Mindflow

Mindflow Mindflow conducts various workshops based on psychological domains for all. Our aim is to make peopl

*प्रवास स्वतःचा स्वतःकडे*मंदिरा वय वर्ष ४३, माझ्याकडे आली ती वैतागलेली आणि confused... माझ्याकडे पाहून ही मुलगी खरंच आपल...
03/05/2025

*प्रवास स्वतःचा स्वतःकडे*

मंदिरा वय वर्ष ४३, माझ्याकडे आली ती वैतागलेली आणि confused... माझ्याकडे पाहून ही मुलगी खरंच आपल्याला मदत करू शकेल का? आपली परिस्थिती समजून घेऊ शकेल का या संभ्रमात असलेली ... मी नेहमीप्रमाणेच सुरुवातीला procedure सांगून तिला मनात जे काही आहे ते मोकळेपणाने बोला असं म्हणलं... कुठून सुरुवात करू असं तिने विचारल्यावर म्हणलं तुम्हाला वाटतंय ते सगळं सांगा.... म्हणाली मी जरा बॅकग्राऊंड सांगते म्हणजे सोपं जाईल.... माझा पुण्यात स्वतःचा उत्तम व्यवसाय आहे, दोन मुलं आहेत, मुलगा graduate तर मुलगी अजून शाळेत आहे, तीन वर्षांपूर्वीच नवऱ्याचा आणि माझा घटस्फोट झाला आणि आम्ही वेगळे राहतो....मुलगा वडिलांकडे आणि मुलगी माझ्याकडे असते, पण वडील गडगंज श्रीमंत असल्याने मुलांना मध्यम वर्गीय परिस्थीती मध्ये राहायची अजिबातच सवय नाहीये....माझ्या कमाईतून मुलीला उत्तम आयुष्य देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करत असते...अगदी खूप नाही पण उच्च मध्यमवर्गीय राहणीमानात छान आयुष्य जगतोय आम्ही माझ्यादृष्टीने बरं का..... पण ना मॅडम हाच problem आहे... म्हणलं थोडं अजून विस्तृत करून सांगता का तर म्हणाली की मुलीला ऐशोरामात राहायची सवय आहे.... सगळया वस्तू, कपडे ब्रँडेड, महागड्या हॉटेल्स मध्ये जायची सवय... मला नाही हो परवडत.... पण म्हणून तिने तिकडे का जावं?? एक दिवस अचानक वडिलांकडे गेली राहायला..... मुलीचं सुख त्यात आहे तर तेही करू म्हणून मी स्वतःच मुलीला तिकडे सोडून आले... तिथे गेल्यावर मुलीच्या लक्षात आलं कि इथे पैसे आहेत नोकर चाकर आहेत पण प्रेमाने करून घालायला कोणी नाही मग ती परत स्वतःच्या terms आणि conditions वर माझ्याकडे लाड करून घ्यायला यायची.... एखादी वस्तू हवी असेल तर बाबा नाही म्हणायचे मग मी आठवायचे... संपर्कात होती नाही असं नक्कीच नाही पण ते असं कोरड वाटायचं....मुलगा अध्येमध्ये भेटायला यायचा... पैसे लागले की मागायचा..... कधी कधी मी स्वतःच्या गरजेच्या चार गोष्टी मागे ठेऊन या मुलांचे लाड करायची... पण दोघांपैकी कोणीच माझ्या बरोबर रहात नाही...इतकी वर्ष नवऱ्याचं सगळं केलं, त्याचे नातेवाईक, मुलं, स्वयंपाक, अगदी घरात कोणालाच कशाचीच कमी पडून दिली नाही पण नवऱ्याने संशय घ्यायला सुरुवात केली आणि त्रास द्यायला सुरू केला खूप वर्ष मुलं लहान आहेत म्हणून सहन केलं पण एक दिवस मरता मरता वाचले आणि तिथून निघून आले... आणि वैतागून वेगळी झाले.... माहेरचा आधार नव्हता... कारण त्यांना सुध्दा जावई सांगतोय तेच बरोबर वाटायचं.... पण माझी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी जगू म्हणून मी प्रयत्न करायचे मुलांना सगळं देण्याचा पण पुढे जाऊदे हो ही मुलं तर आत्ता ही बरोबर नाही आहेत माझ्या.....
इतक्या वर्षात माझे मित्र मैत्रिणी माझं आयुष्य यातून मी पूर्ण ब्रेक घेतला होता. आता कुठे गेल्या वर्षभरात माझ्या बॅच चे ४/५ जुन्या मित्र मैत्रिणींशी पुन्हा एकदा संपर्क साधायला सुरुवात केली आहे.... पण मला ना मॅडम भीती वाटते आता पुढे काय मी एकटी कशी राहू, मी financially independent आहे.... एवढंच काय तर मुलांसाठी सुद्धा काही savings केलेली आहेत....माझी मुलं माझ्याबरोबर राहतील का, काहीच कळत नाहीये.... आणि.... आणि...... त्यांचा थोडा गोंधळ वाढलेला पाहून म्हणलं जे वाटतंय ते नि:संकोचपणे बोला.... मगाशी सांगितल्या प्रमाणे हे फक्त आपल्या दोघींमध्ये राहणार आहे....मग थोडी अडखळत म्हणाली....आता मी कुठल्या पार्टनर चा विचार करणं योग्य नाहीये ना ? केलाच तर मुलं याकडे काय दृष्टीने बघतील माहीत नाही.... परत लग्न करणं आणि त्या जबाबदाऱ्या वगैरे पार पाडण्याची ताकद संपली आहे. पण नुसतंच कोणाची तरी साथ हवी म्हणून राहणं कितपत योग्य आहे, समाज काय म्हणेल? एकदा वाटतं हे असले विचारच मनात नाही आले पाहिजेत पण एखाद वेळी २-३ दिवस मुलं फिरकतच नाहीत माझ्याकडे तेव्हा घर खायला उठतं... काही कळत नाहीये काय करू....
कोणाला काय वाटतं आहे, कोणी मला स्वीकारेल की नाही, लग्न करावं की तसच राहावं वगैरे विचार करण्याआधी मी त्यांना काही exercise दिले हा विचार करण्यासाठी की त्यांना भविष्यातल्या एकटेपणाच्या भीती मुळे पार्टनर हवा आहे असं वाटतंय की आत्ता मुलं मुलांच्या आयुष्यात busy आहेत कामात स्वतःला गुंतवूनही घरी आल्यावर कोणीतरी हवं ही गरज जास्त आहे, मुलं किंमत, प्रेम, आदर देत नाहीत म्हणून किंमत देणारं कोणीतरी हवं आहे की आधी मी मला स्वतःला प्रेम, किंमत, आदर देणं गरजेचं आहे... कोणीतरी मला स्वीकारण्यासाठी मी स्वतःला स्वीकारलं आहे का?... थेरपी सेशन्स जसे जसे पुढे जात होते तसतसा मंदिराचा आत्मविश्वास वाढत होता.. त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, gym join केली, मित्रमैत्रिणींना भेटणं वाढवलं... मुलांच्या गरजेला त्या आजही हजर आहेतच पण पूर्वीसारखं मुलांनी मला सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे प्रत्येक क्षुल्लक आणि विनाकारण हट्ट पुरवणे त्यांनी कमी केलं ... मुलांनी बोलावलं की त्या पूर्वी हातातली सगळी काम सोडून जायच्या त्यात थोडा बदल करून आत्ता मी करतीये ते काम किती महत्वाचं आहे हे ठरवून मग जायला सुरुवात केली.... त्याचबरबरीने खूप वर्षांपासून त्यांना एक कोर्स करायचा होता त्याच्या entrance च्या तयारीला सुरुवात केली... पहिल्या attempt मध्ये admission नाही मिळाली पण दुसऱ्या attempt मध्ये क्लिअर झाल्या आणि admission घेऊन पेढे द्यायला त्या आज माझ्या क्लिनिक ला आल्या होत्या.... इतकचं नाही तर इतर कोणी बरोबर यायला तयार नाही म्हणून सोलो ट्रीपही करून आल्या... आमचं शेवटचं सेशन होऊन बरेच महिने झाले होते... पार्टनर हवा की नको, लग्न करून की live in मध्ये, हवा तर कसा हवा यासाठी आता त्यांना माझ्या मदतीची गरज नव्हती...आता मंदिरा स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या... बोलता बोलता त्याचं म्हणाल्या नेहा मॅडम हे सगळं जर मी वर्षभरात करू शकले तर मी का इतकी वर्ष का थांबले होते आणि कोणासाठी?
खरंच तो प्रश्न किती योग्य होता.... मी तर फक्त त्यांना मार्ग शोधण्यासाठी मदत केली होती....विचार करणं, निर्णय घेणं, आपल्या निर्णयाची जबाबदारी घेणं हे सगळं तर त्यांनीच केलं होतं.....प्रत्येक वेळी स्वतःचा विचार करण्यासाठी आपल्याला काहीतरी कारण का हवं असतं.... का काहीतरी झाल्यानंतरच आपण स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करतो? आपल्या मध्ये असणारी strength शोधण्यासाठी आपण नेहमीच त्या शेवटच्या क्षणाची वाट का पाहतो?? एखादं toxic Relation, कामाच्या ठिकाणी होणारी गळचेपी किंवा इतर काहीही... नेहमीच आपल्यावर व्यक्त किंवा अव्यक्तरित्या दबाव आणणाऱ्या लोकंच्या मतानुसार स्वतःच्या आयुष्याची गणितं बदलणे आपण कमी करायला हवं... इतरांबरोबर स्वतःकडे सुध्दा थोडं लक्ष द्यायला हवं.. एखादा छंद जोपासायला हवा... दिवसातला थोडासा वेळ स्वतःसाठी काढायला हवा... आवडती गाणी ऐकणे, पुस्तकं वाचणे, बागकाम करणे, ड्रॉइंग किंवा स्केचिंग करणे, मित्रमैत्रिणींना भेटणे, रोजचा थोडा व्यायाम करण्याबाबत स्वतःशी ठाम राहणे, कधीतरी पिक्चर बघायला जाणे, कधीतरी स्वतःला आवडतो म्हणून एखादा पदार्थ करून खाणे, निवांत गॅलरी मध्ये बसून कॉफी घेणे, अगदी पेपर वाचण्यासाठी रोजची १५ मिनिटे काढणे... थोडक्यात आपण स्वतःच स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा बदलणे... थोडीशी इच्छाशक्ती.... थोडेसे स्वतःसाठी घेतलेले कष्ट आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं की या गोष्टी वाटतात तितक्या अवघड नक्कीच नाहीत... फक्त एकदा प्रयत्न करून बघायला हवा... मग बघा आपल्याला आपली strength शोधण्यासाठी संकटाची गरज नाही भासणार ....

नेहा पेंडसे किल्लेदार
MA (Clinical Psychology, SPPU), PG Diploma in Clinical & Counselling Psychology SPPU

समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
माईंडफ्लो मेंटल हेल्थ केअर्स, पुणे
9405262066/9923040201

• लेखातील नावे बदलेली आहेत.
• लेख नावसहित शेअर करण्यास हरकत नाही

27/04/2025

मधला वेळ आणि मनन

परवा एका मित्राशी पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रोडवर जो नो vehicle zone केला होता याबाबत चर्चा करत होतो. एकूणच सगळी मुलं मोठी माणसं सगळेच कसे enjoy करत होते हे तो सांगत होता... आणि मध्येच म्हणाला की तुला माहितीये का त्या LIC च्या बिल्डींग च्या इथे तो एक जुना बोर्ड आहे आणि खूप जुना आहे आपण एवढ्या वेळा जातो त्या रस्त्यावरून मला पुण्यात येऊन ६/७ वर्ष झाली पण मी तो आज पाहिला.. मला कळलं नाही की हा असं का सांगतोय बोर्ड आहे जुना तो पहिला त्यात काय ते एवढं... तर तो म्हणाला की मी आज battery low असल्याने माझा फोन घरी charging ला लावून मग बाहेर पडलो... आणि या बोर्ड सारख्या अजूनही काही गोष्टी मला जाणवल्या कारण इतके दिवस आधी मी कधी त्या इतक्या clearly पाहिल्याचं नव्हत्या..... फोन नसल्याने माझं लक्ष गेलं आणि मी ते notice करू शकलो....
त्याच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की आपण फोनमध्ये इतके अडकून गेलोय की निरीक्षण हा घटकच नाहीसा झाला आहे. आणि त्यामुळे आपण सारखं स्वतःला मी किती busy आहे हे सांगत राहतो... नाही हो वेळच होत नाही... इतकं सुरू असतं ना दिवसभर काय काय... काय सांगू तुम्हाला..... पण खरंच असं असतं का? अगदी दोन मिनिटं सुद्धा रिकामी मिळत नाहीत का? आणि जेव्हा मिळतात त्यात आपण काय करतो???? बऱ्याचदा फोन हातात घेऊन social networking sites, games, photos, videos, कधी कधी तर अगदी नुसतं wallpaper बघत असतो....
पण पूर्वी म्हणजे साधारण १५-२० वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. त्याकाळी हा फोन नव्हता तेव्हा लोक काय करत असतील? त्याकाळी लोकांकडे वेळही असायचा हे वाक्य तर आपण इतक्या वेळा ऐकतो..... पण तो दोन गोष्टींच्या मधला वेळ त्यांना कसा मिळायचा? तर हा मधला वेळ म्हणजे बस स्टॉप वर उभा असताना बस येईपर्यंतचा, Hotel मध्ये order येईपर्यंतचा, भेटीच्या ठिकाणी समोरचा माणूस येईपर्यंतचा, भात शिजेपर्यंतचा, कॉलेजात शिक्षक येईपर्यंतचा, टीव्हीवर एखादा Program संपुन दुसरा सुरू होईपर्यंतचा किंवा डॉक्टरांच्या waiting room मध्ये आपल्या नंबराची वाट बघेपर्यंतचा वगैरे वगैरे.... हा जो काही मधला वेळ आपल्याला मिळायचा त्यात आपण फोन नसताना काय करायचो??
खूप विचारांती माझ्या असं लक्षात आलं की साधारण आपण दिवसभरात जी कामं करणार असू त्याचा विचार, घरात कोण काय बोललं त्यावरून कोणाला काय हवंय याचा विचार, मध्येच एखाद्या जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण येऊन तिचं काय चाललं असेल ती ख्यालीखुशाली पत्र लिहून विचारली पाहिजे अशी एक आठवण, आपल्या हातून एखादी चूक घडली असेल तर कारणमीमांसा करून चूक सुधारण्यासाठी process, अर्थिक गणिताची जुळवाजुळव, घरगुती कार्यक्रमाचे नियोजन, वर्तमानपत्र, मासिक वाचणं/चाळणं, गॅलरीत उभं राहून झाडं पक्षी बघणं, आजूबाजूला असणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यांचा पेहराव, सामान, गाड्यांचं निरीक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वसंवाद.... म्हणजे या सगळ्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांवर आपल्या मनात उमटणारे प्रतिसाद.....अशा असंख्य गोष्टी मुकेपणाने त्या एकट्याच्या मधल्या वेळेत चालत असायच्या..
पण आज Online, Quick, Instant या सगळ्याच्या नादात आपण हा मधला वेळ हरवून बसलोय का ? म्हणजे आवडतात म्हणून आणि इच्छा झाली म्हणून आपण गाणी ऐकतो की सवय म्हणून पटकन headphones लावून गाणी आपोआप चालू केली जातात ? गरज आहे म्हणून आपण मोबाईल बाहेर काढतो की आपोआप तो बाहेर येतोच आणि आपसूक सवयीने FB, Insta check केलं जातं ? काहीच नवीन नसेल तर हा Group open कर, त्याचं Profile check, हा इकडे गेला होता, बरंय यांना बऱ्या मिळतात रजा फिरायला वगैरे विचार करत राहतो... आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचा प्रश्न असा की त्यातून आपल्याला काय मिळतं??? लोकांचे प्रोफाईल check करणं, तासनतास reels बघत बसणं, नुसतं उभं राहिलं की फोन काढून unlock करून messages, phones आले आहेत का चेक करणं.... यातून "आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन" मात्र निसटून चाललंय... आणि आपल्या ते लक्षातही येत नाहीये.... त्यामुळे उघडा डोळे बघा नीट.... कामाच्या मधल्या 5/10 मिनिटात फोन न बघण्याचा प्रयत्न करा... आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करा... एखाद्या collegue ला compliment द्या... उगाचच signal वर थांबलेल्या गाडीवरच्या माणसांकडे बघा.... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळ नाहीये वेळ नाहीये हे स्वतःला आणि इतरांना ऐकवण्याआधी कटाक्षाने मी माझा मधला वेळ किती आणि कुठे घालवतोय हे पहा.... मग वेळ कधी कुठे कसा जातोय.. याचा प्रश्न पडणार नाही....

नेहा किल्लेदार
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mindflow Mental Health Cares
M.A. Clinical Psychology,
PG Diploma in Clinical and counseling Psychology
8149049660, 9923040201

तुलना , स्पर्धा आणि नातीसचिन, वय वर्ष ३०, विवाहित. लग्न होऊन दोन वर्ष झालेली पण बरोबरीने भांडणं पण सुरूच होती. भांडणांची...
06/04/2025

तुलना , स्पर्धा आणि नाती

सचिन, वय वर्ष ३०, विवाहित. लग्न होऊन दोन वर्ष झालेली पण बरोबरीने भांडणं पण सुरूच होती. भांडणांची कारणं खूप होती पण सगळयात महत्वाचं कारण होतं की बायकोची तक्रार....आठवड्यातून एकदा candle light dinner, तू माझे photos post करत नाहीस, आपल्याकडे कार नाही, तू मला छान छान gifts देत नाहीस, माझ्यासाठी flowers घेऊन येत नाहीस... तू मला surprises देत नाहीस. तू मला वेळ च देत नाहीस... आपण कुठे फिरायला जात नाही.... तुझे मित्र कसे outing ला जातात प्रत्येक weekend ला आपण कुठेच जात नाही.... आता तुम्ही सांगा दोघांची कामाची schedule, दोघांच्या घरचे, रोजची घरातली बाहेरची कामं हे सगळं कायम कसं जमणार???
मानसी, वय २७, विवाहित. नुकतंच लग्न झालेलं... पण ६ महिन्यातच ती वैतागली होती.... कारण नवरा Instagram वरचे reels baghto आणि तू तसं वागावं असा हट्ट करतो. त्याची कोणीतरी आवडती नायिका आहे जिच्या सारखं मी दिसावं यासाठी त्याचा हट्ट असतो.. त्याप्रकारचे कपडे, make up, ते सगळं carry करण्याचा confidence त्याला माझ्यात हवा आहे. पण हे कसं शक्य आहे मॅडम... ती नायिका त्याला आवडते तो follow करतो, माझं काहीच म्हणणं नाही... लग्न झालं म्हणजे त्याने ते बंद करावं असही माझं म्हणणं नाही पण...मी मी आहे आणि ती ती आहे.... एवढी साधी गोष्ट कळत नाही..... मुळातच ती नायिका आहे आणि मी सामान्य माणूस.... हाच किती मोठा फरक आहे.... बरं मी काही अगदी गबळी रहात नाही... कुठे कसं जायचं हा sense मला आहे... पण याच्या हट्टापायी वैतागले आहे मी....
आश्लेषा वय ३२, अविवाहीत. मला handsome, caring, charming, माझे लाड पुरवणारा, समजून घेणारा.. नवरा हवा आहे. Insta वरचे reels बघून खूप त्रास होतो.... मुलींना एवढे छान आणि sensible नवरे मिळतात... सारखं वाटतं राहतं तीला मिळू शकतो तर मला का नाही... मला भेटणारी मुलं एवढी basic का आहेत....
अमित वय ३६, विवाहित. माझी Ex girlfriend आयुष्यात खूप पुढे गेली आहे पण मी या वयातही जेवढा असायला हवा होतो तेवढा successful नाही.. आजूबाजूच्या आनंदी मित्रांकडे बघून सारखं वाटतं माझ्याकडे काहीतरी कमी आहे.. माझं काम चांगलं चाललं आहे, खाऊन पिऊन सुखी आहोत, savings आहेत, वर्षातून एखादी foreign trip करायचा प्रयत्न करतो, बायको खूपच चांगली आहे... मुलं नाहीयेत अजून.... पण आमचं नातं खूप छान आहे फक्त आधीच्या नात्यात जी intimacy होती ती इथे नाहीये असं वाटतं....
वर नमूद केलेल्या चारही केस आपण नीट वाचल्यानंतर लक्षात येईल की आपल्याकडे काहीतरी नाहीये आणि ते हवं आहे हा हट्ट त्रास, कटकट, भांडणं, दुःख तयार करतो आहे. सचिनच्या बायकोला त्यांच्या राहणीमानापेक्षा वरची पातळी हवी आहे.... मानसीच्या नवऱ्याचा त्याच्या बायकोने नायिकेसारखं दिसावं असं वाटतं... आश्लेषाला येणारी स्थळ आणि तिने imagine केलेला charming मुलगा यात प्रचंड तफावत आहे. अमित आधीच्या नात्यात एवढा अडकला आहे की आत्ताच्या नात्यामधल्या सकारात्मक गोष्टी त्याला दिसतच नाहीयेत किंवा बघायच्या नाहीयेत.
या सगळ्याचा विचार करताना असं लक्षात येतं की या सगळ्यांनी त्यांना जे हवं आहे असं वाटतंय ते दुसरीकडे कुठेतरी पाहिलं आहे, अनुभवलं आहे... आणि त्याची तुलना ते त्यांच्या वास्तवाशी करत आहेत. तुलना ही तुलनेच्या पातळीवर असेपर्यंत तिचा त्रास होत नाही पण जेव्हा ही तुलना स्पर्धेची जागा घेते तेव्हा आपण आपला आनंद हरवून बसतो.
कोणतीही स्पर्धा ही तुलनेपासून तयार होते आणि स्पर्धेचे रुप कधी घेते हे आपल्यालाही कळत नाही. मग नातं कोणतंही असो, सासू-सून, नवरा-बायको, Boss-Employee, मित्र-मैत्रिणी एकदा का नात्यात स्पर्धा आणि तुलना आली की ते नातं संपुष्टात येतं आणि फक्त स्पर्धा उरते...
तुलना ही पूर्णपणे चूक आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात होणारी तुलना नेहमीच प्रोत्साहित करते. म्हणजे बऱ्याचदा आपण मोठ्या लोकांची चरित्र वाचून, interviews ऐकून, कोणाची तरी यशोगाथा पाहून प्रेरित होतो आणि आपणही काहीतरी करावं ही ऊर्जा मिळते. पण या प्रत्येकवेळी जर आपण त्यांना करता आलं मलाच जमत नाहीये, माझ्याबरोबरचे सगळे पुढे गेले मी नाही गेलो, तिचा नवरा तिचे लाड करतो नाहीतर माझा नवरा... त्याची बायको all-rounder आहे नाहीतर आमचं एकतर office नाहीतर घर... हा विचार करत राहिलो तर फक्त दुःख आणि वेदना शिल्लक राहतील...
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून आपण काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावरच हे अवलंबून आहे की तुलना करून आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे की दुःख.... Internet हे आभासी जग आहे त्यावर दिसणाऱ्या reels मध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसणारे नवरा बायको रोज कचाकचा भांडत असतील, नायक नायिका त्या photo आणि reels मध्ये आनंदी, सुखी दिसत असले तरी त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे करावं लागतं असेल कदाचित त्यांना मनापासून हे करायचं नसेल... आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणी पुढे गेले असतील पण त्यांचाही काहीतरी struggle असेल... जो आपण बघत नाही...
तुलना करा नक्कीच करा पण समोरच्याला मिळालेलं यश बघून खचून जाण्यापेक्षा यशस्वी होण्यासाठी मी अजून काय करू शकतो हा विचार करा... आपल्या माणसांना कोणासारखं करण्यापेक्षा ती आहेत तशी स्वीकारायचा प्रयत्न करा... नात्यात problems आहेत म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा ती सुधारण्यासाठी काय करता येईल हा विचार करा... आणि सगळयात महत्वाचं आभासी जगात न राहता जे वास्तव आहे ते बघण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करा.... आणि तुमच्या आनंदची, यशाची, सुखाची गुरूकिल्ली तुम्हालाच सापडेल...

नेहा किल्लेदार
मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक
Mindflow Mental Health Cares
MA Clinical Psychology (SPPU)
PG Diploma in Clinical and Counseling Psychology (SPPU)
9405262066, 9923040201

समुपदेशकाकडे जाण्याचा पर्याय कधी निवडावा?आपल्या प्रत्येकाला असा एक मित्र किंवा मैत्रीण असते जी आपलं सगळं ऐकून घेते, गरज ...
20/03/2025

समुपदेशकाकडे जाण्याचा पर्याय कधी निवडावा?

आपल्या प्रत्येकाला असा एक मित्र किंवा मैत्रीण असते जी आपलं सगळं ऐकून घेते, गरज असेल तेव्हा सल्ला देते, आपण खचलो तर उभं राहायला मदत करते, आणि त्यांची ही सपोर्ट सिस्टीम आपल्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते. पण कधी कधी आयुष्यातल्या काही समस्या त्या मित्राच्या मदतीच्या पलीकडच्या असतात. त्यांनी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, आपली बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही काही समस्या सुटत नाहीत. जेव्हा व्यक्ती खूप मानसिक त्रासात असते किंवा भावनिक कल्लोळ माजलेला असतो.. अशावेळी Professional Help म्हणजेच कोणत्याही counsellor/ समुपदेशकाची मदत घेणं सोयीचं ठरतं.
उदाहरण बघूया, श्यामलाला तिच्या कामाचा अतिशय ताण होता आणि त्याचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील परिणाम होत होता, तिने ही गोष्ट तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितली, त्यांनी तिचं ऐकून घेऊन त्याप्रमाणे तिला काही उपाय सांगितले. श्यामलाने ते अंमलात आणले. तिचे मित्र त्या उपायांची मदत होते आहे ना आणि श्यामला बरी आहे ना, हे वेळोवेळी तिच्याशी बोलत होतेच. मित्रांच्या मदतीने काही काळासाठी तिची समस्या सुटली असं तिला वाटलं पण मित्रांचे उपाय, त्यांची काळजी या सगळ्यानंतरही काही दिवसांनी तिला परत त्रास होऊ लागला आणि समस्येचं मूळ कारण तसंच आहे असं तिच्या लक्षात आलं.
इथेच समुपदेशकांची मदत होऊ शकते. समुपदेशक निःपक्षपाती आणि बिनशर्त आपलं बोलणं ऐकून घेऊन आपल्याला समजून घेतात. आपल्या समस्येचे कारण शोधून काढून त्यावर उपाय शोधण्यासाठी आपली मदत करतात. समुपदेशक त्यांनी घेतलेल्या ट्रेनिंग आणि त्यांच्या अनुभवावरून तुम्हाला भावनिक गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी दिशा दाखवतात.
मित्र- मैत्रिणींशी आपला भावनिक बंध असल्याकारणाने ते आपल्याला आधार देतात पण प्रत्येक वेळी rational/ तर्कशुद्ध, व्यक्तिसापेक्ष पण तटस्थ आणि तार्किक मार्गदर्शन करू शकतीलच असं नाही. कदाचित नकळत त्यांच्याकडून कधी त्यांचे biases मध्ये येऊ शकतात किंवा कधी कधी तुमच्या समस्या सोडविण्यासाठी आणि तुमचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी गरजेचा आणि अपेक्षित असणारा वेळ आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण त्यांच्याकडे असेलच असे नाही. पण समुपदेशक तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरजेची असणारी तंत्र/strategies आणि insights विकसित करायला मदत करतात आणि त्यामुळे परिवर्तन घडवून आणणे सोपे जाते.
जेव्हा कधी कोणतीही न सुटणारी समस्या असते, तेव्हा ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित ठेऊन चालत नाही तर त्यावर योग्य तो उपाय शोधणं गरजेचं असतं. निःपक्षपाती दृष्टीकोन, उद्देशपूर्ण तंत्र, खास तुमच्यासाठी सातत्याने दिला जाणारा वेळ (dedicated time), आणि भावनिक त्रासातून मुक्त होण्यासाठी मदत होईल अशा साधनांचा (tools) योग्य तो वापर कसा करायचा हे समुपदेशक शिकवतात.
उदाहरणार्थ एखादी जखम झाली की आपण मलम लावतो आणि आपल्याला दुखण्यापासून तेवढ्यापुरता दिलासा मिळतो/ बरं वाटतं पण कधी कधी जखम खोलवर गेलेली असते आणि खपली निघाली की परत त्रास सुरू होतो तेव्हा ती जखम भरून येण्यासाठी आणि बरं होण्यासाठी आपल्याला औषध घेणं गरजेचं असतं. आणि समुपदेशक तेच करतात.
अर्थातच जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तेव्हा आपले मित्र असणारच आहेत. पण जेव्हा आपल्याला असं वाटेल की हा support असुनही काहीतरी कमी वाटतं आहे किंवा support असुनही समस्या पूर्णपणे सुटत नाही तर समुपदेशकांची मदत नक्की घ्या. आपल्या मित्रांना आपण यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या या निर्णयाला ते सुद्धा तुम्हाला support करतील. ते कमी पडतायत म्हणून नाही तर आपल्याला थोडं अधिक हवं आहे म्हणून आपण तज्ञ समुपदेशकांची मदत घेत आहोत, त्यामुळे याचं guilt बाळगू नका.... त्यासाठी लाजू नका, पुढे या मदत घ्या!

नेहा किल्लेदार
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
MindFlow Mental Health Cares, Pune
MA in Clinical and Counselling Psychology (SPPU)
PG Diploma in Clinical and Counselling Psychology (SPPU)
9405262066, 9923040201

Counsellor? Therapist? Psychiatrist??हा लेख कोणासाठी - मी Psychiatrist, Psychologist, Psychotherapist, Counsellor या सगळ...
13/03/2025

Counsellor? Therapist? Psychiatrist??

हा लेख कोणासाठी - मी Psychiatrist, Psychologist, Psychotherapist, Counsellor या सगळ्यांपैकी नेमकं कोणाकडे जाऊ असा प्रश्न पडलेल्यांसाठी आणि ज्यांना यांच्या कामातला फरक जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी...

भारतात मानसिक आरोग्याचा विचार आणि त्यासाठीची उपचार पद्धती याची सुरुवात खूप उशीरा म्हणजे खरंतर अगदी आत्ता आत्ता झाली आहे. त्यामुळं अजून या क्षेत्रातले बरेच शब्द आपण अंदाजाने वापरतो आणि ते समानार्थी आहेत असं आपल्याला वाटत असतं. उदा. Counselling आणि Therapy, Guidance आणि Counselling, Psychiatrist आणि Psychologist, Hypnotism आणि Psychotherapy वगैरे. या सगळ्यात केवळ एकच साम्य आहे की हे सगळे शब्द मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. काही वेळेस अभ्यासक्रमातील काही घटक common ही असतात पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत आणि व्याप्ती मात्र वेगवेगळी असते. या लेखात आपण ही वेगवेगळी Professions व त्यांची कामाची व्याप्ती, क्षेत्र समजून घेणार आहोत जेणेकरून वाचकांना मला कोणाकडे गेलं पाहिजे याचा निर्णय घेणे सोपे जाईल.

१. Psychaitrist (मनोविकार तज्ञ): Psychiatrist हे डॉक्टर असतात. MBBS नंतर MD in psychiatry हे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले असते. मानसिक आजाराचे निदान करून त्यावर औषधोपचार करण्याचे काम ते करतात. मानसिक आरोग्य क्षेत्रात औषधे देण्याचा अधिकार हा फक्त psychaitrist ना असतो. औषधांच्या मदतीने वर्तन नियंत्रित करणे आवश्यक असते तेंव्हा Psychiatrists ची गरज असते.

२. Clinical Psychologist : Clinical Psychologist असणाऱ्या व्यक्तीने Clinical Psychology मध्ये master's नंतर दोन वर्षांचे MPhill in Clinical Psychology हे शिक्षण घेतलेले असते. Clinical psychologist psychological Testing करतात. ज्याप्रमाणे रक्त, साखर, कॉलेस्ट्रॉल या चाचण्या lab technician करतात त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याचे निदान करण्यासाठी Clinical psychologist काही चाचण्या करून त्याचा रिपोर्ट psychaitrist ला देतात. त्या रिपोर्ट च्या मदतीने मानसिक आजाराचे काही indicators psychaitrist ना मिळतात. टेस्टिंग बरोबरच हे निरोगी व्यक्ती तसेच लक्षणे स्थिरावलेला मानसिक रोगी यांना counselling आणि therapy सुद्धा देतात. मानसिक रोग्यांचे समुपदेशन करण्याचा अधिकार हा फक्त clinical psychologist ना असतो. इतर समुपदेशक ते करू शकत नाहीत. Clinical psychologist ना Therapy, Counselling आणि psychaitry चे सुद्धा ज्ञान असते. कोणती औषधे कशासाठी वापरली जातात याची त्यांना माहिती असते पण औषधे लिहून देण्याचा अधिकार नसतो.

३. Psychiatric Social Worker : Psychiatric Social Worker म्हणून काम करण्यासाठी MSW ही पदवी घ्यावी लागते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानसिक रोग्यांबरोबर काम करता येते. बऱ्या होणाऱ्या रोग्यांशी संवाद साधून त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याचे काम हे कार्यकर्ते करतात. हॉस्पिटल मध्ये किंवा rehabilitation centers इथे हे कार्यरत असतात. रुग्णाच्या कुटुंबाला वेळोवेळी आजाराबाबत माहिती देणं, तसेच रुग्णाच्या वर्तनाचे, भावभावनांचे, संवादाचे निरीक्षण करून ते डॉक्टरांना देखील सांगतात. बऱ्या होणाऱ्या रुग्णांसाठी वेगवेगळ्या activities घेणं, आणि त्यांना प्रोत्साहनात्मक समुपदेशन करणं हे काम प्रामुख्याने ते करतात.

४. Psychotherapist (मानसोपचार तज्ञ) : Psychotherapist हे प्रामुख्याने दीर्घकालीन उपचार करतात. ज्या समस्यांचे मूळ भूतकाळात आहे किंवा ज्या समस्या अधिक जटिल असतात त्या समस्यांवर विविध उपचारपद्धती वापरून client ला मानसिक दृष्ट्या सुस्थिर करण्याचे काम करतात. मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगनिवारणाच्या उपचार पद्धती आहेत त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेऊन हे त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. Therapist मुळापर्यंत जाऊन व्यक्तिमत्वाची खोलवर माहिती घेऊन बदल घडवून आणण्यास मदत करतात. Therapist हे जुन्या मुरलेल्या भावनिक आणि मानसिक समस्यांवर भर देतात. Therapy ची प्रक्रिया दीर्घ काळ. चालणारी असते. समस्यांचे मूळ कशात आहे ते शोधून त्यावर काम केले जाते. या विविध उपचारपद्धतीमध्ये CBT, REBT, Psychoanalysis, DBT अशा वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा समावेश होतो. केवळ अशी उपचार पद्धत शिकून Psychotherapist म्हणून काही लोक काम करतात पण Master's in Clinical Psychology or counselling psychology अशी मानसशास्त्रातील दोन वर्षांची पदवी संपादन करून CBT, REBT, Psychoanalysis, DBT अशा वेगवेगळ्या उपचारपद्धती शिकून काही काळ तज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने सराव करून Psychotherapist म्हणून काम करणे फायद्याचे असते.

५. Counsellor/ Counselling Psychologist (समुपदेशक): Master in Clinical/ Counselling Psychology/ M.Sc. in Psychology ही पदवी असणारे समुपदेशक/ counsellor म्हणून काम करू शकतात. Counsellor हे client कडे असणाऱ्या माहितीमधून त्यांच्या आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. Counselor हे वर्तमानात जाणवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. Counselling ची प्रक्रिया अल्पकालीन असते. वर्तमानातील समस्यांचा सामना करण्यासाठी समुपदेशनाची मदत होते. Counselor ला सुद्धा, testing, Psychotherapy, Psychaitric Disorders, medicines, याची माहिती असणे गरजेचे असते. म्हणजे वेळीच मर्यादा ओळखून संबंधित व्यक्तीला पुढे गरजेनुसार Clinical Psychologist किंवा Psychiatrist कडे refer करता येते.

हे सोडून अनेक ठिकाणी एक महिन्याचा, ३-६ महिन्यांचे counselling कोर्सेस उपलब्ध असतात पण ते करून कोणीही counsellor किंवा therapist mhanun काम करू शकत नाही. कायद्यानुसार Counsellor म्हणून काम करण्यासाठी MA in Clinical/ Counselling Psychology किंवा MSC in Clinical Psychology ही पदवी असणे बंधनकारक आहे. म्हणून कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य सेवा घेताना संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता बघणे खूप गरजेचे असते.

©नेहा किल्लेदार
मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक
MindFlow Mental Health Cares, Pune
MA Clinical Psychology (SPPU)
PG Diploma in Clinical and Counseling Psychology (SPPU)
9405262066,9923040201

प्रेमविवाह: प्रेम आणि विवाह, प्रेम की विवाहअक्षय वय वर्ष 30 उच्चशिक्षित, बिझिनेस एकहाती उत्तमरित्या सांभाळणारा, घरात एकु...
12/03/2025

प्रेमविवाह: प्रेम आणि विवाह, प्रेम की विवाह

अक्षय वय वर्ष 30 उच्चशिक्षित, बिझिनेस एकहाती उत्तमरित्या सांभाळणारा, घरात एकुलता एक असल्याने लहानपणापासून च सगळ्यांचा लाडका, हरहुन्नरी, हुशार, मनमोकळ्या स्वभावाचा... नुकतंच चार वर्षांपूर्वी लग्न झालं. बायको अस्मिताही दिसायला गोरी गोमटी, नाजूक, प्रथितयश कंपनीत उच्चपदावर काम करणारी.... घरच्यांना आवडलेली... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षयवर जीव ओळवून टाकणारी... इतकं सगळं छान सुरळीत सुरू असताना अक्षय ला माझी आठवण का यावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.....तर झालं असं की अक्षय एकदा असाच खूप व्यथित होऊन त्याच्या एका मैत्रिणीशी बोलायला गेला आणि तिने त्याला माझ्याकडे पाठवलं...
अक्षय आणि अस्मिताचं love marriage होतं... पण सध्या दोघांमध्ये सारख्या कुरबुरी सुरू होत्या. छोट्या छोट्या कारणांवरून त्या दोघांमध्ये मोठमोठी भांडणं व्हायला लागली होती आणि आपसूकच याचा परिणाम त्यांच्या घरावर व्हायला लागला होता. एक अशांतता पसरली होती. आणि या प्रॉब्लेम वर दोघांनाही तोडगा काढता येत नव्हता.. साधारण 12 वर्षांचं नातं आणि 3 वर्ष लग्नाची अशी एकूण १५ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते... पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी पडत होत. आणि आपण प्रेम करत होतो ती नक्की हीच व्यक्ती का ? असा त्यांना प्रश्न पडत होता.... तुम्हाला आम्हाला वाटेल की वाद कोणत्या नवराबायको मध्ये होत नाहीत... त्यात एवढं ते अगदी counsellor पर्यंत जाण्यासारखं काय आहे... नाही ती कौतुकं नुसती...
पण त्या दोघांच्या जागी जाऊन याचा विचार केला तर १५ वर्ष एकमेकांना ओळखून पण ते अनोळखी आहेत की काय असं वाटत होतं त्यांना.. त्यांचा प्रॉब्लेम अजून थोडा समजून घेण्यासाठी मी काही प्रश्न विचारले की नक्की काय प्रॉब्लेम होतोय त्यावर अक्षय म्हणाला की तिला मला समजूनच घ्यायचं नसतं... सारखी लहानसहान गोष्टीसाठी हट्ट धरायचा.... आज तू जेवायलाच नाही आलास, मग पिच कलर चा कुर्ताच का आणला light green का नाही आणला, मग आईबाबांबरोबर च का जातोस सारखा, मला वेळच देत नाहीस, सांगून च बाहेर जात नाहीस, माझ्यापासून पैशांचे व्यवहार लपतोस, मित्रांबरोबरच फिरत असतोस... जबाबदारी म्हणून नाही तुला, तुझी बहीण सारखीच आपल्या बरोबर का येते... आणि मग पेटंट डायलॉग असतोच की लग्नानंतर तू बदलला आहेस... माझी किंमतच नाहीये.... आधी कसा वेळ होता आता कसा नाहीये..... अगदी वैतागलोय मी... म्हणजे मी अगदी पूर्ण बरोबर आहे असं नाही... पण म्हणून पूर्ण चूक माझीच नाहीये ना... म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की ती हे प्रॉब्लेम मुद्दाम शोधून काढते... आता मला सांगा मला २४ तास हिच्याबरोबर कसं राहू मी? आणि इतक्या वर्ष काही गोष्टी करत आलोय, मित्रांसाठी, घरासाठी, बहिणीसाठी अशा कशा सोडून देऊ अचानक??? आणि हीच म्हणायची तुझं हे असं सगळ्यांसाठी धावून जाणं च प्रेमात पडायला भाग पाडतं मला आणि मग आता काय आटले प्रेम?? आणला कधीतरी मी माझ्या चॉईस ने कुर्ता तर माझ्यासाठी घालू शकतेच ना ती?? आणि मग असं झालं की मी अजूनच मुद्दामहून ती predict करते तसं वागतो.... आजकाल तर मला वाटतं लग्न करून चूक केली की काय हिच्याशी...
त्याच पूर्ण ऐकून घेऊन मी त्याला विचारलं की लग्नाआधीची १२ वर्ष तीने अजिबातच हट्ट केला नाही आणि अचानक करतेय असं वाटतंय का तुला? किंवा लग्नाआधी कधीच ती असं म्हणाली नाही की मला फक्त तू हवा आहेस... सगळ्यांबरोबर काय भेटायचं आपण दोघंच भेटू कधीतरी.... त्यावर तो म्हणाला हो ती हे म्हणायची बऱ्याचदा मग आम्ही प्लॅन च तसा करायचो आठवड्यातली एक संध्याकाळ फक्त आमच्या दोघांची असायची... बाकी दिवस आम्ही सगळ्यांबरोबर असायचो... आणि म्हणलं हट्टाबाबतीत काही आठवतंय??? मग म्हणाला हो तशी हट्टी होतीच ती लहानपणापासून तिची आई पण सांगते ना... पण मला वाटायचं लहान आहे, अल्लड आहे, लाडात वाढलीये जबाबदारी पडली की होईल बदल हळू हळू पण नाहीच हो... पण मग तू तेव्हा तिचे हट्ट कसे पुरवायचास? म्हणाला सगळ्या गोष्टी manage करून... काही पुरवायचो कधी कधी अति होतंय हे समाजवायचो.... मग मी त्याला म्हणलं या सगळ्याचा तू खोलवर विचार करायचा म्हणालास तर ती आणि तू दोघंही तसेच आहात... थोडाफार वयानुसार झालेला बदल सोडला तर तुमचा मूळ स्वभाव तोच आहे आणि पूर्वी ज्या गोष्टी फक्त तुमच्या दोघांच्या होत्या त्यात आता काही फॅक्टर्स add झाले आहेत त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणं जरा जड जातंय, असं काहीसं होतंय का? म्हणाला हो खरंच की मॅम ती तशीच आहे आधीपासूनच लग्न झालं की बदलेल हळू हळू हे मला वाटतं होतं... पण तिने बदलावं असं वाटतं हेही मी तिला सांगितलं नाहीये..... म्हणलं म्हणजे कुठेतरी तुम्ही एकमेकांना गृहीत धरून चालला होतात की थोड्या वर्षांनी ही बदलेल किंवा हा बदलेल... पण प्रत्यक्षात आत्ता तसं होत नाहीये म्हणून तुमची भांडणं होतायत.... एकमेकांना काय अपेक्षित असेल हे तुम्ही एकमेकांना विचारात न घेता तुमच्या दृष्टिकोनातून करायचा प्रयत्न करत आहात आणि मग खऱ्या अपेक्षा बाजूलाच राहतायत.... अशा अजून बऱ्याच गोष्टी अक्षय च्या लक्षात आल्या आणि त्याला कळलं की माणूस चूक नाहीये आपल्या दोघांना प्रेम आणि लग्न यामधील transition जमत नाहीये.
कधी कधी प्रेम आणि लग्न या स्थित्यंतरामध्ये आपण आपल्या पार्टनर ला गृहीत धरतो... आणि मग प्रेमात जो स्वभाव गोड, किंवा डॅशिंग वाटत असतो त्याच्याशीच प्रॉब्लेम वाटायला लागतो... कधी कधी आपल्याला आपल्या पार्टनरचे negative पॉईंट्स बघायचेच नसतात...किंबहुना बघूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो... आपल्याला वाटतं की तो नंतर बदलेल... पण ही आपली न बोलून दाखवलेली ईच्छा असते आणि हे समजून घेऊन त्याने/ तिने बदलावं ही अपेक्षा असते... त्याच्या/तिच्या अपेक्षांचा विचार आपण आपल्या दृष्टिकोनातून करत असतो..... ZNMD मधल्या डायलॉगचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.. कल्की अभयला म्हणते.... शादी के बाद थोडेना तुम ऐसें boys ट्रिप पे जाना पसंद करोगे.... असंच काहीसं आपलंही होतं... आणि इकडे खरी सुरवात होते नात्यामध्ये गडबड व्हायला. मग कोणीतरी एकच जण चरफडत अपेक्षा पूर्ण करत राहतो... आणि ओझ्याखाली दबून जातो.. किंवा कोणाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही आणि भांडण होत राहतात... आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि एक छान हेल्दी नातं दुःखद शेवटाकडे जायला लागतं...
आणि आपण हिच्या आईवडिलांना सांग, त्याच्या बहिणीकडे तक्रार कर, मित्राकडे मन मोकळं कर असं करत हे छोटे छोटे वाद निकोपाला जातात.. यासगळ्याच solution एका छोट्याश्या गोष्टीत असतं... पण ते सोडून आपण मात्र बाकी सगळं करत असतो... ते म्हणजे संवाद... म्हणून एकमेकांशी संवाद साधा.. एकमेकांबद्दल च्या अपेक्षा clearly सांगा... कोणत्या गोष्टी तुम्ही स्वीकारू शकता कोणत्या अजिबातच स्वीकारता येणं शक्य नाही याबद्दल बोला... वाद/ मतभेद हे प्रत्येक जोडप्यामध्ये होतात पण आपल्यासाठी वाद महत्वाचा आहे की माणूस हा विचार करण्याचा प्रयत्न करा... चिडलेल्या अवस्थेत हे शक्य नाही पण शांत झाल्यावर आपल्या पार्टनर ची बाजू ऐकून घ्यायचा प्रयत्न करा...
प्रत्येकाला हे लागू होईलच असं नाही काही नाती याला अपवाद असूच शकतात पण जिथे शक्य आहे तिथे आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो ना... नाहीतर या मॅरेज मधून लव्ह निघून जातं आणि ते दोघे जगासाठी फक्त एक विवाहित जोडपं/ married couple म्हणून जगायला लागतात....

नेहा किल्लेदार
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
MA in Clinical Psychology (SPPU)
PG Diploma in Clinical and Counselling Psychology (SPPU)
माईंडफ्लो मेंटल हेल्थ केअर्स
9923040201 , 094052 62066

Address

Flat Number 1, Rokade Heights, Besides Automatic Suzuki Showroom Paud Road, Pune 38
Pune
411038

Telephone

+919923040201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mindflow posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mindflow:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram