02/11/2021
धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती
भारतीय संस्कृतीत आरोग्य हा भाग संपत्तीच्या वरचा मानला गेला आहे. आरोग्य संपत्ती साठी समर्पित असलेला हा दिवस.धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते.
जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णु अवतार देव धन्व॔तरी होय. धन्वंतरी अमृत घेऊन आले होते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो अशी कल्पना आहे. भागवत पुराण या ग्रंथात विष्णू अवतारांपैकी हा एक अवतार मानला गेला आहे. याच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या त्यामुळे त्याला देवांचा वैद्य म्हणून ओळखले जात.
वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे ज्ञान असणारा रोग्यांवर त्या पद्धतीने औषधोपचार करणारा भिषग्वर. अशा लोकांच्या नावा आधी वैद्य ही उपाधी लावली जाते. धन्वंतरीना देवांचा वैद्य मानला जाते व आयुर्वेदाचे,वैद्यकशास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते.धन्वंतरी सर्व वेदांमधे निष्णात होते, मंत्र तंत्राचे ते उत्तम जाणकार होते त्यांच्या अलौकीक सामर्थ्यामुळेच अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणुनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हंटल्या जातं.धनु किंवा धन्व म्हणजे शल्य (surgery) आणि अन्त म्हणजे शेवट म्हणजेच ज्याला शल्यतन्त्रामधील सर्व काही ज्ञात आहे असा हा वैद्य धन्वंतरी.धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते.
आपल्या चार हातांत अवघ्या भूतलावरील प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावले असून, मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी धन्वंतरी अवतरले. प्रकट झाले,
धन्वंतरींनी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले. सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात. सुश्रुताचार्य भूल देता अनेक शस्त्रक्रिया यशस्वी करीत असत असा उल्लेख आढळतो. आयुर्वेदाचे धन्वंतरींकडून मिळालेले ज्ञान चरकाचार्यांनी वृद्धिंगत केले. आयुर्वेद भगवान धन्वंतरींकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला, ही आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते.
श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर आयुर्वेदाचे प्रवर्तक मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.
मात्र, त्यांची पूजा करण्यापूर्वी भगवान धन्वंतरीच्या मूर्तीला आंघोळ करून अभिषेकही केला जातो. नंतर ध्यान केले जाते तेव्हा हा मंत्र म्हणावा.
सत्यं च येन निरतं रोगं विधूतं,
अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।
गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।
नंतर भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेवर गंध, अक्षता, फुल, गुलाल अर्पण करावा. चांदीच्या भांड्यात खीर नैवेद्य दाखवावी. (चांदीचे भांडे उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही भांड्याचा उपयोग करू शकता). यानंतर पुन्हा आचमन करा. मुख शुद्धीसाठी विड्याच्या पानाचा एक विडा लावून ठेवा. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी इ. पूजनीय औषधी भगवान धन्वंतरीला अर्पण करावे तसेच काही ठिकाणी खडीसाखर व धने ही प्रसाद म्हणून अर्पण करतात.
तसेच नऊ प्रकारचे धान्य भगवान धन्वंतरीला अर्पण केले जाते. व रोग नाशच्या इच्छेने खालील मंत्राचे स्मरण केले गेल्यास त्याचा फायदा होतो.
ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।
तर
आयुर्वेदिक वैद्य मंडळी ही या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा यामुळे अपमृत्यु टळतो असा समज आहे.
व रोज तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी म्हणूनच मान्यता आहे.
अशा प्रकारे शास्त्रात आजच्या दिवसाचे महत्त्व असून म्हणूनच या दिवसास धन्वंतरी जयंती साजरी करण्याची प्रथा आहे.