30/08/2021
अति सर्वत्र वर्जयेत्
आजकाल पाणी किती प्यावे यावर खूप महाचर्चा होताना दिसते त्यासाठीच हा लेखनप्रपंच.
आपल्याला लहानपणापासून पाणी हे जीवन एव्हढेच शिकवले जाते पण पाण्याची दुसरी बाजूपण आपण बघूयात. अनेकदा आपल्याला काही गोष्टींची एकच बाजू शिकवली जाते पण त्याची दुसरी बाजू आपल्याला स्वानुभव किंवा जेष्ठांच्या अनुभवातून शिकावी लागते. कदाचीत पाण्याच्या बाबतीत पण असेच झाले असावे. सध्या दुर्देवाने काही ठिकाणी महापूर येवून गेला, त्याठिकाणच्या लोकांना पाणी मृत्यू कसा आहे, आप महाभूताची शक्ती जवळून किती आहे हे अनुभवास आले.
पाण्याचे पण वजन असते, एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरून बघा मग कळेल कि पाण्याला किती वजन असते ते. पाण्याचे पण पचन (digestion) व्हावे लागते ही संकल्पना अनेक मोठमोठ्या लोकांच्या डोक्यात पण येत नाही. अनेकदा लोकांना असे वाटते कि आपण वरून पाणी पिले कि ते लगेच लघवीतून बाहेर पडते. आपल्या शरीरात एका सरळ Pipe सारखे तोंड आणी लघवीची जागा थेट जोडलेली नाहीये.
मुतखड्याचे रुग्णांना पहिला (प्रेमळ ?) सल्ला दिला जातो कि पाणी भरपूर प्या. कमी पाणी पिल्यानेच तुला मुतखडा झाला असे diagnosis करून पण मोकळे होतात. त्यानिमित्ताने बिअर पण सुरु होते अनेकदा, नंतर मुतखडा राहतो लांब पण बिअर पुढे चालू राहते. 😷 खरं तर पाणी किती प्यावे हे गाढवाला पण शिकवावे लागत नाही मग माणसाला का शिकवावे लागते कि पाणी किती प्यावे ते?
आपल्या शरीरात ६४ % पाणी आहे. तसेच आपल्या आजूबाजूलाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उटांसारखे आपल्याला शरीरात पाणी साठवून ठेवण्याची आवशक्यता नसते. आपण दुष्काळी भागात देखील राहत नाही. आपण अश्या area मध्ये राहतो की जिथे कुपोषणाचे रुग्ण खूपच कमी आढळतात. उलट अनेक गोष्टी जास्तच आहेत जसे कि साखर, पाणी, Blood pressure, stress etc. अश्यावेळी प्रथमतः अतिरिक्त प्रमाणात असणाऱ्या या गोष्टी आहारातून कमी करणे महत्वाचे आहे.
भरपूर पाणी पिल्याने detoxofication होते असे अनेकांना वाटते. आपल्या शरीरात अनेक water soluble minerals आहेत, जास्त पाणी पिल्याने लघवीतून शरीरातील क्षार बाहेर पडतात व deficiency निर्माण करतात, अग्निमांद्य होते.
आयुर्वेदानुसार रोगा: सर्वेपि मंदग्नौ | म्हणजेच शरीरात जे कोणते रोग होतात ते मंद अग्नी मुळेच होतात व त्याचे पहिले लक्षण म्हणजे भूक कमी / न लागणे.
देवाने आपल्याला इंद्रिय दिलेले आहे. आपल्याला तहानेची जाणीव होते. आजकाल निसर्गाला आपल्यापेक्षा जास्त कळते का आपल्याला निसर्गापेक्षा जास्त कळते या प्रश्नाचे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बुद्धीचा अहंकार किंवा अतिरिक्त पैसा इ. अन्य कारणामुळे असेल पण आपण देखील निसर्गाचाच एक भाग आहोत याचा पुरेपूर विसर झालेला अनेक लोकांमध्ये बघायला मिळतो.
Business मध्ये ज्या प्रमाणे demand & supply वर काम केले जाते. त्याप्रमाणे शरीराला जेव्हढी तहान लागेल तेव्हढेच पाणी एकाजागी शांत बसून पिणे. पिताना भांड्याला तोंड लावून, चूळ भरल्याप्रमाणे पाणी तोंडात फिरले पाहिजे व नंतर पोटात गेले पाहिजे (लाळ पाण्यात पूर्णपणे मिसळली पाहिजे.) गटागटा वरून पाणी एकदम कधीच पिऊ नये.
दररोज भरपूर पाणी प्या ही विदेशी खुळचट संकल्पना आहे. तो प्रदेश वर्षातील अनेक महिने थंड असतो. त्याठिकाणची लोकांची पाण्याची गरजच पूर्ण वेगळी आहे तसेच तिकडच्या लोकांचे खाण्याचे पदार्थ जर तुम्ही बारकाईने बघितले तर तुमच्या लक्षात येईल कि ते कोरडे पदार्थ जास्त खातात जसे कि pizza, burger n all त्यामुळे त्या लोकांना ठरवून पाणी प्यावे लागते. अन्न गिळण्यासाठी निश्चितच पाण्याची आवश्यकता असते. पण विदेशी म्हणजे भारी असे अनेकांना वाटते.
आपल्याकडील संस्कृतीतील जेवणामध्ये पाणी असलेले खूप पदार्थ असतात जसे कि पातळ भाजी, आमटी, ताक, कोशिंबीर इ. तांदूळ पण पाण्यात शिजला कि त्याचा भात होतो. आपला भारत हा विषुवृत्ताजवळचा उष्ण कटिबंधातील देश आहे. इथे आपल्याला असाच घाम येतो. त्यामुळे आपल्याला दिवसाला असे ठरवून ४-५ litres पाणी पिण्याची काहीच आवश्यकता नसते. प्रत्येकाची दैनंदिन जीवनशैली, बाहेरचे वातावरण, पूर्वी झालेले आजार इ. हे वेगवेगळे असतात अर्थातच त्यामुळे प्रत्येकाची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते.
रात्रभर बंद असलेल्या gas burner वर सकाळी उठल्यानंतर पाणी टाकले आणी नंतर तो पेटवण्याचा प्रयत्न जर केला तर तो लगेच पेटेल का? तसेच आपल्या शरीरात रात्रभर अन्नाचे पचन होऊन सकाळी मल,मूत्र विसर्जन व्यवस्थित शरीराच्या बाहेर पडल्यानंतर नुकतेच कुठे पोटातला जाठराग्नी पेटत असतो अश्या वेळी त्यावर पाण्याचा भडीमार केला जातो. स्वयंपाक करताना पण पाण्याचा योग्य वापर केला तरच भोजन उत्तम प्रकारे तयार होऊ शकते.
अजिर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बल प्रदम |
भोजने च अमृतं वारी भोजनान्ते विष प्रदम ||
अजीर्ण म्हणजे अन्न नीट पचले नसेल तर (कोमट) पाणी हे औषधाप्रमाणे काम करते, म्हणजे अन्न सेवन त्यावेळी न करता तहान लागली की अल्प प्रमाणात कोमट पाणी प्यावे. अन्न पचले असताना पाणी प्याले की ते तृप्ती व बल प्रदान करते. भोजन समयी आपण अल्प प्रमाणात पाणी घेतले तर ते अमृताप्रमाणे कार्य करते. जेवताना कोमट पाण्याचा घोट जीभ स्वच्छ करण्यास मदत करतो व जीभेस नवीन रस ज्ञानासाठी तयार करतो. त्यामुळे पचन सोप्पे होते. भोजनाच्या अंती एकदम पाणी पिल्याने ते नीट पचत नाही परिणामी आम तयार होतो व तो विषसमान असतो.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी मध व गरम पाणी पितात. हे आयुर्वेदाला मुळीच मान्य नाही. पहिली गोष्ट अशी कि मध कधीच गरम करू नये, विष समान होतो तो. दुसरे अनेक वर्ष मध व कोमट पाणी घेऊन किती grams वजन कमी झाले याचा फेर विचार करून बघावा. तसेच बाहेरून आल्यावर हृदय गती स्थिर होई पर्यंत व शरीराचे तापमान सामान्य होईपर्यंत पाणी पिऊ नये.
अत्यम्बुपानात न विपच्यते अन्न निराम्बुपानाच्च स एव दोष:।
तस्मात नरो बहनीविवर्धनाय मुहूर्मुर्वारी पिबेदभुरि।।
अतिशय पाणी पिण्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, पाणी मुळीच न पिण्याने दोष निर्माण होतो. म्हणून थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे.( तहान लागली तरच)
आप महाभूताची योनी समुद्र आहे त्यामुळे पाणी नेहमी उताराने वाहते. त्यामुळे विशेषतः पायावर सूज येत असल्यास पाणी आवशक्यतेनुसारच पिणे. पृथ्वी, पाणी, आग, वायू व आकाश या ५ महाभूतांचा विचार केल्यास पाणी या महाभूताला अनन्य साधारण महत्व दिलेले आहे. अगदी आधुनिक अंतराळ मोहिमेत देखील पर ग्रहावर जीवसृष्ट्री शोधताना देखील त्या ग्रहावर पाणी आहे का ते शोधले जाते. कारण काही जिवाणू oxygen शिवाय पण राहू शकतात परंतु पाण्याशिवाय जगू शकतो असे पूर्ण ब्रम्हांडामधे कुणी असेल असे वाटत नाही. परंतु त्यासाठी पाणी अतिरिक्त घेणे कधीच योग्य नाही, म्हणूनच म्हणतात अति सर्वत्र वर्जयेत्....
आजन्म आयुर्वेद विद्यार्थी,
वैद्य स्वप्निल सुहास जोशी
पांचभौतिक चिकित्सक, सातारा.
vaidyaswapniljoshi@gmail.com