22/01/2021
#मानसिक_आजाराची_कारणे
#चांगल्या_गोष्टी_सोडणे आणि #वाईट_गोष्टी_न_सोडणे
रुग्ण तपासणी करताना एक डॉक्टर म्हणून अनेक प्रश्न विचारले जातात त्यात प्राधान्याने आहार कसा आहे,दिनचर्या कशी आहे,ताणतणाव ,पूर्वीचे आजार आणि इतरही.
"तुम्ही सकाळी पायी फिरता का "?(Walk घेता का ?)मी माझ्या रुग्णांना विचारतो तेव्हा पुष्कळदा उत्तर येते , "पूर्वी फिरायचो पण आता काही दिवसापासून बंद केले"
किंवा
व्यायाम करता का ? असे विचारता
तेव्हा तसेच उत्तर दिले जाते.
आपण करत आहोत त्याचे समर्थन करण्यासाठी
"मी किती व्यस्त असतो "किंवा "वेळच भेटत नाही "इ उत्तर दिले जाते.
मग असेच अनेक प्रश्न
वेळेवर जेवता का ?
हॉटेल चे जेवण किती असते?
योगासने,ध्यान,पूजा,रात्रीची झोप इ. ची उत्तरे साधारणतः तशीच आढळतात.
आणि वरील प्रश्नाच्या अगदी उलट
काही व्यसन आहे का?
जसे दारू (sorry drinks) घेता का ?
सिगारेट (smoke) करता का?
तंबाखू, गुटखा इ ची सवय आहे का ?
त्यावेळेस occasionly असे उत्तर येते.
ते बंद करा असे म्हणता.
डॉक्टर , सध्या शक्य नाही पण हळू हळू करेल.
म्हणजेच मनुष्य चांगल्या गोष्टी सोडतो पण काही चुकीच्या गोष्टी मात्र लवकर सोडत नाही.
ही गोष्ट केवळ व्यसन किंवा आहार,दिनचर्ये पूरती मर्यादित नाही तर मानसिक स्तरावर घडणाऱ्या गोष्टी अशाच असतात.
कोणी आपली स्तुती केली किंवा चांगले म्हणाले की लोक त्यास एक वेळेस विसरतील पण कुणी वाईट बोलले किंवा नाव ठेवले की ती गोष्ट मात्र ते कधीच विसरत नाहीत.
एखाद्याचे कौतुक करायचे तो विसरेल किंवा त्यास शब्द थोडके च असतील पण निंदा आणि त्याचे गाऱ्हाणे करताना मात्र शब्द अपुरे पडतात .
एखाद्याने केलेली मदत तो विसरेल पण मदतीस न आलेल्या लोकांची यादी मात्र तो लक्षात ठेवेल.
आपण केलेल्या चुकांना तो लगेच माफ करतो पण दुसऱ्यांच्या चुका मात्र सतत उगाळत राहतो.
माझं कस बरोबर आहे याचे समर्थन करताना दुसऱ्याचे चूक कसे यासाठी तो तर्क लावतो.
समजून घेणे यापेक्षा गैरसमज करून त्यांचे धागे विणत संशयाच्या भोवऱ्यात स्वतःच फसतो.
एखाद्याने आपणास कसे फसवले ?मग ते पैसा किंवा इतर बाबतीत असेल ,तर तो त्यास वारंवार आठवतो परंतु त्यास सध्या मदत करणारे १० लोक दिसत नाहीत.
आता वरील सर्व बाबीचा मानसिक आजाराशी कसा संबंध आहे ते पाहू.
एक पन्नाशी च्या आसपास असणारी महिला गुडघे दुखी व इतर आजारासाठी आली.तपासणी करताना वारंवार पूर्वी लग्नानंतर घरातील जावू,नणंद यांनी कसा त्रास दिला , मला किती काम करावे लागले आणि त्यामुळेच सर्व आजार झाले हे ती वारंवार सांगत होती.खर तर आज तो काळ जावून 15 एक वर्ष झाली व सगळे वेगळे राहतात पण तो आघात ती विसरत नाहीये आणि त्यामुळे त्रास काही बरे होत नाहीत.त्रास झाला होता हे खरे असेल ही पण ते च वारंवार लक्षात ठेवून व आठवून ती स्वत:ला त्रास करून घेत होती.उपचारासोबत या बाबींवर लक्ष देवून मार्गदर्शन करावे लागले.
एक तरुण मुलगी , वडील रागीट असल्याने त्या काळात मेडिकल ला जावू न देता कॉमर्स करायला लावले.आज ती एका चांगल्या बँकेत आहे पण त्याचा द्वेष मनात ठेवून तिने लग्नही केले नाही आज depression मध्ये आहे. चूक झाली ही असेल पण त्याचा त्रास स्वतः ला मनुष्याने किती काळ करून घ्यावा.
अशा अनेक घटना घडतात आणि त्याची परिणीती मानसिक विकारात होते
जसे
तरुणपणी झालेला प्रेमभंग.
मुलाने मनाच्या विरुद्ध केलेले आंतरजातीय लग्न.
मित्राने पैश्यासाठी व्यवसायात दिलेला धोका.
पती पत्नीचे भांडण व फारकत.
भावा भावांची इस्टेटी साठीचे तंटे व कोर्ट कचेरी.
सासू सूनाचे मनमुटाव.
इ अनेक घडणाऱ्या घटना आणि त्याचे मनावर होणारे परिणाम.खर तर बऱ्याच घटना डॉक्टरांच्या अधिकार क्षेत्रा बाहेरील आहेत. पण याचा परिणाम जेव्हा आरोग्यावर येतो तेव्हा भेट होते डॉक्टरांची.
यातून मार्ग काढण्यासाठी करावे लागते प्रबोधन
समजून घ्यावे लागते आपल्या दुःखाची कारणे आणि शोधावी लागते ती वाट.
जसे मागे पाहून पुढे जाता येत नाही तसे भूतकाळात रमुन भविष्य घडत नाही.
धैर्य,संयम,जीवन समजून घेणे,इतरांना माफ करणे , माफी मागणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
आपण जग बदलू शकत नाही पण
आपल्या अंतर्यामी जग सुंदर करू शकतो.
द्वेष,मत्सर,राग,लोभ,वेदना यांना विसरून मिळालेले किंवा उरलेले आयुष्य मनुष्य सुखी करू शकतो
मात्र गरज आहे
ती चांगल्या गोष्टी न सोडणे आणि
वाईट गोष्टी सोडून देणे याची.
जग सुंदर आहे वेदनेतही
आणि कुरुप आहे सुखातही
गरज आहे बदलाची
नव्याने जग पाहायची
@ डॉ.अमोल ना. देवरे
श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
औरंगाबाद