Atharv Child Clinic - Dr. Amitkumar D. Hatunje

Atharv Child Clinic - Dr. Amitkumar D. Hatunje बालरोगतज्ञ ? नव्हे बालआरोग्यतज्ञ .... As working in Primary Health Center as a Visiting Paediatrician, please avoid timings 11:00 a.m. to 12:30 in morning hours.

Preferably call before you get there.

16/01/2023

मी शिकलेली, सुस्थितीतील, शहरात रहाणारी,
आयुष्यात सगळी सुख उपभोगली.
मग आता काय करायचं?

इव्हेंट.
मौज मजा गम्मत ...
चला, किटी पार्टी करु.
आपली संस्कृतीही जपायला हवी ना ..... मग संक्रात-हळदीकुंकू करू.

हे एका शहरी संपन्न स्थितीतील बाईचे मनोगत.
तिला माहितीये, की ती हे सगळे गंमत म्हणून करतीये.

पण ...
ह्याचे पडसाद निम्न वर्गात उमटतात.

खेड्यांतून, गावांतून हे असे संवाद ऐकू येतात ...
.. बघ, ती एवढी शिकली-सवरलेली बाई हे करते,
आणि तुला काय ग धाड भरली ?
.. अग, त्या शहरातल्या बायका करतात.
मग आपण पण केले पाहिजे.
असे करणे म्हणजेच आपण शिकलेल्या.
बरोबरच असणार ते.

आणि मग सुरू होतात ... हळदीकुंकू सोहळे.
फुटकळ २-५-१० ₹ चे काहीतरी वाण.

पूर्वीच्या काळी,
प्रत्येकाच्या शेतात उगवलेलं सगळं
सुगडात भरून वाण म्हणून एकमेकींना दिला जायचं.
त्या सुगडातील एकूणएक गोष्ट खाल्ली जायची.
बोरं, ऊस, शेंगा, गाजर, रेवडी, आणि बरेच काही.

आता काय करतोय ?
नुसता दिखावा.
पैठण्या, पाटल्या, नथ, मेकअप. आणि फोटो.

आणि पौष्टिक अन्न ?
ह्या सुगीच्या दिवसात उगवलेले धान्य, भाजीपाला ?
तो कुठंय ?

परत हळदी कुंकू शब्द वापरून,
विधवा, कुमारी, घटस्फोटिता ह्यांना आम्ही बोलवतो,
वगैरे वगैरेचे नगारे बडवयचे,
पण त्या किती ऑकवर्ड होतात, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष.

पूर्वजांना किती डोकं होतू,
ऋतुनुसार सण साजरे करायचे.
आणि आता काय करतोय आम्ही ?
मज्जा मज्जा मज्जा.

परत तुम्हाला नाही करायचे तर तुम्ही नका करू.
वगैरे अर्धवट ज्ञान आम्हालाच.

#आधारित

14/01/2023

एक अनुभव.

परवा मी १४ तासांच्या सलग फ्लाईटमध्ये
एक अजब बघितलं.
'दोन-अडीच' वर्षांच्या चिमुकल्याने आई अन् आजीला
'आयपॅड'वरून अक्षरशः जेरीला आणलं होतं.

चार्जिंग संपलं होतं, आणि अख्खं विमान त्याने
आपल्या आरड्याओरड्यानं डोक्यावर घेतलं होतं.

एअरहोस्टेसने रंगवायला काही आणून दिलं, .. खाऊ दिला, तरी नाही.

शेवटी एकाने त्याच्याकडची चार्जिंग केबल दिली,
तेव्हा ते पोरगं थांबलं.

इकडे आईला कसलाही रिग्रेट नाही.
पण आजी मात्र शरमेली झाली होती,
सतत तिच्या मुलीला नावं ठेवत होती.

बरं तो मुलगा काय बघतो एवढं, तर 'इन्स्टा रील्स'.
आता विमानात वायफाय नाही,
तर आईने त्याच आवडते tv शो डाउनलोड केले होते.

आम्ही सगळे त्या मुलात गुंतून गेलो होतो,
पण काहीही करू शकलो नाही.
मी त्याच्याशी काही खेळायचा असफल प्रयत्न केला.

अनेकदा नव्यानं 'आई' झालेल्या मुलींना
बाळाला जेवू घालताना mobile समोर लावून ठेवणं,
इतकंच जमतं.

मी त्यांना सांगतो,
बाळाला गोष्टी सांगा, गाणी म्हणून दाखवा,
Soft Toys किंवा Miniature Animals असतील,
तर त्यापासून गोष्टी तयार करुन सांगा.

पण खेदाने म्हणावे लागते,
या सोशल मिडियाच्या अतिवापराने
नव्या आयांची कल्पनाशक्ती आटून गेली की काय ?

आईचा आवाज, आवाजाचा पोत आणि ताल,
यावर भाषासमृद्धी आणि व्याकरणाची नैसर्गिक जाण
आपसूकच निर्माण होते.

ती मोबाईलच्या स्क्रीनवर कशी होणार 😢

#आधारित

14/01/2023

''खेळणी''.

छोट्या मुलांना तपासायला आणतात,
तेव्हा खेळण्याबद्दल चर्चा तर होणारच.

काय खेळतो/खेळते ? कसा खेळतो ?
कोणाबरोबर खेळतो ? काय खेळणी आहेत ?
हे प्रश्न तर विचारले जातातच,
पण माझ्या खेळघरातील वस्तूंशी मूल कसे वागते,
हेसुध्दा बघितले जाते.

'मुलाला काय त्रास आहे' याचा शोध घेण्यासाठी
ही सर्व माहिती फार महत्त्वाची आहे.

गेली २१ वर्षे मी हा उद्योग करतो आहे.
लहान मुलांशी खेळणे, त्यांना खेळताना बघणे,
आणि पालकांबरोबर खेळाबद्दल चर्चा करणे.

हा माझ्या व्यवसायाचा भागच आहे.

मोकळेपणाने खेळू शकणारी मुले कमी दिसतात.
हे प्रमाण क्लिनिकमध्ये येणाऱ्या मुलांमध्ये तर
दिवसेंदिवस कमीच होते आहे.

अजून एक निरीक्षण
मला फार अस्वस्थ करतं आहे,
म्हणूनच खूप दिवसांनी परत लिहितोय.

"घरी काय खेळणी आहेत" या प्रश्नाचं उत्तर -
चित्रांची पुस्तके, ब्लॉक्स, इंग्रजी मुळाक्षरांची
साचेबद्ध रचना, आणि मोटारगाडी.
यापलीकडे जात नाहीये.

"या गोष्टी म्हणजे खेळणी नव्हे !
हा तर अभ्यासाचा माल आहे,
''खेळणी काय आहेत घरात ?'' असं विचारलं,
की पालक एकमेकांच्या तोंडाकडे बघतात.
आणि मोबाईल, कॉम्प्युटर या गोष्टींची नावे घेतात.

प्रत्येक गोष्टीचा संबंध
काहीतरी शिक्षणाशी लागला पाहिजे.
आणि अक्षरओळख आणि ढीगभर चित्रांवरून
त्या वस्तूंची नावे सांगता येणे,
असे दळभद्री शिक्षण !

घरच्या माणसांबरोबर बसून लहान मुलांनी
'आपडी-थापडी'चे काहीतरी गंमत खेळ खेळावेत,
बडबडगाणी म्हणावी, वेडीवाकडी तोंडे,
आवाज, अंगविक्षेप करून खदाखदा हसावे,
लोटपोट हसावे असं होणं अपेक्षित आहे.

बाहुल्या असाव्यात त्या कापड,
लोकर, चिंध्या अशा मऊ गोष्टींच्या,
हव्या तश्या खेळता येणाऱ्या असाव्यात,
भातुकली असावी, घरात वापरली जाणारी
भांडीकुंडी असावीत, आई-बाबांच्या काही
कामाच्या आणि वापराच्या वस्तूंचा
पोराने खेळायला कब्जा केलेला असावा.

घरातली एखादी वापराची वस्तू सापडत नसेल,
तर ती सवयीने पोराच्या खेळण्यात शोधली जावी,
आणि तिथे ती सापडावी, असं काहीसं
लहान मुलांच्या खेळत्या घरात असणं अपेक्षित आहे.

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या जगात
स्वतःची कल्पनाशक्ती मिसळून
काहीतरी प्रतिमा निर्माण करणे,
आणि त्यात खेळणे-रमणे,
अशा प्रकारे बालपण जावे, असे अपेक्षित आहे.

पुस्तकातील अगम्य चित्रांची नावे सांगता येणे,
प्रत्यक्ष कधीही, कुठेही फारशा न दिसणाऱ्या
कार्सचे ब्रँड-मॉडेल सांगता येणे.
'देश म्हणजे काय' याची कणभर समज नसताना
भिंतीवर नकाशे टांगून त्यातील रंगीबेरंगी तुकड्यांना
देश म्हणून ओळखणे, त्या देशांची
आणि त्यांच्या राजधान्या असलेल्या शहरांची
अगम्य नावे घडाघडा म्हणून दाखवणे,
ही हुशारी नव्हे,
तर निपचित पडलेल्या
'बालपणा'चे मेकअप लावलेले प्रेत आहे,
हे लोकांना समजत नाही का ?

असली दुर्दैवी मुले म्हणजे
आपली पुढची पिढी असणार आहे का ?

'स्मरणशक्ती म्हणजेच सगळे काही'
ही संकल्पना १८१८ मध्येच मेली,
ही बातमी अजून पोहोचली नाहीये का ?

मी काय करू ? समजतच नाहीये.

माणूस कसा वाढतो, कसा शिकतो, कसा वागतो,
आणि सामाजिक बनतो याचा आपल्याला आजकाल खूप सखोल अंदाज आहे.
दरवर्षी त्यात भर पडते आहे.

त्याचा वापर करून जगभर बालसंगोपन बदलते आहे.
समृद्ध होते आहे.

आणि आपण ...
कुठे तोंड करून उभे आहोत ! हे काय चाललंय ?

12/06/2021

स्वित्झर्लंडमधला एक अनुभव इथं सांगतो.

काही वर्षांपूर्वी माझं एका स्वीस कुटुंबात वास्तव्य होतं. भोजनाच्या वेळेला आमच्या गप्पा चालल्या होत्या. यजमान एक शास्त्रज्ञ होते. त्यांच्या पत्नी गृहिणी होत्या.

गप्पांच्या ओघात मी त्यांना विचारलं,
"तुम्ही काय करता?"

त्यांनी उत्तर दिलं, "मी ट्यूशन घेते."

मी आश्‍चर्यचकित होऊन विचारलं,
"तुमच्याही देशात ट्यूशनचा प्रकार आहे ?"
( आपल्या देशातील ट्यूशनच्या व्यापाराची इत्थंभूत माहिती मी त्यांना दिली.)

तेव्हा त्या हसत म्हणाल्या,

"आमच्याकडं फक्त ‘ढ’ मुलांना ट्यूशन लावली जाते.
ट्यूशनला जाणं आमच्या देशात अप्रतिष्ठेचं समजतात."

"मग कुठली ट्यूशन तुम्ही घेता?" मी प्रश्न केला.

"मी पालकांच्या शिकवण्या घेत आहे." त्या उत्तरल्या.

पालकांना त्या सुजाण पालकत्वाचे धडे देतात. संगोपनशास्त्र हे खूप प्रगत झालं आहे आणि
आपण कालबाह्य होत आहोत, याची जाणीव पालकांना
होऊ लागली आहे. म्हणून तिथं त्यांना आजकाल
पालकत्वाच्या शिकवणीची गरज भासत आहे.

ही जाणीव इथल्या पालकांना होईल तो सुदिन !!!

#फादर फ्रान्सिस दिब्रिटो
#दैनिक सकाळ

07/06/2021

कोव्हिडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती समाजामध्ये पसरलेले दिसते.

तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे, असं म्हणता येणार नाही, असं आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे.

डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यांचा मुद्दा मांडताना
केलेलं विश्लेषण खालील प्रमाणे, १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होत आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे.

या तर्काला कोणताही आधार नाही.

बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने देखील हे स्पष्ट केलं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.

त्यात ते म्हणतात.
तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणं कठीण आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही कोव्हिड होण्याची भीती असते
पण तिसऱ्या लाटेमध्ये मुलं सर्वाधिक
बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.

९० टक्के मुलांमधील कोव्हिडसौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे.• काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते, पण त्यांचं प्रमाण फार मोठं नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.

लहान मुलांमध्ये या विषाणूच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट रिसेप्टर विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत. सध्या माध्यमं राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत.

मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचे कोव्हिडमुळे बाधित होण्याचं प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्क्यांच्या दरम्यान राहिलं आहे.

हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखांवरून दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही.

मागील सहा महिन्यात एकूण कोव्हिड रूग्ण संख्येच्या तुलनेत वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या प्रमाणात फारसा बदल झालेला दिसत नाही. म्हणजेच मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण स्थिर आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जरी कोव्हिडबाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.

आपण अगदी मे महिन्याचं उदाहरण घेतले तरी अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण
०.०७ टक्के एवढं आहे.

साधारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो, असं हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.

लहान मुलांमध्ये कोव्हिडचं प्रमाण वाढू शकतं हे भाकित मनावर घेऊन आपण त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे.

कोणतीही तयारी वाया जात नाही. परंतु त्यामुळे लहान मुलं असणाऱ्या पालकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणं फारसं हितावह नाही.

आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचं नियमित लसीकरण पूर्ण झालं आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा.

तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही
घाबरून जाऊ नका.

वेळेवर तज्ञांचा सल्ला घ्या.सोशल मिडिया वर सर्वस्वी अवलंबून राहू नका.आणि ...आकडेवारी-टक्केवारी सारखी असली,तरी,डॉक्टर-आरोग...
03/06/2021

वेळेवर तज्ञांचा सल्ला घ्या.
सोशल मिडिया वर सर्वस्वी अवलंबून राहू नका.

आणि ...

आकडेवारी-टक्केवारी सारखी असली,
तरी,
डॉक्टर-आरोग्य कर्मचारी यांची संख्या
मात्र आहे तितकीच राहणार आहे,

हेसुद्धा लक्षात ठेवावं लागेल.

12/03/2021

पण लक्षात कोण घेतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

बाळाची काळजी घेण्याच्या,
जितकी घरे तितक्या तऱ्हा असतील.
बाळ म्हणजे सृजनाची खूण, भविष्याची ठेव,
पूर्वजांच्या ऋणाची परतफेड ...
पण ह्या काव्यात्म, रेशमी अनुभवाला
गैरसमजुतींची कसर अगदी सहज लागते.

पण लक्षात कोण घेतो?

आता हेच पहा ना,
जन्मतः बाळाला अंघोळ घालायची
कित्ती कित्ती घाई.

नुकतेच जन्मलेले बाळ अतिशय बेंगरूळ दिसते.
टयांह्यां टयांह्यां रडत असते, ओले असते.

केस चिकटलेले, चेहरा, डोकं जरा चेपलेलं,
सर्वांगावर चिकटा चिकटलेला,
रक्त लागलेलं, डोळे घट्ट मिटलेले;
असं ते बाळ पहाताच आईच्या काळजात चर्रर्र होतं.

हेची फळ काय मम तपाला, असं म्हणत
ती मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेते.

पाहिजे होतं मिल्कपावडरच्या डब्यावरचं
गुटगुटीत बाळ आणि पदरात पडलं हे ध्यान !!

पण चिंता नसावी.
बाळ आपलं रूप झपाट्यानी पालटतं,आणि
काही दिवसात अगदी 'राजस' दिसायला लागतं.

त्याला सजवायची, घाई करू नये.

जन्मतः बाळाला तेल माखून, न्हाऊ घालून,
त्याच्या अंगावरचा चिकटा काढून,
पॉलिश करून घेण्याची काही गरज नसते.

उलट पहिले एकदोन दिवस बाळाला
मुळी अंघोळ घालूच नये.
त्याच्या अंगावरचा पांढरा चिकटा
त्याच्या संरक्षणासाठी असतो.
त्यांनी उबही रहायला मदत होते.

तो काढून उलट तोटाच होतो.
तेंव्हा तो आपोआप सुकून, पडू द्यावा.

जी गोष्ट अंघोळीची तीच तेलाची.
जिथे भोक दिसेल तिथे तेल घालायची
आपल्या समाजाला वाईट्ट खोड आहे.
त्यामुळे बाळाच्या नाकात, कानात, बेंबीत,
शीच्या जागी, शूच्या जागी, तेलाचे थेंब सोडले
की ‘अंगाला लावणाऱ्या बायांना’ कृतकृत्य वाटतं.

खरंतर बाळाच्या कुठल्याही भोकात काहीही
घालायची गरज नसते.
दिसेल त्या भोकात तेल घालायला
बाळ म्हणजे काय शिवणयंत्र आहे?

पण तेल आणि त्याचे गुणधर्म याचं वेडच आहे.

अगदी जगभरातल्या लोकांना.
कुठल्याही सफरीला गेलात की लगेच
स्थानिक तेल विकणारे भेटतात.

इजिप्तच्या कमल-तेलापासून ते
लंकेतल्या दालचिनी-तेलापर्यंत अनेक विक्रेते
मला भेटले आहेत.

कोणत्याही तेलात केस गळायचे थांबतात,
सांधेदुखी पळून जाते आणि संडासला साफ होते !

हे तीन गुण किमान असतातच.

बाकी मग तसला ‘स्टॅमिना’ वाढवण्यापासून
ते चिरतारुण्यापर्यंत काहीही असू शकतं !!

असो.

बाळाच्या कानात तेल ओतले तर
कानाचा पडदा तेवढ्या वजनानेही फाटू शकतो.

अगदी कांद्याच्या सालीइतका पातळ असतो कानाचा पडदा.
तेलाचं वजन तो फाटायला पुरेसं असतं.
मग हे तेल मध्यकर्णात जातं.
या तेलाच्या थरावर बुरशी इत्यादी जंतू वाढतात.
नाजूक अंतर्कर्णाची चांगलीच नासधूस करतात.
बाळाची श्रवणशक्ती कमी होते,
ते समाजात, शाळेत, मागे पडते,
आणि पुढे दुर्दैवाची मालिकाच सुरु होते.

मुलाच्या आणि कुटुंबियांच्या अंतःकरणाची
नासधूस होते.
पण सांगूनही हौसेहौसेनी तेल घालणाऱ्या आज्ज्या,
रोज भेटतात मला.

वर सांगतात तेल घातल्यामुळे
कानात मळ साठत नाही.
मुळात मळ हा तिथले नैसर्गिक स्त्राव
आणि धूळ याचं मिश्रण असतं.

चावणे, चोखणे अशा जबड्याच्या हालचालींमुळे
जो काही मळ असतो तो आपोआप बाहेर येतो.
तो काढण्याची गरज नसते.
त्यातून तान्ह्याबाळाचा आणि धुळीचा
संपर्क तो किती ? पण लक्षात कोण घेतो ?

नाकातही तेल घालायची आवश्यकता नसते.
उलट तेलाचा अंश श्वसनमार्गात जाऊन
न्युमोनिया झाल्याची उदाहरणे आहेत.
केमिकल न्युमोनायटीस म्हणतात त्याला.

बेंबीवर तेलही असेच अनावश्यक.
तिथेही तेल घातलं की नाळेचं ओलं बोंडूक
वाळण्याची क्रिया मंदावते.

ओली, लुसलुशीत, निर्जीव, नाळ म्हणजे
जंतूंना मोकळे रानच की.

नाळेला ड्रेसिंग करणे, पट्टी बांधणे,
गोमय (म्हणजे गाईचे शेण) लावणे,
सारं काही निषिद्ध आहे.
गाय कितीही पवित्र असली तरीही.

नाळ पडल्यावर कधी कधी बेंबी ओलसर रहाते.
खडेमिठाचा खडा त्यावर धरला,
की ही ओल शोषली जाते.

विशेष काही करावं लागत नाही.

तेल लावण्या पाठोपाठ अंघोळ येते.
बाळराजांची अंघोळ म्हणजे तर काय शाही स्नान !

एरवी चांगल्या कर्त्याधर्त्या बायका
बाळाला अंघोळ घालायला बाई का लावतात,
हे एक न सुटलेलं कोडं आहे.

एरवी ह्या बायका अगदी कर्तृत्ववान वगैरे असतात.
विमाने उडवतात, बंदूक चालवतात,
लाखोंचे व्यवहार ह्यांच्या सहीने होतात; पण ...
बाळाला अंघोळ घालायला ह्यांना खास बाई लागते.
ती सुद्धा कोणतीही कामवाली चालते.

चार घरी धुणीभांडी करणे,
चार घरी अंगाला लावायला जाणे,
आणि स्वतःची चार मुले असणे,
एवढेच ह्यांचे क्वालिफिकेशन.

बाळाला अगदी चोळून मोळून अंघोळ घातली जाते.
तत्पूर्वी त्याला तेलानी रगडून रगडून
पैलवानासारखे मालिश केलं जाते.

इतकं रगडण्याची गरज नसते.
अशाने क्वचित हाड मोडल्याची,
स्नायू ओढल्याची उदाहरणे आहेत.

एक बाई बाळाचे हात पाय एकत्र धरून
त्याला झोके देते आहे,
असाही एक भयंकर व्हिडीओ
एका पेशंटनी मला दाखवला होता.

काय करू नये, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून
दाखवायला, मी तो सेव्ह करून ठेवला आहे.

अंघोळीच्या आधी ह्या तेल लावण्याचा
कितपत फायदा होतो कुणास ठाऊक.
तेलाचा काही अंश हा बाळाच्या त्वचेतून
शोषला जातो, त्वचा तुकतुकीत रहाते,
हे फायदे म्हणायचे.

पण त्याच बरोबर ते बुळबुळीत होतं,
हातातून निसटून अपघात होऊ शकतो,
हे तोटे म्हणायचे.

शिवाय तेल कोणते हा तर आजकाल
प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

तालेवार घरात बदामाचे तेल, नाहीतर तिळाचे तेल,
मग खोबरेल तेल, मग गोडं तेल,
अशी उतरती भाजणी आहे.

खरंतर कोणतेही तेल चालतं.
कृपया अर्थाचा अनर्थ करून
अगदीच इंजिन ऑईल चोळू नये !

मग कढत पाण्यानी अंघोळ.
त्यात बाळाला पायावर घेणे, बसवणे,
डोक्यावरून पाणी घालणे, उलथे ठेऊन घालणे,
पालथे ठेवून घालणे,
अशा क्रिया हौसेहौसेनी केल्या जातात.

हे सगळं अनावश्यक आहे,
आणि क्वचित धोकादायक सुद्धा.

हे होईपर्यंत बाळ ठोठो बोंबलत असते,
क्यांक्यां केकाटत असते.
पण ह्या सगळ्यानंतर बाळ गाढ झोपते
याचेच बायकांना कौतुक !

झोपेल नाही तर काय ?
इतके रडव रडव रडवल्यावर ग्लानी येणारच की.

पण रडण्यानी बाळाला व्यायाम होतो,
असं एका माउलीच्या, माउलीच्या, माउलीनी
मला छातीठोकपणे सांगितलं होतं.

कितीही समजावून सांगितलं तरी
त्याचं ते छाती ठोकणे काही संपेना.

शिवाय स्वतःची आठ बाळंतपणे झाल्याचा
त्यांना लोकोत्तर अभिमान होता आणि
माझे एकही बाळंतपण झाले नसल्याचा
कांगावा अखंड चालू होता.

शेवटी मी म्हटले, ‘अरे व्वा! मग रोज तासभर
पाट मांडून, मांडी घालून बसा आणि
मोठ्यांदी गळा काढून तुम्हीही तोच व्यायाम करा !

बाळाला बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून;
नाही तर त्यांनी सांगितलं असतं, की
‘मी काही तुमच्यासारखा बाहेर जात नाही.
त्यामुळे मळतबिळत नाही.
मला नुसतं विसळून घेतल तरी चालेल’.

बाळ विसळून घेणे ही
बाळाला अंघोळ घालण्याची आदर्श पद्धत.
करायचं असं की टेबलावर योग्य त्या तापमानाचे
पाणी एखाद्या टबमध्ये घ्यायचं
आणि बाळाला त्यात हलकेच विसळून घ्यायचं.

गार हवा, मग गरम पाणी, पुन्हा गार हवा
अशा तापमानाच्या झोक्यांचा बाळाला त्रास होतो.

तेंव्हा हे लक्षात ठेऊन सारं काही उरकायचं. अंघोळीनंतर तेल लावायचं.
अशानी अंगात उब रहायला
या तेलाचा उपयोग होतो.

या साऱ्या प्रकारात सर्वात अघोरी प्रकार
कोणता असेल तर बाळाला धुरी देणे.

रसरसत्या निखाऱ्यावर काय काय जाळून
त्याचा धूर बाळाला दिला जातो.
त्या धुरात काय दिव्य वायू असतील ते असोत,
पण त्यात कर्बद्वीप्राणवायू
आणि कर्बप्राणवायू असतातच असतात.

यांनाच मराठीत कार्बन डायऑक्साइड
आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणतात.

यातला दुसरा तर एकदा लालपेशीत शिरला
की पुन्हा निघत नाही.
म्हणजे ती पेशी कायमची बाद.
हा प्रकार तर पूर्णतः टाळावा.

बरेचदा बाळाची छाती फुगलेली दिसते,
आणि ती पिळली तर किंचितसे दूधही येते.
याला डाकीणीचे दूध म्हणतात, आणि
हे पिळून काढणे चांगले असेही समजतात.

पण अशा तऱ्हेने दूध पिळणे हानीकारक ठरते. यामुळे दुधाच्या पेशींना इजा होते,
आणि जर मुलगी असेल,
तर तिला पुढे स्तनपानाला अडचण येते.

असे दूध आईच्या संप्रेरकामुळे तयार झालेले असते.
ते आपोआप, आतल्याआत जिरून जाते.
पिळून काढण्याने कधी कधी तिथे इन्फेक्शन होऊन
गळू देखील उद्भवू शकते.

तेंव्हा असे करू नये.
तान्ह्या मुलीच्या बाह्यांगातून
थोडा रक्तस्राव झाल्याचही दिसू शकतं.
हा ही आईच्या संप्रेरकांचा प्रताप.

ह्यालाही काहीही करायची गरज नसते.
हाही स्त्राव आपोआप थांबतो.
जुजबी स्वच्छतेपलीकडे काही करावे लागत नाही.

उगाच आश्चर्याचे चित्कार काढू नयेत.
पदर तोंडावर धरून ‘पदर आल्याची’
अस्फुट चर्चा करू नये. ती फिजूल आहे.

बाळाच्या डोळ्यात काजळ घालणेही,
असेच चुकीचे आहे.
शिवाय ते डायरेक्ट बचाकभर घातलेले असते.
त्या काजळातून डोळे शोधावे लागतात.
घरी केलेले, चांदीच्या वाटीवर धरलेलं असलं,
तरीही काजळाची गरज नाहीच.
काजळामुळे डोळे मोठे होत असते,
तर चिन्यांनी आणि जपान्यांनी आपल्याकडून
कित्तीतरी काजळ आयात केलं असतं !

काजळ घालणारी बोटे अस्वच्छ असली,
तर डोळ्याला इन्फेक्शन होते,
कधी बोट डोळ्याला लागते,
काजळीचे कण डोळा ते नाक अशा
सूक्ष्म अश्रूनलिकेत अडकून ती वाट बंद होते;

असे अनेक प्रकार संभवतात.
दृष्ट लागू नये म्हणून हा प्रकार आवश्यक आहे म्हणे.

काय काजळ तीट लावायचं ते इतरत्र लावा.
पार अंगभर ठिपके ठिपके काढून
बाळाचा बिबट्या करा.
पण प्लीज डोळ्यात काही घालू नका.

असाच बाळाची टाळू भरणे
नावाचा एक प्रकार आहे.
हा करू दिला नाही तर आलेल्या बाईचा
डायरेक्ट अपमान होतो म्हणे.

लगेच तिचा पापड मोडतो.
यात आलेली बाई बाळाच्या डोक्यावर तेल थापटते.

तेल राहून, केस चिकटून, खवडे झाले तरी चालतील
पण टाळू भरणार म्हणजे भरणार !

मुळात तेलानी असं काही होत नाही.
टाळू न भरणाऱ्या इतर संस्कृती
या पृथ्वीतलावर नांदत आहेत.

त्यांच्या अपत्यांची टाळकी टाळू न भरताही
शाबूत आहेत. बाळाची टाळू म्हणजे त्याच्या
कवटीच्या हाडातील मऊ मोकळे अंतर असते.

बाळाचा वाढता मेंदू मावावा म्हणून
अशी सोय असते. शिवाय प्रसुतीच्या वेळी
अशा लिबलिबीत लवचिक कवटीमुळे
बाळाचे डोके थोडे निमुळते होते,
आणि सुलभतेने बाहेर येते.

पुढे १८ महिन्यापर्यंत ही जागा हाडांनी भरून जाते,
चांगली टणक होते.

तेल थापटून टाळू भरून येत नाही.
शिवाय जर भरून येत असेल तर मग एकच का ?

अशी किमान अजून एक जागा असते बाळाच्या डोईस. कमी दिवसाच्या बाळाला तर
अधिक असतात. त्याही भराव्यात.

पण बायकांना या जागांचा पत्ता नसल्यामुळे
सारा भर माथ्यावर तेल थापटण्याकडे.

बिच्चाऱ्या बाकीच्या टाळू !
मुकाट्यानी आपोआप भरून येतात.

बाळाला भेटायला येणारेही
असेच उच्छाद आणतात.
मुळात भेटायची, बाळ पहायची उत्सुकता असणे
यात गैर काही नाही.

माकडातही अशी वागणूक शास्त्रज्ञांनी
नोंदवली आहे ! पण जावं ते थोड्या दिवसांनी,
जरा आई आणि बाळ स्थिरस्थावर झाल्यावर.

तात्काळ भेटायला गेलं नाही तर
आपलं महत्व कमी होईल असं काहींना वाटतं.

मग दवाखान्यातच भेटायला जायचं,
हात साबणाने स्वच्छ न धुताच
बाळाला मांडीवर घ्यायचं,
त्याला मांडीवर घेऊन डोलवायचं,
त्याच्या हातात मळकी नोट ठेवायची,
मग ते ती नोट तात्काळ तोंडात घालणार !

अशी सगळी गंमत चालू रहाते.

येणारे जाणारे तरी किती,
त्याला काही सुमारच नाही.
त्या आईला ना पुरेशी विश्रांती मिळते,
ना बाळाला घ्यायला वगैरे पुरेसा निवांतपणा,
ना प्रायव्हसी.

काही समाजात तान्ह्या बाळाला
अजिबात बघायला जात नाहीत,
गेले तरी हात लावत नाहीत.
हे बेस्ट आहे.

काही लोकांत मात्र येईल ती बाई बाळ हाताळणार,
त्याला तेल लावून त्याची टाळू भरणार.

वर असं काही टाळावं म्हणलं तर
तिचा अपमान होणार.
मेलीनं मूल माझ्या मांडीवर दिलं नाही म्हणणार.

अशा किती गोष्टी सांगाव्यात ?

एक ना अनेक. शेवटी मी तर माझ्या दवाखान्यात
प्रत्येक खोलीबाहेर पाटी लावून टाकली आहे.

मी तर इवले इवले मूल;
अगदी नाजूक नाजूक फूल.

भेटण्यासाठी तुम्ही आतुर;
पण डॉक्टर मात्र चिंतातूर.

बाहेरून येता कुठून कुठून;
कपडे, अंग, हात मळवून.

आत्ता भेट फक्त लांबून,
नंतर बोलावीन हाक मारून.

ह्यानी मात्र भलताच फरक पडला आहे.
एरवी येणारे यायचे, काय करायचे ते करायचे,
आणि जायचे.

आता येणारे येतात,
काय करायचे ते करतात,
आणि जाताना मला सांगून जातात,

‘डॉक्टर, तुम्ही कविता छान करता हं !’

Address

Kanade Compound, Thorat Chowk
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 5pm - 8pm
10pm - 2pm
Wednesday 5pm - 8pm
10pm - 2pm
Thursday 10am - 2pm
5pm - 8pm
Friday 10am - 2pm
5pm - 8pm
Saturday 10am - 2pm
5pm - 8pm

Telephone

+919423595965

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharv Child Clinic - Dr. Amitkumar D. Hatunje posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Atharv Child Clinic - Dr. Amitkumar D. Hatunje:

Share

Category