27/04/2020
🙏मी एक स्वपं पाहिले🙏
भिलाटीमध्ये आमच्या घरी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही आमचा दारू विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असू. गावातील लोक दारू पिण्यासाठी घरीच येत असत. ब-याच वेळेस आम्हा लहान मुलांना त्यांना चखणा वगैरे आणून द्यावे लागत असे.
माझी परीक्षा असली की साहजिकच मी ही कामं करायला तयार होत नसे, यावरून आमच्या एका गि-हाइकाने, तो-यात ‘जाय थोडं काम करीये, शिकसीन मोठा डाक्टर-कलेक्टर व्हनार शे’ असं हिणवून मला चखणा आणायला सांगितले. मी रडू लागलो, तेव्हा आईने त्या गि-हाइकाला सांगितले, ‘मना बी पो-या एक दिन डाक्टर-कलेक्टर हुई. तुम्ही चखणा आज दुस-या कडतीनं मांगडा, आनी याले अभ्यास करू द्या!.… डॉ. राजेंद्र भारूड (IAS)
धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा... याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात जन्म घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या... माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक म्हैस असा कुटुंबकबिला. भिलाटीमध्ये शिक्षण, शाळा याचा कित्येक वर्षे कुणाचाही दुरान्वये संबंध आला नव्हता. चुकून कधीतरी एखादा मुलगा फाटका सदरा आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मध्येच कळपातून चुकलेल्या वासरासारखा शाळेत जाताना दिसे, पण तेवढाच... त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशा परिस्थितीत मोठमाय आणि मायने शाळेत नाव घातले. तिथेच आयुष्याच्या बदलाला सुरुवात झाली. मावशी आणि आई निरक्षर असली तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले होते. कदाचित त्याचमुळे शाळेत पाठवण्याचा अट्टहास होता...
पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारी भिल्ल समाजातील माणसं... पोट नेईल तिथं जायचे. असेच पूर्वज कधीतरी सामोड्यामध्ये येऊन स्थिरावले... काही भिल्लांची स्वत:च्या मालकीची जमीन असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे शेवटी मजुरीसाठी परप्रांतात जावंच लागत असे. बहुतेककरून खान्देशातील भिल्ल गुजरातेत जात असत. बहुसंख्यांकडे ना स्वत:चा व्यवसाय ना शेतजमीन; रानावनात राहणारे मासे पकडणे अथवा दारू गाळणे हा व्यवसाय करीत . घरातील लहान-थोर सर्वच दारू पीत. त्यामुळे दारू हे व्यसन वाईट असून ते करू नये, असे सांगणारे घरात कुणीच नाही.
अशा वातावरणात वाढ. आईच्या पोटात असतानाच वडील गेले. गर्भपात करून घेण्यासाठी प्रचंड दबाव असताना आईच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणा-या मावशीने आईला आणि त्यांच्या सह दोन्ही भावंडांना तिच्या घरी आणले. सामोड्यामध्येदेखील अभिजनांची शाहू वस्ती होती. तेथील मुले शाळेत जात... शाळेमधली प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये गती होती. आता शाळेतील शिक्षक घरी येऊन प्रगती सांगत होते. प्रगती म्हणजे काय, हे जरी कळत नसलं तरी म काही तरी चांगलं करतोय आणि म्हणूनच शाळेतले शिक्षक घरी येताहेत, इतकंच मायला आणि मोठमायला कळत होतं.
दहावीत असतानाच, ब-याचशा मित्रांची लग्नं झाली होती. म्हणजे 15-16व्या वर्षीच मित्रांची लग्नं होऊन ते भिलाटीतील इतरांसारखे मजुरीवर जात होते. शाळा शिकाऊन पो-याला कोठे नोकरी लागाऊ शे? घर राही त पैसा तरी कमाई, असा साधारण सगळ्यांचा सूर होता. खरे तर त्या पालकांचे म्हणणे बरोबर होते. कारण गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावणे, ही त्या क्षणाची गरज होती.
अगदी मामा, काका यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. या सर्वांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे; तर अज्ञान होतं, असंच मल वाटतं. कदाचित हेच मायला आणि मोठमायला कळलं होतं आणि म्हणूनच गावातल्या शाळेतून नंतर ‘नवोदय’ या अक्कलकुव्याच्या शाळेत शिक्षकाच्या आग्रहाखातर पाठवले. आयुष्यात सुदैवाने चांगली माणसे आली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा, असं मनात होतं. कारण गणितामध्ये चांगले मार्क मिळत होते. परंतु इंजिनिअर झालास तर केवळ तुझा आणि तुझ्या कुटुंबीयांचाच फायदा होईल; आणि डॉक्टर झालास तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. शिवाय डॉक्टर झाल्यानंतर प्रशासक झालास तर अधिक व्यापक प्रमाणात लोकसेवा करता येईल, हे देवरे सरांनी समजावून सांगितले... जी. एस. मेडिकलसारख्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. सामोड्यातील नवोदयसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये कधी जातीवरून क्षमता जोखली गेली नव्हती. मात्र मुंबईसारख्या आधुनिक विचारांच्या शहरामध्ये असा अनुभव आला. ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेला एक आदिवासी मुलगा उत्तम गुणांनी डॉक्टर झाला होता. ज्या ‘केईएम’मध्ये सुरुवातीला तुच्छतेची वागणूक मिळाली होती, त्याच ‘के ईएम’मध्ये ‘बेस्ट स्टुडंट अवॉर्ड’ मिळवून स्वत:ला सिद्ध केले. त्या वेळच्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन समाजाची सेवा करणार असल्याचे सांगितले होते. पहिल्या प्रयत्नात ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली होती; परंतु ‘आयएएस’ बनण्याचे ध्येय पक्के असल्याने पुन्हा एकदा प्रयत्न करून 2012मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि अखेर आयएएस झाले... एक ध्येय गाठले...
मित्रांनो मी एक स्वप्न पाहीलं!
जरूर वाचा..