01/05/2023
राज्यातील जनतेला 'महाराष्ट्र दिना'च्या मनापासून शुभेच्छा देतो. यासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या १०६ वीरांना अभिवादन करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान देणाऱ्या समस्त महाराष्ट्र वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
संपूर्ण जगाची चाकं कामगारांच्या श्रमशक्तीवरंच फिरत असतात. कामगारांच्या घामावरंच जगाचा रहाटगाडा सुरु असतो. कामगार दिनाच्या निमित्तानं मी जगभरातील कामगारांना, त्यांच्या श्रमशक्तीला वंदन करतो.कामगार बंधु-भगिनींना, त्यांच्या कुटुंबियांना आजच्या कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो.
आजचा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक ८१४ गावं महाराष्ट्रात सामील करण्याचं आपलं स्वप्न आजही अपूर्ण असून ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा आपला लढा कायम राहील, असा निर्धार व्यक्त करतो.
शेती,उद्योग,व्यापार,शिक्षण,विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन, आरोग्य,कला,क्रीडा,सहकार अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच अव्वल राहिली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक सुधारणा अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ज्यांच्या विचारांवर चालतो, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनाही वंदन करतो.
महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या शेतकरी, कष्टकरी, साहित्यिक, कलावंत, खेळाडू, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांच्या कष्टातून महाराष्ट्र घडला, वाढला, समृद्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या या सुपुत्रांबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया. देशाची एकता, समता, बंधुता, सार्वभौमत्वाची भावना कायम ठेवूया. देशाची लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊया असं आवाहन करतो.