18/03/2026
*आला उन्हाळा ... आरोग्य संभाळा !*
"यंदा जरा उन्हाळा जास्तीच आहे" असे आपण दरवर्षी म्हणतो आणि ते अनुभवतो सुद्धा !
निसर्गावर मानवाने केलेले आक्रमण, वृक्षतोड अशा विविध कारणांनी दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या काळात तापमान नवीन उच्चांक गाठत आहे...
तीव्र उन्हाळ्याच्या या काळामध्ये आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आता आपण पाहूया ...
*√ उन्हाळ्यातील आहार -*
वसंत आणि ग्रीष्म हे दोन ऋतू प्रामुख्याने उन्हाळ्याशी निगडित आहेत. साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिने हे वसंत ऋतूचे आणि एप्रिल व मे हे महिने ग्रीष्म ऋतूचे असे वर्गीकरण यामध्ये आपण करू शकतो.
उन्हाळ्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे वसंत ऋतू... या काळात थंडीमध्ये शरीरात वाढलेल्या कफदोषाचे उष्णतेने विलयन होऊन कफाचे विविध आजार उद्भवताना दिसतात. तर पुढील काळामध्ये ग्रीष्म ऋतूत शरीरातील कोरडेपणा वाढल्यामुळे विविध आजार उद्भवतात. या गोष्टींचा विचार करून आपल्याला आहार निवडायचा आहे..
*खाताना पुढील गोष्टींचा विचार जरूर करा -*
√ उन्हाळ्याच्या या काळात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे पचायला हलके व ताजे अन्नपदार्थ शक्यतो खावेत.
√ भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे हे या काळामध्ये आरोग्य चांगले राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते.
√ काळया मनुका, आवळा कँडी, कवठ, कोहळा यांच्यासह आंबा, करवंद, जांभूळ इत्यादी मोसमी फळे खाण्यामध्ये असावीत..
*पुढील पदार्थ जरूर टाळा -*
× अति मसालेदार, तिखट, तळलेले, आंबवलेले पदार्थ, मैद्याचे विविध पदार्थ खाणे टाळावे.
× दूध + फळे एकत्रित खाणे, दुधापासून बनवलेले गोड पदार्थ जसे की बंगाली मिठाई, रबडी इ. पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
*√ शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवा !*
'पाणी हेच जीवन' असं आपण सगळेजण विज्ञानात शिकतो.. आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा हा नियम तंतोतंत लागू होतो.
शरीरातील विविध धातू घटकांचे काम योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. यासोबतच मेंदू,हृदय, किडनी इ. महत्त्वाच्या अवयवांच्या योग्य कार्यासाठी सुद्धा पाणी गरजेचे असते.
आयुर्वेदानुसार उन्हाळ्याला अर्थात ग्रीष्म ऋतूला आदान काळ असे म्हटले आहे. अर्थातच शरीरातील विविध घटकांचे शोषण करणारा असा हा काळ असतो. यामध्ये *शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य रहावे यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो -*
• लिंबू, कोकम, आवळा, कैरीचे पन्हे
इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ताजी सरबते पिणे
• पिण्याच्या पाण्यामध्ये सुगंधी वाळ्याचा वापर करणे
• उपलब्धतेनुसार नारळ पाणी व मलईचे सेवन करणे.
• ऊसाचा ताजा रस बर्फ विरहित पिणे.
• घरी बनवलेले, ताजे व गोड ताक उन्हाळ्याच्या या काळात अमृतासमान काम करते. यामध्ये पचनाला मदत म्हणून जिरे, कोथिंबीर, सैंधव मीठ यांचा वापर आपण करू शकता.
*पुढील गोष्टी जरूर टाळा -*
× कार्बन डाय-ऑक्साइड युक्त हवाबंद कोल्ड्रिंक्स चे सेवन करणे
× उघड्यावरील बर्फ असलेले पदार्थ खाणे / पिणे ( पोटाच्या व घशाच्या विविध इन्फेक्शन चा धोका होऊ शकतो )
× उभ्याने, घटाघट पाणी पिणे टाळावे.
*√ उन्हाळ्यातील दिनचर्या कशी असावी ???*
आयुर्वेदामध्ये बदलणाऱ्या प्रत्येक ऋतू नुसार आपल्या दैनंदिन कामकाजात कसे बदल करावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. भोवतालच्या निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांसोबत शरीराला जोडून घेण्यासाठी याचा नक्की उपयोग होतो.
• व्यायाम - उन्हाळ्याच्या काळात नियमित परंतू हलक्या स्वरूपाचा व्यायाम असावा. व्यायामाचे प्रमाण थंडीच्या काळापेक्षा कमी असावे.
चालणे / पोहणे / सूर्यनमस्कार / खेळ यापैकी आपल्या पसंतीचा व्यायाम नियमित करावा.
या व्यायामाला दीर्घ श्वसन, अनुलोम - विलोम, विलोम, शीतली, भ्रामरी व ओंकार इत्यादी प्राणायामांची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जोड द्यावी.
• कडक उन्हाच्या वेळामध्ये फिरताना टोपी अथवा रुमालाच्या साह्याने डोक्याचे रक्षण करावे.
• कपडे शक्यतो सुती, हलके, सौम्य रंगांचे आणि सैलसर असावेत... अगदी घट्ट कपडे/ जीन्स इत्यादीचा वापर टाळावा...
• उन्हात फिरताना गॉगल चा वापर अवश्य करावा. त्यासोबतच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी रात्री झोपताना दुधाच्या अथवा गुलाबजलाच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात. तळपायांना खोबरेल तेल जिरवावे.
• जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. जेवण व झोप यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतरा आवश्यक...
• बऱ्याचदा उन्हाच्या झळांमुळे दुपारची ग्लानी आल्यामुळे झोप लागते. ही दुपारची झोप टाळणे आरोग्यासाठी उत्तम. त्याऐवजी आराम खुर्चीमध्ये विश्रांती घेणे सोयिस्कर...
• ज्या ठिकाणी हिरवीगार झाडी आहे, नदी अथवा तलावासारखे पाण्याचे साठे आहेत अशा प्रदेशामध्ये अथवा बागेत फिरणे हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मदत करणारे ठरते.
*√ उन्हाळ्याच्या काळामध्ये घेण्यासारखी घरगुती औषधे -*
• लघवीच्या जागी होणारी जळजळ, लघवीचे प्रमाण कमी होणे या तक्रारी टाळण्यासाठी धने जिरे तसेच नागरमोथा या वनस्पतींनी सिद्ध केलेले पाणी प्यावे.
• ऍसिडिटी, पोटात अथवा छातीत जळजळ, डोळ्यांची व हातापायाची आग टाळण्यासाठी प्रवाळयुक्त गुलकंद, आवळा ज्यूस यांचे सेवन करू शकतो.
• उलटी, मळमळ यासारख्या तक्रारींमध्ये आवळ्यापासून बनवलेले पाचक तसेच ताज्या डाळिंबाचा ज्यूस, आवळा कॅन्डी, काळया मनुका यांचे सेवन करावे.
• घोणा फुटण्याची समस्या टाळण्यासाठी नियमित गुलकंद अथवा मोरावळा खाणे तसेच अडुळशाच्या पानांचा रस यांचा वैद्यांच्या सल्ल्यानुसार उपयोग करू शकतो.
• पोट योग्य प्रकारे साफ होण्यासाठी दररोज १ कप गरम दूध + १ चमचा तूप याचे रात्री झोपताना सेवन करू शकता. मूळव्याधीचे त्रास टाळण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते.
• त्वचारोग व डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी योग्य वैयक्तिक स्वच्छता तसेच कडुलिंब व कोरफड यासारख्या वनस्पतींचा उपयोग करू शकतो.
लक्षात ठेवा ! आयुर्वेदामधील निदान व उपचार पद्धती ही पूर्णतः व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे वरील सर्वच उपचार घेण्यापूर्वी आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरते !
अशाप्रकारे खाण्यापिण्याचे काही नियम, दिनचर्येतील योग्य बदल आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधे यांच्या मदतीने आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये आपले आरोग्य सांभाळू शकतो !
~ *वैद्य मिहीर वाचासुंदर,* (एम्.डी. आयुर्वेद),
*पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल,*
कराड | पुणे...