
03/05/2025
*प्रवास स्वतःचा स्वतःकडे*
मंदिरा वय वर्ष ४३, माझ्याकडे आली ती वैतागलेली आणि confused... माझ्याकडे पाहून ही मुलगी खरंच आपल्याला मदत करू शकेल का? आपली परिस्थिती समजून घेऊ शकेल का या संभ्रमात असलेली ... मी नेहमीप्रमाणेच सुरुवातीला procedure सांगून तिला मनात जे काही आहे ते मोकळेपणाने बोला असं म्हणलं... कुठून सुरुवात करू असं तिने विचारल्यावर म्हणलं तुम्हाला वाटतंय ते सगळं सांगा.... म्हणाली मी जरा बॅकग्राऊंड सांगते म्हणजे सोपं जाईल.... माझा पुण्यात स्वतःचा उत्तम व्यवसाय आहे, दोन मुलं आहेत, मुलगा graduate तर मुलगी अजून शाळेत आहे, तीन वर्षांपूर्वीच नवऱ्याचा आणि माझा घटस्फोट झाला आणि आम्ही वेगळे राहतो....मुलगा वडिलांकडे आणि मुलगी माझ्याकडे असते, पण वडील गडगंज श्रीमंत असल्याने मुलांना मध्यम वर्गीय परिस्थीती मध्ये राहायची अजिबातच सवय नाहीये....माझ्या कमाईतून मुलीला उत्तम आयुष्य देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करत असते...अगदी खूप नाही पण उच्च मध्यमवर्गीय राहणीमानात छान आयुष्य जगतोय आम्ही माझ्यादृष्टीने बरं का..... पण ना मॅडम हाच problem आहे... म्हणलं थोडं अजून विस्तृत करून सांगता का तर म्हणाली की मुलीला ऐशोरामात राहायची सवय आहे.... सगळया वस्तू, कपडे ब्रँडेड, महागड्या हॉटेल्स मध्ये जायची सवय... मला नाही हो परवडत.... पण म्हणून तिने तिकडे का जावं?? एक दिवस अचानक वडिलांकडे गेली राहायला..... मुलीचं सुख त्यात आहे तर तेही करू म्हणून मी स्वतःच मुलीला तिकडे सोडून आले... तिथे गेल्यावर मुलीच्या लक्षात आलं कि इथे पैसे आहेत नोकर चाकर आहेत पण प्रेमाने करून घालायला कोणी नाही मग ती परत स्वतःच्या terms आणि conditions वर माझ्याकडे लाड करून घ्यायला यायची.... एखादी वस्तू हवी असेल तर बाबा नाही म्हणायचे मग मी आठवायचे... संपर्कात होती नाही असं नक्कीच नाही पण ते असं कोरड वाटायचं....मुलगा अध्येमध्ये भेटायला यायचा... पैसे लागले की मागायचा..... कधी कधी मी स्वतःच्या गरजेच्या चार गोष्टी मागे ठेऊन या मुलांचे लाड करायची... पण दोघांपैकी कोणीच माझ्या बरोबर रहात नाही...इतकी वर्ष नवऱ्याचं सगळं केलं, त्याचे नातेवाईक, मुलं, स्वयंपाक, अगदी घरात कोणालाच कशाचीच कमी पडून दिली नाही पण नवऱ्याने संशय घ्यायला सुरुवात केली आणि त्रास द्यायला सुरू केला खूप वर्ष मुलं लहान आहेत म्हणून सहन केलं पण एक दिवस मरता मरता वाचले आणि तिथून निघून आले... आणि वैतागून वेगळी झाले.... माहेरचा आधार नव्हता... कारण त्यांना सुध्दा जावई सांगतोय तेच बरोबर वाटायचं.... पण माझी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी जगू म्हणून मी प्रयत्न करायचे मुलांना सगळं देण्याचा पण पुढे जाऊदे हो ही मुलं तर आत्ता ही बरोबर नाही आहेत माझ्या.....
इतक्या वर्षात माझे मित्र मैत्रिणी माझं आयुष्य यातून मी पूर्ण ब्रेक घेतला होता. आता कुठे गेल्या वर्षभरात माझ्या बॅच चे ४/५ जुन्या मित्र मैत्रिणींशी पुन्हा एकदा संपर्क साधायला सुरुवात केली आहे.... पण मला ना मॅडम भीती वाटते आता पुढे काय मी एकटी कशी राहू, मी financially independent आहे.... एवढंच काय तर मुलांसाठी सुद्धा काही savings केलेली आहेत....माझी मुलं माझ्याबरोबर राहतील का, काहीच कळत नाहीये.... आणि.... आणि...... त्यांचा थोडा गोंधळ वाढलेला पाहून म्हणलं जे वाटतंय ते नि:संकोचपणे बोला.... मगाशी सांगितल्या प्रमाणे हे फक्त आपल्या दोघींमध्ये राहणार आहे....मग थोडी अडखळत म्हणाली....आता मी कुठल्या पार्टनर चा विचार करणं योग्य नाहीये ना ? केलाच तर मुलं याकडे काय दृष्टीने बघतील माहीत नाही.... परत लग्न करणं आणि त्या जबाबदाऱ्या वगैरे पार पाडण्याची ताकद संपली आहे. पण नुसतंच कोणाची तरी साथ हवी म्हणून राहणं कितपत योग्य आहे, समाज काय म्हणेल? एकदा वाटतं हे असले विचारच मनात नाही आले पाहिजेत पण एखाद वेळी २-३ दिवस मुलं फिरकतच नाहीत माझ्याकडे तेव्हा घर खायला उठतं... काही कळत नाहीये काय करू....
कोणाला काय वाटतं आहे, कोणी मला स्वीकारेल की नाही, लग्न करावं की तसच राहावं वगैरे विचार करण्याआधी मी त्यांना काही exercise दिले हा विचार करण्यासाठी की त्यांना भविष्यातल्या एकटेपणाच्या भीती मुळे पार्टनर हवा आहे असं वाटतंय की आत्ता मुलं मुलांच्या आयुष्यात busy आहेत कामात स्वतःला गुंतवूनही घरी आल्यावर कोणीतरी हवं ही गरज जास्त आहे, मुलं किंमत, प्रेम, आदर देत नाहीत म्हणून किंमत देणारं कोणीतरी हवं आहे की आधी मी मला स्वतःला प्रेम, किंमत, आदर देणं गरजेचं आहे... कोणीतरी मला स्वीकारण्यासाठी मी स्वतःला स्वीकारलं आहे का?... थेरपी सेशन्स जसे जसे पुढे जात होते तसतसा मंदिराचा आत्मविश्वास वाढत होता.. त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, gym join केली, मित्रमैत्रिणींना भेटणं वाढवलं... मुलांच्या गरजेला त्या आजही हजर आहेतच पण पूर्वीसारखं मुलांनी मला सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे प्रत्येक क्षुल्लक आणि विनाकारण हट्ट पुरवणे त्यांनी कमी केलं ... मुलांनी बोलावलं की त्या पूर्वी हातातली सगळी काम सोडून जायच्या त्यात थोडा बदल करून आत्ता मी करतीये ते काम किती महत्वाचं आहे हे ठरवून मग जायला सुरुवात केली.... त्याचबरबरीने खूप वर्षांपासून त्यांना एक कोर्स करायचा होता त्याच्या entrance च्या तयारीला सुरुवात केली... पहिल्या attempt मध्ये admission नाही मिळाली पण दुसऱ्या attempt मध्ये क्लिअर झाल्या आणि admission घेऊन पेढे द्यायला त्या आज माझ्या क्लिनिक ला आल्या होत्या.... इतकचं नाही तर इतर कोणी बरोबर यायला तयार नाही म्हणून सोलो ट्रीपही करून आल्या... आमचं शेवटचं सेशन होऊन बरेच महिने झाले होते... पार्टनर हवा की नको, लग्न करून की live in मध्ये, हवा तर कसा हवा यासाठी आता त्यांना माझ्या मदतीची गरज नव्हती...आता मंदिरा स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या... बोलता बोलता त्याचं म्हणाल्या नेहा मॅडम हे सगळं जर मी वर्षभरात करू शकले तर मी का इतकी वर्ष का थांबले होते आणि कोणासाठी?
खरंच तो प्रश्न किती योग्य होता.... मी तर फक्त त्यांना मार्ग शोधण्यासाठी मदत केली होती....विचार करणं, निर्णय घेणं, आपल्या निर्णयाची जबाबदारी घेणं हे सगळं तर त्यांनीच केलं होतं.....प्रत्येक वेळी स्वतःचा विचार करण्यासाठी आपल्याला काहीतरी कारण का हवं असतं.... का काहीतरी झाल्यानंतरच आपण स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करतो? आपल्या मध्ये असणारी strength शोधण्यासाठी आपण नेहमीच त्या शेवटच्या क्षणाची वाट का पाहतो?? एखादं toxic Relation, कामाच्या ठिकाणी होणारी गळचेपी किंवा इतर काहीही... नेहमीच आपल्यावर व्यक्त किंवा अव्यक्तरित्या दबाव आणणाऱ्या लोकंच्या मतानुसार स्वतःच्या आयुष्याची गणितं बदलणे आपण कमी करायला हवं... इतरांबरोबर स्वतःकडे सुध्दा थोडं लक्ष द्यायला हवं.. एखादा छंद जोपासायला हवा... दिवसातला थोडासा वेळ स्वतःसाठी काढायला हवा... आवडती गाणी ऐकणे, पुस्तकं वाचणे, बागकाम करणे, ड्रॉइंग किंवा स्केचिंग करणे, मित्रमैत्रिणींना भेटणे, रोजचा थोडा व्यायाम करण्याबाबत स्वतःशी ठाम राहणे, कधीतरी पिक्चर बघायला जाणे, कधीतरी स्वतःला आवडतो म्हणून एखादा पदार्थ करून खाणे, निवांत गॅलरी मध्ये बसून कॉफी घेणे, अगदी पेपर वाचण्यासाठी रोजची १५ मिनिटे काढणे... थोडक्यात आपण स्वतःच स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा बदलणे... थोडीशी इच्छाशक्ती.... थोडेसे स्वतःसाठी घेतलेले कष्ट आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं की या गोष्टी वाटतात तितक्या अवघड नक्कीच नाहीत... फक्त एकदा प्रयत्न करून बघायला हवा... मग बघा आपल्याला आपली strength शोधण्यासाठी संकटाची गरज नाही भासणार ....
नेहा पेंडसे किल्लेदार
MA (Clinical Psychology, SPPU), PG Diploma in Clinical & Counselling Psychology SPPU
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
माईंडफ्लो मेंटल हेल्थ केअर्स, पुणे
9405262066/9923040201
• लेखातील नावे बदलेली आहेत.
• लेख नावसहित शेअर करण्यास हरकत नाही