03/02/2026
प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् -
प्रयत्न – अवयवांची विशिष्ट हालचाल करण्यासाठी तसेच त्यांना स्थीर ठेवण्याकरता केलेले प्रयत्न, शैथिल्य - या वृत्तीला आवर घालणे आणि अनंत समापत्ती - माझे अस्तित्व फक्त या दृष्य देहापुरते नसून ते अनंत ब्रह्मांडरूप आहे असे चिंतन करणे.
आपण जेंव्हा प्राणायाम किंवा धारणा करण्याकरता सरळ बसतो तेंव्हा गुडघे जमिनिकडे ढकलून, पाठीचा कणा सरळ ठेवण्याकरता विशेष ताकद वापरावी लागते म्हणजेच प्रयत्न करावा लागतो. तसे बसणे ही आपली सहज प्रवृत्ती नसते. एखादी नृत्य मुद्रा करताना, ती अर्थपूर्ण आणि प्रभावी करण्याकरता शरीराच्या सामान्य स्थितीपेक्षा विशेष प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारच्या हालचालीत शरीराची सहज प्रवृत्ती सोडून त्याला काहीसे बांधून घातल्यासारखे किंवा विशिष्ट स्नायू आवळून धरुन ती हालचाल करावी लागते. उदा – पळायचे झाले तर कंबर, खांदे, पोट येथील स्नायू किंचित का होईना आवळून धरावे लागतात. चित्र रंगवणे, चेकवर सही करणे, रांगोळी काढणे, शस्त्रक्रिया करणे किंवा तत्सम कलात्मक कामे करताना, शरीराचे अन्य स्नायू किंचित आवळून स्थीर करुन धरावे लागतात; व त्यावेळी हात, डोळे, ओठ इ. स्नायू नियंत्रितपणे वापरावे लागतात.
थोडक्यात मनासह, स्नायू व अंतर्गत अवयवांना विशिष्ट प्रकारे आकुंचित करुन धरणे या प्रक्रियेला प्रयत्न म्हणता येईल.
शैथिल्य - अशाप्रकारचे प्रयत्न करणे सोडून देणे म्हणजे शैथिल्य होय. उदा आपण टि. व्ही पाहताना किंवा मित्रांशी गप्पा मारताना बसलेले असतो, तेंव्हा असे मनाला आणि स्नायूंना आवरण्याचे प्रयत्न करत नाही. त्याप्रमाणे प्राणायामाकरता किंवा धारणेकरता बसतानाही प्रयत्न न करता सहज बसावे. असे पतंजलींचे म्हणणे आहे.
विशेष टीपः प्रत्यक्षात मात्र ना पूर्ण शिथिलीकरण करुन चालत ना पूर्ण आवर घालून चालत, दोन्हीचा समतोल करावा लागतो आणि तरच योगातील पुढील अंगांचा म्हणजे प्राणायाम व धारणा सराव करणे सोपे होते.
आता हे अनंतावर ध्यान करणे म्हणजे काय व त्याचा आसनाशी काय संबध? याबाबत असे म्हणता येईल की, शरीर-मनाच्या स्तरावरच्या अडचणींकडे लक्ष गेले की त्यांची तीव्रता जास्त जाणवते व त्यांना स्थिर करणे कठीण होते. अशावेळी अनंतावर ध्यान म्हणजेच मोजता न येणाऱ्या विषयांवर, उदा: समुद्र, अनंत-ईश्वर, अनंत-आकाश, विश्वात असणाऱ्या अनेक सूर्यमाला, इ. विषयांवर ध्यान (एकाग्रता) केल्यास ही स्थीरता साधणे सोपे होते.
काही अभ्यासकांच्या मते, भगवान विष्णू शेषावर झोपलेले असताना, एकदा शंकरांचे नृत्य पाहण्यात दंग होते व त्यामुळे त्यांचे शरीर आनंदाने कंपित होत होते. मात्र ते पडू नयेत म्हणून शेषांनी त्यांना कसे स्थीर ठेवले याचे ध्यान करावे.