Dr. Jyoti's Ayurveda

Dr. Jyoti's Ayurveda Superspeciality ayurveda panchakarma centre, training and research centre

केसांच्या आरोग्यासाठी काय करू? भाग – ३ मागील २ लेखांमधून केसांच्या आरोग्यासाठी घातक आहार आणि सवयी यांची माहिती घेतल्यानं...
19/10/2024

केसांच्या आरोग्यासाठी काय करू? भाग – ३
मागील २ लेखांमधून केसांच्या आरोग्यासाठी घातक आहार आणि सवयी यांची माहिती घेतल्यानंतर आता उपाय काय आहेत ते समजून घेऊया.
१. सूर्यनमस्कार आणि चालण्याच्या व्यायामाला दिनचर्येत आवर्जून स्थान द्यावे.
२. प्राणायामाच्या प्रकारात किमान दीर्घश्वसन आणि भ्रामरी यांचा उपयोग करावा.
३. ध्यान शिकून घ्यावे आणि किमान दिवसभरात एकदा करावे, अगदीच वेळ मिळाला नाही तरी किमान रात्री झोपताना पाठीवर झोपलेल्या अवस्थेत तरी का होईना ध्यान करत निद्राधीन होण्याचा सराव करायला हरकत नाही.
४. दिनचर्येत सकाळी उठल्यानंतर दिवसभरात किमान एका आहारात संपूर्ण आहार चौरस ठेवण्याचा प्रयत्न करावा.
५. भूक नाही मात्र पुढे खायला मिळणार नाही तर खाऊन घेऊ अथवा भूक लागली आहे मात्र खाण्यासाठी वेळ नाही अश्या अवस्था जवळपास सर्वच वयोगटात दिसतात, कुठे शाळा-कॉलेज-क्लासेस तर कुठे ऑफिसेस चे ब्रेक अनेकदा सोयीचे नसतात, अश्यावेळी खाण्यासाठी ज्वारीच्या लाह्या, खजूर अथवा मनुका असे पदार्थ जवळ एका छोट्या डब्यात बाळगाव्यात, भुकेची वेळ टळून जाऊ देऊ नये यासाठी प्रयत्नशील राहावे.
६. आहारात अल्प प्रमाणात का होईना सुक्या मेव्याचा नियमित वापर ठेवावा, यासाठी कोणताही आजार नसेल तर बदाम, मनुका, खजूर, जर्दाळू, भोपळ्याच्या बिया इ. चा उपयोग करता येईल, मात्र आजारी व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या आहारात कोणता सुकामेवा चालेल हे विचारून मगच खाण्यात समावेश केलेला उत्तम !
७. ओल्या नारळाचा आठवड्यातून किमान दोन वेळा आहारात चटणी, गूळ-खोबरं (मधुमेह नसणाऱ्यांना लागू) इ. माध्यमातून वापर करावा.
८. तीळ, काराळ यांचा वापर आहारात अल्प स्वरुपात ठेवावा.
९. आहारात आमटी, ररस्सा भाजी, वरण अश्या पदार्थांचा उपयोग करावा आणि कोरडे अन्न खाऊ नये.
१०. केसांच्या आरोग्यासाठी उत्तम अस्थीधातू असणे आवश्यक आहे, त्यामुळे आहारात गाईचे दुध, गाईचे तूप यांचा समावेश ठेवावा.
११. आहारात ऋतुनुसार आवश्यक ते बदल करणे.
१२. मलावष्टंभ, आम्लपित्त अश्या त्रासांवर आवश्यक ती चिकित्सा घेणे.
१३. सौम्य विरेचनासाठी पोटातून आठवड्यातून किमान एकदा एरंड तेलाचा उपयोग कसा करायचा हे जवळच्या वैद्यांना विचारून घ्यावे, कारण या स्वरूपाच्या चिकित्सा स्वरूप उपायाचा विचार करताना व्यक्तिपरत्वे मात्रा आणि वारंवारता ही ठरविणे आवश्यक असते.
१४. केसांना केस धुण्याआधी तेल लावण्याची पद्धत आहे, करायला हरकत नाही मात्र केस धुतल्यावर नियमित स्वरुपात केसांच्या मुळाशी आणि टोकाकडील केसांच्या लांबीच्या अनुसार तेलाचा वापर आवर्जून करावा.
१५. केसांच्या मुळाशी जे तेल नियमित लावायचे आहे ते तेल केश्य द्रव्यांनी युक्त वापरले तर केसांच्या असलेल्या तक्रारी दूर होतात आणि भविष्यात तक्रारींचे प्रमाण सुद्धा कमी राहते.
१६. केसांसाठी वापरली जाणारी प्रसाधने नैसर्गिक घटकांनी तयार केलेली आहेत आणि खात्रीशीररित्या त्याच घटकांनी तयार केलेली आहेत याची पडताळणी करूनच वापरावी.
१७. केस धुण्यासाठी नेहमीच कोमट म्हणजे अगदीच कमी कोमट पाणी वापरावे.
१८. केसांना धुण्यासाठी शाम्पूऐवजी शिकेकाई चा उपयोग करावा, अनेक वैद्य नित्य वापरासाठी उपयुक्त शिकेकाई मिक्स, उटणे, शाम्पू, केश्य तेल, केश्य लेप, कोंड्यासाठी लेप, तेल इ. तयार करत असतात, केवळ हर्बल आणि आयुर्वेद या नावाने जाहिरात करून शून्य आयुर्वेदीय औषधांचा उपयोग करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा वैद्यांकडून असे उत्पादने खरेदी करून वापरता येतील.
१९. केसांना लावण्यासाठी वापरावयाचे तेल कोमट (थेट अग्नीचा संपर्क न येऊ देता कोमट केलेले) उपयोगात आणावे.
२०. केस सुकाविताना शक्यतो केस मोकळे ठेऊन नैसर्गिकरीत्या सुकू द्यावे.
२१. थेट उन्हात दीर्घकाळासाठी काम करणारे अथवा दोन चाकी वाहन चालविताना दीर्घकाळ प्रदूषण आणि उन्हाच्या संपर्कात नियमित यावे लागत असेल तर अश्या लोकांनी डोके कापडाने झाकून घेण्याची सवय ठेवावी,
२२. केसांना रंगविण्यासाठी शक्यतो नैसर्गिक पर्यायांचा उपयोग करावा.
कोंडा, केस गळणे या समस्यांवर घरघुती उपायांच्या खंडीभर पोस्ट आपल्याला मिळतील, मात्र उपाय जर आयुर्वेदीय करायचे असतील तर मात्र रुग्ण इतिहास समजून घेऊन रीतसर परीक्षण केल्याशिवाय उपाय करता येत नाहीत. कारण आयुर्वेदीय चिकित्सा ही लक्षणांवर आधारित चिकित्सा नसून व्याधीच्या कारणांचा, व्याधीची अवस्था, व्याधीच्या निर्मितीत कारणीभूत असलेल्या दोषांचा सर्वार्थाने विचार करून करावयाची चिकित्सा आहे, केवळ भारतीय औषधी आहेत आणि आपल्याला नावे माहित आहेत म्हणून त्यांचा सहज वापर करून घरच्या घरी चिकित्सा करणे याला चिकित्सा म्हणत नाहीत, याचा विचार होणे फार आवश्यक आहे.
आयुर्वेदीय चिकित्सकाला वगळून केलेली चिकित्सा लक्षणे कमी करायला मदत करेल कदाचित, औषधांचा काही न काही प्रभाव दिसणारच! मात्र औषधी थांबवली की लक्षणे पुन्हा अवतरणे ही स्थिती अश्या चिकित्सेत निश्चित दिसून येते, त्यामुळे वैद्यांना भेटायला टाळाटाळ करू नये, केसांचे आरोग्य महत्वाचे असेल तर हा शॉर्टकट कामाचा नाही. केसांचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य उत्तम राखायचे असल्यास जो गुण आवश्यक आहे तो म्हणजे सातत्याने चांगल्या सवयींचा सराव, याचा आपल्याला आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उपयोग होतो, तेव्हा हा गुण अंगी बनविण्यासाठी प्रयत्नशील रहा असा शेवटचा आणि महत्वाचा सल्ला आहे.

शुभं भवतु!

वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर

#ऐकावे_आयुर्वेदाचे
#केशविकार_आणि_आयुर्वेद
#खालित्य_पालित्य

#केशरंजनकल्प

केसांच्या आरोग्यासाठी काय करू? भाग २ केसांच्या आरोग्यासंदर्भात टाळायच्या विहारातील सवयी आज समजून घेऊया. १. जागरण टाळावे....
16/10/2024

केसांच्या आरोग्यासाठी काय करू? भाग २

केसांच्या आरोग्यासंदर्भात टाळायच्या विहारातील सवयी आज समजून घेऊया.

१. जागरण टाळावे.
२. सकाळी सूर्योदयानंतर झोपून राहणे टाळावे.
३. झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर किमान २ तास स्क्रीन-टाईम टाळावा.
४. अनिद्रा, खंडित निद्रा या अवस्था विना चिकित्सा ठेऊ नये.
५. सतत स्क्रीनसमोर काम करू नये.
६. भूक नसताना वेळ झाली म्हणून जेऊ नये.
७. आधीचे अन्न पचलेले नसताना जेऊ नये.
८. आहारात एकच प्रकारचा आहार ठेऊ नये.
९. येता-जाता तोंडात काहीतरी टाकणे ही सवय टाळावी.
१०. केवळ काम-खाणे-आराम या स्वरूपाच्या दिनचर्येला टाळावे.
११. मलावष्टंभ, अपचन, पोटात वायू धरणे, जेवणानंतर पोटात जळजळ होणे ई. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
१२. डोक्याच्या त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
१३. केस धुताना गरम पाण्याचा उपयोग करू नये.
१४. केस धुण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या शाम्पू चा अतिरिक्त वापर टाळावा.
१५. केस सुकविण्यासाठी नियमित ड्रायर चा वापर टाळावा.
१६. केस धुण्यापूर्वी किंवा धुतल्यावर तेल न लावण्याची सवय टाळावी.
१७. केसांवर हिट ट्रीटमेंट, हेअर जेल इ. चा वारंवार आणि अतिवापर टाळावा.
१८. उन्हात दीर्घकाळ काम करण्याचे स्वरूप असल्यास डोके न झाकता काम करणे टाळावे.
१९. भावनांचा निचरा न होता सतत भावनिक दडपण असलेल्या अवस्था ओळखाव्या.
२०. ताण येण्याच्या अवस्था न ओळखता दीर्घकाळ तश्याच ठेऊ नये.

पुढील पोस्ट मधून केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहार-विहारादी उपकारक सवयींची माहिती करून घेऊया, तोवर स्टे ट्यून्ड !

क्रमश:

वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर

#ऐकावे_आयुर्वेदाचे
#केशविकार_आणि_आयुर्वेद
#खालित्य_पालित्य

#केशरंजनकल्प

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
12/10/2024

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏

एक पंचविशी पार केलेला विमनस्क मनस्थितीतून मानसिक आजाराचे ठसठशीत लेबल लाऊन इंजिनीअरिंग अर्ध्यातच सोडून आलेला मुलगा, एका प...
10/10/2024

एक पंचविशी पार केलेला विमनस्क मनस्थितीतून मानसिक आजाराचे ठसठशीत लेबल लाऊन इंजिनीअरिंग अर्ध्यातच सोडून आलेला मुलगा, एका प्रतिष्ठित डॉक्टरांची त्यांच्यासारखीच किंबहुना काकणभर जास्त हुशार बहीण अर्ध्यातच एमबीबीएस अर्ध्यात सोडून स्किझोफ्रेनिया या आजाराला बळी पडते, एखादा उच्च पदस्थ मध्यमवयीन कुटुंबप्रमुख जेव्हा अचानक अबोल आणि एकांतप्रिय होऊन कुटुंबापासून विरक्त होऊन जातो तेव्हा मनाच्या आंदोलनांबाबत त्यात काय एवढं? असा सूर कामाला येत नसतो. अश्या रुग्णांमध्ये आयुर्वेदीय औषधी, समुपदेशन, सत्वावाजय चिकित्सा, पंचकर्म यांचा युक्तीने उपयोग करता येतो.

आजचा दिवस जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळण्यात येतो, गेल्या काही वर्षात बदललेली जीवनशैली, संयुक्त होत जाणारी कुटुंबं, खऱ्या जगापेक्षा आभासी जगातील वाढलेला वावर, रोजच कोणत्या ना कोणत्या ट्रेंडिंग विषयावर मनात उचंबळून येणाऱ्या भावनेच्या लाटेवर स्वार होत हिंदोळे घेत राहण्याच्या आपल्या जीवनशैलीमुळे मानसिक कुपोषण वाढत आहे याची एक वैद्य म्हणून मी साक्षीदार आहे, जवळपास सर्व रुग्णांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानसिक आरोग्याच्या समस्या दिसत असतात, या समस्या पुढे गंभीर रूप धारण करणार आहेत हेसुद्धा समजून येते, त्यामुळेच जसा शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याचा उहापोह आपण करतो तसाच मानसिक आरोग्य राखण्यासाठी काही नियम आपण आवर्जून पाळायला हवे आहेत.

पुढील काही नियम याबाबतीत आपल्याला उत्तम मानसिक आरोग्य राखायला मदत करतील,

१. "जैसा अन्न वैसा मन" या उक्तीप्रमाणे आपल्या आहाराच्या बाबतीत दक्ष असा, सतत तामसिक अन्नाच्या सेवनाने स्वभावात उग्रपणा यायला लागतो, याचे परिणाम आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांवर आणि पर्यायाने आपल्या आणि त्यांच्या नात्यावर होत असतो. तेव्हा आपल्या रागावर, भावनांवर नियंत्रण मिळवू न शकणाऱ्या लोकांनी आपला आहार तपासणे आवश्यक ठरेल.

२. योग्य काळात आणि योग्य मात्रेत निद्रेची आवश्यकता आपल्या मुलभूत गरजांपैकी एक आहे, आयुर्वेदाने निद्रेला आपल्या जीवनाच्या तीन मुख्य स्तम्भापैकी एक मानलेले आहे ते उगाच नाही. साधारणपणे रात्रीच्या पहिल्या प्रहरात म्हणजेच नऊ नंतर लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न असायला हवा, आणि सकाळी सूर्योदयाच्या किमान ४५ मिनिटे आधी उठून झोप पूर्ण करावी. यावेळेच्या व्यतिरिक्त निद्रा घ्यायला केवळ बाल, वृद्ध, गर्भिणी आणि काही रुग्णांना परवानगी असते, तेव्हा निद्रेच्या नियमांना पाळून आपली कामे करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना कामाच्या व्यस्ततेमुळे झोपेच्या या वेळा पाळणे शक्य होत नाही त्यांनी विस्कळीत दैनंदिनीचे दुष्परिणाम ताल्ण्यासाठीच्या उपायांना समजून घ्यायला आवर्जून वैद्यांचा सल्ला घ्यावा.

३. दिनचर्येत नियमित व्यायाम हा आपल्या शरीराला स्थिरत्व आणतोच मात्र मनालासुद्धा स्थैर्य आणतो हा नियमित अनुभव आहे. आधुनिक शास्त्र सुद्धा व्यायामामुळे शरीरात हॅपी हॉर्मोन स्त्रवतात असे सांगितले आहे.

४. प्राणायाम, ध्यान -धारणा यांना सुद्धा आपल्या दिनचर्येत अगदी कसोशीने स्थान द्या, या लहान सवयींना अंगीकारा.

५. सोशल मिडिया आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, ही पोस्ट सुद्धा आपण फेसबुकवरच वाचत आहात, मात्र या माध्यमाचा सकारात्मक उपयोग करून घेणे सहज शक्य आहे हे मी अनुभवातून मांडत आहे. अशुद्ध पाणी पिऊन उपाय करण्यापेक्षा पाणी पिण्याच्या आधी स्वच्छ गाळून पिणे कधीही श्रेयस्कर असते, त्यानुसार आपण वाचत असलेला, पाहत असलेल्या कन्टेन्ट निवडून मग कन्झुम करा. यासाठी कोणत्या व्यक्तींना, कोणत्या पेजना आपण फॉलो करत आहोत याचे अधूनमधून अकाऊंटींग करणे कधीही हितकर आहे.

६. आयुष्यात अनेकदा आपण गरज नसलेल्या इमोशनल ड्रामा मध्ये गुरफटतो, किंवा कुणीतरी आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या अनावश्यक ड्रामामध्ये खेचून नेत असतो, अश्या वेळी "बेगानी शादी मे..." ओळखून घ्यावे आणि स्वतःला अश्या परिस्थितीतून किमान मानसिक पातळीवर तरी सोडवून घ्यावे.

७. स्वतःच्या प्रगतीवर मग ती शारीरिक पातळीवर असो, मानसिक पातळीवर असो की आर्थिक पातळीवर त्यावर लक्ष केंद्रित करा.

८. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांची निवड जाणीवपूर्वक करा, बायोलॉजिकल फॅमिलीची निवड आपल्या हातात नसली तरी, लॉजिकल फॅमिली निवडणे आपल्या हातात असते, त्यामुळे सकारात्मक, आयुष्यात विशिष्ट ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या लोकांच्या अधिकाधिक सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, अशी माणसे त्यांच्या केवळ सान्निध्याने आपली उर्जा वाढविण्याचे काम करत असतात, तेव्हा अश्या माणसांना जमेल त्या माध्यमातून जोडत राहा.
चांगले साहित्य वाचण्याची सवय लावा.

९. नवीन कौशल्य विकसित करा.

१०. वाचनासारखी मनाचे पोषण करणारी आणि नवीन संकल्पनांचे महाद्वार आपल्यासाठी उघडणारी सवय जाणीवपूर्वक लाऊन घ्या.

"मनोवेध : आजार आणि मन यांचा संबंध" या आमच्या कार्यशाळेची आखणी आम्ही केली तेव्हा सध्याची गरज ओळखून ती केली, या कार्याशाळेबाबत फारसे लिहण्यात येत नसताना पुढील कार्यशाळा कधी असणार आहे याची चौकशी अनेकांनी केली आहे, त्यांच्यासाठी पुढील पोस्टमध्ये अधिक माहिती देईनच मात्र कुणालाच या कार्यशाळेची गरज उरणार नाही तो सुदिन असेल, मग करूया ना आपल्या मनाचे उत्तम पोषण?

शुभं भवतु!

वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर

#ऐकावे_आयुर्वेदाचे

#मानस_विकार_आणि_आयुर्वेद

#मनोविकार

#आयुर्वेद

“मनोवेध” कार्यशाळेच्या रविवारच्या शेवटच्या सत्रात दिनचर्या विषय समजावून सांगताना पादाभ्यंग विषयावर बोलणे झाले, इतकी साधी...
08/10/2024

“मनोवेध” कार्यशाळेच्या रविवारच्या शेवटच्या सत्रात दिनचर्या विषय समजावून सांगताना पादाभ्यंग विषयावर बोलणे झाले, इतकी साधी सवय आपल्या दिनचर्येत समाविष्ट केली तर किती फायदे होतात याबद्दल काल दिवसभर विचार मनात रेंगाळत राहिले म्हणून लिहते आहे.

पादाभ्यंगाचा शब्दशः अर्थ पायाला त्यातही तळपायाला तेल लावून जिरवणे, आयुर्वेदाने दिनचर्येत ज्या गोष्टी आवर्जून करायला सांगितल्या आहेत त्यात पादाभ्यंगाचा समावेश होतो. पादाभ्यंग नियमित करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत,

१. रुक्षता (कोरडेपणा) कमी करते
२. स्तंभ / स्तब्धता म्हणजेच आखडलेपणा कमी करते
३. खरत्व म्हणजेच खरखरीतपणा कमी करते
४. श्रमहर असल्याने थकवा कमी करते
५. स्थैर्यकर असल्याने शक्ती वाढवते
६. सुप्ती म्हणजेच बधीरपणा तसेच मुंग्या येण्याची संवेदना कमी होते.
७. तळपायात असलेल्या मर्मांचे पोषण होऊन नेत्रदृष्टी वाढणे, गृध्रसी म्हणजेच सायटिका सारख्या वाताच्या आजारात वेदना कमी होते.

तळपायाला तेल लावायचे ते कधी, कोणते याचे साधे उत्तर म्हणजे अभ्यंगाला वेळचे बंधन आहे तसे पादाभ्यंग करायला वेळेचे बंधन नाही, दिवसभरात कोणत्याही वेळेत करता येते मात्र रात्री केलेले उत्तम ! त्यातून तीळ तेल हे सर्वांना, सर्व ऋतुत वापरता येते, ज्यांना काही विशिष्ट आजार आहेत त्यांना मात्र औषधी सिद्ध तेलाचा वापर केल्यास अधिक फायदा मिळविता येतो, उदा. तळपायास दाह (आग) असल्यास चंदन तेल, वाताचे विकार असतील तर महानारायण तेल, कफाचे विकार असल्यास त्रिफळा तेल इ. वेगवेगळ्या तेलांचा वैद्यांच्या सल्ल्यानुसार उपयोग करता येईल.

पुढील अवस्थांमध्ये पादाभ्यंग निषिद्ध सांगितलेले आहे अपचनाची अवस्था असताना, ज्वर असताना, त्वचेचा विकार, शोथ म्हणजेच सूज, आघातजन्य व्रण अथवा जखम.

काश्याच्या वाटीने / कांस्यथाळी मसाज वगैरे सध्या ट्रेंडिंग आहेतच सध्या, पादाभ्यंग विषयाशी प्रथमदर्शनी मिळतेजुळते विषय म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी, अरोमा थेरपी, अक्युप्रेशर आहेत. मर्म आणि अक्युप्रेशर पॉईंटस् यामध्ये मात्र मोठे अंतर आहे, त्यामुळे अक्युप्रेशर म्हणजे मर्म थेरपी नाही.

माझ्या आजीची माझी एक ठळक आठवण म्हणजे माझ्या लहानपणी आजी रोज रात्री जेवण झालं की, दूरदर्शन वर बातम्या पाहत स्वतःच्या तळपायांना शिस्तीत आणि आरामात तेल लावत बसत असे, तिच्यापुरतं तिचं हे मेडीटेशन होतं, कारण ज्या तन्मयतेने ती हे काम करत असे, ते पाहूनच जीवाला निवांत वाटे! आजकाल जे माईंडफुल म्हटलं जातं ते काय हे मी रोज तिच्याकडे पाहून समजून घेतलं आहे.

माझी आजी ९७ व्या वर्षी गेली, तोपर्यंत स्वयंपूर्ण होती, काटक होती. गुडघेदुखतात अशी तिने कधीही तक्रार केली नाही, तिच्या अवतीभोवती कितीही विपृत परिस्थिती आली तरी डोक्याला हट लाऊन बसलेले मी तिला कधीही पाहिले नाही, चिंता-शोक-भय निर्माण करणाऱ्या कोणत्याही परिस्थिती मध्ये वातप्रकोप होऊ न देण्याचे मोठे सामर्थ्य तिच्या आत्मज-मानस प्रकृतीत जितके होते तितकेच या सामर्थ्याला टिकवण्याचे बळ तिच्या दिनचर्येतील सवयीत होते, पादाभ्यंग ही त्यातलीच एक सवय! तिच्या पिढीला शतायुषी असण्याचे वरदान हे त्या पिढीने कमावलेले वरदान होते हे मान्यच करायला हवे.

प्रॉडक्टीव्हिटीच्या युगात आज आपण सहज म्हणतो, काय करायचे इतके जागून? माझ्या आजीला हा प्रश्न पडला नाही, आपल्याला सुद्धा तो पडू नये असे मला वाटते! किमान हातीपायी धडधाकट अंताला जावे हे तरी का ध्येय असू नये, तेव्हा देणार ना पदाभ्यंगाला आपल्या दिनचर्येत स्थान?

शुभं भवतु!

वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे

#ऐकावे आयुर्वेदाचे
#पादाभ्यंग
#अभ्यंग

03/10/2024

केसांची काळजी कशी घेऊ या संदर्भात अनेकांनी विचारणा केली, या प्रश्नाचं सोपं उत्तर हे की, आपलं मशीनच्या पार्ट्स प्रमाणे वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये विभागलेले नाही, एकूणच संपूर्ण आरोग्य असलेल्या व्यक्तींचे शारीरिक भावपदार्थ आरोग्यपूर्ण असतात, आता हेच पहा ना, आयुर्वेदानुसार अस्थी धातूचा मल म्हणजे केश आहे, ज्यांच्या शरीरात धातूंचे पोषण योग्य होते त्यांच्या शरीरात क्रमाने अस्थिधातू सुद्धा आरोग्यपूर्ण असणार आहे, परिणामी त्यांच्या केसांचे आरोग्यासुद्धा उत्तम असणार आहे, आता हे अंतस्थ घटक दुर्लक्षून केवळ त्यांच्या "हेअर केअर" रुटीन ची चौकशी करून आणि ते रुटीन तंतोतंत फॉलो करून आपल्याला तसेच परिणाम मिळतील अशी अपेक्षा करणे हे निव्वळ दिवास्वप्न आहे.

मात्र तरीही याविषयावर अधिक लिहण्याचा प्रयत्न असेल, लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा 🙏

#ऐकावे_आयुर्वेदाचे

#आयुर्वेद

#केसांचेविकार

02/10/2024

आमच्या छ. संभाजीनगर पासून जवळच्या एका क्षेत्राच्या मठाधीपतींची चिकित्सा काही वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या पार पडली, त्यांना चक्कर येणे आणि डोकेदुखीचा त्रास होता. मुळात सन्यस्त असल्याने पथ्यापथ्य, व्यायाम इ. नियमांचे सहज पालन घडल्याने त्यांना बरे व्हायला फार वेळ लागला नाही, त्याशिवाय योगपालन नियमित व्हावे यासाठी आश्रमातील मुलांना सकाळी योगासने शिकविण्याची जवाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतल्याने व्यायामात खंड झालेला नाही, आहाराची पथ्ये अजूनही पाळत असल्याने त्यांच्या आजारात अनेकदा जो पुनरुद्भ्व होतो तो त्यांच्याबाबतीत झालेला नाही.

आज भेट झाली ती दीर्घ प्रवासातून आल्यावर वातावरणातील बदलांमुळे झालेल्या सर्दी-खोकला यासाठी, आयुर्वेदावरचे त्यांचे प्रेम असे की, ते कोठेही असतील तरी आयुर्वेदाला प्राधान्य देतात. या अश्या असंख्य थोर आणि महान आत्म्यांचे आशिर्वाद पाठीशी असल्याने या महान शास्त्राचा ऱ्हास होणे कदापि शक्य नाही.

संत-महात्मे यांच्या अल्प का होईना सहवासातून तुम्हाला प्रचंड मोठी उर्जा मिळत असते, आमच्यासारख्या एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांना अश्या महात्म्यांचे स्वतः चालून येऊन सान्निध्य लाभावे हा भगवान धन्वन्तरींचा मोठा आशिर्वाद आहे😇

आजचा दिवस तर पुरेपूर वसूल झाला!

तुमचा सर्वांचा दिवस शुभ जावो 🙏🙏

Diabetes can be reversed!
29/09/2024

Diabetes can be reversed!

भाची लहान असताना माझ्याकडून राजकन्या नाहीतर परीची गोष्ट ऐकायची, एकच गोष्ट रोज वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून सांगितली की तिल...
28/08/2024

भाची लहान असताना माझ्याकडून राजकन्या नाहीतर परीची गोष्ट ऐकायची, एकच गोष्ट रोज वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून सांगितली की तिला मावशी म्हणजे जादुगार वाटत असे कदाचित! तो आमचा हक्काचा वेळ असे, कधी कधी दिवसभराचा कामाचा थकवा आणि अतिशय जडावलेल्या डोळ्यांनी मी हे काम पूर्ण करत असे, तिचे चिमुकले डोळे मात्र जिज्ञासा आणि उत्कंठेने ओथंबलेले असायचे, एकाच वेळी उर्जेचा अखंड धबधबा असलेली ही फुलपाखरे आणि त्याचवेळी कामाच्या ओझ्याखाली असलेले पालकांच्या वयाची माणसे यांच्या एकमेकांशी असलेल्या सहवासाची एक गंमतच आहे. अर्थात भाची सुट्ट्यांमध्ये आली की हा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा !

पुढे-पुढे गोष्ट सांगण्याऐवजी गोष्ट वाचून दाखवणे सुरु झाले, त्यापुढे गोष्ट वाचायला लाऊन मी ऐकणे सुरु केले, मग तिने तिचे पुस्तक वाचायचे आणि मी माझे पुस्तक वाचायचे आणि मगच झोपायचे इथपर्यंत गाडी आली.

आज आठवण्याचं कारण की, मावशीने कढी एकदा गोष्ट सांगावी यासाठी आसुसलेले हे चिमुकले डोळे स्वतःहून पुस्तकं वाचायला लागले आहे, परवा आई पुण्याला गेली, जाताना तिच्याजवळ भाचीसाठी मुद्दाम पुस्तकाचा खाऊ पाठवला असता मुद्दाम फोन करून पुस्तक आवडल्याचं आणि लगेच तीन गोष्टी वाचून झाल्याचं अपूर्वाईने सांगायला फोन आला.

बाकी काय देता येईल कल्पना नाही पण पुस्तकांचा नाद हा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित झाला आहे, आज यासाठी स्वतःला बक्षीस तर द्यायलाच हवं, कोणतं पुस्तक घ्यावं बरं स्वतःसाठी? 😇

#मनातलं

आजारांच्या कारणांमध्ये दमन केलेल्या भावनांचं प्रमाण पाहता आयुर्वेदीय सत्वावाजय चिकित्सेला खूप मोठं महत्व येणाऱ्या काळात ...
27/08/2024

आजारांच्या कारणांमध्ये दमन केलेल्या भावनांचं प्रमाण पाहता आयुर्वेदीय सत्वावाजय चिकित्सेला खूप मोठं महत्व येणाऱ्या काळात असणार आहे हे नक्की!

"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" या मूल सिद्धांताकडे नव्याने वाटचाल पाहायला मिळणार आहे, वैद्य मित्रांनो, आयुर्वेदाच्या भात्यातल्या सत्वावाजय चिकित्सेरुपी या एका शस्त्राचा वापर आजही आपण करत आहात याबाबत शंका नाही, मात्र येणाऱ्या काळात अधिक प्रभावीपणे तो करत राहूया आणि चिकित्सा विश्वात आपले वेगळे स्थान अधिक बळकट करूया!

#मनातलं

"मनोवेध : आजार आणि मन यांचा संबंध" या कार्यशाळेचे स्वरूप : • माध्यम : ऑनलाईन  • भाषा : मराठी Aआणि इंग्रजी • वेळ: रविवार ...
16/08/2024

"मनोवेध : आजार आणि मन यांचा संबंध" या कार्यशाळेचे स्वरूप :

• माध्यम : ऑनलाईन
• भाषा : मराठी Aआणि इंग्रजी
• वेळ: रविवार सकाळी ८ ते ९
• तारखा : १५ सप्टेबर ते ६ ऑक्टोबर दर रविवारी
• रजिस्ट्रेशन साठी शेवटची तारीख : १० सप्टेबर

कोणासाठी उपयुक्त :

• चिंता, नैराश्य आणि नकारात्मक विचारांचे प्राबल्य असलेल्या व्यक्ती
• आजाराची आणि एकूणच आयुष्याबद्दल अनिश्चितता अथवा असुरक्षित भावना असलेल्या व्यक्ती
• मानसिक आघात अथवा दीर्घकाळ संघर्षाच्या अवस्थेतून गेलेल्या व्यक्ती
• जिर्ण आजारांशी लढताना मनोबल टिकविण्यात अडचण येत असलेल्या अवस्थेतील रुग्ण
• मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे किमान एक नातेवाईक
• आजारांचा आणि मनाचा संबंध याबाबत अधिक माहिती हवी आहे अश्या सर्व जिज्ञासू व्यक्ती.

कार्यशाळेचे फायदे :
• आजारातून बाहेर पडण्यासाठी सजग आणि सबल मानसिक दृष्टीकोन निर्माण करण्यात रुग्णांना मदत होते.
• जिर्ण आजारांनी ग्रस्त रुग्णांना निराशा दूर करायला मदत होते.
• नकारात्मकता आणि विचारांचा गोंधळ दूर करायला मदत होते.
• स्वस्थ व्यक्तींना आजारांच्या निर्मितीत मानसिक भाव समजून घेऊन आजार दूर ठेवण्यासाठी मदत होते.

संपर्क कसा करायचा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScPi2frshPEpscHFWXn5xfM-16ipKirdrJ3U43axtjDu-pGGw/viewform?usp=pp_url

या लिंक वर जाऊन form भरायचा आहे

• 9049603419 या क्रमांकावर whatsapp मेसेज करायचा आहे, पुढील सूचनांसाठी आपल्याला संपर्क केला जाईल.

वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर

#ऐकावे_आयुर्वेदाचे

#जिर्ण_आजार

#आयुर्वेद

आजाराचा आपल्या मनावर आणि मनाचा आजारावर कसा परिणाम होतो हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. घाबरलेली अथवा गोंधळलेली मानसिक स्...
14/08/2024

आजाराचा आपल्या मनावर आणि मनाचा आजारावर कसा परिणाम होतो हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे.

घाबरलेली अथवा गोंधळलेली मानसिक स्थिती हा चिकित्सेच्या मार्गातील मोठा अडथळा आहे ही वस्तुस्थिती आहे.

आजार मग तो आशु असो की जिर्ण, रुग्णाच्या मनःस्थितीचा फार मोठा परिणाम चिकित्सेवर होतो, त्यातूनही जे रुग्ण जिर्ण आजारांनी ग्रस्त आहेत आणि ज्यांना उपशय मिळविताना अडचणी येत आहेत अश्या रुग्णांच्या बाबतीत नकारात्मक मानसिक दृष्टीकोन हा फार मोठा विषय आहे.

रुग्णांमध्ये या विषयाच्या बाबतीत अनभिज्ञता असल्याने त्यांच्या चिकित्सेचा कालावधी वाढतो तसाच त्यांचा खर्चही वाढतो, हा टाळता येईल असा प्रवास असल्याने याबाबतीत रुग्णांसाठी वैयक्तिक समुपदेशनाव्यतिरिक्त अजून काय करता येईल या अनुषंगाने केलेल्या विचारमंथनातून रुग्णांसाठी एक कार्यशाळा उद्याच्या मुहूर्तावर घोषित करणार आहोत, ज्यांना याचं लाभ घ्यायचा आहे त्यांनी उद्याच्या पोस्टकडे लक्ष द्यावे.

लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा 🙏🙏

©वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर

#ऐकावे_आयुर्वेदाचे

#आयुर्वेद

#आयुर्वेद_सिद्धांत

#जिर्ण_आजार

Address

Aurangabad
431005

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

9049603419

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Jyoti's Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Jyoti's Ayurveda:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Dr. Jyoti’s Ayurveda

An Ayurvedic panchkarma hospital providing services in ilness and wellness with an authentic ayurvedic remedies.