होतात.

#अनिर्वेदो_वार्तलक्षणांनां
मन प्रसन्न असणे, हे आरोग्याच्या लक्षणांमध्ये सर्वश्रेष्ठ लक्षण आहे.

#असमर्थता_भयकराणां
भयकारक भावांमध्ये, असमर्थता-हतबलता सर्वात श्रेष्ठ आहे.

#तद्विद्यसम्भाषा_बुद्धिवर्धनानाम्
विद्वान व्यक्तींसोबत केलेली चर्चा, बुध्दि वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.

#सद्वचनमनुष्ठेयानाम्
संतांनी, सज्जनांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे, हे अनुपालन करण्याजोग्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.

#असद्ग्रहणं_सर्वाहितानां
सर्व प्रकारच्या अहितकारक गोष्टींत, असंबद्ध बोलणे, वागणे हे सर्वात अग्रेसर आहे.

#सर्वसन्न्यासः_सुखानामिति
उपधा, अर्थात सर्व विषय वासनांपासून अलिप्त राहणे, हे सर्वात सुखदायक आहे.

Rational Emotive Behavior Theory चे जनक, डॉ. अल्बर्ट एलिस यांनी या सर्व मनाच्या खेळांची मांडणी अतिशय सोप्या शब्दांत केली आहे.

आपण म्हणतो A झाले, म्हणून मी C केले. आणि आपण आपल्या वागण्याला/कृतीला A कारणीभूत मानतो. पण वस्तुतः आपल्या C या कृत्याला, A ही घटना जबाबदार नसते. तर A नंतर, आपण जो विचार करतो, तो A आणि C या दोघांच्या मध्ये होणारा, आपल्या मनातील विचार म्हणजे B यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असते. त्यामुळे आपल्या भावनांचे नियंत्रण आपल्याच हातात आहे. त्याची जबाबदारी आपण दुसऱ्याच्या वर्तनाला देतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्या मानसिक आरोग्याला बाधा पोहोचवत असतो.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, आपण व्यक्त होण्याआधी विचार करूयात, हा संकल्प सर्वजण मिळून करूयात, आणि आनंदाचे सोपान होऊया!

आम्ही अलिबाग येथे आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करून आज ५ वर्ष पूर्ण झाली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वाद असेच कायम पा...
17/06/2019

आम्ही अलिबाग येथे आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करून आज ५ वर्ष पूर्ण झाली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वाद असेच कायम पाठीशी राहू दे. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या रुग्णांचे विशेष आभार; आमची अनुभवाची शिदोरी त्यांच्यामुळेच अधिकाधिक समृद्ध होत आहे.

- डॉ. सौ. अवनी व डॉ. अमेय केळकर

 #खरंच_आयुर्वेदामध्ये_वेळाने_गुण_येतो_का?          आजचे वेगवान जग, सततची धावपळ, कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्याचे द...
14/05/2019

#खरंच_आयुर्वेदामध्ये_वेळाने_गुण_येतो_का?

आजचे वेगवान जग, सततची धावपळ, कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्याचे दडपण आणि सर्वच क्षेत्रांत वाढत चाललेली स्पर्धा या सर्व कारणांमुळे आजच्या घडीला कुणालाही स्वतःच्या प्रकृती स्वास्थ्याकडे पहायला सुद्धा वेळ नाही. अशा परिस्थितीत 'आजारी पडणे' ही एक मोठी नामुष्कीच. कारण आजची ही व्यस्त जीवनशैली 'विश्रांती' या शब्दाला थारा देत नाही. त्यामुळे सर्वांना लवकरात लवकर आराम पडावा, जाहिरातीत दाखवतात तसे #मिनिटोंमे_राहत असे काही आपल्या आजाराच्या बाबतीत घडावे अशी अपेक्षा असते. अशा प्रकारची अपेक्षा ठेवणे यात काहीच गैर नाही. पण सर्वच परिस्थितींमध्ये, सर्वच प्रकारच्या आजारांत अशी अपेक्षा ठेवणे, हे मात्र वास्तववादी ठरत नाही.

एका बाजूला ही जीवनातील व्यस्तता, तर दुसऱ्या बाजूला आयुर्वेदाबद्दल रूढ झालेला गैरसमज; तो म्हणजे - "आयुर्वेदिक औषधांनी रुग्ण बरा होण्यास वेळ लागतो!" हे वाक्य काही लोक उपहासाने बोलतात तर काही आयुर्वेदावर निष्ठा असलेले लोक हेच वाक्य कौतुकाने म्हणतात - "आयुर्वेदात रोग मुळापासून बरा होतो, म्हणून रोग बरा व्हायला वेळ लागतो." पण हे वाक्य देखील योग्य नाही. कारण रोग पूर्णतः बरा होण्यासाठी प्रत्येक वेळी वेळ लागेलच असे नाही. फक्त गरज असते ती, रुग्णाने योग्य वेळीच वैद्याकडे जाण्याची, वैद्याने योग्य ती औषधयोजना करून पथ्य समजावून सांगण्याची आणि रुग्णाने नेमाने औषध घेऊन, सांगितलेले पथ्य काटेकोरपणे पाळण्याची.

आरोग्यप्राप्ती होऊन, व्याधि नाहीसा करण्याच्या सामर्थ्यामुळेच आयुर्वेद शास्त्र हजारो वर्षे, काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे. या शास्त्रात पूर्वीच्या आचार्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत, ते आजच्या काळातही तितकेच प्रभावी व सद्य:फलदायी ठरतात. असे असूनही, गुण वेळाने येतो हा गैरसमज रूढ होण्याचे कारण काय? याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे.

मुळात हल्ली आजारी पडल्यावर पहिल्या प्रथम कोणी डॉक्टरांकडे जात नाही. पहिल्यांदा नंबर लागतो तो म्हणजे, घरात असलेल्या औषधी स्टॉक मधील वेदनाशामक औषधे, अँटासिड्स, व्हिटॅमिनच्या गोळ्या, टॉनिक्स, आणि ऍलर्जीवरील औषधांचा! यातील काहीच नसेल, तर दुसरा नंबर मेडिकल शॉपचा! मग त्या शॉपवाल्याच्या सल्ल्याने आजचे दुखणे उद्यावर ढकलले जाते. आणि तरीही बरे वाटत नसेल, तर आता डॉक्टरांकडे जाण्यावाचून तरणोपाय नाही याची जाणीव झाल्यावर डॉक्टरांचा नंबर लागतो. तर काही लोकांना 'अँलोपँथी औषधे खूप झाली! आता आयुर्वेदिक उपचारच घेऊ' असा अचानक साक्षात्कार होतो. आणि अशी सगळी वैद्यकीय मुशाफिरी झाल्यावर सरतेशेवटी तो रुग्ण आयुर्वेदाकडे वळतो. अशावेळी रोग जुनाट झालेला असतोच व रुग्णाचे शरीरबळ सुद्धा कमी झालेले असते. बरं या आतापर्यंतच्या वाटचालीत त्या रुग्णाला काय खावे? काय टाळावे? त्याच्या जीवनशैलीत काही चुकते आहे का? पथ्य काय पाळावे? याबाबत कोणीच मार्गदर्शन केलेले नसते. त्यामुळे ज्या चुकीच्या सवयींमुळे रोग जडला असतो, त्या सवयी तशाच चालू असतात. परिणामी रोग वाढतच राहिलेला असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आलेल्या रुग्णाला वैद्याने योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन केल्यास आयुर्वेदाबद्दल रुजणाऱ्या गैरसमजुतींना आळा घातला जाऊ शकतो.

आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायला येणारे बहुतांश रुग्ण हे जुनाट आजार, जसे की सांधेदुखी, दमा, त्वचाविकार-सोरायसिस, एक्झिमा, स्थौल्य इत्यादि चिवट आजारांनी ग्रस्त असतात. आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळण्याआधी त्या रुग्णांचे वेदनाशामक औषधे, स्टिरॉइड्स, अशा तऱ्हेच्या औषधांचा मारा करून झालेला असतो. आणि रुग्ण या औषधांवर अवलंबून झालेला आणतो. कधी हे वैद्यकीय सल्ल्याने होते तर कधी काही रुग्ण १० दिवस घ्यायला सांगितलेली औषधे, बरे वाटते म्हणून स्वतःच ठरवून महिनोमहिने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत राहतात. त्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे काम दुप्पट झालेले असते, एक म्हणजे त्या औषधांवरचे अवलंबित्व घालवणे आणि मूळ रोगाची चिकित्सा करणे. अशा जुनाट, त्रासदायक आजारांमध्ये, रोग त्वरित बरा व्हावा, काहीतरी जादुई इलाज मिळावा अशी रुग्ण व नातेवाईकांची अपेक्षा असते. परंतु अशा जुनाट होऊन 'कष्टसाध्य' अर्थात् बरे होण्यास दुरापास्त झालेल्या व्याधींना, कमी होण्यास काही वेळ तरी लागणारच! अशा अवस्थेत आयुर्वेदतज्ज्ञांचे ज्ञान, चिकित्सा कौशल्य आणि समुपदेशन कौशल्य यांची खरी कसोटी असते. आणि ते बरोबर जमल्यास या गैरसमजांना आळा घालणे शक्य होते.

याखेरीज काही रुग्ण आततायीपणा करून, अतिशय अनिवार्य असलेली पथ्ये सुद्धा कधी कधी पाळत नाहीत. उदाहरणार्थ Cold Drink आणि थंड पाणी पिण्याची सवय असलेली व्यक्ती सतत सर्दीने पीडित असून सुद्धा आपली थंड पेय पिण्याची सवय सोडण्यास तयार होत नाही. आणि फक्त औषधांनीच ताबडतोब इलाज व्हावा अशी त्यांची इच्छा असते. तर काही रुग्ण रात्री मेजवानीचा बेत ठरला असताना, अतिसाराने (अर्थात् जुलाब) पीडित झाल्यावर सुद्धा आपण संध्याकाळपर्यंत बरे होऊन रात्री मेजवानीचा आंनद उपभोगता यावा अशी लालसा मनात ठेवून असतात; जे वस्तुतः शक्य नसते.

ही सगळी कारणे, आयुर्वेदामध्ये उशिराने गुण येतो! या गैरसमजाला कारणीभूत आहेत, हे जरी खरे असले तरी काही आयुर्वेदिक तज्ञ सुद्धा हा गैरसमज अधिक दृढ होण्याला कारणीभूत आहेत; हे सुद्धा नाकारता येत नाही. रुग्णाला योग्य आराम मिळवून देण्यात अपयश आल्यावर, रुग्णाचे तात्पुरते समाधान करण्याकरिता ते याच गैरसमजाचा 'ढाल' म्हणून वापर करतात. असे करणे त्यांना तत्क्षणी वाचविणारे असले तरी दूरचा विचार करता याने त्यांचे व शास्त्राचे नुकसानच होत असते. आधी पाहिल्याप्रमाणे जुनाट, चिवट आजारांत नाही मात्र सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा तत्क्षणिक आजारांत लवकर बरे व्हावे अशी रुग्णाची अपेक्षा अयोग्य नसते. आणि या अपेक्षेला पूर्ण करणे कोणत्याही शास्त्राच्या डॉक्टरचे/वैद्याचे काम असते. अशावेळी स्वतःच्या मर्यादांचे खापर संपूर्ण आयुर्वेद शास्त्रावर फोडणे चूक आहे.

त्यामुळे योग्यवेळीच वैद्याकडे जाणे, योग्य वेळी योग्य औषधीयोजना सुरू करणे आणि वैद्याने सांगितलेले पथ्य रुग्णाने जाणीवपूर्वक पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास रोगमुक्तीचे उद्दिष्ट विनासायास साध्य होते.

- डॉ. अमेय केळकर
M.D. आयुर्वेद
डॉ. केळकर्स आयुर्केयर, अलिबाग
मोबा. ९१६८९११४४४

मनोदैहिक (सायाकोसोमॅटीक) विकार आणि आयुर्वेदमानवी मनाचा आणि शरीराचा अवश्यंभावी एकमेकावर परिणाम होत असतो. मन प्रसन्न नसेल ...
07/03/2019

मनोदैहिक (सायाकोसोमॅटीक) विकार आणि आयुर्वेद

मानवी मनाचा आणि शरीराचा अवश्यंभावी एकमेकावर परिणाम होत असतो. मन प्रसन्न नसेल तर भूक न लागणे, खाण्यात मन न लागणे, निरुत्साही वाटणे, काही करावेसे न वाटणे अशी शारीरिक लक्षणे दिसून येतात. तर आजारपणामुळे नैराश्य येणे, कशात मन न लागणे अशी लक्षणे दिसून येतात. हा शरीर-मनाचा अन्योन्य संबंध लक्षात घेऊनच आयुर्वेदात स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना केवळ रोगांचा अभाव म्हणजेच स्वास्थ्य इतकी त्रोटक व्याख्या न करता ज्याचे सर्व शरीर व्यवहार सुस्थितीत आहेत, वात-पित्त-कफ हे त्रिदोष, सप्तधातु इत्यादि सर्व शरीर घटक योग्य स्थितीत आहेत त्याचबरोबर ज्याचे मन, इंद्रिये, आत्मा प्रसन्न आहेत; तोच सर्वार्थाने स्वस्थ होय. WHO ने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) सुध्दा १९४८ साली आधीची स्वास्थ्याची व्याख्या बदलून परिपूर्ण, सर्वसमावेशक अशी स्वास्थ्याची व्याख्या करताना म्हटले आहे की आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नाही तर ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती असलेली अवस्था होय! यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, ती म्हणजे केवळ सर्व शारीरक तपासण्या, प्रयोगशालेय परीक्षणे ही योग्य मर्यादेत राखले आणि मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल तर ती व्यक्ती नक्कीच स्वस्थ म्हणून गणली जाणार नाही आणि दुसरे म्हणजे कालांतराने त्या व्यक्तीच्या शरीर स्वास्थ्यावरसुद्धा मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम होणार हे नक्की!

आयुर्वेदामध्ये विविध शारीरिक रोगांचे वर्णन करताना; लक्षणांमध्ये मानसिक लक्षणांचे सुद्धा विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. तसेच रोग होण्याच्या कारणांमध्ये आणि रोगनिर्मितीच्या प्रक्रियेत मानसिक भावांचा सुद्धा सूक्ष्म विचार करण्यात आला आहे. हा शरीरावर होणारा मनाचा परिणाम लक्षात घेऊनच अधुनिक वैद्यकशास्त्रात ‘सायाकोसोमॅटीक मेडिसिन’ नावाची स्वतंत्र शाखाच उदयास आली आहे. यामध्ये सामाजिक, भावनिक घटक आणि मानवी वर्तन यांचा शरीर रचना आणि शरीर क्रिया यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो व या मनोदैहिक आजारांचा प्रतिबंध आणि उपाय यावर संशोधन केले जाते. या आजारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. याला कारण म्हणजे आताचे स्पर्धात्मक जग, त्यातून अंगीकारलेली चुकीची जीवनशैली, समाधान आणि यशस्वीता यांचे बदललेले मापदंड आणि या सगळ्यातून निर्माण होणारा आणि कोणालाही न चुकणारा मानसिक ताण!

मनोदैहिक आजारांची व्याप्ती प्रचंड आहे; पचनसंस्थेच्या विकारांपासून ते काही संधीविकार, त्वचाविकार, श्वसनसंस्थेचे विकार, रक्तदाब व रक्तवहन संस्थेचे काही विकार यांचे मूळ कारण हे मानसिक असते. तर दम्या सारख्या काही आजारांमध्ये मानसिक ताण, शोक, विषाद इत्यादि कारणांमुळे लक्षणांमध्ये वाढ होऊन आत्यंतिक (Acute symptoms / Episodes) अवस्था उत्पन्न होऊ शकते. बऱ्याचदा असे होते की रुग्णाच्या रोगाच्या निदानासाठी त्याचा पूर्वेतिहास आणि लक्षणे तपासून झाल्यावर, जेव्हा चिकित्सक त्याला हा आजार मानसिक कारणांमुळे झाला आहे असे सांगतो, तेव्हा एक तर त्याच्याकडून या दोन गोष्टींचा काय संबंध? अशी अविश्वासाची किंवा “मला कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही” अशी पूर्णतः असहमतीची (Complete Denial) प्रतिक्रिया सामान्यतः बघायला मिळते. अशावेळी चिकित्सा करणाऱ्या चिकित्सकाच्या समुपदेशन कौशल्याचा (Counselling) कस लागतो. विशेषतः ‘लायकेन प्लानस’ सारखा त्वचाविकार ज्यात लाल ते जांभळट रंगाचे छोटे छोटे चट्टे शरीरावर येतात आणि रुग्णाला असह्य खाज येते, तेव्हा त्याचा मनाशी असलेला संबंध रुग्णाला समजावून सांगताना ते त्याच्या गळी उतरवणे कष्टसाध्य काम आहे.

आपल्या शरीरात तयार होणारी विवध संप्रेरके अड्रेनलीन, कोर्टीसोल, एंडोर्फिन, सेरोटोनीन, डोपामाईन आपला मूड ठरवत असतात आणि याच संप्रेरकांच्या माध्यमातून मानसिक भावनांची अभिव्यक्ती शारीरिक लक्षणांमध्ये होत असते. आयुर्वेदामध्ये रसरक्तादि सात धातू आणि त्यांच्या स्रोतासांचे वर्णन केले आहे. यात सर्वात पहिले रसवह स्रोतस ज्यात आपण खाल्लेल्या आहारातून तयार होणारा आणि शरीर पोषणाकरिता आवश्यक असलेला आहाररस तयार होतो. या रसवह स्रोतासामध्ये बिघाड होण्याच्या कारणांचे वर्णन करताना चरकाचार्य म्हणतात :

रसवाहिनी दूष्यन्ति चिन्त्यानां अतिचिंतनात् |

म्हणजे अतिचिंता केल्याने त्याचा पचनावर परिणाम होऊन रसवह स्रोतसात दुष्टी निर्माण होते आणि त्यातून विकार उत्पन्न होऊ शकतात. आयुर्वेदातील ग्रहणी रोग, प्रवाहिका रोग ज्यांची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्रातील Irritable Bowel Syndrome, Crohn’s Disease, Inflammatory Bowel Disease, Ulcerative Colitis यांच्याशी केली जाऊ शकते; हे सर्व आजार मानसिक अस्वास्थ्यातूनच उत्पन्न होत असतात. अशावेळी केवळ पचन सुधारण्यासाठी चिकित्सा करून भागत नाही. रुग्णाला योग्य समुपदेशन करून मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि त्यादृष्टीने काही उपाय सुचविणे आवश्यक ठरते. एकंदरीतच मनोदैहिक विकारांमध्ये केवळ लाक्षणिक चिकित्सा करून भागत नाही तर, मूळ मानसिक कारण दूर केल्याशिवाय विकार पूर्णपणे बरा होत नाही.

मनाची चिकित्सा करायची म्हणजे नेमके काय? या सर्व रुग्णांना मनोविकार तज्ञाकडे जावे इतके काही मनोवैगुण्य या रुग्णांमध्ये नसते. त्यांना फक्त थोड्या समुपदेशनाची, धीर देण्याची आणि आजाराचे स्वरूप समजावून सांगण्याची गरज असते. थोडाबहुत मानसिक ताण तर आपण सर्वजणच दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. पण केवळ त्याच त्याच विचारात स्वतःला गुरफटवून घेऊन आपण स्वतःच नकळतपणे त्या नकारात्मक भावनांना शरण जात असतो. एका छोट्या गोष्टीतून हे आपल्याला समजून घेता येईल. “एकदा एक पोपट एका पवनचक्कीवर बसला असतो. इतक्यात वारे वाहू लागतात आणि पवनचक्की थोडी गती घेते. पोपटाला वाटते आता आपण खाली पडणार, म्हणून तो त्याची पवनचक्कीच्या पात्यांवरची पकड घट्ट करतो. वाऱ्याचा जोर वाढतो, पोपट आणखी घाबरतो आणि पकड अजून जास्त घट्ट करतो. तो हे विसरतो की त्यानेच पवनक्कीला घट्ट धरून ठेवले आहे म्हणून तोल जाऊन तो भीत आहे. पण ती चक्की सोडून देऊन; उडून उंच झेप घेण्याचे बळ त्याच्या पंखांमध्ये आहे हे तो विसरूनच गेला असतो”. आपली स्थिती या पोपटाहून वेगळी नसते, आपल्या मनात त्याच त्याच विचारांची चक्री सतत सुरु असते आणि आपण त्याच भावनिक आंदोलनांवर झुलत राहतो. पण ते झटकून, झुगारून देणे आपल्याच हातात आहे, हे मात्र आपण विसरतो. याकरिता योगाशास्त्राची चांगली मदत होऊ शकते. योगासने शरीर नियमन करतात तर प्राणायाम शरीर-मन दोहोंवर सकारात्मक परिणाम घडवतो. श्वासावर लक्ष केंद्रित करून केलेले दीर्घश्वसन शरीराचा थकवा दूर करते, सकारात्मक उर्जा उत्पन्न करते आणि चित्तशांति मिळवून देते. पण हे सर्व योगशास्त्र शिक्षित मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली शिकणे आवश्यक आहे. दूरदर्शन वर बघून करताना आपल्या होत असलेल्या चुका आपल्याला कळत नाहीत. तसेच दूरदर्शनवर योगासने, प्राणायाम करणाऱ्या व्यक्तीच्या समोर ध्वनिक्षेपक असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या श्वासाचा आवाज खूप मोठा येतो. तेवढा आवाज करण्यासाठी आपण अनावश्यक जोर लावला तर फायदा तर होणार नाहीच उलट छाती व पोटाच्या मध्ये असलेल्या पडद्यावर अनावश्यक ताण असे करून आपण देत असतो. त्यामुळे सांगायचा मुद्दा हाच, की योगशास्त्राचेही औपचारिक शिक्षण घेऊन मगच तो करावा.

प्रत्येकाने काही ना काही छंददेखील जरूर जोपासायला हवा. छंद जोपासल्याने आपल्याला रोजच्या कंटाळवाण्या चाकोरीबद्ध आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण अनुभवता येतात, मानसिक थकवा दूर होतो, आपली विचारक्षमता सुधारते, अनुभवक्षेत्र विस्तारत जाते. छंद हे आपापल्या आवडीनुसार वेगवेगळे असू शकतात. कुणाला शरीर सौष्ठवासाठी करायाच्या व्यायामातून आनंद मिळत असेल, कुणाला शांत बसून गाणी ऐकायला आवडत असेल, पाळीव प्राण्याच्या सहवासात एखाद्याला आनंद मिळत असेल, तर कुणाला समाजोपयोगी काही कृती करून समाधान मिळत असेल. कृती कोणतीही असो, फक्त ती सकारत्मक हवी आणि त्यातून आनंद निर्मिती व्हायला हवी. तरच त्याला छंद म्हणू शकतो नाहीतर व्यसन, नशापान करून पण काही लोकांना तत्क्षणिक आनंद मिळतो, पण ते नकारात्मकतेकडे गेलेले व्यसन असते. व्यसनाधीनातेने समस्या तर सुटत नाहीतच पण मानसिक गुलामी आणि अनारोग्याला मात्र नक्कीच सुरुवात होते. तेव्हा या गोष्टींपासून दूर राहणेच इष्ट.

आयुर्वेदात चित्तप्रसादनासाठी विविध औषधी सिद्ध तूप, रसकल्प, वटीगुटी, काढे आहेत. तसेच नस्य, शिरोधारा, शिरोबस्ती अशा पंचकर्मातील उपचारांचा सुद्धा चांगला फायदा होतो. आधी वर्णन केलेले ग्रहणी (IBS), सोरियासीस, लायकेन प्लानस सारखे त्वचाविकार यांसारख्या मनोदैहिक आजारांवर सुद्धा आयुर्वेदात अतिशय प्रभावी औषधी उपलब्ध आहेत. मात्र ती औषधे घेताना केवळ वर्तमानपत्रातील पानभर जाहिराती वाचून किंवा गुगलबाबाला विचारून स्वतःच स्वत:च्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये. वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच या विकारांची चिकित्सा करावी. अशा सर्व उपायांनी आपण मस्तिष्कशामक, निद्राजनन (Antidepressants, Sedatives) गोळ्या यांच्यावरील अवलंबित्व टाळू शकतो.

शेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे :

मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण |
मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा ते ||१||
मनें प्रतिमा स्थापिली | मनें मना पूजा केली |
मनें इच्छा पुरविली | मना माउली सकळांची ||२||
साधक वाचक पंडित | श्रोते वक्ते ऐका मात |
नाहीं नाहीं आन दैवत | “तुका” म्हणे दुसरें ||३||

© डॉ. अमेय अ. केळकर
M.D. (आयुर्वेद) कायचिकित्सा
डॉ. केळकर्स आयुर्केयर अॅन्ड पंचकर्म सेंटर, अलिबाग

प्रत्येक जण आपल्या बाह्य रूपाबद्दल काळजी घेत असतो. आरसा वापरतच नाही, असा मनुष्य विरळाच. त्यामुळे बहुतांश सर्वच जण आपल्या...
18/08/2018

प्रत्येक जण आपल्या बाह्य रूपाबद्दल काळजी घेत असतो. आरसा वापरतच नाही, असा मनुष्य विरळाच. त्यामुळे बहुतांश सर्वच जण आपल्या त्वचेच्या आरोग्याबद्दल, ती गोरी, तुकतुकीत दिसणे याबद्दल जागरूक असतात. दूरदर्शनवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये सुद्धा सर्वाधिक प्रमाण हे साबण, फेस पावडर, क्रीम, लोशन, मॉईश्र्चरायजर्स अशा त्वाचेशी निगडित सौंदर्य प्रसाधनांचेच असते.

वस्तुतः बाह्य आघात, थंडी, ऊन, वारा यापासून शरीराचे रक्षण करणे, पूर्ण शरीराला आच्छादन करणे हे त्वचेचे मुख्य काम. या खेरीज स्पर्श संवेदनेचे ज्ञान करून देणे आणि स्वेदग्रंथींमधून स्वेदनिर्मिती (घाम) करून शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणे, हे काम सुद्धा त्वचेद्वारे केले जाते. त्याचबरोबर हाडे बळकट राहण्यासाठी आवश्यक असलेले "ड" जीवनसत्व सुर्यप्रकाशातून त्वचेद्वारेच मिळते. त्यामुळे केवळ रूपासौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्यरक्षणासाठी सुद्धा त्वचा चांगली व निरोगी असणे महत्त्वाचे आहे. पण आता झाले असे आहे की, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधून सौंदर्याची चुकीची व्याख्या समाजात रुजवली जात आहे. त्यामुळे गोरेपणाच्या मागे लागून कित्येक मुले-मुली आपल्या चांगल्या निरोगी त्वचेवर नको नको त्या क्रीम, लोशन लावून स्वतःवर प्रयोग करून घेत असतात. मुळात आपली भारतीय लोकांची त्वचा, उष्ण कटिबंधात राहत असल्याने पाश्चिमात्य लोकांसारखी लख्ख गोरी असूच शकत नाही. आणि ती तशीच असायला हवी, वा नसेल तर व्हायला हवी, असे वाटण्याचे सुद्धा काही कारण नाही. कारण सौंदर्य केवळ त्वचेच्या रंगावरून ठरत नाही, तर आपला वागण्या-बोलण्यातील आत्मविश्वास, तो आपल्या डोळ्यांतून कसा व्यक्त होतो? या व अशा इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असते. हे सर्व विश्लेषण करण्यामागे कारण हेच की, केवळ गोरे होण्यासाठी नाही-नाही ते क्रीम चेहऱ्यावर लावू नयेत. त्यात असणारी रसायने, काहींमध्ये असलेले स्टेरॉइड्स यांपासून उपाय न होता अपायच होऊ शकतात.

त्वचारोग होण्याची #सामान्य #कारणे :
◆ आहारात तिखट, खारट, आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
◆ आंबवलेले व बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
◆ आहारात मिठाचा जास्त प्रमाणात वापर करणे, तसेच पापड, लोणचे इ. मीठ जास्त असणारे पदार्थ नेहमी आहारात असणे
◆ ईन्स्टंट पदार्थ, हवाबंद-डबाबंद विविध टिकाऊ पदार्थ, प्रिझर्व्हेटिव घातलेले विविध प्रकारची शीतपेये, ज्यूसेस
◆ कृत्रिमरित्या पिकवली जाणारी फळे
◆ चहा, कॉफी अतिरिक्त प्रमाणात, तसेच सर्व प्रकारची मद्यपेये, तंबाखू, सिगारेट इ.
◆ आहारात सातत्याने दही खाणे
◆ शिळे, तळलेले, चमचमीत, मसालेदार व आंबवून तयार केलेले पदार्थ
◆ शरीराची योग्य निगा न राखणे व नीट स्वच्छता न पाळणे

त्वचारोगांमध्ये #पथ्यकर #आहार :
★ शक्यतो गोड, कडू व तुरट चवीचे पदार्थ खावे
★ भाज्यांमध्ये दुधी भोपळा, लाल भोपळा, कोबी, तोंडली, पडवळ, कारली, करटोली, चाकवत, पालक, चवळाई, माठ, शेपू, पांढरा कांदा या त्वचेसाठी पथ्यकर असणाऱ्या भाज्यांचा समावेश करावा.
★ ज्वारी, बाजरीची भाकरी, मूगडाळ यांचा आहारात समावेश करावा.
★ भूक लागल्यावरच जेवावे. भूक नसताना वा भुकेची वेळ टळून गेल्यावर खाणे टाळावे.
★ आहारात दूध, तूप, ताक या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असण्यास हरकत नाही, मात्र दही खाणे टाळावे.
★ जेवण शक्यतो गरम असतानाच जेवावे.

त्वचेच्या आरोग्यासाठी #पुढील #गोष्टी #आवर्जून #कराव्यात :
■ आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालावीत.
■ शक्यतो रोज, किमान आठवड्यात एकदा तरी संपूर्ण अंगाला तेल लावून अभ्यंग करावा. आणि नंतरच मग कोमट पाण्याने आंघोळ करावी.
■ आंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने पूर्ण अंग कोरडे करावे.
■ घराबाहेर जाऊन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे.
■ राहण्याची जागा स्वच्छ, सुशोभित, प्रसन्न असावी.
■ काही त्वचाविकार हे मानसिक ताणतणावांमुळे देखील उद्भवतात. उदाहरणार्थ Lichen Planus हा त्वचाविकार ज्यात खाज येते व लाल ते गडद जांभळट रंगाचे छोटे छोटे चट्टे हातापयावर येतात; असा हा विकार केवळ अतिचिंता, काळजी करण्याने उद्भवतो. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणाव विरहित जीवनशैलीचा अवलंब करावा. त्याकरिता रोज सकाळी पाऊण-एक तास चालणे, प्राणायाम करणे, पुरेशी झोप घेणे, एखादा छंद जोपासणे इत्यादि गोष्टींची मदत होऊ शकते.
■ रात्री झोपताना सैल कपडे घालावेत.
■ अधून-मधून उटण्याचा वापर करावा.
■ आयुर्वेदानुसार त्वचविकारांचे मूळ कारण हे रक्तादुष्टी असते (इथे वात-पित्त-कफ दोषात्मक दुष्टी अपेक्षित आहे, केवळ जंतुसंसर्ग दुष्टी नाही). त्यामुळे निरोगी व्यक्तीने हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असल्यास व कोणताही जंतुसंसर्गजन्य रोग झाला नसताना वर्षातून एक वेळा तरी रक्तदान करावे. असे केल्याने नवीन शुद्ध रक्ताच्या निर्मितीला चालना मिळते.

#त्वचारोगांमध्ये_टाळायच्या_गोष्टी :
● अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नये. तसेच आंघोळ झाल्यानंतर फार वेळ ओल्या अंगाने वावरणे टाळावे.
● दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे टाळावे.
● सतत उन्हात फिरणे, अनवाणी फिरणे टाळावे.
● पूर्ण न वाळलेले, ओले कपडे घालू नयेत.
● कोंदट वातावरणात राहू नये.
● सतत नायलॉन, टेरिलीन, टेरिकॉटचे कपडे वापरणे टाळावे.
● घाम आल्यावर तो न पुसता, तसाच ठेवू नये.
● सौंदर्य प्रसाधनांचा अनावश्यक वापर करू नये.
● दुसऱ्यांचे कपडे, तसेच कंगवा, रुमाल इत्यादि वस्तू वापरणे टाळावे.

अशाप्रकारे सर्व वर्ज्य गोष्टींचा त्याग केल्यास आणि पथ्यकर गोष्टी पाळल्यास त्वचेचे आरोग्य अबाधित राहण्यास निश्चितच फायदा होईल. आणि यदाकदाचित त्वचारोग झाला तरी हे नियम पाळून त्यापासून लवकरच रुग्णाची सुटका होऊ शकते.

त्वचा हा एकप्रकारे आपल्या आरोग्याचा आरसाच असतो. आपण सफारचंदासारखी फळे विकत घेताना त्या फळांची त्वचा बघून गुणवत्ता ठरवतो. त्याचप्रकारे आपली त्वचा सुद्धा आपल्या आरोग्याची निदर्शक असते. त्यामुळे त्वचेशी निगडित कोणतीही समस्या उद्भवल्यास लगेच वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. अन्यथा कपड्यांखाली झाकल्या जाणाऱ्या त्वचारोगांवर उपचार घेण्यास रुग्ण जमेल तितकी टाळाटाळ करतात, ज्याचे त्वचेवर व एकंदरीतच आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. अशाप्रकारे सर्वांनीच आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी.

- डॉ. अमेय केळकर
डॉ. केळकर्स आयुर्केयर अँड पंचकर्म सेंटर, अलिबाग
मोबाईल नंबर- ९१६८९११४४४

Address

Dr. Kelkar' Ayurcare & Panchakarma Centre, Alibag
Alibágh
402201

Telephone

09168911444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kelkar's Ayurcare And Panchakarma Centre, Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Kelkar's Ayurcare And Panchakarma Centre, Alibag:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category