29/07/2025
*नागपंचमी आणि महाराष्ट्र खाद्य संस्कृती- पारंपरिक आणि पोषणयुक्त पदार्थ*
श्रावण महिन्यात पहिला वहिला सण म्हणजे *नागपंचमी* 🪱
नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि विशिष्ट पारंपरिक पदार्थ बनवले जातात🙏
या दिवशी नागांची पूजा करण्याचा आणि सापांना दुधाने आंघोळ घालण्याची परंपरा आहे.
असे प्रचलित आहे कि नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी टाळणे महत्वाचे आहे, जसे की चुलीवरचे अन्न शिजवणे, धारदार वस्तूंचा वापर करणे आणि जमिनीवर खोदकाम करणे टाळावे.वरील प्रकारात नागा ना इजा होण्याची शक्यता असते.
या दिवशी काही ठिकाणी तवा किंवा सुरीचा वापर टाळला जातो, त्यामुळे *त्यानुसार पदार्थ निवडले जातात*
नागपंचमीनिमित्त गोडा-धोडाचे पदार्थ तयार केले जातात. नागपंचमीला महाराष्ट्राच्या काही भागात पुरणाचे दिंड तयार केले जातात.नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. उकडीचे पदार्थ, जसे की दिंड, पातोळ्या, किंवा मोदक नैवेद्यासाठी बनवले जातात
*नागपंचमी चे पदार्थ*
*गव्हाची खीर* -
नागपंचमीला गव्हाची खीर बनवण्याची परंपरा आहे. गहू दुधामध्ये शिजवून, गूळ, वेलची पूड आणि सुका मेवा घालून ही खीर तयार केली जाते.
*पुरणाचे दिंड* -
हा नागपंचमीचा एक महत्त्वाचा आणि पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ पुरणापासून बनवला जातो, पण याला दिंडाचा आकार दिला जातो आणि काही ठिकाणी वाफवून बनवतात. हे दिंड गरम तुपाबरोबर किंवा कट (कटाची आमटी) सोबत खाल्ले जातात.
*पातोळ्या* -
विशेषतः कोकण आणि किनारपट्टीच्या भागात पातोळ्या बनवल्या जातात.
तांदळाच्या पिठाच्या आवरणात नारळ आणि गुळाचे मिश्रण भरून हळदीच्या पानांमध्ये वाफवून या पातोळ्या बनवतात. हळदीच्या पानांमुळे त्यांना एक वेगळा सुगंध येतो.
*कानोले* -
खानदेशात कानोले हा पदार्थ नागपंचमीला आवर्जून केला जातो. हे देखील एक प्रकारची गोड पोळी किंवा दिंडासारखेच असतात.
*नारळाची वडी-*
नारळ आणि गुळापासून बनवलेली नारळाची वडी देखील या दिवशी काही घरांमध्ये तयार केली जाते.
या पदार्थांसोबतच नागपंचमीला *नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा* नैवेद्य दाखवला जातो.
तर मंडळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भौगोलिक पद्धतीने जे जे काही उपलब्ध आहे त्यापासून हे *पारंपारिक पदार्थ* बनवण्याची पहिल्यापासून ची पद्धत आहे.
आपण *डाएट म्हणून बरेचदा असे पदार्थ खाणे टाळतो.*
पूर्वीचे मंडळी हे पदार्थ फक्त सणा *सुदीला हे बनवून खात होते* त्यामुळे त्याचा त्यांना त्रास होत नसे आणि शारीरिक कष्ट देखील भरपूर होते त्यामुळे जे खाल्लेले ते पचून जात असे.
आता आपण हे वरील पदार्थ बघितले तर ते *पोषण युक्त पदार्थांपासून बनवलेले दिसते ज्यामध्ये गहू,चणाडाळ,गूळ नारळ,तीळ* असे सगळे पदार्थ वापरले गेलेले आहेत.
पानगी विशेष म्हणजे त्याच्यामध्ये *हळदीचे पान* वापरले जातात.जस केळीच्या पानांवर जेवल्याने त्यातील घटक शरीराला मिळतात, त्याचप्रमाणे हळदीच्या पानांवर पदार्थ वाफवल्याने *पानांमधील पोषक घटक पदार्थात उतरतात* . हळदीच्या पानांवर पानगी वाफवल्याने त्या पदार्थाला हळदीचा एक खास आणि *नैसर्गिक सुगंध येतो* , जो त्याची चव आणखी वाढवतो. हा सुगंध कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक आरोग्यदायी आणि नैसर्गिक असतो.
शिवाय सणासुदीला असेच विशेष पदार्थ बनवून आणि आपले *खाद्य संस्कृती जपली जाते.*
*फास्ट फूड च्या भवऱ्यात अडकलेल्या आपल्या आत्ताच्या पिढीला या पारंपरिक पदार्थांची ओळख होणे आणि त्यांचे आवड निर्माण होणे हे अत्यंत गरजेचे आहे.*
फास्ट फूड सारख्या पदार्थांमध्ये अत्यंत घातक असे रासायन असतात जे या पारंपारिक पदार्थांमध्ये नसतात.
जरी कॅलरी थोड्या जास्त असल्या तरी ते सणासुदीलाच खाणे अपेक्षित असते त्यामुळे त्याचा नुकसान होत नाही आणि ते कधीतरी आपण खात असल्यामुळे ते विशेष आणि मूल्यवान बनतात.
तुमच्या घरी नागपंचमीला कोणते पदार्थ बनवले जातात? 🙏
*अर्चना रायरीकर*