21/04/2026
“थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी हवे व्यापक जागरण !” – डॉ. अतुल कुलकर्णी
महर्षी कर्वे यांची १६८ वी जयंती कर्वे संस्थेत उत्साहात साजरी
दि. १८ एप्रिल २०२६ - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरी केली गेली. या विशेष निमित्ताने दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने केले गेले होते.
संस्थेच्या कर्वेनगर परिसरातील मुख्य आवारामध्ये असलेल्या महर्षी कर्वे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच वृंदावन बागेमध्ये सकाळी आठ वाजता सामूहिक प्रार्थना केली गेली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जनकल्याण रक्तकेंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, विख्यात लेखक डॉ. न. म. जोशी, श्रीमती विनया बापट, प्रा. उल्हास बापट तसेच महर्षी कर्वे यांचे पणतू श्री. अरुण नेने व त्यांचे कुटुंबीय अण्णासाहेब कर्वे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
यानंतर कर्वे रस्त्यावरील महर्षी यांच्या पुतळ्यासही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. या वेळी व्हिजन इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषपथकाद्वारे महर्षी कर्वे पुतळ्यास मानवंदना दिली.
प्रति वर्षीप्रमाणे या दिवशी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन केले गेले होते. मुख्य आवारामधील इचलकरंजी सभागृहामध्ये हे शिबिर संपन्न झाले जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने झालेल्या या शिबिरामध्ये एकूण १०७ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून महर्षी कर्वे यांना आदरांजली अर्पण केली.
या दिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या म. ना. अदवंत प्राथमिक शाळेत स्टीम प्रयोगशाळा व गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव आणि व्यवस्थापक मंडळ सदस्या श्रीमती सीमा कांबळे यांच्या शुभहस्ते झाले. या प्रकल्पासाठी अॅन्सिस साॅफ्टवेयर या कंपनीने अर्थसहाय्य दिले.
‘आव्हान रक्तविकारांचे’ या विषयांतर्गत थॅलेसेमिया या घातक रक्तविकाराविषयी जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांचे एक विशेष व्याख्यान महर्षी कर्वे व्याख्यानमालेअंतर्गत आज पार पडले. संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम विद्या संकुलात हे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांच्यासह, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री. मंदार पारखी, श्रीमती सीमा कांबळे, वित्त समिती अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विविध शाखांचे शाखाप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने, प्रत्यक्ष आणि युट्यूब लिंकद्वारे आभासी स्वरुपातसुद्धा उपस्थित होते.
याच कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी लिखित ‘भारतरत्न महर्षी कर्वे’ या मराठी पुस्तकाचा श्रीमती विनया बापट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला. या दोघांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यानंतर श्रीमती विनया बापट आणि डॉ. न. म. जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गुरुतुल्य असणाऱ्या डॉ. जोशी यांनी मुळातच अत्यंत नेमकेपणाने लिहिलेल्या या चरित्राचा अनुवाद करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे श्रीमती बापट यांनी सांगितले तर उत्तम इंग्रजी अनुवाद करून जगभरातील वाचकांपर्यंत अण्णांचे चरित्र पोहोचत असल्याचे समाधान डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानात प्रथम महर्षी कर्वे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत जनकल्याण रक्तपेढीशी संस्थेच्या असलेल्या संबंध व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. “मानवी देह ही निसर्गाची उत्कृष्ट निर्मिती आहे. त्यातील रक्त हा घटक तर केवळ अलौकिक म्हणावा लागेल”, असे सांगत त्यांनी रक्तविकारांचे आव्हान सोप्या भाषेत सर्वांसमोर मांडले. ते म्हणाले, “शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य रक्तपेशी करतात. मात्र त्यातही विकार उत्पन्न होऊ शकतात आणि या विकाराचा वाईट परिणाम शरीराच्या क्षमतेवर होतो. थॅलेसेमिया हा असाच एक विकार आहे. रक्तातील लाल रक्तपेशी योग्य पद्धतीने तयार न होणे हे या विकाराचे लक्षण आहे. हा विकार अनुवांशिक आहे. सर्व शारीरिक गुणधर्म हे गुणसुत्रातूनच आलेले असतात. यात काही वैशिष्ट्ये जशी संक्रमित होतात तसेच विकारही संक्रमित होतात. आई आणि वडील हे दोघेही जेव्हा थॅलेसेमियाचे वाहक असतात तेव्हा पुढल्या पिढीत थॅलेसेमियाचा विकार उद्भवू शकतो. आज महाराष्ट्रात १५०० पेक्षा अधिक मुलांना या विकारामुळे नियमित रक्त भरुन घ्यावे लागते. एका थॅलेसेमियाग्रस्त मुलास दर वर्षी १० ते १५ रक्तपिशव्या लागतात. अर्थात या मुलांचे उपचार करण्याबरोबरच थॅलेसेमिया उद्भवूच नये यासाठी व्यापक जागरणाची आवश्यकता आहे. केवळ थॅलेसेमिया-वाहक असलेली कुठलीही व्यक्ती अत्यंत सामान्यपणे आपले आयुष्य व्यतीत करू शकते, हे नीट समजून घायला हवे. चित्रपट जगतातील सुपरस्टार अमिताभ बच्चन – जे स्वत: थॅलेसेमिया-वाहक आहेत - हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न तेव्हाच येतो, जेव्हा दोन थॅलेसेमियाचे वाहक पती-पत्नी म्हणून एकत्र येतात. जागरण आवश्यक आहे ते यासाठी. जागरणासोबतच आवश्यकतेप्रमाणे तपासणी करून आपण स्वत: थॅलेसेमिया-वाहक आहोत की नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. ही चाचणी गुणसुत्रांशी संबंधित असल्याने ती आयुष्यात एकदाच करायची असते. सहज शक्य असेल तिथे दोन थॅलेसेमिया-वाहकांचे लग्नसंबंध टाळता आले तर थॅलेसेमियाला निश्चितच मोठ्या प्रमाणावर आळा बसु शकेल. हे अगदीच शक्य नसल्यास किमान डॉक्टरांच्या सल्ल्याने संततीबाबतचे निर्णय घेणे हे करता येऊ शकते.”
ते पुढे म्हणाले, “थॅलेसेमियाबाबतचे व्यापक जागरण, तपासणी आणि निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही दिशा ठेवून सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे. शिवाय आज थॅलेसेमियाग्रस्त असलेल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेणे ही देखील समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. ‘असा रक्तविकार अन्य कुणाच्या नशिबी येऊ नये’ अशी भावना थॅलेसेमियाग्रस्त मुलांची व पालकांची असते, हे बऱ्याचदा पहायला मिळते. मात्र असे व्हायचे असेल तर आपण या जागरण कार्यासाठी आपला सहभाग देण्याची खूप आवश्यकता आहे, असे सांगत डॉ. कुलकर्णी यांनी सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
औपचारिक आभार प्रदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉ. शास्त्री यांनी थॅलेसेमिया विकाराची गंभीरता अधोरेखित करत संस्थेने याबाबतच्या प्रबोधन, तपासणी व समुपदेशनाचे व्यापक अभियान हाती घेतले असल्याची माहिती सर्वांना दिली. कु. अभिरा काळे हिने गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती पोहेकर यांनी केले.