27/01/2022
वयाच्या 40 नंतर आरोग्याच्याबाबतीत अनेकजण या 6 चुका करतात; आयुष्यभर भोगावे लागतात परिणाम
Unhealthy Habits To Avoid After 40 : या वयात स्वतःच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असताना अनेक लोक वाढत्या वयानुसार निष्काळजी बनतात. वृद्धत्वाची सुरुवात झाल्यानंतर लोक शारीरिक हालचालींपासून दूर राहतात आणि त्यांना त्याचा फटका लवकरच सहन करावा लागतो.
वाढत्या वयानुसार स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 व्या वर्षांनंतर, आपण आरोग्याबद्दल निष्काळजीपणा थांबवणं आणि शक्य तितक्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं महत्त्वाचं आहे. असं न केल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका तर वाढतोच; शिवाय, आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवतात. खरं तर या वयात स्वतःच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असताना अनेक लोक वाढत्या वयानुसार निष्काळजी बनतात. वृद्धत्वाची सुरुवात झाल्यानंतर लोक शारीरिक हालचालींपासून दूर राहतात आणि त्यांना त्याचा फटका लवकरच (Unhealthy Habits To Avoid After 40) सहन करावा लागतो.
'ईटधिसनॉटदॅट'च्या मते, खरं तर हे वय असं असतं जेव्हा बहुतेक लोकांनी त्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात किंवा त्या पूर्ण होण्याच्या जवळ पोहोचलेल्या असतात. तसंच, आर्थिकदृष्ट्याही लोक बऱ्यापैकी स्थिर झालेले असतात. यामुळं या वयात सर्वांनाच आरामदायी जीवन जगायला आवडतं. परंतु शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की, चाळिशी पार केल्यानंतरही आपण आपली जीवनशैली निरोगी ठेवली पाहिजे आणि सक्रिय जीवन जगलं पाहिजे. मात्र, लोक या वयात शरीराला हानिकारक असलेल्या सवयींना बळी पडतात; ज्यामुळं त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
1.व्यायाम
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक वयोगटात व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. मात्र, बरेच लोक 40 व्या वर्षांनंतर व्यायाम करणं टाळतात. पण दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर, या वयात तुम्ही तुमच्या दिनक्रमात योग, ध्यान, चालणं यांचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे. व्यायाम न केल्यानं लठ्ठपणा वाढतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका वाढू लागतो.
2. चुकीच्या स्थितीत बसणं
तुम्हाला वारंवार आणि बऱ्याच वेळासाठी चुकीच्या स्थितीत बसण्याची सवय लागली असेल, तर याच्यामुळं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाडं दुखणं किंवा स्नायूंमध्ये गोळा येणं, मुंग्या येणं अशी समस्या जडू शकते. चुकीच्या आसनात वर्षानुवर्ष बसण्यामुळं मणक्याचा त्रासही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मणक्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे. तसंच लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसताना योग्य मुद्रेत बसावं.
3. धूम्रपान
तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल आणि चाळिशीनंतरही तुम्ही त्यावर नियंत्रण केलं नाहीत, तर ते श्वसनसंस्थेसाठी अधिकच हानिकारक ठरतं. यामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो.
4. मेंदू तल्लक ठेवणारे खेळ
वयाच्या चाळिशीनंतर मेंदूचा व्यायाम करण्यात टाळाटाळ केली तर अल्झायमर किंवा कमकुवत स्मरणशक्तीची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत मेंदूला व्यायाम देणारे, तल्लक ठेवणारे खेळ, बुद्धिबळ, बोर्ड गेम आदी खेळ खेळले पाहिजेत.
5. रक्तदाबाची वेळच्या वेळी तपासणी न करणं
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळं चाळिशीनंतर रक्तदाब वाढण्याची समस्या जडणं ही बाब सामान्य झाली आहे. याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी रक्तदाबाची वेळच्या वेळी तपासणी करणं आवश्यक आहे. अन्यथा, पुढे मूत्रपिंड, हृदयाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.
6. शरीराची दरवर्षी तपासणी न करणं
चाळिशीनंतर तुम्ही दरवर्षी शरीराची संपूर्ण तपासणी (General Check up) करणे राहणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, कोलेस्टेरॉल, बीपी, हृदयविकार, मूत्रपिंडाचं कार्य आदींची वेळच्या वेळी तपासणी केली पाहिजे. तुम्ही असं केलं नाही तर कोणतीही जुनी समस्या अचानक समोर येऊ शकते आणि जीवावरही बेतू शकते.