27/07/2019
रक्तदाब ( B.P) हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.
दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
विविध देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून येते की एकंदर लोकसंख्येच्या १० ते २५ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळते. त्यामुळे या रोगाबद्दल माहिती करून घेणे, तो न व्हावा, किंवा झाल्यास आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे ठरते.
रक्तदाब म्हणजे काय?
हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.
सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.
एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.
रक्तदाबाचे प्रकार
अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.
१. साधा अतिरक्तदाब (Primary Hypertension)
२. अनुषंगिक अति रक्तदाब : (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.
अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)
ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :
कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.
क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.
ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.
ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.
इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.
रक्तदाबाची कारणे :
१. आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.
२. स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.
मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅड्रिनालीन व नॉरेअॅड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.
३. धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअॅड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.
४. मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.
५. मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
६) रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.
७) लठ्ठपणा, अतिरक्त वजन :
स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.
अति रक्तदाबाची लक्षणे :
अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.
* सतत डोके दुखणे, जड वाटणे.
* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.
* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.
* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.
रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे
* नाकातून रक्तस्राव होणे.
* हातापायावर सूज येणे.
* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम
१) हृदयाची अकार्यक्षमता :
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
२) मूत्रपिंडावर परिणाम :
उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
३) इतर दुष्परिणाम :
अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.
उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.
अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)
अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.
रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.
* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.
* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.
* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात.
* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अॅवोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.
अति रक्तदाबाचे उपचार
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे डॉक्टरचे काम आहे.
रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा
२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा
३) वजन कमी करणे
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.
* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
४) व्यायाम आणि योगासने :
ताण-तणाव कमी करणे
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.
क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी.
‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. ‘HURRY, WORRY, CURRYX’ या गोष्टी आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी व्हाल यात शंकाच नाही.
अधिक माहिती साठी आणि उपचारा साठी
डॉ अरबाज़ डांगे
डॉ केहकशा डांगे
यांना भेटू शक्ता
Mob 8880806940