06/02/2018
जागतिक कर्करोग दिन : भाग 2
डॉ कल्याणकर किरण
(कर्करोग निमित्त प्रकाशित लेखमालेचा भाग 2)
कर्करोग हे नाव काढले तरी अंगावर भीतीचा काटा येतो आणि अशीच स्थिती रुग्ण अनुभवीत असतो. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच बऱ्याच रुग्णांचे हातपाय गळून जातात.
आयुर्वेदामध्ये, *" विषाद: रोगवर्धनानाम श्रेष्ठ : ।। "*
विषाद (दुःख, खेद, भीती, शोक करणे) हा रोगाला वाढवण्यासाठी श्रेष्ठ असा वर्णिला आहे. यामुळे निदान झालेले कॅन्सर सारखे आजार आणखी बळावायला लागतात. आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच टय़ुमर(गाठी) होय. हे टय़ुमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन टय़ुमर म्हणजे साधी गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची (बिनाईन) गाठ ही सहज काढून टाकता येते. या बेनाईन गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत.
मात्र दुस-या प्रकारात (मालिग्नंट) कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणा-या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. यातील एक लक्षात घेण्याजोगा भाग म्हणजे रक्ताचे कॅन्सर मध्ये मात्र कुठल्याही गाठी तयार होत नसतात. रक्ताचे कॅन्सर हे बहुतांश वेळा मालिग्नंट स्वरूपाचेच असतात आणि लहान मुलांमध्ये (ल्युकेमिया: वयोगट 3 ते 16) याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथी आणि मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग प्रौढपणी होतो. सगळे कॅन्सर हे योग्य वेळेत निदान झाल्यास बरे होण्याची शक्यता वाढते.
आपण काय करू शकतो.
शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थासारखे आहार टाळावेत. अतितेलकट पदार्थ टाळावे. मद्यपान टाळावे. फूड कलर्स, त्वचेची रासायनिक सौन्दर्य उत्पादने, केमिकल्स चा धूर, अतिशय तंग कपडे, तंबाखू गुटखा खैनी बिडी सिगारेट आदी पदार्थ टाळावेत.
उन्हातून फिरताना छत्री किंवा हॅट वापरावी. आंबा, पेरू, द्राक्ष, अननस, संत्रे, मोसंबी, आवळा यासारख्या फळांचा आणि पडवळ, भोपळा, घोसाळे, टोमॅटो यासारख्या फळभाज्या , हिरव्या पालेभाज्या अशा भाजांचा तसंच कडधान्याचा, मोड आलेली उसळ आदींचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात गहू, तांदूळ, नाचणी आणि ज्वारी अशा पदार्थाचा समावेश करावा. थोडक्यात तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. नैसर्गिक आणि सेंद्रिय(Organic vegetables) भाजीपाला, फळे यांचा आवर्जून वापर करावा.
*शरीरातील सर्व अवयवांची साम्यवस्था टिकविणे अतिशय गरजेचे असते, यासाठी नियमित स्वरूपात आपल्या प्रकृतीनुसार योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेणे तसेच वर्षातून एकदा तरी पंचकर्म उपचार करून घेणे श्रेयस्कर ठरते.*
सध्या भारतात तोंडाचा , फुफुसांच्या, स्तन आणि गर्भाशयमुख या चार कॅन्सर चे मिळून एकत्रित प्रमाण 50% ते 60% आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांनाच होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणा-या लोकांचं प्रमाण अधिक असून पाच ते सहा दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास ५ लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या वर्षी ही संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. प्रतिवर्षी कर्करोगाचे निदान होणारे रुग्णांचे प्रमाण याच पटीमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच फुप्फुसं, तोंड, ओठ, घसा आणि प्रोस्टेटचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा (Ovarian cancer) कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतडय़ांच्या कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या ३० ते ५० या वयोमर्यादेत होतात.
*स्तनांचा कर्करोग(Breast cancer)*
गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा कर्करोग पूर्णतः बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित अर्धा तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग ३० ते ४५ या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्तता होण्याची शक्यतादेखील कमी असते.
*डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव हीदेखील असू शकतात.* याशिवाय बाहय़ आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ अन्न सवयी, औद्योगिकीकरण, रासायनिक खते, पेस्तीसाईड चा अनिर्बंध वापर लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात.
निदान करण्यात विलंब, आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा ‘किलर रोग’ ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्यक आहे.
या कर्करोग दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने अधिकाधिक लोकांना कर्करोगाविषयी माहिती देऊन *'कॅन्सर ला कॅन्सल'* करून आजाराविषयी जागरूकता वाढवुयात.
(कॅन्सर वरील लेखमालेतील तिसरा भाग लवकरच प्रकाशित करू.)
डॉ. कल्याणकर किरण
आरोग्य विषयक लेख मिळवण्यासाठी आपले नाव आणि व्हाट्सअप्प क्रमांक पुढील फोन क्रमांक वर पाठवा.
8898630831
डॉ कल्याणकर किरण
M.D. (Ayu.)
Consulting Ayurvedic Physician
आयुर्वेद वाचस्पती, योग आयुर्वेद तज्ञ
संपर्क- 8898630831
श्री विश्व-गणेश आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय
शॉप क्र. 17, मीरा आरकेड, शिल्प चौका जवळ, सेक्टर 20, खारघर, नवी मुंबई.