14/11/2023
*दिवाळीला अभ्यंगस्नान का केले जाते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…..*
दीपावली; ज्याला दिवाळी, असेही म्हटला जाणारा हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला दिवाळीचा फराळ, मिठाई आणि फटाके आठवतात. पण, यात आणखी एक गोष्ट अशी आहे; जी दिवाळीमध्ये आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान. दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून, मग अंघोळ केली जाते आणि त्यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला फार महत्त्व आहे. त्याला गंगा स्नान, थैला स्नान असेही म्हणतात.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी सांगतात, “शारीरिक स्वच्छतेसह हे शरीर आणि आत्म्याचे आध्यात्मिक शुद्धीकरण करते. सामान्यत: दीपावलीच्या दिवशी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून नवीन दिवसाची सुरुवात केली जाते.”
अभ्यंगस्नान कसे करावे?
ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी सांगितले, “अभ्यंगस्नानाची सुरुवात सूर्योदय होण्यापूर्वी लवकरात लवकर उठून होते; जे पवित्र मनाने आणि भक्तिभावाने उत्सवाचे प्रतीकात्मक स्वागत केल्याचे दर्शवते. सर्वसाधारणपणे कुटुंबाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली या विधीमध्ये बहुतेक कुटुंबांतील सर्व सदस्यांचा सहभाग असतो.”
अभ्यंगस्नानासाठी उपचारात्मक तीळ तेल
अभ्यंगस्नानासाठीच्या तेलात कोणते घटक एकत्र करतात आणि स्नानापूर्वी प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट करताना जगन्नाथ गुरुजी म्हणाले, “तिळाचे तेल हे त्याच्या उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. सामान्यतः आंघोळीसाठी ते वापरले जाते. कधी कधी चंदनाची उटी, लवंग किंवा हळद यांसारखे सुगंधी घटक त्यांच्या शुद्धीकरणाच्या गुणधर्मांसाठी तेलात एकत्र केले जातात. तेल लावण्यापूर्वी एक समृद्ध सुरुवात करण्यासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते.
शुद्धीकरणाची पायरी
अभ्यंगस्नानाने आपल्या शरीराचे शुद्धीकरण कसे होते ते विशद करून, जगन्नाथ गुरुजी यांनी सांगितले, “गरम केलेल्या तेलाने शरीरावर हळुवारपणे मालिश केले जाते; ज्यामुळे तेल आणि औषधी वनस्पतींचे शरीराला बरे करण्याचे गुणधर्म त्वचेमध्ये प्रवेश करतात. तेल लावल्यानंतर उटणे किंवा नैसर्गिक साबण वापरून कोमट पाण्याने स्नान केल्यावर ही प्रथा पूर्ण होते. शरीरातील जास्तीचे तेल आणि कोणतीही अशुद्धता काढून टाकण्यासाठी ही शुद्धीकरणाची पायरी आवश्यक आहे; ज्यामुळे एखाद्याला ताजेतवाने व टवटवीत वाटेल.”
स्नायूंना आराम अन् शरीराला चैतन्य सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्येदेखील सांगितले की, “गरम पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी शरीराला तीळ तेल आणि औषधी वनस्पतींचे तेल लावले जाते. कारण- ते हिवाळ्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, वात कमी करणे आणि त्वचेला चांगले पोषण देते. शिवाय गरम तेल आणि गरम पाण्याच्या अंघोळीमुळे मिळणाऱ्या उबदारपणाने रक्ताभिसरण वाढवते, स्नायूंना आराम देते आणि शरीराला चैतन्य देते”
*मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटर अक्युपंक्चर (Acupuncture) आणि निसर्गोपचार (Naturopathy) डॉ. संतोष पांडे यांनी अभ्यंगस्नानाचे खालील फायदे नोंदवले आहेत...*
*१) त्वचेला ओलावा...*
उबदार तेल त्वचेमध्ये प्रवेश करते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. विशेषत: हिवाळ्यात जेव्हा त्वचा कोरडी आणि रुक्ष होते तेव्हा त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास यामुळे मदत होते.
*२) रक्ताभिसरणात वाढ...*
कोमट तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते; ज्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. चांगले रक्ताभिसरण म्हणजे त्वचेच्या पेशींना पोषक असा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारणे.
*३) अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत...*
नियमित तेल लावून अंघोळ केल्याने त्वचेला चांगले पोषण मिळते आणि लवचिकता वाढवून वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
*४) नैसर्गिक तेज...*
या विधीमध्ये वापरण्यात येणारे तेल हे बहुतेक वेळा तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांसह तयार केलेले असते; जे त्वचेला नैसर्गिक तेज देण्यास मदत करते.
*५) आराम मिळतो...* अभ्यंगस्नानाने शारीरिक फायदे मिळण्यासह मानसिक विश्रांतीही मिळते. तसेच या स्नानाने तणाव कमी होऊन, मन शांत होते आणि निरोगीपणाची भावना वाढते.
प्रत्येक जण ही प्रथा पाळत नाही; पण या सर्व प्रथा आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहेत.
*कुमार चोप्रा*
*सुनील इनामदार,*
🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹
*(कॉपी पेस्ट)*