Jagtap Clinic

Jagtap Clinic Clinic and Hospital

04/04/2024

Earn this badge when you register for Google I/O.

15/03/2024
https://youtu.be/YOPs2JTb6Es
26/05/2023

https://youtu.be/YOPs2JTb6Es

Dr. Sandeep V Jagtap's Valuable Insight on World Hypertension Day 2023 to Control Hypertension in Association with Unison Pharmaceuticals

19/04/2023

मनन...
गेल्या दोन दिवसात दोन बातम्या ऐकायला मिळाल्या.
पहिली म्हणजे मुंबईला उष्माघाताचे बळी
आणि दुसरी म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू
दोन्ही घटना दुर्दैवी आहेत
मृतांना श्रद्धांजली.
खरंतर एवढ्यावरच हे विषय संपवले जातात.
परंतु या संदर्भात मीडियात बातमी वाचताना प्रशासनाची असंवेदनशीलता... शब्द वाचनात आला आणि मनन सुरू झाले, शब्द वाचून करुण असे हसू आले.
मी या संदर्भात विचार करताना माझा व्यवसाय एक डॉक्टर म्हणून आणि एक सजग नागरिक म्हणून विचार करायला लागलो.

( सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी ही पोस्ट वाचताना कृपया राजकीय चष्मा वापरू नये. एक डॉक्टर किंवा एक सजग नागरिक म्हणून विचार करावा ही नम्र विनंती. कारण ज्या राजकीय लोकांच्या कुटुंबात बाप वेगळ्या पक्षात मुलगा वेगळ्या पक्षात असतो, त्यांना स्वतःच्या फायद्या खेरीज कुठलेही विचारसरणीचे सोयर सुतक नसते, परंतु आपण त्यांच्या संदर्भात तावातावाने भांडत असतो. ते इतर वेळी करावे परंतु या संदर्भात कृपया राजकीय चष्मा वापरू नये ही नम्र विनंती. डॉक्टर व नागरिक म्हणून आपल्या प्रश्नाचा विचार करावा.कारण अशा घटना सर्वच राजकीय पक्षांच्या कारकिर्दीत होतात )

अत्यंत उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमात सर्वोच्च स्थानी असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,भारताचे गृहमंत्री हजर राहतात, ज्या कार्यक्रमात लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत असणारे धर्म श्रेष्ठ लोक हजर असतात त्या कार्यक्रमात निष्पाप लोकांचा मृत्यू होतो आणि यावर वरीलपैकी एक देखील आमचं चुकलं असं म्हणत नाही ऊन जास्त होत असं म्हणतात.. ( या दोघांचे प्रशासन ,उष्माघाताच्या सूचना रोज देत असतात कदाचित सूचना फक्त देण्यासाठी असतात स्वतः अमलात आणण्यासाठी नसतात याच्यावर या लोकांचा ठाम विश्वास असावा )..
घटना वाईट आहे परंतु कमीत कमी चूक कबूल करण्याची संवेदनशीलता तर असावी..
आणि दुसरी घटना होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू, आता या घटनेत होर्डिंगला परवानगी देणाऱ्यांपासून ती उभारणी करणारे व अनेक इतर अनेक घटक सामील आहेत परंतु मुंबई सारखी घटना घडते अशा
सर्वोच्च लोकांच्या हाताखाली काम करणाऱ्या राजकारणी व इतर अधिकाऱ्यांकडून संवेदनशीलतेचे अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

डॉक्टर आणि नागरिक म्हणून माझा मुद्दा वेगळा आहे,तो म्हणजे, आम्ही जो नेहमी अनुभव घेतो किंवा आपण देखील पेपरला वाचत असतो मीडियात बघत असतो किंवा रोज अनुभवत असतो तो 👇
एखाद्या गंभीर रुग्णाला वाचवत असताना जर चुकून त्याचा मृत्यू झाला, किंवा दुर्दैवाने एखाद्या औषधाची ( जे औषध संपूर्ण लोकांसाठी वापरले जाते परंतु एखाद्याला ते सहन होत नाही खरंतर हा एक अपघात असतो, त्या व्यक्तीचे शारीरिक दुर्दैव असते ) रिएक्शन होऊन एखादा रुग्ण गंभीर होतो किंवा दगावतो अशावेळी रुग्णू मुळातच सिरीयस होता किंवा त्याची रिएक्शन हा एक अपघात आहे असे न समजता डॉक्टरांचीच चूक आहे असे समजून रुग्ण,त्याचे नातेवाईक, परिसरातील नगरसेवक, राजकारणी, राजकीय पार्ट्या,धार्मिक संघटना, आणि विशेष करून मीडिया देखील.. त्या डॉक्टरला काहीजण प्रत्यक्ष झोडपतात व काही शब्दा द्वारे व मीडिया द्वारे झोडपतात. त्या डॉक्टरांना विनाकारण पोलीस आणि कोर्ट इत्यादी सर्व कारवायांना सामोरे जावे लागते, इतका त्रास दिला जातो की चुकून हा व्यवसाय निवडला अशी त्याच्या मनात भावना निर्माण व्हावी.
याउलट वरील दोन्ही घटनां सारख्या घटना जेव्हा घडत असतात तेव्हा समाज, मीडिया का गप्प राहतो, आत्ताच नव्हे तर यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत पण कोणावरही जबाबदारी निश्चित केली जात नाही. आणि डॉक्टरांच्या बाबतीत मात्र त्या डॉक्टरांना विनाकारण छळ सोसावा लागतो. अशा घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करून कोणावरच कारवाई होत नाही हे विदारक सत्य आहे. यावर सर्वांनी मनन करावे, विचार करावा. डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्रित आवाज उठवावा व नागरिकांनी देखील यावर गंभीरपणे विचार करावा यासाठी हे मनन 🙏

डॉ. सत्यजित पाटील

18/03/2023
09/03/2023

*🥵Influenza A subtype H3N2 आणि लवकर बरे न होणारे सर्दी - खोकला , तापाचे पेशंट !*

*🌹डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
( EMS Consultant , Pune )
मोबाईल - 9762258650

मागील महिन्यापासून सर्दी -खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय रित्या वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. खरं सांगायचं झालं तर दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन चे पेशंट वाढताना आपल्याला दिसतात कारण हा ऋतू संधीचा काळ असतो.

मग याचवेळी या विषयावर चर्चा घडताना का दिसत आहे ? ... याचे कारण म्हणजे पूर्वी व्हायरल इन्फेक्शन झाल्यास ते साधारण पाच दिवसांमध्ये पूर्ण आटोक्यात यायचे. पण यावेळी मात्र असे होताना दिसत नाहीये. रुग्णांची लक्षणे जास्ती दिवस लांबत चाललेली दिसत आहेत त्यात पण सर्दी आणि खोकला हा जवळपास दोन ते तीन आठवडे बरा होत नाहीये. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये सर्दी खोकला हे लक्षण सर्व प्रकारची औषधे देऊन सुद्धा जास्ती दिवस राहिलेले दिसत आहे.

त्यातल्या त्यात काही वृद्ध व्यक्तींमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होणे आणि न्यूमोनिया होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सुद्धा वेळ येत आहे. त्यामुळे या सर्दी खोकल्याला वृद्ध व्यक्तींनी आणि ज्यांना काही पूर्वीचे आजार आहेत त्यांनी सहजतेने घेऊ नये.

आपल्या फॅमिली डॉक्टरचा किंवा फिजिशियन चा सल्ला त्यांनी नक्की घ्यावा कारण गरज पडल्यास काही तपासण्या उदाहरणार्थ छातीचा एक्स-रे, ऑक्सिजनची पातळी बघणे आणि काही रक्ताच्या तपासण्या करण्याची सुद्धा यावेळी गरज पडताना दिसत आहे.

कोविड पूर्व काळामध्ये व्हायरल इन्फेक्शन च्या साथीदरम्यान एवढा खटाटोप करण्याची गरज पडत नव्हती, *मग या वेळेला नक्की काय झाले आहे ?*
त्यासाठी ICMR ने जेव्हा पूर्ण भारतामध्ये Respiratory Viral Surveillance केला तेव्हा असे लक्षात आले की यावेळी बऱ्याच रुग्णांमध्ये *Influenza A च्या H3N2 या सब टाईप चे इन्फेक्शन झालेले आहे.* या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती तेवढी तयार नाही.

2009 - 2011 साली स्वाईन फ्लूची साथ पुण्यामध्ये आली होती . स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 - हा सुद्धा Influenza A चा सब टाइप होता. सध्या H3N2 हा सब टाइप Prevalent झालेला दिसत आहे.

( There are four types of seasonal influenza viruses types A, B, C and D. Influenza A and B viruses circulate and cause seasonal epidemics of disease )

*🤔हा H3N2 सब टाइप नवीनच आहे का पूर्वी पण होता ?*
1968 साली सुद्धा या H3N2 सब टाइपने उच्छाद घातला होता. त्या Pandemic मध्ये सुमारे दहा लाख लोकांचा बळी गेला होता. 1968 flu Pandemic ला Hongkong flu म्हणून पण ओळखले जाते. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्या Pandemic ची सुरुवात सुद्धा चीनमध्येच जुलै 1968 साली झाली होती आणि ती साथ 1969- 70 सालापर्यंत बऱ्याच मोठ्या भागांमध्ये पसरली होती.फ्ल्यूच्या साथीला सुमारे 6000 वर्षाचा इतिहास आहे. 1918 साली आलेली स्पॅनिश फ्ल्यूची साथ त्यानंतर 1957 साली परत फ्लूची साथ जगभरात आली ... त्यामध्ये लक्षावधी लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर 2019 साली आलेल्या कोविडच्या साथीच्या उद्रेकाचा तर आपण सर्वांनी अनुभव घेतलाच.

हे सर्व व्हायरस कालांतराने क्षीण होत जातात आणि त्याचे रूपांतर सीजनल फ्ल्यू मध्ये होते . कारण मोठ्या प्रमाणात लोकांना या व्हायरसच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊन जाते.

*मग यावेळी Influenza A च्या या H3N2 सब टाइप मुळे इतका त्रास का होत आहे* याचे कारण म्हणजे व्हायरसच्या बाह्यरचनेत झालेल्या फरकामुळे शरीराकडून या व्हायरस वर म्हणावी तशी मात केली जात नाहीये .

सध्या या व्हायरस मुळे मुख्यता तीव्र स्वरूपाचा ताप ,अंगदुखी ,डोकेदुखी, घशात खवखवणे - दुखणे, सुरुवातीला कोरडा खोकला आणि काही दिवसांनी कफ चा खोकला ,कमालीचा थकवा तोंडाची चव जाणे इत्यादी लक्षणे उत्पन्न होताना दिसत आहेत.

त्यातील ताप हे लक्षण कालांतराने कमी होते पण सर्दी आणि खोकला हा दीर्घ कालावधीसाठी राहत आहे. मुख्यतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये खोकून खोकून कमालीचा थकवा येणे आणि काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया होणे ऑक्सिजनची पातळी कमी होणे ही लक्षणे पण उत्पन्न होत आहेत.

नुकताच 04 मार्च रोजी ICMR ने सर्वे चा रिपोर्ट प्रसिद्ध केला केला . या सर्वे मध्ये असे लक्षात आले की जे रुग्ण या लक्षणांमुळे रुग्णालयात भरती झालेले होते ( SARI - Severe Acute Respiratory Infection) त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांना Influenza A च्या H3N2 या सब टाईप ची बाधा झालेली होती.

अर्थात हे व्हायरल इन्फेक्शन असल्याने त्यामध्ये Antibiotics चा काहीही रोल नाही. खोकला कमी होत नाही म्हणून वारंवार एंटीबायोटिक बदलत राहिल्याने त्याचा काही फायदा होण्याऐवजी अँटीबायोटिक च्या अतिवापरामुळे होणारे साईड इफेक्ट आणि मुख्यता संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे अँटिबायोटिक ला निर्माण होणारा resistance हा मात्र होत असताना दिसत आहे. *त्यामुळे IMA ने परिपत्रक काढून सध्या चालू असलेल्या साथीमध्ये अँटिबायोटिक चा वापर काळजीपूर्वक आणि गरज असेल तरच करण्याचा सल्ला दिला आहे.*

कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये जी काळजी घ्यावी लागते तीच या वेळेला पण घेणे अपेक्षित आहे, जसे की पाणी भरपूर पिणे जेणेकरून डीहायड्रेशन होणार नाही. तसेच विश्रांती घेणे , योग्य पूरक आहार घेणे , तेलकट मसाल्याचे पदार्थ तसेच थंड पाणी , कोल्ड्रिंक इत्यादीचा वापर टाळणे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणे इत्यादी.

डॉक्टर मंडळी मात्र मुख्यता रुग्णाचा खोकला कमी होत नसल्यामुळे पेशंटच्या रोशाला बळी पडताना दिसत आहेत. रुग्णाचा खोकला कमी होत नसल्यास त्याचा छातीचा एक्स-रे काढणे, ऑक्सिजनची पातळी कमी होत नाही ना याची खात्री करणे ,गरज असल्यास रक्ताच्या तपासण्या करणे ( CBC , ESR इत्यादी) गरजेचे आहे.

काही ठराविक पेशंटमध्ये खोकला थांबवण्यासाठी स्टिरॉइड चा वापर करावा लागत आहे. पण स्टिरॉईडचा वापर करताना तो इन्हेलर च्या स्वरूपात ( Seraflo ) किंवा रोटा कॅप ( Foracort ) , नेब्युलायझेशन (Duolin + Budecort वाफ देणे ) इत्यादी पद्धतीने करावा कारण तोंडावाटे किंवा इंजेक्शन स्वरूपात स्टिरॉइड दिल्यास त्याचे बरेच दुष्परिणाम शरीरावर होतात.

एकूणच गेल्या काही वर्षांमध्ये व्हायरसच्या बदलत्या स्वरूपामुळे चिकित्सा पद्धतीमध्ये बदल करावे लागत आहेत तसेच रुग्णाचे पण समुपदेशन करण्याची मोठी आवश्यकता गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे.

*😀H3N2 च्या त्रासामुळे का होईना परत सर्वसामान्य जनता ही मास्क च्या वापराकडे वळेल अशी आशा वाटते !*

( You can forward my post with my name and without editing any content)

*🌹डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
( EMS Consultant , Pune )
मोबाईल - 9762258650

08/03/2023

*रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे*..

*थेरेसा सर्बर माल्कल*!
हे नाव तुम्ही पूर्वी दी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो...
मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना.. सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते. १८९१ साली अमेरिकेत दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली. या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना… सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.

_*जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि थेरेसा माल्कल यांना सलाम!*_

21/01/2023

काय होतं की आपल्याला अंगाला हात लावून तपासणाऱ्या, आपल्या सवयी खोडी माहीत असल्यामुळे त्याबद्दल हक्काने कान टोचणाऱ्या, आपला त्रास समजतोय हे वागण्या बोलण्यातून दाखवणाऱ्या 'आपल्या आपल्या' डॉक्टरांची सवय असते. परदेशात आजारी पडलो की आधी आपल्या डॉक्टरांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आजारी पडलं की त्यांच्याकडे जायचं, स्वतःला अगदी सोपवून द्यायचं, हजार प्रश्न विचारायचे, अगदी रडू वगैरे आलं तरी बिनधास्त रडायचं, ते सांगतील ती औषधं मनात कोणतीही शंका न आणता घ्यायची आणि हळूहळू बरं व्हायचं! बहुतेक वेळा आपले डॉक्टर आपले कौन्सेलर, शिक्षक, पालक आणि ज्याचा अमाप आदर वाटावा असे मित्रही असतात. घरात ए सी बसवावा की नाही इथपासून मुलाची ऍडमिशन कुठं करावी इथपर्यंत वाट्टेल त्या गोष्टी त्यांच्याशी बोलता येतात. अशा आपल्या फॅमिली डॉक्टरांचं आपल्याला हवं तेव्हा उपलब्ध असणं आपण गृहीत धरलेलं असतं.
परदेशात आल्यावर या बाबतीतही स्वावलंबी होणं हा पहिला दणका असतो.
इथंही फॅमिली डॉक्टर असतात, इथंही बहुतेक सगळे तज्ञ असतात पण इथं 'आपण ' 'परदेशी' असतो. आणि त्यामुळे खूप खूप फरक पडतो.

काय झालं सांगते.
पंधरा एक वर्षं झाली. त्याला अचानक बारीक ताप येत होता. औषधं घेऊन कमी व्हायचा. एक दिवस चालताना धाप लागली. जीव थकून गेला. विश्रांती घेऊनही बरं वाटेना. हळूहळू धाप लागणं वाढलं. छातीत दुखू लागलं. जवळच जीपीकडे गेलो. तिने ताप कमी व्हायची औषधं दिली, लिक्विड डाएट सांगितलं आणि हायड्रेटेड राहण्यासाठी कोका कोला किंवा तत्सम गोष्टी पीत रहा असा सल्ला दिला. त्यात चार दिवस गेले. त्रास वाढतच होता.

एक दिवस उभं राहिलं तरी चक्कर यायला लागली. आम्ही इमर्जन्सी रूममध्ये पळालो. तिथं वाट बघण्याचा काळ होता 2 तास. मग नंबर लागला. फिजिशिअन म्हणे हार्ट प्रॉब्लेम वाटतोय. तासभर वाट बघितल्यावर हार्ट स्पेशालिस्ट बघून गेला. लक्षणं विचारली. हे काही हार्ट चं वाटत नाही म्हणून निघून गेला. मग लंग स्पेशालिस्ट आला. एक्स रे करून म्हणे याचं तर एकच फुफ्फुस काम करतंय. निदान काय ते कळण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतील. खोकला वगैरे नव्हताच. ऍडमिट होऊन रक्त वगैरे तपासण्या सुरु झाल्या. तोवर घरच्या डॉक्टरांनी टी बी आहे हे लक्षणं ऐकून सांगितलं होतं. धीर दिला होता. सहा महिने औषधं घ्यायची सांगितलं होतं. पण जोवर इथल्या डॉक्टरांना टेस्टमध्ये तसे पुरावे सापडत नाहीत तोवर फक्त ताप कमी व्हायचं औषध सुरु होतं. फुफ्फुसातलं दिवसाला लिटरभर पाणी काढण्यासाठी एक नळी लावली होती. ती लावण्यासाठी कापून स्क्रू वगैरे फिट करताना भूल हवी आहे का असा चॉईस विचारला होता!

नवऱ्याला डच यायचं नाही. आणि हॉस्पिटल स्टाफला इंग्रजी यायचं नाही.
घरचं अन्न खायला परवानगी नाही. पेशंट जवळ थांबायची वेळ दिवसातून चार तास. रात्री सोबत थांबणं वगैरे तर विषयच नाही. जेवणात मासे. मला डच बऱ्यापैकी यायचं. मी शाकाहारी म्हणजे काय सांगायची. स्टाफ ड्युटी बदलली की पुन्हा ताटात मासे! तब्येत अजून बिघडतच चालली होती. काय त्रास होतोय ते इंग्रजीत सांगितलेलं डॉक्टर सोडून कुणालाही कळायचं नाही. डॉक्टर दिवसातून तीन चार मिनिटं बघून जायचे. मी जाऊन हॉस्पिटलमधल्या सोशल वर्करला भेटले. तिने परिस्थिती समजून घेऊन मला दिवसभर थांबायची परवानगी दिली.
मग टेस्ट रिपोर्टसाठी मागे लागणे,ते ट्रान्सलेट करून भारतात पाठवणे, भारतातल्या आणि इकडच्या डॉक्टरांचं फोनवर बोलणं करून देणे असं काय काय सुरु राहिलं. धीर देणं सोडा पण इथले डॉक्टर मलाही हा प्रकार संसर्गजन्य असू शकतो तर तू इथं बसायचं की नाही ठरव असं म्हणायचे.मोठ मोठ्या सुयानी पोटात इंजेक्शन द्यायला एकजण आला. त्याला विचारलं हे का घ्यायचं आहे, म्हणे तू झोपून आहेस म्हणून. घ्यायलाच हवं का? यावर थंड उत्तर - तुझी बॉडी. तू ठरव!!!

फायनली 11 दिवसांनी भारतातल्या डॉक्टरांचं निदान बरोबर आहे ही आनंदाची बातमी मला तिथल्या डॉक्टरांनी दिली. वीस पंचवीस गोळ्या लिहून दिल्या. घरी सोडलं. जाता जाता म्हणे यातल्या काही औषधाचा डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर तुम्ही आय स्पेशालिस्टला दाखवून घ्या. म्हटलं बरं. अपॉइंटमेंटसाठी फोन केला तर म्हणे लवकरात लवकरची अपॉइंटमेंट अजून 9 आठवड्यानी आहे!
एकूणच आम्ही दोघे इतके शिणलो होतो की सगळं गुंडाळून सरळ भारतात आलो. 24 तासांच्या आत भारतातली ट्रीटमेंट सुरु झाली होती. आम्ही आपल्या माणसात आहोत या गोष्टीचा प्रचंड सकारात्मक परिणाम तब्येतीवर दिसत होता.
गोष्ट अशी होती की तोवर त्या डच डॉक्टरने या प्रकारची टी बी ची केस क्वचितच बघितली होती म्हणे. 30-32 वर्षांच्या त्याच्या अनुभवात भारतीय पेशन्ट्स फार तर 10 आले असतील असं स्वतःच सांगत होते ते. शिवाय संपूर्ण निर्व्यसनी असलेल्या माणसाला भारतातल्या अनहायजीनिक परिस्थितीमुळे टी बी झाला अशी टिप्पणी पण त्यांनी केली. ( त्या आधी वर्षभर सलग आम्ही तिथेच होतो हे सांगूनही )

पेशंटला खोटी आशा दाखवायची नाही, प्रोटोकॉल सोडून ट्रेंटमेन्ट द्यायची नाही, पेशंट पासून काहीही लपवायचं नाही वगैरे नियम चांगलेच आहेत. पण यात एम्पथी, माणूस म्हणून वागणूक या गोष्टी फार कमी वेळा अनुभवाला येतात.
अजून काही अनुभव सांगते.
वय वर्षं चार. सतत ताप सर्दी. डॉक्टर कोणत्याही extra तपासण्या करायला तयार नाही. शेवटी ते मूल थकून खेळेना खाईनासं झाल्यावर आईबापानी हट्टच केल्यावर टेस्ट केल्या. आणि न्यूमोनियाचं निदान सांगितलं. ते सांगताना आपण आधीच लक्ष द्यायला हवं होतं वगैरे भाव सुद्धा नाही.

मैत्रिणीला खूप त्रास होत होता म्हणून दोन आठवडे मागे लागल्यावर सोनोग्राफीला पाठवलं. रिपोर्ट देताना म्हणे गर्भाशयात काहीतरी दिसतंय, कॅन्सरही असेल किंवा साधे फायब्रॉइडही असतील! काय ते तुझी गायनॅक सांगेलच. गायनॅकची अपॉइंटमेंट दोन आठवड्यानंतरची! तोवर पेशंट आणि घरचे गॅसवर! गायनॅक म्हणे फायब्रॉइडस आहेत, ते सर्जरी करून काढायचे की नाही तू सांग!!!!

मित्राचं पोट दुखत होतं. जी पी फक्त पेनकीलर लिहून देत होते. त्याला वेगळीच भीती वाटत होती. नॉशिया, ताप, पोट दुखी अशा अवस्थेत त्याने स्पेशालिस्टकडे जायचा हट्टच धरला तेव्हा दोन महिन्यानंतरची वेळ मिळाली. तोवर याने भारतातल्या डॉक्टरांशी बोलून आहारात बदल करून, औषधं घेतली आणि बराही झाला. स्पेशालिस्ट त्याच्यावर उगाच वेळ खाल्ला म्हणून वैतागला!!!!

तीन वर्षाची मुलगी शाळेत मिसळत नाही, बोलत नाही म्हणून तिला चाईल्ड सायकीअट्रिस्तकडे रेफर केलं गेलंय. भारतातून नुकतीच आलेली, आईचा हात कधीही न सोडलेली ती चिमुकली केवळ बुजल्यामुळे असुरक्षित वाटून तसं वागतेय हे लक्षातही घेतलं नाही.

बॉर्डर लाईन ऑटिजम असं निदान झाल्यावर स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट मिळायला 8 महिने लागलेत अशी केस नुकतीच बघितली. त्या काळात त्या बाळाच्या पालकांचे काउंसेलिंग वगैरे दूरची गोष्ट!

इथं थेट उठून हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होता येत नाही. तुम्हाला तुमच्या घराजवळच्या स्थानिक जी पी कडे रजिस्टर करावे लागते. तिथेच जायचं. त्यांना वाटलं तर ते स्पेशालिस्टकडे रेफर करणार.

अचानक काही झालं तर इमर्जन्सीत जायचं. तिथं तुम्हाला डॉक्टर येऊन बघेपर्यंत 1 तास ते 4 तास लागू शकतात.
अगदीच आणीबाणी असताना आंब्युलन्स बोलावता येते. पण त्याची खरंच गरज होती का हे हेल्थ इन्शयूरन्सवाले ठरवतात. त्यांनी नाही म्हणलं तर साधारण हजार स्विस फ्रॅंक एवढा भुर्दंड खिशातून द्यावा लागतो.

कोणतीही आरोग्य सेवा मोफत नाही. हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा आहे. गरजू लोकांना सबसिडीज आहेत पण मोफत काहीही नाही.

डेंटिस्ट, फिजिओथेरपीस्ट, आय स्पेशालिस्ट यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन जाता येतं. पण जी पी कडून रेफरन्स नसेल तर त्याला किती काळ लागेल सांगता येत नाही.

किरकोळ औषधं सोडली तर कोणतीही औषधं विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळत नाहीत. अँटीबायोटिक तर फार्मसीस्ट तयार करून देतात आणि प्रिस्क्रिप्शन ठेऊन घेतात. नेहमीची थायरॉईड वगैरे औषधंही प्रत्येकवेळी प्रिस्क्रिप्शन देऊनच घ्यावी लागतात. अर्थात त्यासाठी प्रत्येक वेळी जी पी ची भेट घेणं आलंच.

पंधरा मिनिटांच्या कन्सलटेशनची इथली फी 130 chf पासून सुरु होते. बिलाच्या पावतीत पेशंटने काय शंका विचारल्या, नेमकी काय तपासणी झाली, कोणती औषधं दिली ते सविस्तर लिहिलेलं असतं.

इथंही माझी जीपी मला आजी सारखी वाटते. पाठ दुखतेय, भूक लागत नाही अशा शंका विचारल्यावर जरा शेकून बघतेस का, जरा संत्री खाऊन बघतेस का असं कन्सल्टेशन बरेचदा देते. अर्थात सोबत पेनकीलर आणि श्रद्धा सबुरी आलीच!

हे अनुभव वेगळे म्हणून लिहितेय. या अनुभवांमुळे भारतीय आरोग्य व्यवस्था, आपले डॉक्टर्स याबद्दल कृतज्ञता आणि आदर वाढतच गेलाय. इतकी लोकसंख्या, इतके पेशंट्स, अपुऱ्या व्यवस्था, कामाच्या तासांची गणती नाही अशा परिस्थितीत स्वतःचे मोराल टिकवून वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करत राहणारे सगळेच माझ्या दृष्टीने सुपर हिरो आहेत.

अर्थात माझे अनुभव काही फार जास्त आहेत, महत्वाचे आहेत असं नाही. सर्वसामान्य पेशंट म्हणून तीन वेगवेगळ्या देशात आलेले हे अनुभव.
यात कोणत्याही दोन देशांची तुलना करायची नाही तरी ते शंभर टक्के जमत नाही.
आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती या आणि अशा असंख्य घटकांमधील भिन्नतेचा फार मोठा प्रभाव त्या त्या देशातल्या सिस्टीम्सवर पडत असणार त्यामुळे तुलना करणं योग्यही नाही.
त्यात जगात सगळीकडे चांगले वाईट लोक असतात त्यात डॉक्टर्सही असणारच. सुदैवाने माझ्या वाट्याला फार चांगले डॉक्टर्स आलेत. आपल्याला चांगलं वाटतं ते आपण सांगावं म्हणून सांगतेय, भारतीय आरोग्य व्यवस्था आणि भारतीय डॉक्टर्स ही कृतज्ञता वाटण्याची गोष्ट आहे.

माया ज्ञानेश.
स्वित्झर्लंड

Address

Wakad Road
Pune
411057

Opening Hours

Monday 8:30am - 8:30pm
Tuesday 8:30am - 8:30pm
Wednesday 8:30am - 8:30pm
Thursday 8:30am - 8:30pm
Friday 8:30am - 8:30pm
Saturday 8:30am - 8:30pm

Telephone

+919604270042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagtap Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jagtap Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category