08/04/2024
पंचकर्म
'पंच' म्हणजे पाच आणि 'कर्म' म्हणजे प्रक्रिया किंवा Procedure. शरीराची अंतर्बाह्य शुद्धी करण्याच्या उद्दिष्टाने पाच प्रमुख वेगवेगळ्या प्रक्रिया आयुर्वेदात वर्णन केल्या आहेत. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या पाच प्रक्रियांना एकत्रितपणे पंचकर्म असे म्हणतात.
पंचकर्म का करायचे ?
प्रत्येक शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतातच. ह्या तीन दोषांचे शरीरातील प्रमाण आहार, ऋतू इत्यादि विविध घटकांमुळे कमी जास्त होत असते. शरीर स्वस्थ राहण्यासाठी तिन्ही दोषांना त्यांचे त्यांचे काम व्यवस्थितपणे गरजेचे असते. जेव्हा ह्या दोषांचे शरीरातील प्रमाण खूप वाढते तेव्हा आपण आजारी पडतो. उदाहरणार्थ वात वाढला असता अंगदुखी, पाठ, कंबर, सांधेदुखी, वारंवार पोट फुगणे, भरपूर ढेकर येणे, कोरडी त्वचा असे आजार उद्भवतात. पित्त वाढले असता घसा, छाती, डोळ्यांची जळजळ, तोंडआंबट कडवट होणे किंवा त्या स्वरूपाची उलटी होणे, वारंवार तोंड येणे, उबाळू, लघवी किंवा गुदद्वारे रक्त पडणे हे त्रास दिसून येतात. कफ वाढला असता स्थौल्य, दमा, खोकला, मधुमेह हे आजार आढळून येतात. सध्याची जीवनशैली बघता हे तिन्ही दोष एकाच वेळी प्रमाणापेक्षा वाढून वरील लक्षणे मिश्र स्वरूपात किंवा ह्यापेक्षा वेगळेच त्रास झालेले सुद्धा आढळून येतात.
दोषांचे बिघडलेले प्रमाण पूर्ववत करण्यासाठी पंचकर्म मोलाची मदत करतात. वाढलेले दोष बाहेर काढून टाकणे आणि नवीन शरीर घटकांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार करणे हे पंचकर्माच्या साहाय्याने साध्य होते. थोडक्यात कॉम्प्युटर फॉरमॅट करून व्हायरस, corrupt files काढून टाकणे आणि नव्याने restart करणे होय. आपण गाडीचे ठराविक दिवसांनी servicing करतोच तसंच हे एकप्रकारे शरीराचं servicing होय. गाडीच्या servicing नंतर गाडी कशी छान चालते तसंच पंचकर्मानंतर शरीर अगदी कापसासारखं हलकं वाटतं प्रसन्न वाटतं. 'घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून' तसंच पंचकर्मानंतर शरीरात होणारे सकारात्मक बदल प्रत्येकाने स्वतः अनुभवावे हेच खरं.
पंचकर्म करताना घेण्याची काळजी
पंचकर्म ही एक शास्त्रीय पद्धत आहे ती पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीनेच व्हायला हवी. वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण, नस्य ह्या पैकी कोणताही एक उपक्रम व्यवस्थित पूर्ण करायला अंदाजे ७ ते १० दिवसांची आवश्यकता असते. पंचकर्म सुरू करण्याअगोदर आणि नंतर थोडे दिवस काही नियम आहारपद्धत पाळावी लागते. ह्या दरम्यान वैद्यांच्या सल्ल्याने काही थोडेफार बदल करून आपण आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवू शकतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यांच्यातील आजाराचे स्वरूप वेगळे असते. प्रत्येक व्यक्तीचे नाडीपरीक्षण, प्रकृतीपरीक्षण करून त्याला योग्य असे पंचकर्म व किती दिवस पंचकर्म करावयाचे ते ठरवले जाते. 3 दिवसात संपूर्ण Detox, एका दिवसांत सर्व पंचकर्म अशा ऑफर्स म्हणजे केवळ प्रलोभने असतात. ती शास्त्रीय पद्धत नव्हे. अशा प्रलोभनांना बळी पडल्यास फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकते. त्यामुळे तज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचकर्म करावे हेच उत्तम. 'शर्व आयुर्वेद क्लिनिक' मध्ये याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाते. पंचकर्म झाल्यानंतर किंवा होत असतानाच्या काळात संपूर्ण आहार समुपदेशन, आयुर्वेदीय जीवनशैली ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. अशा प्रकारे शरीर शुद्धी केली असता त्याचे होणारे फायदे चरकसंहितेत पुढीलप्रमाणे वर्णन केले आहेत..
एवं विशुद्धकोष्ठस्य कायाग्नि: अभिवर्धते।
व्याधयश्च उपशाम्यन्ति प्रकृतिश्चानुवर्तते ।।
इंद्रियाणि मनो बुद्धी वर्णश्चास्य प्रसीदति।
बलं पुष्टि: अपत्यंच वृषता चास्य जायते ।।
जरां कृच्छ्रेण लाभते चिरं जीवति अनामयः ।
तस्मात् संशोधनं काले युक्तियुक्तं पिबेत् नरः ।।
भावार्थ - भूक वाढते, व्याधींचे निराकरण होते, मूळ शारीरिक प्रकृती टिकून राहते(थोडक्यात सर्व विकृती नष्ट होतात), ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुध्दी यांचे प्रसादन होते म्हणजेच कार्यक्षमता वाढते, वर्ण उजळतो, शरीर पुष्ट बलवान होते, अपत्यप्राप्ती होते, कामशक्ती वाढते, वार्धक्य उशिरा येते, निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे संपूर्ण शरीर शुद्धी करावी हेच उत्तम.
गाडीचं नियमित servicing करणारे आपण आपल्या शरीराच्या servicing कडे मात्र लक्ष देत नाही. आता हे एवढे फायदे पंचकर्माने होणार असतील तर तात्पुरत्या गोळ्या घेऊन आजार दाबून ठेवणे चांगले की या शास्त्रशुद्ध मार्गाने तो समूळ नष्ट करणे चांगले हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुमच्यापर्यंत ही पद्धती परिणामकारकरीतीने पोहोचावी यासाठी आम्ही आहोतच!
वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता 9421422958
वैद्य प्रतिक मेहता 9404024628
शर्वआयुर्वेद क्लिनिक, दाभोळकर कॉम्प्लेक्स C विंग, पहिला मजला, दत्त मंदिराशेजारी, खेर्डी, चिपळूण
(पूर्वप्रसिद्धी - जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विशेषांक)