16/08/2025
*मृत्यू दाखला डेथ सर्टिफिकेट*
दृश्य 1..शरद आपल्या 65 वर्षांच्या वडिलांसोबत नवीनच शहरात रहायला आला होता. तसे शहरात राहून सहा महिने झाले होते.बाबांना जुना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. त्यांची ट्रीटमेंट मुंबईला सुप्रसिद्ध तज्ञांकडे चालू होती नवीन शहरात राहायला आल्यापासून सहा महिन्यांनी अचानक हृदयविकाराने बाबांचे निधन झाले. आता प्रश्न आला मृत्यू दाखल्याचा.नवीन शहरातील डॉक्टरानी मृत्यू दाखला देण्यास नकार दिला व जुन्या डॉक्टरांचा संपर्क होत नव्हता
दृश्य 2
विठ्ठल रावांना कर्करोगाचे निदान फार उशिरा झाले.तज्ञांनी उपाय नसल्याने घरी शुश्रुषा करण्यास सांगितले,तरी मूळ ताकतीच्या जोरावर त्यांनी एक वर्ष काढले. घरच्यांनी सेवा करण्यात कमतरता ठेवली नाही, मात्र उपाय नसल्याने जवळच्या डॉक्टरलाही कधी बोलावले नाही.विठ्ठल रावांच्या मृत्यूनंतर जवळच्या डॉक्टरने मृत्यू दाखला देण्यास नकार दिला .
दृश्य 3
विठाबाई गावाला राहायच्या.बीपीचा त्रास असल्याने गोळ्या चालू होत्या. मुलाकडे वसईला राहिला आल्या होत्या दोन दिवस छातीत भरून येत होते. मुलाने डॉक्टरांना दाखवायला सांगितले काय कशाला डॉक्टर साधा गॅस झालाय असे सांगून मुलावरच चिडल्या तिसऱ्या दिवशी सकाळी छातीत कळ येऊन अचानक निधन झाले. डॉक्टरांनी मृत्यू दाखला देण्यास नकार दिला.
कोणत्याही व्यक्तीच्या घरातील दोन महत्त्वाच्या असामान्य घटनां म्हणजे.. जन्म आणि मृत्यू...यातील पहिली घटना अत्यंत आनंददायक व दुसरी घटना अत्यंत दुःखदायक पण टाळता न येण्यासारखी.
नियमानुसार जन्म व मृत्यू दाखला असणे हेही तितकेच महत्त्वाचे पण मृत्यू दाखला हा मात्र कायद्याच्या जास्त कक्षेत येणारा.
मृत्यू दाखला हा साधारणपणे मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना मयत व्यक्तीवर शेवटपर्यंत औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात येतो. खरे तर हा दाखला हे डेथ सर्टिफिकेट नसून याला MCCD.. Medical certificate for cause of death म्हणतात..
या दाखल्याशिवाय मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करता येत नाही व हा दाखला दाखवल्याशिवाय नगरपालिकेतून शासकीय मृत्यू दाखलाही मिळत नाही. अशा मृताचे मग पोस्टमार्टम करून शासकीय मृत्यू दाखला मिळवावा लागतो. त्यासाठी बरीच धावपळ करावी लागते जी दुःखद मनस्थितीत बरीचशी तापदायक ठरते.
साधारणपणे जनमानसात असा समज आहे की एखादी व्यक्ती मृत पावल्यास डॉक्टर त्याला तपासून मृत घोषित करून मृत्यू दाखला देऊ शकतात.पण प्रत्यक्षात असे नाही.कायदेशीर दृष्ट्या एखादी व्यक्ती किमान सात ते 14 दिवस मृत्यू अगोदर डॉक्टरांच्या ट्रीटमेंट खाली असेल तरच ते डॉक्टर अशा व्यक्तीस मृत्यू दाखला देऊ शकतात. तेही जेव्हा डॉक्टर मृत्यूच्या कारणाबाबत समाधानी असतील तर..
याचे साधारण पणे रुग्णालयातील दाखला 4 व रुग्णालया बाहेरील दाखला 4A असे दोन प्रकार असतात..
हे दाखले विनामूल्य देण्यात यावेत असे कायदेशीर बंधन आहे.. रुग्णालयाचे शुल्क बाकी असले तरी मृत्यू दाखला देणे कायद्याने बंधनकारक आहे.. रुग्णालये आपले बाकी शुल्क नंतर नातेवाईकांकडून कायदेशीर मार्गाने वसुल करू शकतात..
मृत्यू दाखल्यात मृत्यूची किमान तीन शास्त्रीय कारणे लिहावी लागतात.. निदान तात्कालिक व antecedent कारण लिहायला लागतेच..
वयोमानानुसार वृद्धापकाळाने मृत्यू हे कारण प्राथमिक कारण होऊ शकत नाही तसेच खात्री असल्याशिवाय हृदयविकाराचा झटका अशी कारणे देऊ शकत नाहीत.अशामुळे जेव्हा घरातील एखादी व्यक्ती मयत होते तेव्हा जर तिला कोणत्याही डॉक्टरांची सध्याची साधारणपणे 14 दिवसांमधली ट्रीटमेंट चालू नसेल तर डॉक्टर मृत्यू दाखला देण्यास नकार देतात. ते कायदेशीर दृष्ट्या योग्यही आहे व तशा केसही झालेल्या आहेत व मयत व्यक्तीच्या कुटुंबाला पोस्टमार्टम साठीचा मनस्ताप आणि धावपळ करावी लागते
तर यावर उपाय काय
1 आपल्या घरात एखादी अंथरुणाला खीळलेली वृद्ध अथवा जुना असाध्य आजाराने आजारी असलेली व्यक्ती असेल तर निदान महिन्यातून एकदा तरी आपल्या फॅमिली डॉक्टरांना घरी विजीटला बोलावून तपासणी करण्याची विनंती करावी जेणेकरून डॉक्टरनाही व्यक्तीच्या तब्येतीची माहिती राहते
2 हृदयविकार,मधुमेहाचे, रक्तदाबाचे डॉक्टरांचे फॉलोअप शक्यतो चुकवू नये फॉलोअप चुकल्यास डॉक्टर कायद्याने मृत्यूचा दाखला देण्यास किंवा इतर कोणत्याही दाखला देण्यात जबाबदार राहणार नाहीत हे ध्यानात घ्यावे.
3 तसेच हल्ली बरेच जणांचे मोठाले इन्शुरन्स असतात अशावेळी अशी व्यक्ती मयत झाल्यास इन्शुरन्स कंपनी केवळ डेट सर्टिफिकेट वर क्लेम देण्यास टाळाटाळ करतात.अशावेळी डॉक्टरांचे सध्याचे प्रेस्क्रीप्शन वा ट्रीटमेंट नसल्यास भावना बाजूला ठेवून पोस्टमार्टम केल्यास नंतरची कोर्टबाजी टळू शकते.
4.. शक्यतो पन्नाशीच्या आतील व्यक्तीचा फारसा सिरीयस नसलेल्या आजाराने उदाहरणार्थ मधुमेह अचानक मृत्यू झाल्यास पोस्टमार्टम हे आवश्यक ठरते..
5..अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तीचा मृत्यू अचानक शक्यतो होत नाही.अन्न पाणी बंद केले, दम, घर घर लागायला लागली तरी लगेच डॉक्टरांना बोलवावे. जरी बऱ्याचदा औषधांचा फायदा नाही आपणास माहिती असले तरी पुढील मनस्ताप टळतो.
5..तसेच शासकीय दाखलाही डॉक्टरी दाखला दाखवून लवकर घ्यावा. यात वेळ काढल्यास सरकार दरबारी ही बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
6..जरी आपल्या घरातील आजारी व्यक्तीची ट्रीटमेंट स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांकडे चालू असेल तरीही आपल्या जवळील फॅमिली डॉक्टरांना नियमित दाखवत जावे. साधारण पणे मृत्यू दाखला देण्याच्या वेळेस आपले नेहमीचेच डॉक्टर उपयोगी पडतात..
7..सर्वात महत्वाचे.. मृत व्यक्ती नेहमीचा जरी रुग्ण असला तरी मृत्यू संशयास्पद वाटला, आत्महत्या, अपघात इत्यादी वाटल्यास डॉक्टर मृत्यू दाखला नाकारु शकतात.. अशा वेळी ही केस medicolegal म्हणून पोलिसांकडे पाठवू शकतात..
तर शेवटी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू ही दुःखदायक घटना असली तरी पुढील अधिक मनस्ताप टाळण्यासाठी अशी अगोदर काळजी घेणे हे महत्त्वाचे..
डॉ रजनीश घाडी..
9890312002