27/09/2023
पावसाळी आजारपणं! … Monsoon fever!!
नमस्कार शेतकरी बांधवांनो!
पावसाळा सुरू होऊन जवळ जवळ 3 महिने होत आलेत. पण आपल्या भागात यावर्षी मात्र पाऊस उशीराने सुरु झालाय. पावसाच्या आगमणाने शेतकरी राजा व संपूर्ण बाजारपेठा सुखावल्या आहेत. परंतु आनंदाप्रमाणेच पावसा मागुन दबक्या पावलांनी चालत येतात ते म्हणजे “पावसाळी आजारपणं!.”
पावसाळ्यात वातावरणात बदल होऊन दमट वातावरण तयार होते. आणि हे वातावरण डास,पिसवा सारख्या किटकांच्या वाढीस पोषक असते. डास पिसवांपासुन मलेरिया, डेंग्यू, चिकणगुण्या, गोचिडताप अशा गंभीर आजारांचा प्रसार होतो.
पावसाळ्यातील ओलावा व दमटपणामुळे बऱ्याचदा घरातील भिंतींवर / झाडावर बुरशी वाढते. अशा बुरशीचे हवेत तरंगणारे कण (fungal spores) हे अस्थमा किंवा जुनाट श्वसनाचे आजार, अॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना घातक ठरु शकतात.
पावसाळ्यात दुषित पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांमधे ही वाढ होते. उदा., गॅस्ट्रो, हिपटायटीस A,E, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कॉलेरा .तसेच पावसाळ्यात हवेची आद्रता सारखी बदलत असते. त्याचा घातक परीणाम दम्याच्या रुग्णांवर होत असतो.
अशाप्रकारे पावसाळ्यात आजारपणामुळे शारीरीक नुकसान तर होतेच पण गंभीर आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे आपण सर्वानींच सामूहिक पणे काही काळजी घेणे गरजेचे आहे
उदा.
A)डास /किटक प्रतिबंधक उपाय:
1. आपल्या परीसरात डास, माशा ह्यांच्या वाढीस पोषक असणारे डबके, साचलेल्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे.
2. घरात अडगळ किंवा आजुबाजुच्या परीसरात ओलावा होऊ न देणे.अडगळ व ओलाव्या मुळे किटक आकर्षित होतात.
3. डेंगुचा डास (एडिस एजिप्टी ) हा दिवसा चावतो. त्यामुळे शक्यतो दिवसा लांब बाह्यांचे कपडे वापरावेत.
4. रात्री झोपताना मच्छरदानीचा वापर करावा.
5. सायंकाळी दारे खिडक्या बंद करावेत जेणेकरून डास घरात येणार नाहीत.
6. पाणी साचण्याची ठिकाणे नष्ट करणे शक्य नसल्यास यात डासांच्या अळ्यांना खाणारे गप्पी मासे सोडावेत.
7. छतावरील पाण्याच्या टाक्या/ गोठ्यातील जनावरांसाठीच्या पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकून ठेवाव्या .जेणेकरून त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही.
B)दूषित पाण्याद्वारे पसरणार्या आजारांचा प्रतिबंध-
1. पाणी उकळून थंड करून प्यावे.
2. घरातील Aqua मशीन्स् ची नियमितपणे सर्विसिंग/तपासणी करावी.
3. कार्यक्रम / यात्रा अशा ठिकाणी पाणी पिने टाळावे.
4. जेवणापूर्वी, शौचानंतर, जनावरांच्या संबंधी काम केल्यानंतर हात सातत्याने स्वच्छ धुवावेत.
5. भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून घ्यावेत.
6. बाहेरील पदार्थ उदा. उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत.
C)दमट हवेमुळे वाढणार्या आजारांचा प्रतिबंध-
1. गार हवा/ थंडी / पावसापासून संरक्षण करण्यासाठी शक्य असेल तेथे रेनकोट/ जर्किन / स्वेटर वापरावे.
2. दम्याच्या रुग्णांनी आपले औषधी पंप/ औषधे नियमित वेळेत घ्यावेत. सर्दी /ताप आसल्यास लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. दम्याच्या रुग्णांनी विशेषत: ह्या दिवसांमधे घरात ओलावा/ बुरशीची वाढ होऊ देऊ नये. पांघरण्याचे कपडे व्यवस्थित सुकवुन घ्यावे.धूळीशी संबंध येणारी कामे टाळावीत किंवा ते करताना नियमित मास्क वापरावा (उदा. मुरघास बनवताना)
आजारपण हे फक्त शारिरीक त्रास नसुन आधीच संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणखी आर्थिक संकटास एक कारण ठरतात. त्यामुळे आपण आधीच वरील सोप्या सोप्या प्रतिबंधात्मक गोष्टी केल्यास मोठे नुकसान वाचवू शकतो.
धन्यवाद!!