Dr Shilpa Chitnis Joshi

Dr Shilpa Chitnis Joshi This page is created to make people aware about various important health and social issues .

19/08/2024

'

वैद्यकीय क्षेत्रातली अमानुष पिळवणूक

सध्या एरणीवर आलेल्या विषयावर अजून बोलावेसे वाटत आहे.वैद्यकीय क्षेत्रात कामाच्या ताणामुळे आत्महत्या,मानसिक आजार हे काही नवे नाही. याबद्दल विचार करताना जुन्या अत्यंत कटु आठवणी जाग्या झाल्या.माझे अनुभव 90 च्या दशकातले आहेत.इतकी वर्षं झाली तरी परिस्थिती बदलली नाही ही एक शोकांतिकाच आहे.

आज आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर व यशस्वी झालेले कितीतरी डॉक्टर या वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठांकडून होणाऱ्या अमानुष पिळवणुकीला सामोरे गेलेले आहेत. काही यातून तावून सुलाखून निघतात, काही जण अतिशय कष्टांने मिळवलेली पदव्युत्तर शिक्षणाची सीट सोडून जातात. काहींची अवस्था टोकाच्या मानसिक अवस्थेपर्यंत जाते पण ते स्वतःला सावरतात.

ही छळाची कहाणी समजून घेण्याआधी वैदयकीय पदव्युत्तर शिक्षण कसे असते ते समजावून घेणे आवश्यक आहे. पूर्वी एम.बी.बी.एस. च्या मार्कावर तर आत्ता हल्ली प्रवेश परीक्षा पास झाल्यावर पदव्युत्तर सीट मिळते. या दोन्ही परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्याला अपरिमित कष्ट असतात हे सांगायची गरजच नाही! हे कष्ट करुन पदव्युत्तर सीट मिळालेला विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कामाला लागतो. साधारणपणे इतर क्षेत्रात एक बेसिक पदवी मिळालेल्या माणसाला बऱ्यापैकी आदराने वागवले जाते. वैद्यकीय क्षेत्रात मात्र एम.बी.बी.एस.पास होऊन ज्युनिअर रेसिडेंट (JR) म्हणून लागलेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयातल्या चतुर्थ श्रेणीच्या कामगारापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. जॉइन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून JR हा सर्वांचा खासगी नोकर असल्याची भावना ही डिपार्टमेंटमध्ये सर्वांना असते . सुरुवातीला फक्त कागदपत्र पूर्ण करणे, रक्त लघवी
तपासायला पाठवणे आणि बाकीचे हमालीकाम या शिवाय JR ला काहीही करु दिले जात नाही.रोज सकाळ -
संध्याकाळ राऊंड घेणे हे त्याचे मुख्य काम असते आणि मग 'सिनियर रेसिडेंंट', लेक्चरर्स, प्राध्यापक यांचा ताफा
येतो. यातच राऊंडच्या वेळी JR च्या चुका काढून त्याला पेशंट व नातेवाईकांसमोर अतिशय अपमानकारक वागणूक
देणे, त्यांची वॉर्डबॉय,सिस्टर यांच्यासमोर अवहेलना, निंदानालस्ती करणे हे प्रकार सर्रास चालतात.JR च्या
कामाचे तास यावर काहीही बंधन नसते.सतत ३६ तास काम मग १२ तास सुट्टी व परत ३६ तास काम असं
सलग दोन वर्ष काम मी स्वतःही केलेलं आहे. यात रेसिडंट डॉक्टरला बऱ्याच वेळा महिन्यातून एकही सुट्टी मिळत
नाही मग रविवारची गोष्टच सोडा.या सर्वांवर कडी म्हणजे हे सगळं, चेष्टा, अपमान, निंदानालस्ती आणि अतिकाम
तुझ्या चांगल्या भविष्यासाठी आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं हे विद्यार्थी का सहन करतात. तक्रार का करत नाहीत? तर याची दोन
कारणे आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्याचा हात पूर्णपणे 'गाईडनामक दगडाखाली' अडकलेला असतो. प्रत्येक वेळी
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या 'गाईड' शिवाय पुढे जाताच येत नाही. या गाईडच्या सल्ल्यानेच
त्याचा प्रबंध पुरा करायचा असतेा त्या मुळे वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागले नाही तर प्रबंधावर सही मिळण्याची
शक्यताच नाही.यासाठी कित्येक पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी गाईडच्या घरची सगळी खाजगी कामे,कधी कधी वेळप्रसंगी त्याला दारुची पार्टी देणे या गोष्टी सर्रास करत असतात. गाईडच्या 'खास' मर्जीतल्या डॉक्टरांनी वॉर्डमध्ये विशेष काम केले नाही तरी चालू शकते या उलट ज्यांना ही मखलाशी आणि राजकारण जमत नाही त्यांची अवस्था अतीशय दयनीय होते.

त्यांचे जिणे सिनियर डॉक्टर्स नकोसे करुन टाकतात. सीट तर सोडता येत नाही कारण आयुष्यभरचा करीयरचा
प्रश्न आहे आणि दुसरीकडे होणारा सिनियर्सकडूनचा त्रास ह्या असल्या कोंडमाऱ्यात बरेच विद्यार्थी सापडतात. बरं
गाईडची तक्रार कोणाकडे करणार? मग मात्र पदव्युत्तर परिक्षा पास होण्याची शक्यताच नाही! कारण तोच परीक्षक
असू शकतो आणि बाहेरुन आलेला दुसरा परीक्षक बऱ्याच वेळा त्याचा मित्रच असतो.थोडक्यात म्हणजे वैद्यकीय
शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था सध्या कसायाच्या हाती दिलेल्या शेळीसारखी आहे.त्याच्या नशिबाने 'गाईड' दयाळू निघाला तरच त्याच्या करीयरची नाव पैलतीराला लागू शकते.

विद्यार्थ्याने हा छळ सहन करायचे दुसरे कारण म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याने किती ऑपरेशन्स करायची हे
सर्वस्वी सिनियर्स ठरवतात. एखादा JR जर त्यांच्या 'हुकुमानुसार' वागत नसेल तर पूर्ण पदव्युत्तर शिक्षणात
त्याला काहीही ऑपरेशन्स करु दिली जात नाहीत, जेणे करुन तो पदव्युत्तर परिक्षा पास झाला तरी ऑपरेशन्स चा
अनुभव त्याला शून्य असतो. या सगळ्याचा करियरवर पुढे होणारा परिणाम त्या बिचाऱ्या JR ला पूर्ण दिसत असतो
म्हणूनच त्याला सिनियर्सची हांजी हांजी करणे भाग पडते.

JR वर कामाचा ताण कितीही असला तरी सिनियर्स बसून गप्पा मारतील, खिदळतील पण JR चे काम सिनियरने करणे अत्यंत कमीपणाचे मानले जाते. आपल्या मनाप्रमाणे न वागल्यास गाईडचे कान भरण्याची धमकी JR ला सर्रास दिली जाते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गाईडचे 'लाडके' काही लोक असतात जे 'नावडत्या' लोकांवर अशी कुरघोडी करत असतात। धूर्त आणि लबाड्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण फार सोपे जाते! खासगी
प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मत्सर हाही डिपार्टमेंटच्या राजकारणाचा एक भाग असतो.
इतर महाविद्यालयांमध्ये सिनिअर्समध्ये 'मला रॅगिंग झालयं ना, मग मीही करणार' ही वृत्ती असते. तीच वृत्ती या मेडीकल रॅगिंग मध्ये दिसते.फरक इतकाच की या रॅगिंग मध्ये वरिष्ठांचाही सहभाग असतो.

सतत २४ तास जागून वार्डात काम केल्याकेल्यानंतर १० मिनिटे चहा प्यायला परवानगी घेतल्याशिवाय कशी गेली म्हणून एका वेळी ४-५ जणांनी सर्वांसमोर 'झापणे', गाईडला स्वतःच्या गाडीतून खाजगी
कामे करायला फिरवणे, ठिकठिकाणी त्यांचे पैसे भरणे, त्यांची घरातली कामे करणे, एवढं करुन प्रबंधावर सही
करावी म्हणून गयावया करणे ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत. त्या वेळची ती वेदना अजूनही तितकीच तीव्र आहे.या सर्वांमुळे बरेच विद्यार्थी नैराश्याची शिकार झालेले आहेत. म्हणून या लेखाचा प्रपंच!

बऱ्याच वेळा ज्युनिअर रेसिडेंट च्या व्यक्तिगत आयुष्यावरही सिनिअर्स ढवळाढवळ करतात.पदव्युत्तर विद्यार्थी/ विद्यार्थीनींचे वय साधारण २४ -२५ च्या आसपास असते। ते बघता बऱ्याच जणांची लग्न ठरलेली किंवा ठरत असतात.मग होणाऱ्या नवरा अथवा बायको यांना भेटू न देणे, सुट्टी न देणे या प्रकारेही मानसिक त्रास दिला
जातो.'साखरपुडा, लग्न या गोष्टीच करायच्या असतील तर पदव्युत्तर जागा सोडून द्या व तेच करा' अशी मुक्ताफळे मी स्वतः ऐकली आहेत! विद्यार्थ्याला कष्ट करुन मिळालेली पदव्युत्तर सीट ही आपण स्वतः त्याला फुकट
दान केली आहे म्हणून त्याला छळायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे असा गाईडचा अविर्भाव असतो! अर्थात सर्व गाईड असे नसतात पण अशी संख्या बरीच आहे जे वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छळत आहेत.तर एकूण ही अशी परिस्थिती बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असते. माझ्या माहितीत माझ्याच बॅचमधील दोन तीन विद्यार्थी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील सीट केवळ अतिछळामुळे सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट बरीच जुनी आहे. त्यामागे असणारे राजकारण म्हणजे 'बाहेरच्या कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्याला छळून त्याने जागा सोडली की 'आपल्या' माणसाला ती सीट मिळवून द्यायची' हे आहे असे मला नंतर कळले.
डिपार्टमेंट मधील राजकारण हे प्रत्येकच वैद्यकीय महाविद्यालयात असतं.स्त्रीरोग विभागात हे सर्वात जास्त असतं कारण या क्षेत्रात असलेला कामाचा अतिताण,काम करताना पेशंट च्या जीवाला असणारे धोके,सतत रात्रीबेरात्री जागरण हे आहेत.काही लोक या डिपार्टमेंट मध्ये महिला डॉक्टर जास्त असल्यामुळे राजकारण जास्त असे कुजके टोमणे पण मारतात पण पुरुष या राजकारणात कुठेही मागे नाहीत ,काकणभर पुढेच आहेत हे वास्तव आहे.एकमेकांवर कुरघोडी करणे हे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चालतच.
पूर्वी शहरातल्या सिनियर आणि नामांकित डॉक्टर्स वैद्यकीय महाविद्यालयात मानद तज्ञ म्हणून असायचे.त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळत असे.वातावरण खेळीमेळीचे असायचे.खासगी प्रॅक्टिस ,पेशंट शी सुसंवाद साधणे याबद्दल विद्यार्थ्यांना शिकायला मिळायचे.ही पद्धत परत आणायला हवी असं वाटतं.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही गाईड आणि सिनियर्स खरच खूप चांगलें असतात आणि त्यांच्या हाताखाली खूप कुशल डॉक्टर्स तयार होतात. सरसकट सगळ्यांना एकाच मापात तोलणे अन्यायाचे ठरेल.

अतिशय गुणी, अपार कष्ट करुन पदव्युत्तर जागा मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या नशिबात हे सगळे वाढून
ठेवलेले असावे हा दैवदुर्विलास आहे. यात अतिशय कडक कायदे केल्याशिवाय हे बदलणार नाही.

या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यालाही गाईडबद्दल गुप्त पद्धतीने तक्रार करण्याचा अधिकार असावा. एखादी कमिटी राज्यस्तरावर या तक्रारींचा विचार करुन कारवाई करु शकेल. एखाद्या गाईडबद्लल सतत
तक्रारी आल्यास त्याची पदव्युत्तर जागेसाठीची पात्रता रद्द करण्यात यावी, तसेच योग्य कारण दिल्यास गाईड
बदलून मिळण्याची सोय असली पाहिजे. थोडक्यात सिनियर डॉक्टर्स व गाईड यांच्यावर वचक ठेवणारी यंत्रणा
असावी.
यासाठी केंद्रीय DNB बोर्डाची अतिशय योग्य नियमावली आहे.DNB बोर्ड ही संस्था दिल्ली ला असून काही मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्या पदव्युत्तर सीट्स असतात.DNB करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे वैद्यकीय प्रशिक्षण मिळावे त्याबद्दल त्यांचे काटेकोर नियम आहेत तसेच ते गाइड आणि रुग्णालयाला पण लागू आहेत.या सगळ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत नाही.हीच नियमावली सर्व वैद्यकीय महाविद्यालयात लागू असावी.

आज समाजापुढे वैद्यकीय क्षेत्रातील हे विदारक सत्य समोर ठेवताना आमची हीच अपेक्षा आहे की या पुढे कोणाही एका लायकी नसलेल्या माणसाच्या हातात वैद्यकीय विद्यार्थ्याच्या आयुष्याची आणि करीयरची दोरी असू नये!

डॉ शिल्पा चिटणीस - जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरुड
पुणे

10/07/2024

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की..😊❤️

23/06/2024

सरकारी लोकांचे डोके ठिकाणावर आहे काय???

काल रात्रीपासून वैद्यकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.
आधी NEET परीक्षेमधला भ्रष्टाचार आणि गोंधळ कमी होता की काय म्हणून
PG NEET परीक्षा जी आज होणार होती ती काल रात्री अकरा वाजता रद्द करण्यात आली.
याकरता आपल्या देशातले बुद्धिमान आणि कष्टाळू MBBS झालेले तरुण डॉक्टर्स गेले दोन ते तीन वर्षं जीव तोडून अभ्यास करत होते.ही परीक्षा अतिशय अवघड असते आणि इथे प्रचंड स्पर्धा आहे. Post Graduation सीट मिळवण्याकरता दिवसाचे बारा किंवा जास्त तास अभ्यास मेडिकल च्या विद्यार्थ्यांना करावा लागतो.
परीक्षेच्या तयारीसाठी रेल्वे,बस,विमाने,हॉटेल बुकिंग करून ही मुले मुली काल परीक्षा केंद्राजवळ पोहोचली आणि त्यांना निर्विकार पणे परीक्षा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय.
यावर काय बोलायचं??प्रचंड राग, उद्विग्नता ,निराशा या सगळ्या भावनांचा कल्लोळ झाला या कोवळ्या मुलांच्या मनात.जेव्हा घरातलं कोणी अशी परीक्षा देत असतं तेव्हा पूर्ण घर त्या व्यक्तीच्या पाठीशी राहण्यासाठी आपलं आयुष्य बाजूला ठेवून प्रयत्न करत असतात.या सगळ्या कुटुंबांना मनस्ताप भोगावा लागतोय.

या अश्या आपल्या समाजाचे क्रीम असणाऱ्या मुलांना या देशात असं वागवलं जातं??
यामुळे होणाऱ्या भयानक मनस्तापामुळे ही हुशार मुलं निराशेच्या गर्तेत जात आहेत. कोण जबाबदार या सगळ्याला???
उद्या या मुलांनी यामुळे देश सोडायचा ठरवला तर आपण कोणत्या आधारावर त्यांना नका जाऊ म्हणून सांगणार आहोत?
इतर अनेक देश सध्या भारतीय डॉक्टरांसाठी पायघड्या घालत आहेत.
नुकसान आपल्या देशाचे आणि समाजाचे आहे.या लाजिरवाण्या घटनांमुळे जगात भारताची मान शरमेने खाली जात आहे.
ही मुर्दाड, बेफिकीर सिस्टीम लगेच बदलायला हवी नाहीतर पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात येणार आहे.

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरूड
पुणे

16/06/2024

या नीट आणि जेईई च्या मृगजळामागे आपण किती काळ धावणार??
भाग 2

मित्र मंडळी,सर्वप्रथम माझ्या मागच्या लेखाला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार!!
या प्रतिसादावरून आणि तुमच्या कॉमेंट्स वाचून मला या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य अजून प्रकर्षाने लक्षात आलं.आणि याबद्दल अजून थोडं लिहायला हवंय असं वाटलं.

सर्वात आधी काही वाचकांना भविष्य फक्त परदेशात आहे असं मी म्हणतेय असा गैरसमज झाला याबद्दल क्षमस्व!
यापुढच्या काळात खरी भरभराट ही आशिया खंडातील देशांमध्ये होणार आहे आणि त्यात भारत अग्रभागी असेल असं सगळेच जाणकार सांगत आहेत.त्यामुळे जे परदेशी शिक्षणासाठी जात आहेत त्यांनी अनुभव घेऊन परत भारतात येऊन या सुवर्ण काळाचा पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे असंच मला सुचवायचं होतं.सगळ्यांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा काहींनी तरी व्यवसाय करून इतरांना नोकऱ्या द्याव्यात तरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था अजून भरभराटीला येईल असं वाटतं.

दुसरं म्हणजे liberal arts हा जरी उत्तम कोर्स असला तरी तो सरसकट सर्व विद्यार्थ्यांना सूट होईलच असं अजिबात नाही.पण म्हणून सगळ्यांनी सगळी शक्ती पणाला लावून नीट आणि जेईई च्याच मागे धावत सुटायचं हे बरोबर वाटत नाही.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक हुशार बुद्धिमान मुलं बघतो ज्यांना या परीक्षांमध्ये चांगला स्कोअर आणता येत नाही.प्रत्येक विद्यार्थ्याचा मेंदू वेगळा असतो.या परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात जे सर्व हुशार मुलांना जमेलच असं नाही.पण या परीक्षांमध्ये मिळालेलं अपयश यांचा लाख मोलाचा आत्मविश्वास हिरावून घेतं.
त्यामुळे हे वेळीच ओळखून अश्या मुलांनी वेगळा मार्ग शोधला तर त्याच्या गुणांची खरी कदर होऊ शकते.
अर्थात एका मैत्रिणी ने सांगितल्याप्रमाणे जर डॉक्टर होण्याचीच जबरदस्त इच्छा असेल तर मग दुसरा उपाय नाही.
नीट ला यावर्षी तेवीस लाख विद्यार्थी बसले.ही संख्या गेले काही वर्षं वाढतेच आहे. MBBS सीट्स एक लाखाच्या आसपास आहेत. बाकीच्या काही शाखांनाही नीट नंतर ऍडमिशन मिळते.तरीही बाकीच्या वीस लाख विद्यार्थ्यांना नीट देऊन काहीच साध्य होत नाही असेच जे ई ई चे सुद्धा आहे.या परीक्षांसाठी विद्यार्थी कमीत कमी दोन किंवा जास्त वर्षे घालवतात.या काळात त्यांना पुढचा विचार करून काही मार्गदर्शन मिळाले तर हा कष्ट,पैसा आणि मानसिक ताण यांचा अपव्यय आपण वाचवू शकतो असं वाटतं.
पैसा हा या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे.आयआयटी च्या मुलांना मिळणाऱ्या पॅकेजस ने सामान्य माणूस हुरळून जातो पण ही पॅकेजस तिथल्या मोजक्याच मुलांना मिळतात ,बाकीच्यांना बरेच कमी पैसे मिळतात हे सत्य समोर येत नाही.तसेच खूप मोठ्या रकमा या मुलांना परदेशी मिळाल्या तरी त्यांचे खर्च ही तेवढेच असतात.त्यामुळे दिसते तसे बऱ्याच वेळा नसते.गेले काही वर्ष आयआयटी मधल्या मुलांनाही लगेच नोकरी मिळत नाहीये.काहींना परफॉर्मन्स चांगला नाही म्हणून मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागते.
तसं च मेडिकल क्षेत्राचं आहे.MBBS करून पुढे PG न मिळाल्यास भविष्य अवघड होऊन बसतं.साडेपाच वर्षं MBBS, नंतर नीट PG ची तयारी एक ते दोन वर्षं ,नंतर तीन वर्षं PG , मग फेलोशिप,अनुभवासाठी अजून दोन वर्षं अशी तब्बल बारा ते तेरा वर्षं घालवावी लागतात.एवढं करून प्रॅक्टिस सुरू केल्यावर पेशंट फिरकायला वेळ लागतो तो जवळ जवळ पाच वर्षाचा!
लोक यशस्वी डॉक्टरांकडे बघून त्या ग्लॅमर मुळे हुरळून जातात पण त्यामागचे काबाडकष्ट,प्रचंड मानसिक ताण, पैशाचं टेन्शन या गोष्टी त्यांना कधीच दिसत नाहीत. ज्यांना डॉक्टर होण्याच्या ध्येयाने पछाडले आहे अश्यांनीच हा मार्ग पकडावा खरं तर..
भारतात चांगल्या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर परदेशी PhD करायला अजिबात फार खर्च येत नाही. तुम्हाला शिक्षण फुकट आणि वर पगार मिळतो.
जर्मनी,जपान या देशांमध्ये त्यांची भाषा विद्यार्थ्याला येत असेल तर शिक्षण फुकट आहे.
भारतातही उत्तम शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.त्याचा सखोल अभ्यास करायला हवा.

ज्यांना अभ्यासात फार गती नाही अशांनी ITI चा विचार नक्की करावा.यापुढे हातांनी काम करणाऱ्यांना खूप वाव आहे.ITI मधून शिक्षण घेतलेल्या मुलांना डायरेक्ट इंडस्ट्रीज मध्ये उत्तम नोकऱ्या मिळतात.यापुढे परदेशांत मनुष्य बळ खूप कमी पडणार आहे त्यामुळे या मुलांना तिकडेही खूप मागणी असणार आहे.
Nursing हेही अतिशय उत्तम क्षेत्र आहे. भारतात आणि बाहेरही यांना प्रचंड मागणी आहे.
सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी पुण्यात आहे.तिथे खूप वेगवेगळया प्रकारचे कोर्सेस आहेत आणि या विद्यार्थ्यांना लगेच उत्तम नोकऱ्या मिळतात.
मी या क्षेत्रातली जाणकार नाही.मला जेवढी माहिती होती तेवढी मी लिहिली आहे.अजून यात खूप माहिती करून घेण्यासारखे आहे.

फक्त विद्यार्थी आणि पालक यांचे हाल कमी आणि भविष्य उज्वल व्हावे हीच इच्छा!

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरूड
पुणे

14/06/2024

"आता या नीट/जेईई च्य मायाजलातून आता बाहेर पडूया!!"

मित्रमंडळी सध्या NEET exam मध्ये झालेल्या संतापजनक गैरप्रकारांमुळे आपण सगळेच जण खूप उद्विग्न झालो आहोत.

दहावीची परीक्षा संपल्यापासून दोन वर्षे सगळ्या मोहांचा त्याग करून अखंड अभ्यासात बुडालेल्या मुलांना त्यांच्या कष्टांची ही सडलेली फळं मिळताना बघावी लागत आहेत.यामध्ये लाखो पालकांचे सुद्धा कष्ट , पैसा आणि मानसिक ताण गुंतलेला आहे.या सर्वांनाच काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे आणि सरकारी व्यवस्थेच्या बेफिकीरी मुळे प्रचंड मनस्ताप होत आहे.

अश्यावेळी मनात विचार येतो की या जंजाळातून आपल्या मुलांना आणि पालकांना बाहेर काढता येईल का?
माझा मुलगा विक्रम अकरावीत सायन्स ला असताना एक टर्म झाल्यावर त्याला सायन्स आवडत नाही,काहीतरी वेगळं करायचं आहे असं त्याने आम्हाला सांगितलं.त्याला दहावीत नव्वद टक्क्याच्या वर मार्क्स होते. आमच्या पिढीत आम्हाला मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोनच शाखा माहीत होत्या.मग आम्ही जोरदार रिसर्च सुरू केला.यामध्ये माझे दिर अमित परांजपे यांची आम्हाला खूप मदत झाली.आणि मग बारावी सायन्स नंतर विक्रम ने सिम्बायोसिस विमाननगर ला
Liberal arts या चार वर्षाच्या कोर्स ऍडमिशन घेतली.आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे आमच्या आजूबाजूच्या सगळ्यांची मुलं मेडिकल आणि आय आय टी वगैरे करत असताना सुद्धा आम्ही हा निर्णय घेतला कारण त्याने आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहणे याला आमच्या दृष्टीने महत्त्व होते.मुलं हुशार असतील तर कुठेही चमकतील यावर आमचा विश्वास आहे.पण आमच्या आसपासच्या लोकांनी या कोर्स नंतर त्याला नोकरी कुठे मिळेल?,पॅकेज किती असेल अश्या अनेक शंका व्यक्त केल्याच.त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले.

Liberal arts हा कोर्स भारतात तसा नवा आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स , आर्ट्स आणि कॉमर्स तीनही शाखांचे विषय शिकवले जातात. पूर्ण सिस्टीम पाश्चात्य देशांमध्ये असते तशी आहे.तुमचा major subject science असेल तर Bsc in liberal arts अशी पदवी मिळते.यात विद्यार्थ्यांना दोन internships आणि एक प्रबंध लिहावा लागतो.Resarch Methodology सविस्तर शिकवली जाते.
त्यामुळे हा कोर्स पूर्ण केलेला विद्यार्थी बऱ्याच विषयांचा अभ्यास करून पुढचा मार्ग ठरवू शकतो.पुढचं शिक्षण कोणत्याही शाखेत करायचे स्वातंत्र्य राहते.
विक्रमने नंतर एका AI कंपनी मध्ये Marketing analyst म्हणून काम केले आणि आता नुकतीच Singapore Management University मध्ये त्याला
Master in Management या कोर्स ला ऍडमिशन मिळाली आहे.या कोर्स चे आशिया रँकिंग 2 आणि जागतिक रँकिंग 26 आहे.त्यामुळे या कोर्स नंतर त्याला चांगली नोकरी मिळेल आणि नंतर व्यवसाय करायला योग्य पार्श्वभूमी तयार होईल.
हे सगळं सविस्तर सांगण्याचा उद्देश असा की स्पर्धा परीक्षांच्या जीवघेण्या स्पर्धेत न पडताही उत्तम करिअर होऊ शकतं हे पालकांना माहीत व्हावं.या वेगळ्या मार्गांमध्ये कष्ट नाहीत असं अजिबात नाही पण मुलं जास्त रिलॅक्स राहून हे करू शकतात.आणि नुसत्या घोकंपट्टी ( overload of information)पेक्षा ते जास्त wise होतात.
माझी जवळच्या लोकांमध्ये आज माझी मैत्रीण नेहा कुलकर्णी हिची मुलगी फर्ग्युसन महाविद्यालयात BSc Biotechnology करून पुढे अमेरिकेत नावाजलेल्या John Hopkins University मध्ये शिकायला गेली .
माझा भाचा पुणे युनिव्हर्सटी IBB मधून MSC IN BIOTECHNOLOGY AND BIO INFORMATICS हा कोर्स करून आता National University of Singapore (NUS) मध्ये Ph D करतो आहे.त्याला उत्तम stipend मिळतो आणि ही university जगात नावाजलेली आहे.
माझी अजून एक भाची फर्ग्युसन महाविद्यालयात च Bsc and Msc Biotechnology करून आता उत्तम पगार घेत जर्मनी मध्ये PhD करते आहे.
अजून एक माझ्या माहितीतील मुलीने गरवारे महाविद्यालयातून Bsc. MICROBIOLOGY करून बंगलोर ला IAIB या संस्थेतून Msc केलं आहे.आता तिला अमेरिकेतील प्रख्यात Yale University मध्ये कॅन्सर reaserach assistant अशी पोस्ट मिळाली आहे.
या सर्व मुलांचे भविष्य अतिशय उज्वल आहे हे सांगायला नकोच.पण हे कोणीही नीट आणि जेईई च्या मृगजळा मागे धावत सुटले नाहीत.

तर पालक आणि विद्यार्थी हो,आपण आता जागे होऊया आणि जीव तोडून सर्वांनी एकाच गोष्टीच्या मागे लागण्याऐवजी वेगळे मार्ग शोधायला शिकूया.नोकरीचे पॅकेज बघून हुरळून जाण्यापेक्षा आपण व्यवसाय करून इतरांना पॅकेज देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगुया.
यापुढे जगात भारताची अर्थव्यवस्था भरभराटीला येणार आहे.या येणाऱ्या सुवर्ण युगासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्याची गरज लागेल हे आत्ताच ओळखायला हवे.

त्यामुळे मित्रमंडळी नीट आणि जेईई च्या मायाजालातून आता बाहेर पडूया.
बाहेर उज्वल भविष्य आपल्या मुलांची वाट बघते आहे. हो ना?

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरूड
पुणे

30/05/2024

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि त्यावर प्रभावी लस(HPV vaccination)

"डॉक्टर तुम्ही माझ्या गर्भाशयाच्या तोंडावर जखम आहे असं सांगितलं होतं गेल्यावर्षी..एक तपासणी पण सांगितली होती पण मला यायलाच झालं नाही परत तपासणी साठी..आता परत खूप त्रास होतोय..भीती वाटतेय.."

ही पेशंट खरंतर प्रातिनिधिक आहे.अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना स्त्रीरोगतज्ञ गर्भपिशवीच्या तोंडाचा म्हणजे सर्विक्स(cervical cancer) चा कॅन्सर नाहीये ना हे बघण्यासाठीची तपासणी करून घ्या म्हणून वारंवार सांगतात आणि स्त्रिया वर्षानुवर्षे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.

खरंतर ही तपासणी स्त्रीचे लैंगिक जीवन सुरू झाल्यापासून दरवर्षी करणं गरजेचं आहे.पाश्चात्य देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्रीची ती केलीच जाते.आपल्या देशात गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे तरीही भारतीय स्त्रिया ही तपासणी करून घ्यायला टाळाटाळ करतात.
एकदा डिलिव्हरी झाली की शक्यतो स्त्रीरोगतज्ञांकडे फिरकायचेच नाही अशी वृत्ती बहुतेक महिलांमध्ये दिसून येते.

आता गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर का होतो आणि त्याचे लौकर निदान कसे करता येते ते पाहूया.
गर्भाशयाच्या मुखापाशी गर्भाशयाच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन प्रकारच्या पेशींचा संगम होतो.त्याला transition झोन असं म्हणतात.या भागात जखमेसारखे वण तयार होतात.योनीमार्गात सगळ्या प्रकारचे जीवजंतू असल्यामुळे हे वणांमध्ये जंतुसंसर्ग लगेच होतो.आणि मग पेशंट ला खाज,जळजळ,आग,पांढरे जाणे असे त्रास सुरू होतात.यासाठी योनीमार्गात सरकवण्याच्या गोळ्यांचा कोर्स दिला जातो तो व्यवस्थित पूर्ण करणे अतिशय गरजेचे असते अथवा हा जंतुसंसर्ग परत परत होत राहतो.
कधी कधी योनीमार्गाचे जंतुसंसर्ग वारंवार होऊ लागतात तेव्हा पेशंट आणि तिचा नवरा या दोघांनाही औषधे दिली जातात कारण हा जंतुसंसर्ग लैगिक संबंधांमधून पसरू शकतो.बऱ्याच वेळा पुरुषांना काही त्रास होत नाही पण ते जंतुसंसर्गाचे कॅरीयर असतात त्यामुळे त्यांना औषधे दिल्याशिवाय त्यांच्या बायकांना बरं वाटत नाही.काही पुरुष अशावेळी औषधे घ्यायला तयार नसतात ,त्यांना खूप समजावून सांगावे लागते.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा..गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा योनीमार्गात असलेल्या ह्यूमन पापीलोमा वायरस (human papilloma virus)या विषाणू मुळे होतो.ह्या विषाणू ची लागण गर्भपिशवीच्या मुखाला आहे की नाही हे बघण्यासाठी आणि या भागातल्या पेशींची कॅन्सर तपासणी करण्यासाठी HPV +LBC ही तपासणी उपलब्ध आहे.ही तपासणी एकदा केली असता आणि निगेटिव्ह आली तर पाच वर्षापर्यंत पुन्हा करावी लागत नाही.HPV या विषाणूची लागण स्त्रियांमध्ये लैगिक संबंध सुरू झाल्यावरच होऊ शकते.त्यामुळे परदेशात लैगिक संबंध सुरू झाल्यावर pap smear ही तपासणी अतिशय नियमित केली जाते.HPV +LBC ही तपासणी याच प्रकारची पण जास्त अचूक आहे .

कमी वयात लग्न,लगेच मुलं,कमी अंतराने झालेली अनेक बाळंतपणं या सगळ्या गोष्टींमुळे गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सर चे प्रमाण वाढते.या स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आरोग्याबद्दल असलेली अनास्था आणि बेफिकिरी ही सुद्धा हा कॅन्सर वेळेवर निदान न होण्यास कारणीभूत आहे.यासाठी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
बऱ्याच स्त्रिया खूप वर्षं पिशवीच्या तोंडावर असलेल्या (cervical erosions) जखमांसाठी स्त्रीरोगतज्ञांकडे येत राहतात पण तपासणी सांगितली की टाळाटाळ करतात.ही तपासणी वेळेवर केली तर पुढचा खूप मनस्ताप वाचू शकतो.

जास्त प्रमाणात पांढरे जाणे,लैगिक संबंधांनंतर लालसर जाणे,दोन पाळ्यांच्यामध्ये लाल स्त्राव दिसणे हे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.पाळी थांबल्यानंतरही दरवर्षी किमान एकदा स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेणे अनिवार्य आहे आणि ही तपासणी वेळप्रसंगी तुमचा जीव वाचवू शकते .पाळी एकदा थांबली की स्त्रिया स्त्रीरोगतज्ञांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात . गर्भाशय,त्याचे मुख,ओव्हरी या अवयवांच्या कॅन्सरचे वेळेवर निदान होण्यासाठी नियमित तपासणी आणि सोनोग्राफी अत्यावश्यक आहे.

काही वेळा HPV +LBC ही तपासणी नॉर्मल असते पण तिथल्या जखमेला वरवर जंतुसंसर्ग होऊन स्त्रीला त्रास होत राहतो.अशावेळी ही जखम भूल देऊन जाळून टाकली जाते(cervical cryo or thermal cautery) या उपचारपद्धती नंतर बऱ्याच स्त्रियांचा त्रास कायमस्वरूपी कमी होतो.

HPV +LBC ही तपासणी पोझीटीव्ह आली याचा अर्थ कॅन्सर आहे असा नसून,गर्भाशयमुखाकडे जास्त बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे असा होतो.मग त्या भागाची बायोप्सी घेऊन आणि वारंवार तपासणी करून लक्ष ठेवले जाते.

भारतात स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (cervical cancer) कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे.सुदैवाने हा कॅन्सर रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात लस (vaccine) विकसित झाली आहे आणि ती सर्वत्र उपलब्ध आहे.कॅन्सर रोखण्यासाठी लस कशी काम करते याबद्दल खूप जणांच्या मनात शंका असू शकते.त्याचे उत्तर असे की लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला HPV नावाच्या व्हायरस चा संसर्ग होऊ शकतो.हा संसर्ग बरीच वर्षे टिकून राहिला तर त्याचे कॅन्सर मध्ये रुपांतर होऊ शकते.त्यामुळे HPV vaccine म्हणजे लस ह्या संसर्गापासून स्त्रीचे रक्षण करते.साहजिकच कोणताही लैंगिक संबंध येण्याआधी ही लस दिल्यास ती सर्वात जास्त प्रभावी ठरते.त्यामुळे मुली वयात आल्यावर सोळा ते अठरा वर्षे वयाआधी ही लस देण्यात यावी.पंधरा वर्षे वयाआधी ही लस दिल्यास दोन डोस द्यावे लागतात आणि त्यानंतर तीन डोस द्यावे लागतात.0,1,4 महिने असे या लशीचे वेळापत्रक असते.

ही लस सध्या भारतात आयात केली जाते ,त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे.त्यामुळे ज्या मागास सामाजिक व आर्थिक समाजात या लशीची खूप आवश्यकता आहे त्या वर्गाला ती परवडू शकत नाही पण आता बाजारात स्वदेशी बनावटीची लस(cervavax) सिरम इन्स्टिट्यूट तर्फे आली आहे.त्यामुळे ही लस कमी किमतीला उपलब्ध आहे .सर्व मुलींच्या पालकांनी याचा लाभ घेऊन आपापल्या मुलींना ही लस जरूर द्यायला हवी.
ह्या लशीचा फायदा पुरुषांमध्ये सुद्धा आहे. त्यांना तोंडांचे,घशाचे काही कॅन्सर,लैंगिक अवयव, गुदद्वार इथले कॅन्सर यापासून या लशीमुळे संरक्षण मिळू शकते. त्यामुळे काही देशांमध्ये वयात आलेल्या मुलांनाही ही लस द्यायला सुरुवात केली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचे लसीकरण झाले असले तरीही नियमित तपासणी अत्यावश्यक आहेच.आणि दुसरे म्हणजे लग्न झालेल्या अथवा लैंगिक संबंध आधीच आलेल्या स्त्रियाही HPV vaccine घेऊ शकतात पण त्याचा पूर्ण फायदा त्यांना मिळू शकत नाही आणि नियमित तपासणी महत्त्वाची ठरते.

तर मैत्रीणींनो अश्या अगदी साध्या तपासण्या आणि वेळेवर लसीकरण केले तर खूप मोठे आजार तुम्ही टाळू शकाल.तुमच्या मुली क,बहिणी,आया ,सासवा यांच्याशी या विषयावर जरूर बोला.
जीवलगांशी असं हितगुज जास्त महत्त्वाचं..हो ना?

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ
कोथरूड
पुणे

14/05/2024

नमस्कार मित्रमंडळी!
काही तांत्रिक कारणामुळे माझा मागील व्हिडिओ पोस्ट होऊ शकला नाही.तो परत पोस्ट करते आहे. क्षमस्व!
"मैत्रिणींनो " या व्हिडिओ मालिकेचा "मेंस्त्रुअल कप..अजून माहिती घेऊया" हा पुढचा भाग.

04/05/2024

"मैत्रिणींनो" या व्हिडिओ मालिकेचा पुढचा भाग.
त्याची ही झलक.
"मेनस्ट्रुअल कप" या विषयावर चर्चा करूया.

18/04/2024

स्त्रियांच्या मनात कॉपर टी बद्दलचे गैरसमज. आणि सत्य

"अग गेल्या वर्षभरात हा तिसरा गर्भपात करायला आली आहेस तू!मी गेल्यावेळी च तुला बजावलं होतं कॉपर टी साठी पाळीच्या पाचव्या दिवशी ये म्हणून..का आली नाहीस?"
"मॅडम मला खूप भीती वाटते कॉपर टी ची.!"
"आणि वारंवार गर्भपाताची भीती वाटत नाही?"मी थक्क होऊन विचारले..
ह्या पेशंट सारख्या मानसिकतेत बऱ्याच स्त्रिया असतात.
लग्नानंतर एक मूल होईपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या हा कुटुंबनियोजनाकरता उत्तम उपाय असतो .हल्ली बहुतेक जोडप्यांना एकच मूल हवे असते.मग गर्भ निरोधक गोळ्या अनिश्चित काळासाठी घेतल्या जाऊ शकत नाहीत.
त्यामुळे एका अपत्यानंतर कॉपर टी हाच पर्याय योग्य ठरतो.
कॉपर टी बद्दल खूप गैरसमज आणि त्यामुळे अनाठायी भीती स्त्रियांच्या मनात बसलेली आहे.
कॉपर टी शक्यतो एक मूल असलेल्या महिलेच्या गर्भाशयात पाळीच्या पाचव्या दिवशी बसवली जाते.तीन , पाच किंवा दहा वर्षे मुदत असलेल्या कॉपर टी उपलब्ध आहेत.पण त्या मुदतीच्या आधी सुद्धा कधीही काढता येतात.
कॉपर टी गर्भाशयात शुक्राणू साठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते तसेच गर्भ रुजण्याची प्रक्रिया थांबवते त्यामुळे गर्भधारणा होत नाही.त्याचा कोणत्याही हार्मोन्स शी काही संबंध नसतो.तसेच कॉपर टी मुळे वजन वाढणे किंवा कमी होणे अजिबात शक्य नसते.कॉपर टी मुळे माझं वजन वाढलं किंवा कमी झालं हा स्त्रियांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज आहे.
कॉपर टी चे काही फायदे तोटे बघूया.
फायदे
१.एका अपत्यानंतर खात्रीशीर,सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय.
२.जेव्हा परत प्रेगनन्सी हवी आहे असं वाटेल तेव्हा कॉपर टी लगेच काढून टाकता येते.पुढच्या महिन्यापासून कधीही गर्भ धारणा होऊ शकते.
३.नको असलेल्या गर्भधारणेची भीती नसल्यामुळे जोडप्याचे लैंगिक जीवन निकोप राहते.
४.कॉपर टी मुळे कोणत्याही हार्मोन्स वर काही परिणाम नसल्यामुळे चाळिशी पर्यंत सुद्धा ती बसवता येऊ शकते.

कॉपर टी चे काही तोटे
१.कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.
२.मधुमेह,काही प्रकारचे हृदयरोग,संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये कॉपर टी बसवता येत नाही.

३.कॉपर टी ची नियमित तपासणी(दर सहा महिन्यांनी) आवश्यक असते.तसेच योनीमार्ग आणि गर्भाशयाच्या मुखावर संसर्ग किंवा जखम असल्यास त्याकडे लक्ष ठेवून वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.

तर मैत्रिणींनो कॉपर टी सारख्या कुटुंब नियोजनाच्या उत्तम साधनाबद्दल चुकीच्या समजुती दूर करून त्याचा फायदा करून घेण्यातच आपले हित आहे.हो ना?

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरूड
पुणे

11/04/2024

पालक हो तुम्हाला याबद्दल कल्पना आहे का?
आजकालच्या तरुणाई मध्ये वेगवेगळया व्यसनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे त्यांना होऊ शकणारे धोके याबद्दल ची आतल्या गोटातील माहिती..
"मैत्रिणींनो भाग ५"

28/03/2024

सावधान! पोक्सो कायद्याच्या अंतर्गत आपली मुलं सुद्धा अडकू शकतात हे खूप कमी पालकांना आणि तरुणाई ला माहिती आहे.याबद्दल जागरुकता निर्माण करणारा व्हिडिओ माझ्या "मैत्रिणींनो" या मालिकेत पोस्ट करते आहे.त्याची ही झलक🙂

13/03/2024

पुढचा व्हिडिओ येतोय.
विषय: वैद्यकीय गर्भपात

Address

Vinayak Netralaya Building, Ground Floor ; 128/1B Main Paud Road;kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 12am - 1:10pm
6:15pm - 8pm
Tuesday 12am - 1:10pm
6:15pm - 8pm
Wednesday 12am - 1:10pm
6:15pm - 8pm
Thursday 12am - 1:10pm
6:15pm - 8pm
Friday 12am - 1:10pm
6:15pm - 8pm
Saturday 12am - 1:10pm

Telephone

+919764900468

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Shilpa Chitnis Joshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Shilpa Chitnis Joshi:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram