26/02/2026
"डॉक्टर हैमाबती सेन"
आज आनंदीबाई जोशींची पुण्यतिथी आहे. डॉक्टर होण्यासाठी त्यांना अडचणींचे किती डोंगर पार करावे लागले ते सर्वश्रुत आहेच. समकालीन कादंबिनी गांगुली आणि रखमाबाई राऊतांचा संघर्षही ठाऊक आहे.
पण हे सारे अगदीच मामूली वाटावे अशी त्याच काळातील अजून एक लोकविलक्षण कहाणी आहे डॉक्टर हैमाबती (मराठीत हेमावती असावे)यांची.
ही सारी गोष्ट त्यांनी स्वतःच लिहून ठेवली आहे. तिचा नुसता सारांश वेचला तरी जो अन्याय, अपमान, वेदना सहन करत हैमाबतीने हार न मानता संघर्ष करत वाटचाल केली ती असाधारण आहे हे पटतेच. पण 19व्या शतकातील उत्तरार्धात (बालविवाहामुळे), बालविधवांच्या वाट्यास जे भोग येत ते वाचून वाटते " उस जमाने में इस मुल्क में लडकी का जन्म लेना ही पाप था!"
तो शुरू से शुरू करती हूँ..
१८६६ साली बंगालमधील खुलना येथे (जे आता बांगलादेशात आहे) एका कायस्थ जमीनदार कुटुंबात तिचा जन्म झाला. पहिलीच खेप होती, आईला हवा होता "खानदान का चिराग" पण झाली मुलगी, आई निराश झाली. पण वडिल मात्र तिचे लाड करत. लहानपणी तिला मुलासारखे वाढवले गेले. वडील "चुनीबाबू" म्हणायचे.
भेदभावाची झळ सुरुवातीला बसली नाही. पण जेव्हा
घरातील मुलांसाठी शिक्षक ठेवले गेले तेव्हा तिला शिकण्यास मनाई झाली, का तर म्हणे “मुलींनी शिकणे पाप आहे, पतीसाठी अशुभ आहे.”
हेम दाराआड उभी राहून ऐकत राहिली. आणि लवकरच घरातील बायकांना रामायण वाचून दाखवत चकीत केले होते. तसेच परीक्षेत मुलांपेक्षा चुणचुणीत उत्तरे दिली होती.
लवकरच हेमच्या या शिक्षणालाही तिलांजली मिळाली.
1872 च्या दुष्काळात जमीनदारीचे उत्पन्न खालावले होते.
विवाहाचे किमान वय कायद्याने दहा झाले होते, तरीही केवळ
नवव्या वर्षी तिचा विवाह तिच्यापेक्षा जवळजवळ पाचपट वयाच्या, दोन मुली असलेल्या, दोनदा विधुर झालेल्या दंडाधिकाऱ्याशी लावला गेला. हैमाबतीच्या संमतीचा प्रश्नच नव्हता. जातीतीलच नवरा मिळणे हा एकच निकष लावला होता. पदर यायच्या आत कन्येचा विवाह लावण्यात येत असे. हा इतका विजोड विवाह का म्हणून लावला गेला असेल?
त्या मध्यमवयीन पतीने या छोट्या मुलीवर जे जबरदस्तीचे प्रयत्न केले ते लिहिण्याच्या मर्यादेतच बसत नाही. यातून तिची सुटका झाली ती पुढच्याच वर्षी त्याचा लिव्हर एब्सेस होऊन मृत्यू झाला तेव्हा. दहा वर्षांची बालवधू हेम आता बालविधवा झाली.
बंगाल मधे विधवेला दिवंगत पतीच्या मालमत्तेवर हक्क मिळे पण दिराने तिला वारसा नाकारला. सासर-माहेर दरम्यान ती हेलकावे खात राहिली. वडिलांच्या मृत्यूनंतर भावाची मायाही आटली. हैमावतीला सर्वाधिक वेदना देणारी गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांचीही वागणूक सहानुभूतीची नसे.
आता हेम विशीत आली होती.
शेवटी ती काशीला गेली.बनारसला विधवांसाठी आश्रम होते. पण प्रत्यक्षात वेदनांनी भरलेले, असहाय्य विधवा घरीदारी कुठेच सुरक्षित नव्हत्या. बरेचदा कुंपणच शेत खात असे. वाचता-लिहिता येत असल्यामुळे तिला शिक्षकाची नोकरी मिळाली. तेव्हाच तिच्या मनात ठाम विचार रुजला की शिक्षण हे उपजिविकेचे साधन बनू शकते.
विशी गाठेपर्यंत तिने विधवांच्या असुरक्षिततेचे भयावह वास्तव पाहिले होते.
जितके चांगले शिक्षण तितका जास्त पैसा, आणि सामाजिक मान.
ती परत बंगालमध्ये आली आणि ब्राम्हसमाजाची सुधारक चळवळीची सदस्य झाली. स्त्रीशिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यांना प्रोत्साहन देणारी ही चळवळ त्या काळात क्रांतिकारी होती.
तिने कुंजबिहारी या ब्राह्मो कार्यकर्त्याशी विवाह केला. यात सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षण हा विचार अधिक महत्त्वाचा होता.
आता तिच्या आयुष्याने नवे वळण घेतले .. वैद्यकीय शिक्षणाचे.
कलकत्ता मेडिकल कॉलेज मधे पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकवले जात होते; परंतु ते इंग्लिश भाषेत शिकवले जाई. शिवाय त्या कॉलेजची प्रवेश परीक्षा अवघड असायची. परंतु आता स्थानिक भारतीय विदेशी उपचार पद्धतीची मागणी करु लागले होते. तुलनेने डॉक्टरांची संख्या कमी होती. ही तफावत भरून काढण्यात कॅम्पबेल कॉलेजने पाश्र्चात्य वैद्यकीय शिक्षण बंगाली भाषेत देण्यास सुरूवात केली होती. ही प्रवेश परीक्षा ही फारशी अवघड नसे. हैमावतीने प्रवेश परीक्षा सहज पार पाडली व १८९१ साली वैद्यकीय विद्यार्थी झाली.
स्त्रियांनी पडदा पाळायच्या त्या काळात समाजाने हे सहजी स्विकारले असते तरच नवल होते.
कॉलेजला जाणाऱ्या बग्गीवर चिखलफेक होई.
पण हेम मागे हटली नाही. अभ्यासही सोपा नव्हताच. मृतदेहाच्या विच्छेदना वेळी ते दृश्य पाहणेही कठीण मग कापाकापी दूरचीच गोष्ट. पण शिक्षक समजूतीने घेत काम करवून घेत. अंगभूत हुशारी इथे हैमाबतीच्या कामी आली. घरकाम, गर्भपाताचे दुःख, नंतरचे बाळंतपण, आर्थिक अडचणी आणि अभ्यास यांचा समतोल तिने साधला.
१८९४ साली ती वर्गात प्रथम आली.
तिला सुवर्णपदक जाहीर झाले.
परंतु पुरुष विद्यार्थ्यांनी याविरुद्ध आंदोलन केले. “स्त्रियांचे इतके कौतुक व सन्मान कशासाठी?” असे समाजानेही विचारले. हेमने वास्तव स्वीकारले. तिने सुवर्णपदकाऐवजी रौप्यपदक पत्करून त्या बदल्यात कलकत्ता मेडिकल कॉलेज मधील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवली. ती व्यवहारी होती. सुवर्णपदक पोटभर जेवण देणार नव्हते.
पुढे तिला हुगळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पद मिळाले. मासिक वेतन ४० रुपये व राहण्यासाठी आवारातच क्वार्टरची सोय. शिवाय खाजगी व्यवसाय करायची परवानगी. पडदा राखणार्या श्रीमंत स्त्रिया होम व्हिजिटसाठी प्राधान्य देत. कमाईही चांगली होई.
इथे तिने खूप काम केले. तिच्यासारखीच परिस्थिती ओढवलेल्या बालविधवांना आधार दिला. प्रसंगी प्रायव्हेट प्रॅक्टिस मधली कमाई नवर्यापासून लपवत या मुलींना आर्थिक मदत केली.
पण पदासोबत वरिष्ठांकडून सन्मान मात्र मिळाला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याने छळ केला, लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न केले. गर्भपातामुळे मृत झालेल्या स्त्रीचा मृत्यू “अतिरिक्त मासिक पाळी” म्हणून दाखवला गेला तेव्हा त्या भ्रष्टाचारात तिला नाईलाजास्तव सामील व्हावे लागले.
१९१० पर्यंत ती हुगळी येथे कार्यरत होती. पुढेही वैद्यकीय सेवा चालू ठेवली. दरम्यान
पति मरण पावला होता, पदरात पाच मुले होती. त्या मुलांना शिक्षण दिले. एक मुलगा डॉक्टर झाला. त्याच्या बरोबर हैमाबतीने नंतर प्रॅक्टिस शेअर केली.
पण आयुष्याने पुन्हा परीक्षा घेतली. मुलीचा संसार अयशस्वी ठरला, माघारी आलेल्या लेकीसाठी हेम पुन्हा आधारवड बनली.
१९२० च्या आसपास तिने आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. ओळी आखलेल्या साध्या शाळकरी वहीत आणि बंगाली भाषेत.
तिच्या आयुष्याचा निखळ, प्रामाणिक, पारदर्शक दस्तऐवज.
जे जसे घडले ते आणि तसेच्या तसे, फक्त सत्य आणि सत्यच.
1933 साली ब्रेस्ट कॅन्सरने निधन होईपर्यंत ती लिहितच होती.
हे लेखन तब्बल सात दशकांपर्यंत अप्रकाशित राहिले.
नंतर तिच्या नातीने त्या वह्या इतिहासकार तपन रायचौधरी यांना दाखवल्या. त्यांनी जितकी शक्य होईल तितकी त्या लिखाणातील खरेपणाची पडताळणी केली. त्या काळातील हाॅस्पीटलच्या नोंदी तपासल्या. हयात व्यक्तींकडून खातरजमा केली. आणि मगच
त्या लिखाणाचे संपादन करून बंगाली आणि इंग्रजी भाषांतर करून 2000साली तेही प्रकाशित केले.
"Because l am a Woman: Memoirs of Dr Haimabati Sen"
हेमाबतीने गरिबी, शारीरिक व मानसिक छळ, अन्याय सहन केला, पण हार मानली नाही. ती अशी एक ज्वाला होती जिने विझायला नकार दिला.
तिने शिक्षणाला शस्त्र बनवले.
तिने स्वतःला असहायतेच्या पिंजऱ्यातून मुक्त केले. स्वावलंबी केले.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने लिहिले.
तिच्या लेखणीमुळे 1870 ते 1930 असा साठ वर्षाचा इतिहास जिवंत झाला.
Dr Pradnya Rotithor ✒️
26/2/26