19/08/2024
'
वैद्यकीय क्षेत्रातली अमानुष पिळवणूक
सध्या एरणीवर आलेल्या विषयावर अजून बोलावेसे वाटत आहे.वैद्यकीय क्षेत्रात कामाच्या ताणामुळे आत्महत्या,मानसिक आजार हे काही नवे नाही. याबद्दल विचार करताना जुन्या अत्यंत कटु आठवणी जाग्या झाल्या.माझे अनुभव 90 च्या दशकातले आहेत.इतकी वर्षं झाली तरी परिस्थिती बदलली नाही ही एक शोकांतिकाच आहे.
आज आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर व यशस्वी झालेले कितीतरी डॉक्टर या वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठांकडून होणाऱ्या अमानुष पिळवणुकीला सामोरे गेलेले आहेत. काही यातून तावून सुलाखून निघतात, काही जण अतिशय कष्टांने मिळवलेली पदव्युत्तर शिक्षणाची सीट सोडून जातात. काहींची अवस्था टोकाच्या मानसिक अवस्थेपर्यंत जाते पण ते स्वतःला सावरतात.
ही छळाची कहाणी समजून घेण्याआधी वैदयकीय पदव्युत्तर शिक्षण कसे असते ते समजावून घेणे आवश्यक आहे. पूर्वी एम.बी.बी.एस. च्या मार्कावर तर आत्ता हल्ली प्रवेश परीक्षा पास झाल्यावर पदव्युत्तर सीट मिळते. या दोन्ही परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्याला अपरिमित कष्ट असतात हे सांगायची गरजच नाही! हे कष्ट करुन पदव्युत्तर सीट मिळालेला विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कामाला लागतो. साधारणपणे इतर क्षेत्रात एक बेसिक पदवी मिळालेल्या माणसाला बऱ्यापैकी आदराने वागवले जाते. वैद्यकीय क्षेत्रात मात्र एम.बी.बी.एस.पास होऊन ज्युनिअर रेसिडेंट (JR) म्हणून लागलेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयातल्या चतुर्थ श्रेणीच्या कामगारापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. जॉइन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून JR हा सर्वांचा खासगी नोकर असल्याची भावना ही डिपार्टमेंटमध्ये सर्वांना असते . सुरुवातीला फक्त कागदपत्र पूर्ण करणे, रक्त लघवी
तपासायला पाठवणे आणि बाकीचे हमालीकाम या शिवाय JR ला काहीही करु दिले जात नाही.रोज सकाळ -
संध्याकाळ राऊंड घेणे हे त्याचे मुख्य काम असते आणि मग 'सिनियर रेसिडेंंट', लेक्चरर्स, प्राध्यापक यांचा ताफा
येतो. यातच राऊंडच्या वेळी JR च्या चुका काढून त्याला पेशंट व नातेवाईकांसमोर अतिशय अपमानकारक वागणूक
देणे, त्यांची वॉर्डबॉय,सिस्टर यांच्यासमोर अवहेलना, निंदानालस्ती करणे हे प्रकार सर्रास चालतात.JR च्या
कामाचे तास यावर काहीही बंधन नसते.सतत ३६ तास काम मग १२ तास सुट्टी व परत ३६ तास काम असं
सलग दोन वर्ष काम मी स्वतःही केलेलं आहे. यात रेसिडंट डॉक्टरला बऱ्याच वेळा महिन्यातून एकही सुट्टी मिळत
नाही मग रविवारची गोष्टच सोडा.या सर्वांवर कडी म्हणजे हे सगळं, चेष्टा, अपमान, निंदानालस्ती आणि अतिकाम
तुझ्या चांगल्या भविष्यासाठी आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
आता तुम्ही म्हणाल की हे सगळं हे विद्यार्थी का सहन करतात. तक्रार का करत नाहीत? तर याची दोन
कारणे आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्याचा हात पूर्णपणे 'गाईडनामक दगडाखाली' अडकलेला असतो. प्रत्येक वेळी
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या 'गाईड' शिवाय पुढे जाताच येत नाही. या गाईडच्या सल्ल्यानेच
त्याचा प्रबंध पुरा करायचा असतेा त्या मुळे वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागले नाही तर प्रबंधावर सही मिळण्याची
शक्यताच नाही.यासाठी कित्येक पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी गाईडच्या घरची सगळी खाजगी कामे,कधी कधी वेळप्रसंगी त्याला दारुची पार्टी देणे या गोष्टी सर्रास करत असतात. गाईडच्या 'खास' मर्जीतल्या डॉक्टरांनी वॉर्डमध्ये विशेष काम केले नाही तरी चालू शकते या उलट ज्यांना ही मखलाशी आणि राजकारण जमत नाही त्यांची अवस्था अतीशय दयनीय होते.
त्यांचे जिणे सिनियर डॉक्टर्स नकोसे करुन टाकतात. सीट तर सोडता येत नाही कारण आयुष्यभरचा करीयरचा
प्रश्न आहे आणि दुसरीकडे होणारा सिनियर्सकडूनचा त्रास ह्या असल्या कोंडमाऱ्यात बरेच विद्यार्थी सापडतात. बरं
गाईडची तक्रार कोणाकडे करणार? मग मात्र पदव्युत्तर परिक्षा पास होण्याची शक्यताच नाही! कारण तोच परीक्षक
असू शकतो आणि बाहेरुन आलेला दुसरा परीक्षक बऱ्याच वेळा त्याचा मित्रच असतो.थोडक्यात म्हणजे वैद्यकीय
शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था सध्या कसायाच्या हाती दिलेल्या शेळीसारखी आहे.त्याच्या नशिबाने 'गाईड' दयाळू निघाला तरच त्याच्या करीयरची नाव पैलतीराला लागू शकते.
विद्यार्थ्याने हा छळ सहन करायचे दुसरे कारण म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याने किती ऑपरेशन्स करायची हे
सर्वस्वी सिनियर्स ठरवतात. एखादा JR जर त्यांच्या 'हुकुमानुसार' वागत नसेल तर पूर्ण पदव्युत्तर शिक्षणात
त्याला काहीही ऑपरेशन्स करु दिली जात नाहीत, जेणे करुन तो पदव्युत्तर परिक्षा पास झाला तरी ऑपरेशन्स चा
अनुभव त्याला शून्य असतो. या सगळ्याचा करियरवर पुढे होणारा परिणाम त्या बिचाऱ्या JR ला पूर्ण दिसत असतो
म्हणूनच त्याला सिनियर्सची हांजी हांजी करणे भाग पडते.
JR वर कामाचा ताण कितीही असला तरी सिनियर्स बसून गप्पा मारतील, खिदळतील पण JR चे काम सिनियरने करणे अत्यंत कमीपणाचे मानले जाते. आपल्या मनाप्रमाणे न वागल्यास गाईडचे कान भरण्याची धमकी JR ला सर्रास दिली जाते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गाईडचे 'लाडके' काही लोक असतात जे 'नावडत्या' लोकांवर अशी कुरघोडी करत असतात। धूर्त आणि लबाड्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण फार सोपे जाते! खासगी
प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मत्सर हाही डिपार्टमेंटच्या राजकारणाचा एक भाग असतो.
इतर महाविद्यालयांमध्ये सिनिअर्समध्ये 'मला रॅगिंग झालयं ना, मग मीही करणार' ही वृत्ती असते. तीच वृत्ती या मेडीकल रॅगिंग मध्ये दिसते.फरक इतकाच की या रॅगिंग मध्ये वरिष्ठांचाही सहभाग असतो.
सतत २४ तास जागून वार्डात काम केल्याकेल्यानंतर १० मिनिटे चहा प्यायला परवानगी घेतल्याशिवाय कशी गेली म्हणून एका वेळी ४-५ जणांनी सर्वांसमोर 'झापणे', गाईडला स्वतःच्या गाडीतून खाजगी
कामे करायला फिरवणे, ठिकठिकाणी त्यांचे पैसे भरणे, त्यांची घरातली कामे करणे, एवढं करुन प्रबंधावर सही
करावी म्हणून गयावया करणे ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत. त्या वेळची ती वेदना अजूनही तितकीच तीव्र आहे.या सर्वांमुळे बरेच विद्यार्थी नैराश्याची शिकार झालेले आहेत. म्हणून या लेखाचा प्रपंच!
बऱ्याच वेळा ज्युनिअर रेसिडेंट च्या व्यक्तिगत आयुष्यावरही सिनिअर्स ढवळाढवळ करतात.पदव्युत्तर विद्यार्थी/ विद्यार्थीनींचे वय साधारण २४ -२५ च्या आसपास असते। ते बघता बऱ्याच जणांची लग्न ठरलेली किंवा ठरत असतात.मग होणाऱ्या नवरा अथवा बायको यांना भेटू न देणे, सुट्टी न देणे या प्रकारेही मानसिक त्रास दिला
जातो.'साखरपुडा, लग्न या गोष्टीच करायच्या असतील तर पदव्युत्तर जागा सोडून द्या व तेच करा' अशी मुक्ताफळे मी स्वतः ऐकली आहेत! विद्यार्थ्याला कष्ट करुन मिळालेली पदव्युत्तर सीट ही आपण स्वतः त्याला फुकट
दान केली आहे म्हणून त्याला छळायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे असा गाईडचा अविर्भाव असतो! अर्थात सर्व गाईड असे नसतात पण अशी संख्या बरीच आहे जे वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छळत आहेत.तर एकूण ही अशी परिस्थिती बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असते. माझ्या माहितीत माझ्याच बॅचमधील दोन तीन विद्यार्थी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील सीट केवळ अतिछळामुळे सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट बरीच जुनी आहे. त्यामागे असणारे राजकारण म्हणजे 'बाहेरच्या कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्याला छळून त्याने जागा सोडली की 'आपल्या' माणसाला ती सीट मिळवून द्यायची' हे आहे असे मला नंतर कळले.
डिपार्टमेंट मधील राजकारण हे प्रत्येकच वैद्यकीय महाविद्यालयात असतं.स्त्रीरोग विभागात हे सर्वात जास्त असतं कारण या क्षेत्रात असलेला कामाचा अतिताण,काम करताना पेशंट च्या जीवाला असणारे धोके,सतत रात्रीबेरात्री जागरण हे आहेत.काही लोक या डिपार्टमेंट मध्ये महिला डॉक्टर जास्त असल्यामुळे राजकारण जास्त असे कुजके टोमणे पण मारतात पण पुरुष या राजकारणात कुठेही मागे नाहीत ,काकणभर पुढेच आहेत हे वास्तव आहे.एकमेकांवर कुरघोडी करणे हे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चालतच.
पूर्वी शहरातल्या सिनियर आणि नामांकित डॉक्टर्स वैद्यकीय महाविद्यालयात मानद तज्ञ म्हणून असायचे.त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळत असे.वातावरण खेळीमेळीचे असायचे.खासगी प्रॅक्टिस ,पेशंट शी सुसंवाद साधणे याबद्दल विद्यार्थ्यांना शिकायला मिळायचे.ही पद्धत परत आणायला हवी असं वाटतं.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही गाईड आणि सिनियर्स खरच खूप चांगलें असतात आणि त्यांच्या हाताखाली खूप कुशल डॉक्टर्स तयार होतात. सरसकट सगळ्यांना एकाच मापात तोलणे अन्यायाचे ठरेल.
अतिशय गुणी, अपार कष्ट करुन पदव्युत्तर जागा मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या नशिबात हे सगळे वाढून
ठेवलेले असावे हा दैवदुर्विलास आहे. यात अतिशय कडक कायदे केल्याशिवाय हे बदलणार नाही.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यालाही गाईडबद्दल गुप्त पद्धतीने तक्रार करण्याचा अधिकार असावा. एखादी कमिटी राज्यस्तरावर या तक्रारींचा विचार करुन कारवाई करु शकेल. एखाद्या गाईडबद्लल सतत
तक्रारी आल्यास त्याची पदव्युत्तर जागेसाठीची पात्रता रद्द करण्यात यावी, तसेच योग्य कारण दिल्यास गाईड
बदलून मिळण्याची सोय असली पाहिजे. थोडक्यात सिनियर डॉक्टर्स व गाईड यांच्यावर वचक ठेवणारी यंत्रणा
असावी.
यासाठी केंद्रीय DNB बोर्डाची अतिशय योग्य नियमावली आहे.DNB बोर्ड ही संस्था दिल्ली ला असून काही मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्या पदव्युत्तर सीट्स असतात.DNB करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे वैद्यकीय प्रशिक्षण मिळावे त्याबद्दल त्यांचे काटेकोर नियम आहेत तसेच ते गाइड आणि रुग्णालयाला पण लागू आहेत.या सगळ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत नाही.हीच नियमावली सर्व वैद्यकीय महाविद्यालयात लागू असावी.
आज समाजापुढे वैद्यकीय क्षेत्रातील हे विदारक सत्य समोर ठेवताना आमची हीच अपेक्षा आहे की या पुढे कोणाही एका लायकी नसलेल्या माणसाच्या हातात वैद्यकीय विद्यार्थ्याच्या आयुष्याची आणि करीयरची दोरी असू नये!
डॉ शिल्पा चिटणीस - जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ
कोथरुड
पुणे